Sunday, 25 June 2017

होय शिवाजीराजे कुळवाडी भूषणच

...त्यांची हिरोईन 

बहुजनाची ती नाची

गणेश सावंत 

-९४२२७४२८१०

अफजल खानाचा खातमा केल्यानंतर शिवरायांनी त्याचे थडगे बांधले आणि त्याच्या कुटुंबियाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली, दिवाबत्तीची सोय केली, मात्र हीच उदारता शिवरायांनी त्याचवेळी मुडदा पाडलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णी किंवा त्याच्या कुटुंबियाबद्दल दाखविली नाही, असा एक मॅसेज गेल्या चार दिवसांपासून सोशल नेटवर्किंग मीडियावर जबरदस्त फिरतोय. या मॅसेजने गोब्राह्मण प्रतिपालक आणि कुळवाडीभूषण यामधले सत्य जसे कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचाच नव्हे तर जीवन रथाचा सारथी झालेल्या श्रीकृष्णाने हा सूर्य आणि हा जयद्रत जसा दाखवला तसाच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणणार्‍या आणि खोटा इतिहास ठासून-ठासून सांगणार्‍या तथाकथीत बुद्धीजीविंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खोटा इतिहास लिहिण्यात आला, सांगण्यात आला, पसरविण्यात आला हे त्रिकाल सत्य नाकारता येणार नाही. तो इतिहास कसा खोटा होता हे पुराव्यानिशी सांगण्याचं धाडस गेल्या पाच दशकांमध्ये नव्या इतिहासकारांकडून दाखवण्यात येतं. जेंव्हापासून खरा आणि खरा इतिहास महाराष्ट्राच्या मातीला नव्हे तर अवघ्या जगाला माहित होऊ लागला तेव्हापासून शिवाजीराजांना आपल्या खोट्या इतिहासात बंदिस्त करू पाहणार्‍यांचा तिळपापड झाला. राजांचा इतिहास हा सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे. राजेंचं कर्तव्य-कर्म हे अखंड मानव जातीच्या उद्धाराकरिता आहे. कुठल्या एका जातीसाठी, धर्मासाठी अथवा पंथासाठी राजेंनी कर्तव्य-कर्म केलं नाही. त्यांनी कर्तव्य-कर्म केलं ते समाज जिवनाला एकसंघ ठेवण्यासाठी. माणसाला माणूस म्हणून कसं राहता येईल एवढ्यासाठीच. परंतु जाणीवपूर्वक छत्रपतींचा इतिहास अत्यंत दंतकथेप्रमाणे लिहून राजेंना खुजं करण्याचं जे धोरण बुद्धिजीविंनी आखलं त्या धोरणाच्या अक्षरश: चिंधड्या आता खर्‍या इतिहासातून होताना दिसून येतात, म्हणूनच जेंव्हा केव्हा राजेंच्या बाबत एखादा महत्त्वाचा व्यक्ती बोलतो तेव्हा तेव्हा राजेंचा विषय बाहेर काढून कुठं त्याला धार्मिकतेची झालर तर कुठं हिंदुत्वाची मोहर लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. गोब्राह्मण प्रतिपालक राजे होते, असा खोटा इतिहास पसरवून पुन्हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांच्या खांद्यावर धार्मिक दहशतवादाच्या बंदुका लावून आपली पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयास आणि खटाटोप अद्यापही सुरू असल्याचे यावरून पुन्हा एकदा उघडपणे स्पष्ट होते. राजेंना स्वराज्य निर्माण करताना शत्रुंकडून जेवढे संकटे आले नसतील तेवढे संकटे आप्तस्वकियांकडून आल्याचे उघड आहे. मग या आप्तस्वकियांमध्ये राजेंचे सगेसोयरे अन् त्यांना केवळ कुणबियांचा आहे म्हणून राजे म्हणून न स्वीकारणारे त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे त्यामध्ये होते. राजेंचा इतिहास एका जातीसाठी मर्यादित नसल्याने महात्मा ज्योतिबा फुलेंनी राजेंबाबत गौरवोद्गार काढताना

कुळवाडीभूषण

असे म्हटले आहे. रयतेचे राजे, स्वराज्याचे राजे आणि सत्याला धरून चालणारे शिवबा अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहेत, परंतु ते कुठल्या एका जाती-धर्माला राजकारभार करणारे राजे परिचीत नसताना त्यांना आणि त्यांच्या इतिहासाला धर्मांधतेची झालर जी लावली जातेय तीच मुळात या महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रात निपजलेल्यांच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी अत्यंत घातक म्हणावी लागेल. रायगडावर जावून महात्मा फुलेंनी राजेंची समाधी शोधून काढली मात्र तेंव्हाही फुलेंना विरोध झाला हे उघड सत्य याच काल-आजच्या शतकातले कोल्हापुरात शाहू महाराजांना छळणारे आणि त्यांच्या मृत्यूनंतर पेढे वाटणारे याच महाराष्ट्रात दुर्दैवाने निपजले हेही सत्य उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र असे असतानाही रयतेच्या राजाला आणि कुळवाडी भूषण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक आहेत म्हणून दाखवण्याचा प्रयास आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये यशस्वी होईलच हे सांगणे कठीण म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना एक अंगी दाखवण्याचा प्रयास करणारे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते हे काही वर्षांपूर्वी सांगून टाकलं आहे. परंतु अशा स्थितीतही एकअंगी इतिहास लिहिणार्‍या तथाकथीत इतिहासकारांच्या पुस्तकातून दाखले देत आजही गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजीराजे होते हे दाखवण्याचा खटाटोप ज्यांच्याकडून होतो तो हास्यास्पद म्हणावा लागेल. खरं पाहिलं तर शिवाजी महाराजांची दृष्टी, युक्ती आणि शक्ती ही जो आत्मसात करू शकला, शिवाजी राजेंची निती जो खर्‍या इतिहासातून उमजू शकला त्यालाच छत्रपती शिवाजी महाराज समजू शकले, परंतु सोळाव्या शतकापासून शिक्षणाबरोबर अन्य क्षेत्रातही मागं ठेवत जात-पात-धर्म-पंथाच्या आधारे बहुजनांना कामे वाटणार्‍यांनी कधीही बहुजनातल्या लेकरांना विकसित दृष्ट्या याची देही याची डोळा पाहण्याचं साहस आणि धाडस ठेवलं नाही. बहुजनातली एखादी पोरगी चांगली नाचत असेल, तिच्या अंगात कला असेल ती सरस्वतीची भक्त असेल, नटराज तिच्या अंगात असेल तरीही ती नाची म्हणून ओळखली जाते, परंतु तथाकथीत उच्चवर्णीयांची पोरगी टिचभर कपड्यात नाचली तर ती हिराईन म्हणून मिरवते. हेच धोरण काल होतं, आज आहे आणि उद्याही राहु पाहतय. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मानसिकतेचं ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल. त्यांनी केलं तर ते सर्वश्रेष्ठ. त्यांनी वेद, अलंकार म्हटले तर ती दैवी शक्ती आणि जगद्गुरू संत तुकोबांनी अभंग लिहिले, वेद म्हटले, अलंकार केले तर तो कुणबट ही जी महाराष्ट्रातील तथाकथीत बुद्धिजीविंची मानसिकता ती आधी सर्वस्तरातून ठेचली गेली पाहिजे तेव्हा कुठं गोब्राह्मण प्रतिपालक आणि कुळवाडीभूषण अशा बिरुदावलींवर चर्चा होणार नाही अथवा खोटा इतिहास थोपण्याचे कोणी धाडस करणार नाही. जेंव्हा केव्हा एखादा व्यक्ती सत्य बोलायला जातो आणि त्याच्या बोलातून सत्यतेचे प्रमाणपत्र मिळू शकते असं जेंव्हा तथाकथीत बुद्धिजीविंनी वाटतं तेव्हा त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करण्याचं धोरण या महाराष्ट्राला सोळाव्या नव्हे तर बाराव्या शतकापासून माहित आहे. काल-परवा 

शरद पवार बोलले, 

अबाऽबाऽऽऽ अवघ्या महाराष्ट्रातल्या तथकथीत बुद्धिजीविंना अशा काही मिर्च्या लागल्या, बुडाखालून असा काही धूर निघू लागला की जणू शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून टाकलाय आणि हो, हा पॅराग्राफ पुर्ण लिहिण्याअगोदर आम्ही स्पष्टपणे बजावून सांगतो, इथं पवारांची बाजू घेण्याचा आमचा कसलाच प्रयत्न नाही, आम्ही बोलतोय ते फक्त आणि फक्त कुळवाडीभूषण विरुद्ध गोब्राह्मण प्रतिपालक या विषयावर. शरद पवार बोलले ते काय चूक बोलले, श्रीमंत कोकाटे या इतिहासकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यावेळी होत होते. श्रीमंत कोकाटे हे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आले आहेत. राजे हे मुस्लिम द्वेष्टे नव्हते हे कोकाटे सांगत आले आहेत, तसे पुरावे देत आले आहेत. त्या लेखकाचं पुस्तक प्रकाशीत होणार होतं त्यावेळी येणारा जो श्रोतेगण होता तो शिवाजी महाराजांचा मावळा आणि तुकोबांचा सच्चा भक्त होता. त्यांच्यासमोर शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, ते मुसलमानांचे विरोधक नव्हते हे सत्य बोल बोलले, त्यात अनेकांना असं काही दिसून आलं, पवार आताच का बोलले? ते बोलले म्हणजे महाराष्ट्रात काही तरी होणार? त्यांच्या बोलण्यामागं कुठला तरी उद्देश असतो, आता पवारांनी इतिहास संशोधनकारांवर इतिहास लिहिवा, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया लिहून पवारांनी शिवाजी महाराजांवर बोलून जणू काही अपराध केलाय, असं चित्र रंगवण्याचा प्रयास करण्यात आला. अत्यंत केविलवाणा आणि मूळ विषयाला सोडून प्रतिक्रिया देणारा हा प्रयत्न राहिला. खरं तर यावर आम्हाला भाष्य करायचं नव्हतं परंतु बीड जिल्ह्यातील वाचकांनी यावर खासकरून आपण लिहावं, अशी मागणी केली. म्हणून आम्ही आमची भूमिका याठिकाणी स्पष्टपणे मांडली. कारण आम्हाला कुणी कितीही प्रवाहात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला तरी आम्ही मात्र छत्रपती नेमके कसे होते हे स्वत: उमजून घेऊन मांडण्याचा अत्यंत कणाऐवढा प्रयत्न करीत आहोत आणि यापुढेही करीत राहु. परंतु महाराष्ट्रात आज मितीला थोर समाजसुधारक, संत महात्मे यांच्या विषयावरून जात-पात-धर्म-पंथाचं जे विष कालवण्यात येत आहे ते महाराष्ट्राच्या भविष्याला, भवितव्याला घातक असणारा आहे. म्हणून या त्रिखंडातील कर्त्याला आमचं एवढच मागणं असेल, तथाकथीत बुद्धिजीविंपासून महाराष्ट्रात निपजलेल्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दृष्टी दे, युक्ती दे अन् शक्ती दे.


साय दै .बीड रिपोर्टर मधील आज दि. २५ जून रविवार अग्रलेख