Tuesday, 14 March 2017

सायं दै बीड रिपोर्टर होळी विशेष
बुरा ना मानो होली है ....

गणेश सावंत 
 


मईत वाघ्या मुरळीचं जमलं... कमळाबाईने बिनबोभाटपणे वाघ्याशी लगिन लावलं... ऐका हो ऐका.. बीड जिल्ह्याच्या माय बापा... इथं वाचवा हो..ऽ चा आवाज देतायत काका... घसा पडलाय सुखा... नगर पालिकेत बसलाय ठोका... परळीत धनुभाऊचा घेतलाय मुका... बाबाच्या लेकीचा घसा पार पडलाय सुखा... माजलगावात प्रकाशदादांना आलाय मोका... आष्टीत 'धस'कट उपटा... गेवराईत बदामचा एक्का अन् मारतोय चौका... आता एवढंच ऐकत बसा... 

 

 

लोकाहो पुढार्‍यांना नाही येणार तुमचा पुळका... दवंडीवाला दवंडी देत निघाला होता. त्याची आरोळी ऐकून चहाच्या हॉटेलात बसलेल्या तात्यांनी त्याला बोलावलं. आरं ये... ऐकतोस का? ये दवंडीवाल्या... आरं ये बेण्या... तसा दवंडीवाला रागात जाग्यावर थांबाल. मागं न पाहताच त्यानं दोन तीन शिव्या हासाडल्या अन् मागं परतून तात्याच्या दिशेने तो निघाला. दवंडीवाला रागात होता, कोणत्या थेरड्याने आवाज दिला. त्याला बघतोच म्हणत तो तात्याच्या हॉटेलाकडे निघाला. दवंडीवाल्याचा चेहरा लालीलाल झाला होता. पण पहातू तर काय त्याच्या बापाचा मैतूर निघाला तात्या तरीही दवंडीवाला तात्याला म्हणाला, बेणं कुणाला म्हणताय तात्या. कायबी नावानं हाक मारताय राव. मी धर्म्याचा धाकला लेक हाय नाम्या. आता बोला कशाला बोलवलं. दवंडीवाल्याचा तो रुद्र अवतार पाहून तात्याचा आवाज थोडा मवाळ झाला. नामदेवा लामचं दिसत नाही रं कोणाची दवंडी हाय आणि कशाची आरोळी देतोस लेका. तेव्हा दवंडीवाला म्हणाला अवं तात्या अवंदा दुष्काळ बिष्काळ सगळं इसारल्याती लोक. पाणी हाय पण लाईट नाय, बँकात पैका हाय पण खिशात दाणा नाय. शेतात माल हाय पण बाजारात भाव नाय. गावात पुढारी हाय पण त्याच्या दारात देणेकरी हायत. निवडून दिलेले पण फरारी हायत. आरं रं... नाम्या थांब थांब काय म्हणतूस कायबी कळत. अच्छे दिन हायत लेका. इथं कशाची कमी नाही. नाम्या म्हणतो, तात्या तुम्हासनी डॉक्टरला दाखवावं लागतयं कायकी. तात्या म्हणतो, कारं काय झालं मी तर धडधाकट हाय. नाम्या म्हणतो, तात्या तुम्ही 'नमो रुग्ण' झालात. हा रोग दिसत नाही. थेट सरणावर गेल्यावरच कळतयं. यावर तात्या गालात हासले अन् म्हणाले, जावू दे रे आता काय पिकलं पान गळणारच. तेवढ्यात एफएमवर गाणं लागलं. 'वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं' नाम्या हासला अन् तात्याला उद्देशून म्हणााल 'पिकल्या पानाचा देठ की वो फिरवा' तसा तात्या उसळला अन् ये धरम्याच्या बेण्या निट सांग कसली दवंडी. नाम्या म्हणाला तात्या आता झेडपीचं इलेक्शन झालंय न्हवं. त्यात कधी नाही तेवढा गुलाल तिकडं माजलगावच्या ढेपीला लागलाय अन् प्रकाशदादा म्हणून तर धुरवडीची पार्टी देतायत. कारखान्याच्या गेस्टहाऊसवर पार्टी ठेवलीय. सगळेच येणार हायत. चपटी बोटी, हातभट्टी, देशी-विदेशी, विलायती, थंडाई, घोटा सरवाची सरभसाई आहे. खायला प्यायला मनसोक्त हाय अन् जास्त झालीच तर उशाला तळ हाय. असं म्हणत दवंडीवाला निघून गेला. तात्या आपल्या जवानीतले दिवसं आठवू लागले. खिशातली बिडी काढली, शिलगावली झुरका मारला अन् भोसडीच्या म्हणत तात्या निघून गेले. तसा मी लांबून या दोघांचं संभाषण रजनीगंधा चोळत ऐकत होतो. म्हटलं चला उद्या काही तरी भन्नाट बातमी भेटणार असं म्हणत घरी गेलो.

आज जरा भल्या सकाळीच उठलो. अंघोळ केली, होळी पेटवली, तिच्यासमोर दोन दोन हातांनी बोंब ठोकली. पुरणपोळी खाल्ली अन् निघालो पार्टीचं ठिकाण पहायला. आण्णाभाऊ साठे चौकात जसाच मी आलो तसं समोर पोलिसांच्या गाड्या फिरतांनी दिसल्या. तेवड्यात कानावर आचरट विचरट आवाजही धडकू लागले. होळीसाठी लाकडं पळवणारे कारटे बोंब ठोकत होते. त्यांनी मला पाहितलं अन् बोंबलायला लागले- 'होळी रं होळी पुरणाची पोळी, पोलीसवाल्याच्या गाडीत बंदूकीची गोळी' बरं झालं गाडीत हा शब्द नाकातून बोलले असते तर दुसरंच ऐकायला आलं असतं. त्यातला एक पुढं म्हणाला 'पुरणाची पोळी, गुळाचं गुळवणी बदामच्या एक्क्यानं राजांना पाजलं पाणी' दुसरा लगेच पुढे आला अन् म्हणू लागला. शिवछत्र त्यातले आम्ही राजे, का कुणास ठावूक आमचेच वाजतायत बाजे हे ऐकून मी म्हटलं माजलगावला गेलेलं बरं. पुढं निघालो तेवढ्यात संदीपसेनेची बोंब कानावर आली. काका वाचवा होऽ चा जमाना बाद झाला. हरलेल्या काकांचा फकूस्त एक गडी आला. मी म्हटलं अरे बाप रे हे कारटे तर आग लावायला बसलेत मग शेपटी यांची असो अथवा इकडून तिकडं उड्या मारणार्‍या माकडांची आग तर लागणारच ना! म्हणून म्हटलं चला पुढं अन् आलो एसटी स्टॅण्डवर बसमध्ये बसलो गाडी माजलगावच्या दिशेने सुसाट निघाली पण वाटेत कारटे बोंब ठोकतच होते. फेकूच्या अच्छे दिनवर 'नमो रुग्ण' फिदा, देवेंद्रच्या गाजरावर हासतायत खदा खदा ही बोंब होते न होते तोच गुळाची चक्की सेल्फीत दिसली. काम वाली बाई निवडणूकीत हिरमुसली. गाडी तशी बीडाच्या बाहेर निघाली. बार्शी नाक्यावर काही कारटे म्हणत होते होळी रं होळी पुरणाची पोळी, पुढार्‍यांच्या हातात दुष्काळग्रस्तांसाठी रिकामी झोळी. तर कोणी 'बोंबला रे बोंबला, पुढार्‍यांना खाली लोंबवा' म्हणत बोंब ठोकत होते. तर कुणी पुढारी तसे चांगले, लोकांनी वेशीला टांगले, मतांसाठी घेती पैसा अन् निवडून आल्यावर खायला मागती डोसा अशा एक न् अनेक आचरट विचरट घोषणा ऐकून माझे कान किट्ट झाले होते. कवा एकदाचं कारखान्यावर जातोय असं झालं होतं. जसाच मी कारखान्यावर आलो-समोरचे दृष्ट पाहितले अन् तोंडातून अब्बा बब्बा ..ऽ काय तो थाट.. पार्टीसाठी काय तो शामीना सजविला होता. शामीन्यामधल्या टेबलावर चपटी बोटी हातभट्टी, देशी-विदेशी, थंडाई अन् घोटा दिसून येत होता. दिवस मावळतीला गेला मी माझी जागा हेरून ठेवली. उद्या धुरवड हाय म्हणून आज कारखान्यावरच मुक्काम ठोकला. सकाळी लवकर उठलो. फुकटाचा नाष्टा केला अन् गेलो पार्टीच्या शामीयानाकडे-पाहतो तर काय पार्टीची जोरदार तयारी सुरू होती. नौकर चाकर राब राबत होते. दादांचे हौसे गौसे अन् चमचे पळापळ करत होते. पार्टीचं 'शिल' जपावं म्हणून कोणी 'धैर्य' ठेवत होतं. तर 'जया'चा 'सिंह' गर्जना करत होता. आधी आयोजक येतील असं वाटत असतांनाच धुरोळा उडवत एक गाडी आली, शामीयानासमोर थांबली पाहतो तर काय दाडीवाला जिजा सगळ्यांच्या आधी तिथं आला. मी म्हटलं नाही तरी आरटी जिजा आमदारकी सांभाळण्यापेक्षा दादांनाच सांभाळून घेतायत म्हणून आज पार्टी सांभाळायला दादांनीच पाठवलं की काय? तेवड्यात रुबाबात गाडी शामीयानाकडे येत होती.जो तो वाकून नमस्कार घालत होता, म्हटलं नक्कीच प्रकाशदादा असणार. दादा गाडीतून उतरले, पाहणी केली अन् अवजड वाहनालगत आत जावून बसले. कालच्या जिल्हा परिषदेत नववारी नेसलेला गडी तसा भारदस्तच ना तेवढ्यात गेवराईचे ताडासारखे मासांपेक्षा हाडाचे राष्ट्रवादी आमदार आले. कोण म्हणताय म्हणून काय विचारता राव अहो अमरसिंह आले तसे ते दादांच्या काफील्यात जावून बसले. दोघांची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात आष्टीतून सिनेमावाला नायक म्हणा,खलनायक म्हणा अथवा पहेलवान म्हणा डोक्याला काळा गॉगल लावून पार्टीस्थळी आले आता कुठं आरटी जिजांना बरं वाटलं. आपल्या पक्तीचा माणूस आला म्हणून तेवढ्यात आपबिती सांगण्यासाठी, 'धस'मुसळले ही तेथे आले. संगीताताई, प्रितमताई पाठोपाठ येतच होत्या. तेवढ्यात पंडीतमुक्तीचा नारा कानावर पडला. म्हटलं लक्ष्मणशक्तीला झेडपीची संजीवनी मिळाली. हा विचार करत असतांनाच बदामचा एक्का मोठ्या तोर्‍यात गाडीत दिसला. आबा तसेच गाडीच्या खाली उतरले तसे चौका मारावा तसा हाव भाव आधीच्या पाहुण्यांसमोर केला तेवढ्यात मराठ्यांची मोठ बांधता बांधता संघटनेची मोठ बांधणारे मेटे येवून धडकले. सर्वांचा राम राम शाम शाम झाला. तेवड्यात तरणं ताठं पोर एका गाडीतून आलेलं दिसलं. हिरो सारखं होतं ते, म्हटलं एखादा परशा आला की काय? पण तो होता आपला संदीपभैय्या. आता सगळेच आले होते. पण पार्टी सुरू झाली नव्हती. कारण कळीचे आणि मानाचे येयचे राहिले होते. तेवढ्यात सायरण वाजलं अन् पंकजाताई आल्याचा सांगावा जणू मिळाला. त्या पाठोपाठ जयदत्त अण्णाही आले. ते गाडीतून उतरतात की नाही तेवड्यात दुसरा सायरण वाजला अन् धनूभाऊ पोहचल्याची नोंद शामियानात झाली. इकडे सुर्य पार डोक्यावर आला होता. सर्व आमंत्रित शामियानात गेले. कोणी गिलासं भरून घेतले. तर कुणी हातात तांबे घेतले. तर कोणी बाटल्या घेवून चिअर्स केलं. रंगांची उधळणं झाली. पिचकार्‍या उडाल्या. कोण कोणाला काय लावतोय हे पाहत असतांना मेटे, बदामराव अन् संदीपभैय्यांच्या हातात कलरबरोबर बुक्काही दिसला. तर जेष्ठातले काही इशाराबाजी करताना दिसून आले. देशी, विदेशी, चपटी, बोटी, रम थंडाई हातभट्टी अन् घोटा जसाच घशाच्या खाली उतरला तशी सर्वांनाच आठवण झाली ती गाण्याच्या भेंड्यांची पण आधी कोण म्हणणार या बाबत एकमत होत असतांनाच केजच्या संगीताताई गुणगुणतांना दिसून आल्या. त्या उठल्या अन् म्हणू लागल्या,

केजच्या मळ्यावर कोण गं उभी
राखण करते मी आमदारकीची
इश्यऽ मला नाही येत बाई याच्यापुढं

असं म्हणत त्या खाली बसल्या. आता प्रितमताई उठल्या अन् ताईकडं पाहून म्हणू लागल्या.
कोई जब तुम्हाला हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तूम मेरे पास आणा प्रिये
मेरा सर झुका है झूकाही रहेगा

 
असा दर्दभरा नगमा पेश करून प्रितमताईंनी पंकजाताईंसमोर आपली वस्तूस्थिती मांडली. तशी दोन्ही बहिणींच्या डोळ्यांचे काट भरून आले. पंकजाताई भावूक झाल्या. हलकी पण कौतूकाची स्माईल देत त्या प्रितमताईकडे पाहतांना दिसून आल्या. वातावरण शांत झालं होतं. तेवड्यात पंकजाताईंनी गाणं म्हणायचा निर्णय घेतला अन् त्यांनी सूर आवळला-
बाबांचा आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भिती
परळीत काम करूनही
जिंकली द्वाडाची नाती
राजीनाम्याची देते मी चिठ्ठी
आमचेच वाजवतायत
आमच्या नावाने शिट्टी

ताईसाहेबांचे धगधगते गीत कानावर पडल्यावर अनेकांचे कान टवकारले. तसे विनायक मेटे उभा राहिले. अन् वरच्या पट्टीत त्यांनी सुर लावला.
शिट्टी वाजली गाडी सूटली
झेंडा राहिलाय वर
भाजपाच्या दांड्याला नाही घोर
मेटेंच्या नावाचा लई जोर शोर

असं आनंद मिलींद शिंदेंच्या तोर्‍यात गात मेटेंनी आपली शिट्टी गाजवली. तसे गेवराईचे चौके मारणारे अन् आता एक्का ठरू पाहणारे बदामराव उठले अन् म्हणू लागले.

काल रातीला सपान पडलं
सपनात आलं अन् मी बावरले
जयदत्तआण्णांनी सरळ सरळ
राष्ट्रवादीला पाठींबा देण्यासाठी खुनवले

 
गाणं गाता गाता या भोळ्या शंकरानं घोट्याशी इमान राखलं तेवड्यात लक्ष्मण पवार उठले, पंडितमुक्तीचे नारे देत सुटले. त्यांचा आवेश पाहून ताईंनी त्यांना खाली बसण्याचे इशारे केले. लक्ष्मणआण्णा बसताच आरटी जिजा उठले अन् म्हणू लागले-
ताई बाई आक्का
विचार केलाय पक्का
प्रकाशदादांनी लावलाय बुक्का
तुम्ही दिला मला आमदारकीचा मौका
मी होतोय त्यांचा सक्का

जिजांच्या गाण्यावर ताईंना हासावं की रडावं असं झालं असतांनाच भिमराव धोंडे उठले अन् सिनेमातल्या हिरोसारखे ओठ हालवत सुटले. काहीच ऐकू येत नसल्याची ओरड झाल्यावर धोंडे म्हणाले-
सिनेमात नुसते ओठच हालवत असतात, गाणं दुसरेच गातात असं म्हणताच धस खदा खदा हासले अन् गाणं म्हणायला उठले.
कधी काळचा मी धसकट
लोकांनी केलंय आज कसपट
काड्या करून अरं काड्या करून
माझ्याच लोकांना मी करतो चितपट

धसांचं सक्त वचन ऐकून अमरसिंहांना उमाळा फुटला अन् ते शाहीरी अंदाजात गावू लागेल.

डफावर हात तुणतुण्याचा

झेडपी हा राष्ट्रवादीचा प्राण

शिवछत्रचा अमर हा गातो

पवार साहेबांचा गुणगान हो हो

अमरसिंहांची राष्ट्रवादी भक्तीने धनुभाऊंनी टाळ्यांचा कडकडाट केला तर धोरल्या घराने नाक मुरडलं. तसे वयाने सर्वात लहान असलेले संदीपभैय्या उठले, आता हा काय गातोय याचे कोडे सर्वांनाच पडले. संदीपभैय्या गाऊ लागले.
काका मला वाचवा हो ची गुहार
गेली की हो काळाच्या पडद्याआड
न.प.त टाकलीया धाड
झेडपीत पुतण्याची मांड

हे गाणं आहे की कोडं कोणाला सुटण्याऐवजी जो तो पुढचा गडी कोण याकडे लक्ष देत असतांनाच जयदत्तआण्णा उठले अन् म्हणू लागले.

कसमे वादे प्यार वफा

सब बाते है बातो का क्या

कोई किसीका नही यहापे

सब नाते है नातो का क्या?

आण्णांच्या या गाण्यावर टाळ्या वाजल्या खर्‍या पण आखडता हात घेवून. आता उठले धनूभाऊ अन् गाऊ लागले,

जब जब दुनिया में अहंकार बढता है

इमोशनल ब्लॅकमेलिंग होती है

तब तब हमारे जैसे

काकाके उगली की सौगंध लेते है और चल पडते है कामयाबी की तरफ और बोलते है हमे चिर दो यारो ये जो खून है वो आपकाही है. धनुभाऊच्या डायलॉगबाजीने सभागृह शामियानामधला शांत झाला. तसे नववारीतले प्रकाशदादा उठले.
अन् म्हणू लागले.

नववारीतलाबी दादा असं म्हणत दादांनी एका वाक्यात झेडपीची ताकद आपल्या पाठीशी आहे हे दाखवून गाण्याच्या भेंड्यांना पुर्णविराम दिला. आता दिस मावळतीला गेला होता. पोटात चपटी बोटी हातभट्टी देशी विदेशीने कल्लोळ माजविला होता. पोटात आग पडली होती. जो तो भुक भुक करत होता. सर्वांनी भोजनावर ताव मारला. संध्याकाळ झाली. अन् परंपरेनुसार भारनियमनाची वेळ आली, लाईट गेली. अंधारात कुठं काय काय झालं ते मात्र नाही कळालं.