Tuesday, 12 December 2017

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज १२ डिसेंबर गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अग्रलेख 

नैनं छिदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक: |
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥

दखलबाज गोपीनाथराव


विशेष संपादकिय...

- गणेश सावंत -9422742810

गोपीनाथ पांडुरंग मुंडे या नावाच्या देहाला काळाने आमच्यातून हिरावून घेतलं. ज्या देहात धैर्य होतं, ज्या देहाने कायम संघर्ष अनुभवला, जो देह सत्यासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढला. ज्या देहाने आपलं उभं आयुष्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह ऊसताड कामगारांच्या हक्कासाठी चंदनासारखं झिजवलं, ज्या देहाकडे आणि त्याच्या कर्तृत्व-कर्माकडे पाहितल्यानंतर विजयी पताका घेऊन साक्षात काळालाही या देहाच्या विजयी मिरवणुकीमध्ये नाचण्याचा मोह आवरत नव्हता. तोच देह आमच्यातून ईहीलोकी नेण्याचे धाडस म्हणणार नाही आम्ही, पातक काळाने केले. काळाला गोपीनाथ मुंडे नावाच्या नरदेहाची बहुदा ईर्ष्या झाली असावी. त्यांच्या संघर्ष आणि कर्तृत्व-कर्मातून जे निर्माण होते ते निर्भय असते आणि हेच निर्भय पुढे काळालाही भिणार नाहीत, म्हणून आणि म्हणूनच काळाने गोपीनाथ पांडुरंग मुंडे नावाच्या नरदेहाला गेल्या तीन वर्षांपूर्वी भूतलावरून आपल्या सोबत नेलं. गोपीनाथ मुंडेंचा देह पृथ्वीतलावर नसेल, गोपीनाथ मुंडेंचा आवाज कानी पडत नसेल परंतु गोपीनाथ मुंडेंच्या कर्तृत्व-कर्माचा फुलांचा सडा बीड जिल्हावासियांच्या दारासमोरच नव्हे महाराष्ट्राच्या तमाम वंचितांच्या दारासमोर आजही पडलेला आहे आणि त्या फुलांचा सुगंध जेव्हा जेव्हा दरवळतो, तेव्हा तेव्हा गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असं वाटतं, साहेब इथच आहेत, आज संध्याकाळी सात वाजता त्यांचं भाषण आहे, परंतु ते नऊ वाजेपर्यंत येतील आणि व्यासपीठावरून भाषण करतील. कुठे हसी मजाक असेल, तर कुठे सर्वसामान्यांसाठी सरकारला धारेवर धरण्याची भाषा असेल. म्हणूनचसाहेब आपल्यात नसले तरी गोपीनाथ मुंडे म्हणजे नैनं छिदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक: |न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥या ओळींचा भावार्थ अशा कर्तृत्व-कर्माने मोठे असलेल्या संघषमय देहाच्या आत्म्याला कुठलंही शस्त्र कापू शकत नाही. कितीही मोठी आग या आत्म्याला जाळू शकत नाही. नदीचं पाणी सोडा सागराचं पाणी अथवा ढगफुटीही या देहाला भिजवू शकत नाही. कितीही मोठं वादळ येऊद्या, वायू या देहाला वाळवू शकत नाही. असे वर्णन गोपीनाथरावांचं केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण साहेब म्हणजे दखलबाज गोपीनाथराव गोपीनाथ मुंडेंच्या गेल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत किमान दोन दशकाचे आम्ही याची देही याची डोळा साक्षीदार आहोत. जेव्हा सायकलवर बसून प्रचार करणारे आणि पक्षाची विचारसरणी घराघरात पोहचविणारे गोपीनाथराव हेलिकॉप्टरमध्ये बसून पक्षाचा आणि पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करताना आम्ही याची देही याची डोळा पाहितलं आहे. गोपीनाथरावांची राजकीय कारकिर्द ही संघर्षमय आहे. हे सांगायला कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही कारण महाराष्ट्राच्या मातीत जेंव्हा जेंव्हा क्रांत्या झाल्या, ज्यांनी-ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहितले त्यांच्या नशिबी संघर्ष हा आलाच. विसाव्या-एकविसाव्या माहिती तंत्रज्ञानाच्या शतकात गोपीनाथरावांचा संघर्ष जणू सोळाव्या शतकातल्या संत-महात्म्यांबरोबर समाज सुधारकांसारखा दिसून आला. सत्यासाठी-न्यायासाठी, कष्टकरी, कामगार आणि दिनदुबळ्यांसाठी साहेबांचा जिव जसा तुटायचा तसा आजमितीला महाराष्ट्रातल्या भाजपातील अन्य नेत्यांचा तुटतोच हे सांगणे कठीण आहे. कारण जसा संघर्ष रक्तात असायला हवा, जशी न्याय देण्याची उर्मी आणि दिनदुबळे -वंचितांशी प्रेम, प्रेमाची उब देण्याची किमया काही लोकांमध्येच असते आणि ती गोपीनाथरावांमध्ये होती. म्हणूनच ते दखलबाज गोपीनाथराव होते. किरकोळातील किरकोळ गोष्टीची दखल घेणे आणि संबंधितांना न्याय मिळवून देणे ही जी गोपीनाथरावांची भूमिका होती ती भूमिका पाहून आम्ही थेट कुरुक्षेत्रावर जातो. अरे, ज्या अर्जुनाच्या रथाचा सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण होता तरीही अर्जुन कुरुक्षेत्रावर आल्यानंतर समोरचे आप्तस्वकिय पाहून ‘अर्जुनाने सिद्धांत ममगात्राणि मुखश्‍च परशिष्यती’ झाल्याचे सांगितले. समोरचे आप्तस्वकिय पाहून माझे हातपाय गळतायत, युद्ध कशासाठी करायचे, सत्तेसाठी-पैशासाठी? असा सवाल उपस्थित करून हात-पाय गळणारा अर्जुन आपल्या कर्तव्य-कर्माला बगल देताना आम्ही ग्रंथात वाचला परंतु स्वराज्यासाठी आणि सत्यासाठी आप्तस्वकिय आडवे आले तरी त्यांना आडवं करण्याचं काम याच महाराष्ट्रातल्या मातीत राजे शिवछत्रपतींनी केलं. ‘स्वराज्य हा माझा धर्म आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला माणूस हा स्वराज्याचा पाईक आहे,’ याची शिकवण छत्रपती शिवाजी राजेंनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखं कर्तव्य-कर्माला बगल दिली नाही तर आपले कर्तव्य-कर्म पुर्णत्वाकडे नेले आणि महाराष्ट्रावर भगवी पताका फडकावली. गोपीनाथ मुंडेंनीही आपल्या उभ्या आयुष्यात अर्जुनासारखी बगलबाजी दाखविली नाही तर सत्यासाठी, न्यायासाठी राजकारण करत दखलबाज गोपीनाथ मुंडे होऊन दाखविलं. त्यामुळे शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ज्या भाजपाकडे पाहितलं जात होतं त्या शेटजी-भटजींच्या पक्षाला अठरापगड जातीतल्या घरांमध्ये घेऊन जाण्याचं काम गेल्या चार दशकात गोपीनाथ मुंडेंनी केलं. त्याचं फळ १९९५ ला सेना-भाजपाला सत्तेत येऊन चाखता आलं ते केवळ आणि केवळ गोपीनाथराव मुंडेंमुळेच. नाही तर मुंडे नसते तर आजपर्यंतही शेटजी-भटजींचे पक्ष दार उघड बया दार उघड... अशा आरोळ्या मारीत महाराष्ट्राच्या भवानी मातेचं दार ठोठावत बसले असते. महाराष्ट्राची कुलस्वामीनिही त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहते ज्याच्यामध्ये धैर्य ठेवण्याची उमेद असते, संघर्ष करण्याचं धाडस असतं अन् हा संघर्ष करत विजयी पताका फडकविण्याची ज्यामध्ये मनगटात उर्मी असते त्यालाच भवानी मातेचा आशीर्वाद असतो हे इतिहासाची पानं चाळताना आपसुकपणे पहावयास मिळतं. विज्ञानाने अविष्कृत केलेल्या आजच्या काळात गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा जाजव्ल्य आणि धगधगता संघर्ष होता हेही नाकारता येणार नाही. गोपीनाथ मुंडे राजकारण करताना समाजकारणाला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच स्वत: महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो आहोत याची जाणीव ते ठेवायचे. जिथं कुठं जुलुम, जबरदस्ती होत असेल, शेळ्या-मेंढ्या प्रमाणे मोकाटपणे कुठे कुणी जर अन्याय सहन करत असेल तर अशावेळी जातीवंत महाराष्ट्राच्या वाघाचा हा बच्चा दुष्ट संहारीले मागे | ऐसे उदंड एकतो ॥परंतु रोकडे काही | मूळ सामर्थ्य दाखवितो ॥या समर्थांच्या अवळणीनुसार तत्कालीन सत्ताधार्‍यांविरोधात गोपीनाथरावांचा हा आवाज चढता राहिला आणि ‘परिधानता गेली सत्ता उदंड झाली’ असाच स्वत:च्या कर्तृत्वाचा सूर्योदय गोपीनाथरावांनी करून स्वत:च्या नावाचा आणि संघर्षचा दरारा दिल्लीच्या तक्तापर्यंत गोपीनाथरावांनी पोहचविला. हे जेवढे त्रिवार सत्य तेवढेच बीडचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या गल्लीबोळात नव्हे तर दिल्लीच्या तक्तावरही त्यांनी रेखाटला. होतेच गोपीनाथराव आणि आहेतच गोपीनाथराव, असं ठामपणे म्हणण्याचं कारणच तेवढं कारण आजही लोकांच्या मनामनात-तनातनात गोपीनाथराव दिसून येतात. जेवढा संघर्ष गोपीनाथरावांच्या जिवनी होता तेवढेच गोपीनाथराव प्रेमळ होते. आम्हाला आजही आठवतं, त्यांचे सख्खे मित्र प्रमोद महाजन त्यांना सोडून गेले आणि एका कार्यक्रमात गोपीनाथरावांनी ‘प्रमोदजी मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...असं म्हणत थेट प्रमोद महाजनांना फोन केला. एका मराठी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये गोपीनाथरावांनी हा फोन लावला. हो हो मी गोपीनाथराव मुंडे बोलतोय. आपण एकाच वेळी कॉलेजमध्ये होतो. एकाच खेळाच्या मैदानात खेळलो, एकाच वेळी अंबाजोगाईतून पुण्याला शिकायला गेलो, एकाच वेळी आणीबाणीत जेलमध्ये गेलो, एकाच वेळी आपण राजकारणात आलो, एकाच वेळी राजकारणात आपण यश संपादन केलं मग याच वेळी आपण मला सोडून का गेलात एकटे? हा अन्याय आहे, तुमचं अचानक सोडून जाण्यामुळे माझं नाही देशाचं नुकसान झालं. कारण देशाला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाहीये, तुम्ही असता.... परत या... तुम्ही आलात तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल, एवढी तुमची योग्यता आहे. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव अर्ध्यावर का सोडला? हा माझा प्रश्‍न आहे, मित्र म्हणून तुम्हाला विचारण्याचा अधिकार मला आहे, तुम्ही ममता, जयललिता, समता सगळ्यांना एकत्र बांधत होता आता कुणीच नाहीये आपल्याबराबेर. त्यांना तुम्हीच आणू शकला असता. शिवसेना आणि आमच्यात कधी मतभेद होतात पण युती कशी टिकवायची याची कला तुम्हाला अवगत होती आम्हाला कुठंंय! अशा स्थितीत तुमचं असणं किती आवश्यक होतं आणि तुम्ही देश.... आज परत या. तुम्हाला आला तर या देशात नवी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आला तर माझ्या सारखे असंख्य लोक तुमच्या पाठीमागे उभे राहून ही क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही. पुनर्जन्मावर माझा विश्‍वास आहे, कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्‍चितच महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बोललात याबद्दल धन्यवाद... गोपीनाथरावांचा हा फोन खरच हृदयाला भिडणारा होता. आजही युट्युबवर आपण हा व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल. गोपीनाथराव, तुम्हाला मित्रत्वाच्या नात्याने महाजनांना फोन करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही अर्ध्यावरती डाव मोडून का गेलात? हा आमचा अधिकार नसला तरी त्या तमाम कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दिनदुबळे, वंचितांच्या माध्यमातून हा सवाल करण्याचं धाडस आम्ही करतोय अन् गोपीनाथ गडावर आज तुमच्या जयंतीदिनी महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून, सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यातून, माळरान-डोंगरातून आणि बांधा-बांधावरून प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होतोय. कोणी आठवणीने आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतय तर कोणी कर्तृत्व-कर्म आणि धाडसी नेतृत्व याची शिदोरी घेऊन संघर्षाचा वसा आपल्या पदरी बांधतोय. कष्टकर्‍याचं पोर, ऊसतोड कामगाराची पोरगी तुमच्या समाधीस्थळी येतेय, नतमस्तक होते अन् म्हणते ‘सायब मी शिकण, मोठ्ठी व्हयल आणि तुमच्या संघर्षाचा वारसा पुढे नेईल’ गोपीनाथराव आज तुमच्यज्ञा-आमच्यात देहाने नाहीत, परंतु संघर्षशील विचाराने ते कायम आहेत. म्हणूनच गोपीनाथरावांच्या जयंतीदिनी त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन आणि रिपोर्टरकडून बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, वंचितांना गोपीनाथरावांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!