Tuesday, 27 February 2018

मंत्रालयाच्या दारात मराठी भिकारीण

अग्रलेख - गणेश सावंत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जहालो खरे धन्य ऐकतो मराठी 
धर्म-पंथ-जात एक तो जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी 
मराठी भाषेचा गुणगौरव करणारे सुरेश भटांची ही कविता वाचली किंवा कानावर पडली की आईच्या कुशीत विसावल्यागत वाटतं. माय मराठी आज मात्र मंत्रालयाच्या दारात भिकारीन म्हणून उभी आहे की काय, असा परखड सवाल करावासा वाटतो. तसा हा सवाल गेल्या ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीच माधव ज्यूलीअन या कवीने आपल्या कवितेतून केला आहे. एकीकडे मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे मात्र याच मराठी भाषेला दुर्लक्षित करायचे. याची अनुभती भाजप सरकारने उभ्या महाराष्ट्राला दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर यांचे इंग्रजीमधील भाषणाचा मराठीत अनुवाद न करता भाजप सरकारने आपले मराठी बेगडे प्रेम दाखवून तर दिलेच, आज त्यात कहर म्हणून की काय मराठी भाषेचा गुणगौरव करणार्‍या ‘लाभले आम्हास बोलतो मराठी’ या सुरेश भटांच्या कवितेतलं सातवं कडवं गाळून मराठी भाषीक आणि त्यांच्या प्रेमाबाबत सरकारने आपले खायचे दात दाखवून दिले. देव-देश आणि धर्मासाठी प्राण आपुले लावू या तोर्‍यात भाजपाचं सरकार आपलं संस्कार, संस्कृतीबाबतचं बेगडं प्रेम मराठी भाषा दिनी उघडं करतं आणि सरकार कसं नागवं आहे हे दाखवून देतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल माफी मागितली आणि आज पुन्हा मराठी भाषा दिनी गुणगौरव करणार्‍या कवितेतलं कडवं गाळून आपण लोकांना मुर्ख बनवण्यात किती कडवे आहोत हेच सरकारच्या व्यवस्थापनाने दाखवून दिलं. मराठी भाषा म्हणजे काय, 
मराठीचं महत्त्व काय, 
आईचं दुध हा जिवनाचा पाया आहे आणि आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे, मराठी ही आमची आईची भाषा, अर्थात मातृ भाषा आहे. मातृ भाषेतून शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुल्माविरुद्ध बंड पुकारले आणि स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानाचा खजिना कडीकुलुपात ठेवलेल्या देववाणी संस्कृतला आव्हान दिले आणि ‘अमृतातही पैजा जिंके,’ ऐसे अक्षर मिळविन हे ध्येय मराठी भाषिकांसमोर ठेवत मर्दाच्या मरणाचे मार्ग दाखवणारा श्रीकृष्णाच्या भगवद्गितेला मराठीत अनुवादित करून ज्ञानेश्‍वरी जगासमोर आणली. कित्येक वर्षाची संस्कृतच्या मक्तेदारीचा किल्ला ज्ञानेश्‍वरांनी उद्ध्वस्त केला आणि सोजवळ मराठी भाषा खळखळ वाहणार्‍या निखल पाण्यासारखी उभ्या जगाला दाखवून दिली. आज आपण आईचं दुध हे मुलासाठी कसं अमृत असतं आणि जन्मल्याबरोबर दोन तासात आईचं स्तनपान मुलाला करावं, असं सांगतो तसं मातृभाषाही शिक्षणाचा पाया असणारा आहे. त्यामुळे या भाषेचा गुणगौरव झालाच पाहिजे. आज मराठी भाषा दिन म्हणून दिवस साजरा करत असलो तरी मराठी भाषेबाबत आपण तेवढ्याच तळमळीने या भाषेकडे पाहतो काय, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्‍वर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा चमत्कार, ज्या संस्कृत भाषेची मक्तेदारी एक हजार वर्षांहून अधिक काळ सुरू होती त्या संस्कृतची मक्तेदारी अवघ्या १८ वर्षांच्या ज्ञानेश्‍वरांनी मोडली आणि मराठी भाषेत श्रीकृष्णाची भागवद्गिता सांगितली. ते सांगताना मराठी 
भाषेतलं सोजवळपण
जसं माझा मराठीची बोलू कौतुके | परी अमृतातेही पैजा जिंकेल ऐसे अक्षर मिळवील | एक हजारहून अधिक वर्षे ज्या संस्कृतने चोहुबाजुने नाकाबंदी केली त्या संस्कृतची मिरासदारी मराठी भाषेने मोडून काढली. मग इंग्रजीचे काय घेऊन बसलात. मराठी भाषेत एक म्हणती मराठी काय, हे तो भल्याशी ऐकू नये, ती मुर्खे नेनती सोय अर्थान्वयाची जसे आहे तसेच तुकोबांच्या भाषेत मराठी भाषेतलं सोजवळपणाबरोबरच आक्रमकता आपल्याला त्यांच्या अभंगातून पहावयास मिळते. महाराष्ट्राच्या मना-मनावर अधिराज्य करणार्‍या संत तुकोबांनी मराठी भाषेचा जहालपण 
भले तरी देव काशीची लंगोटी 
नाठाळाच्या काठी हाणू माथी 
माय-बापाहुनी बहु मायावंत 
करू घातपात शत्रूहुनी 
या अभंगापाठोपाठ याच अभंगात ते पुढे म्हणतात, 
‘मऊ मेनाहुनी आम्हा विष्णुदास कठीण वज्रास भेदू’ मराठी भाषेतला सोजवळपणा आणि आक्रमकपणा जेवढा मनाला भावतो, तो उमजून येतो तेवढा अन्य भाषेत उमजून येत नाही. विख्यात नाटककार श्रीपाद कोहेटकर यांनी मायभूमीबद्दल उत्कट केलेल्या प्रेमाचं दर्शन या ओळीत आपल्याला खास पाहता येईल. 
बहु असोत सुंदर संपन्न की महा 
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा 
दुसरीकडे फादर स्टिफन्स यांनी ख्रिस्त पुरानात मराठी भाषेबाबत जे गौरवोद्गार काढले ते आश्‍चर्यकारकच. स्टिफन्स म्हणतात,
पखियामध्ये मयरु | वृखियामध्ये कल्पतरु| 
भासांमध्ये मानु थेरू | मराठीयेशी |
असे किती उदाहरण द्यायचे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीनंतर जेव्हा दलितांच्या व्यथा व वेदना साहित्यिक बोलू लागले तेव्हा मराठी भाषेचं महात्म्ये सर्वांनाच समजलं आणि उमजलं. कवि यशवंत मनोहर हे साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये दलितांच्या वेदना तेंव्हा मांडायचे. त्यांनी म्हटलं,
काल पडलेला पाऊस माझ्या शेतात पडलाच नाही
सदरहु पिक आम्ही आमच्या आसवावर काढले
या पंक्तीतून मराठी भाषेचं प्रेम आणि मराठी भाषेतले शब्दांचे शस्त्र अनुभवयास येते. आज महाराष्ट्रात १२ कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. या लोकांच्या घरामध्ये खरच मराठी भाषेचं प्रेम आहे का? हा सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो, कारण आजकाल आमच्या घराघरांमध्ये हाय-बाय आणि टाटाचे जणू वर्गच सुरू झाले आहे. असल्या हाय बाय टाटा करणार्‍या इंग्रजी मॅडमला घरामध्ये घुसू द्यायचे काय? या प्रश्‍नावर आम्ही तर नामदेव ढसाळांच्या भाषेत उत्तर देऊ. नामदेव ढसाळ म्हणायचे, हाय बाय करणार्‍या, ढुंगण हलवित चलणार्‍या इंग्रजी मॅडमला आम्ही आमच्या घरात घुसू देणार नाही, एकीकडे मराठी भाषेवर भाष्य करताना 
इंग्रजी भाषेचा सहारा 
आज घेतलेला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मराठी भाषेबाबत बोलताना म्हटलं होतं, आतंर प्रांती व्यवहारासाठी केंद्र सरकार कोणती भाषा ठरवतेय याची राज्य सरकारांनी वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे सुधारणा लांबणीवर पडणार आहे. कारण फक्त वाद-विवाद होईल या वादविवादातून दुसरे काहीही निष्पन्न होणार नसून इंग्रजांना मागच्या दरवाज्याने प्रवेश मिळणार आहे, तसे झाल्यास तो भारताला कायमचा कलंक ठरेल. तेव्हा पहिले पाऊल म्हणजे सरकारी कचेरीतून प्रादेशिक भाषेचे पुनरुज्जिवन करण्यात यावे. पंडित जवाहरलला नेहरू यांनी तुरुंगातून आपली कन्या हिला हे पत्र लिहिले होते. त्यावर पंडित नेहरू म्हणतात, मी हे पत्र तुला इंग्रजीतून लिहित आहे, हे किती हास्यास्पद! स्वातंत्र्यानंतर आपले सर्व व्यवहार लवकरात लवकर आपआपल्या भाषेत केले पाहिजे. (वरील अनुवाद खांडीलकरांच्या पुस्तकातून) जसं, पंडित जवाहरलाल नेहरुंना भाषेबाबत दुरदृष्टीने पाहता येत होतं तसं महात्मा गांधींनी महाराष्ट्रात मराठी भाषेतच सर्व कारभार आणि व्यवहार झाला म्हणजे मराठी माणूस राज्याच्या विकासाच्या वाटचालीत ‘जला माजी मासा तैसा वावरे’ तसं यशवंतराव यांनीही ७ सप्टेंबर १९६७ रोजी के.जे. सोमय्या आर्टस् व कॉमर्स कॉलेजची पाया भरणी करताना शिक्षणाच्या माध्यमाबाबत जे विचार मांडले ते मराठी भाषेचा उद्धार करणारेच होते. अनेक लेखक, साहित्यिक यांनी मराठी भाषेचा नुसता गुणगौरवच केला नाही तर या भाषेमुळे आईच्या दुधाचे महत्त्व दिले आहे. परंतु आजमितीला या भाषेचं काय होतय आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात ही भाषा कशी लटकवली जातेय, हे दिसून येते. 
आईच्या दुधात रोग प्रतिकारक शक्ती 
जशी आहे तशीच मराठी भाषेतही प्रतिकारक शक्तीच म्हणावी लागेल. धैर्य, संघर्ष आणि यशाची पताका याच भाषेतून फडकवता येईल हेही तेवढेच खरे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर. हे जे सत्य वचन मराठीतूनच सांगता येतं ते अन्य भाषेतून सांगता येणार नाही. ‘गड आला पण सिंह गेला’ अथवा ‘स्वराज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा’ हे जे पराकोटीचे ध्येय-वचन आहेत हे इंग्रजी भाषेत ऐकतानाही रोमांच येणार नाही. अंगातलं रक्त सळसळणार नाही. धैर्य तर नाहीच येणार ते फक्त मराठी भाषेतच सांगितलं तर आमच्या मुलांना कळणार. कारण आईचं दुध ते आईचं दुधच आणि बाटलीतलं दुध ते बाटलीतलं दुधच. शब्दाचा महिमा हा मराठी भाषेत जेवढा दखलपात्र आणि रत्नासारखा व शस्त्रासारखा धारदार तो अन्य भाषेमध्ये दिसून येत नाही. तुकोबांनी यावरही ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जिवाची जिवन  शब्द वाटू जनधन लोका’ यातून मराठी भाषेतल्या शब्दातले रत्न आणि शब्दातले शस्त्रं उघड केले. परंतु त्याच मराठी भाषेला आजही मंत्रालयाच्या दारात आणि घराघरात भिकारीन म्हणून वावरावे लागत असेल तर ते दुर्दैव नव्हे काय?