Sunday, 9 December 2018

ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा


आईने संघर्ष कारायला शिकवलं, विश्‍वास टाकला, भाऊजींनी पडत्या काळात मदत केली तेंव्हा मी उभा राहू शकलो. समाजाचं देणं म्हणून बीडमध्ये प्रॅक्टीस करू लागलो, माझ्या व्यवसायातून आणि सामाजिक कार्यातुन विश्‍वास निर्माण झाला. लोक येत गेले आणि जुळत गेले त्यामुळेच क्रांती मोर्चाची मोठी जबाबदारी मिळाली. त्या जबाबदारीचं फळ अखंड मराठा समाजामुळे आरक्षणातून मिळालं. आरक्षणाचा श्रेय सरकारने घेवू नये. क्रांती मोर्चामुळे दबाव गट निर्माण झाला आणि त्या दबावामुळेच सरकारला आरक्षण द्यावं लागलं. शालेय जीवनाथ आमचे चव्हाण सर नेहमी म्हणायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपवर जा. भलेही चोर झाला तर साधेसुधे चोर हेावू नका मोठे डाकू व्हा. परंतू समाज जीवनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा जान ठेवा. नकारात्मक गोष्टीपासून दूर रहा, सकारात्मक गोष्टींमध्येच शिखरावर रहा. आता मी ही म्हणतो उभ्या आयुष्यात ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा. यासह अन्य गोष्टीवर थेट भेटमध्ये आज आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा सी.ए. बी.बी.जाधव बोलत आहेत त्यांची रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत 



जे जाधव सी.ए. म्हणून ओळखले जात होते. ते मराठा 
क्रांतीचे समन्वयक झाले. कसा होता अहा प्रवास?
चार्टड अकाऊंटंट झाल्यानंतर बीडमध्ये प्रॅक्टीस करायची की नाही हा माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्‍न होता. सुरूवातीला बर्‍याच जणांसोबत चर्चा केली. तेंव्हा असं निदर्शनास आलं, ठरावीक समाज या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांच्याकडून इतर समाजाच्या म्हणण्यापेक्षा बहुजन समाजाच्या लोकांनी पिळवणूक केली जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यामागे त्या लोकांची हुशारी नव्हे तर बहुजनांच्या लोकांमधलं अज्ञान होतं. त्या काळात मी एका संपादकाकडे गेलो होतो. त्यादिवशी ते बोलत असतांना प्रचंड तणावाखाली होते. मी सहज विचारलं, कसलं टेंशन तर ते म्हणाले, दोन महिन्यात अकाउंटींग करायची आहे आणि आमुक आमुक व्यक्ती माझ्याकडून होणार नाही असं म्हणतो. तेंव्हा मी म्हणालो, त्यात टेंशन कसलं? मी करून देतो किंवा अन्य कोणीही करून देईल. यातून एक विषय लक्षात आला. छोट्या-छोट्या गोष्टींचा इशु येथे केला जातो आणि आपल्याच लोकांना त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न होतो. मग मी ठरवलं बीडमध्येच प्रॅक्टीस करायची. प्रॅक्टीस सुरू झाली, लोक येत गेले, समाज जोडला गेला. त्यातून हळुहळु मी सामाजिक कार्यात सहभागी होत गेलो. मला आठवत १७ ते १८ ऑगस्ट २०१६ रोजी शाहु आयटीआयमध्ये  कॉलेज येथे बैठक बोलवण्यात आली होती. मलाही त्याठिकाणी बोलवण्यात आलं होतं. बैठकीत शंभर दोनशे लोक होते. या बैठकीमध्ये क्रांती मोर्चाचा निर्णय झाला नाही. मग २२ ऑगस्टला दुसरी बैठक ही आशिर्वाद मंगल कार्यालय येथे झाली. त्या ठिकाणी ५ हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते. मी ही त्याठिकाणी गेलो होते, सर्वात शेवटी भिंतीला पाठ लावून बसलो होतो. मला कल्पनाही नव्हती की माझ्यावर कुठली जबाबदारी येईल. या बैठकीतच मोर्चा काढायचं नक्की झालं, तारीख ठरली. आता एवढ्या मोठ्या मोर्चाचे नियोजन आणि जो पैसा उभा राहील त्याचं नियोजन कुणाकडे द्यायचं हा विषय जेंव्हा समोर आला तेंव्हा बैठकीमधून कोणी तरी एक जणाने माझं नाव दिलं. अवघ्या काही सेकंदात माझ्या नावावर शिक्का मोर्तब झालं. 
चार्टड अकाऊंटंट या क्षेत्राकडे आपण कसे वळलात?
लहानपणापासुन एक क्रेझ होती मनात. मी जेंव्हा बीड हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होतो तेंव्हा चव्हाण नावाचे एक शिक्षक होते. मला ते नेहमी म्हणायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपला जायचं. भलेही चोर झाला तर साधे सुधे चोर व्हायचं नाही मोठं डाकू व्हायचं. ज्या कामात जाल, जे काम कराल त्यात तुमचा दरारा असला पाहिजे. एवढं मोठं व्हायचं. शिक्षण क्षेत्रात गेलात, व्यवसायात गेलात किंवा अन्य कुठल्या क्षेत्रात गेलात तर खाली रहायचं नाही तर टॉपला रहायचं. ती एकच गोष्ट माझ्या मनावर कायम बिंबली होती. मग माझी दहावी झाली, मार्गदर्शन नसल्यामुळे नेमंक काय करायच? हे माहिती नव्हतं. आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तीनही क्षेत्र निवडत बसलो, चाचपत बसलो. काहीसोबत चर्चा करत राहिलो. परंतू उत्तर काही भेटलं नाही. शेवटी सोबतच्या मित्रांनी कॉमर्स निवडले म्हणून मीही कॉमर्स घेतले. या क्षेत्रात तेंव्हा ज्ञान नव्हतं. सी.ए.व्हायचं हेही ध्येय नव्हतं. कुटुंबातही कोणी सी.ए. नव्हता तरी मी वाणिज्य शाखेला प्रवेश घेला. आकरावी, बारावी फर्स्ट इयर करत असतांना मी ज्या वाड्यात रहायचो त्या ठिकाणी बी.कॉम केलेले विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करायचे. मी त्यांना नेहमी विचारायचो, कॉमर्समध्ये सर्वात मोठी डिग्री काय असेल तर ते म्हणायचे चार्टड अकाऊंटंट. मग मी त्यावेळी ठरवलं मला चार्टड अकाऊंटंटच व्हायचय. नियोजन नसल्यामुळे थोडी फरपड झाली. तेंव्हा तेवढ्या पात्रतेचा होतो की नव्हतो हे ही माहित नाही. परंतू मी ठरवलं होतं, व्हायच तर आता चार्टड अकाऊंटंटच आणि सर ही मला सांगायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपला जा. आज मी या ठिकाणी टॉपला आहे आणि मी ही पुढच्या पिढीला कुठल्याही क्षेत्रात जा परंतू त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजीच व्हाल. त्यासाठी स्वप्न ही मोठे असायला हवे आणि संघर्ष करण्याची धमकही असायला हवी. 
तुमच्या या क्षेत्रात विशिष्ट समाजाची मक्तेदारी आहे असं नेहमी 
म्हटलं जातं, तरीही आपण या क्षेत्रात यशस्वी कसे झालात?
मी कुठल्या समाजाला नाव ठेवणार नाही, परंतू सुरूवातीपासुन ते लोक व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनाच या क्षेत्रातलं महत्त्व माहित होतं. पंधरा-वीस वर्षापूर्वी आपण मागे जावून पाहिलं तर २० टक्केही बहुजनातले लोक व्यापारी वर्गात नव्हते. त्यामुळे सी.ए.पदाची कल्पना अथवा त्याचे महत्त्व त्यांना असण्याचे कारणच नाही. सी.ए. काय असो तो कशासाठी असतो हे तेंव्हा जेमतेम लोकांना माहित होतं. मी जेंव्हा याचं शिक्षण घेत होतो तेंव्हा शंभर मुलांमध्ये बहुजनांचे २-५ मुले असायची. मुस्लिम समाजाचीही स्थिती तीच होती. २ टक्केच समाज या क्षेत्रामध्ये असायचा. त्यामुळे पासिंगचे प्रमाण नेहमी बहुजनांचे कमी असायचे. २०० मुले पास झाले तर बहुजनांची ५ ते ६ त्यामध्ये असायची. म्हणून मी खर तर बीडमध्ये प्रॅक्टीस करण्याचं ठरवलं. मी जिथ होतो त्या ठिकाणी मला लाख रूपयाचा पगार होता. अन्य फॅसिलीटी देण्याचे आश्‍वासन दिले होते. तरीही ती नोकरी मी स्विकारली नाही. आपण ज्या ठिकाणावरून आलो आहोत, ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची काही सेवा करावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी प्रॅक्टीस सुरू केली. रिस्पॉंस मिळत गेला ते वाढत गेले. काम करतांना लोकांची कुठलीही फसवणूक केली नाही. त्यातून विश्‍वास वाढला आणि आज बीडमध्ये चांगल्या सेवेमध्ये मी गणला जातो. हे जेवढं माझं श्रेय आहे तेवढच माझ्यावर प्रेम करणार्‍या लोकांचही आहे. 
आपल्याकडे म्हटलंं जातं, मराठ्यांचा मराठ्यांवर
 विश्‍वास नसतो मग समाजाने क्रांती मोर्चाचा आर्थिक 
व्यवहाराची जबाबदारी तुमच्या टाकली?
२०१६ पर्यंत लोकांनी मला माझ्या कामातून अनुभवलं होतं. सी.ए.चं काम करत असतांना जो विश्‍वास मिळाला, माझी लोकांनी जी आजपर्यंत चाचणी घेतली. मग सामाजिक कार्याच्या माध्यमातून म्हणा, रोटरीच्या माध्यमातून म्हणा, चंपावती क्रीडा मंडळाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून काम करत असतांना मी प्रामाणिकपणे काम करतो हे लोकांच्या लक्षात आले. मी कोणाला मदत करत असतांना ती मदत फोटो काढून कधीच करत नाही. माझ्याकडे अनेक लोक येतात, अनेकांना मोफत मार्गदर्शन मी आजही करतो. एखादी सामाजिक संस्था असेल, तिचे चांगले काम असेल तर त्या संस्थेचं ऑडीटही मी मोफत केलेले आहे. अनेक मंदीरांचे ऑडीट पैसे न घेता आजपर्यंत करत आलेलो आहे. एखाद्या मंदिराच्या ऑडीटचे पैसे माझ्या एखाद्या कर्मचार्‍याने माझ्या गैरहजेरीत घेतले असतील ते माहित नाही. परंतू माझ्यावरचा विश्‍वास वाढला आणि ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आणि ती निभावण्यातही मी यशस्वी झालो. 

मराठा क्रांतीमध्ये गटतट पढले आहेत, याकडे आपण कसे पाहता?
गटतट असं म्हणता येणार नाही. क्रांती मोर्चा हे एक समाजाचे सामाजिक काम आहे. मला एखादा विचार पटला नाही तर मी त्या विचारासोबत जाणार नाही. परंतू त्या विचाराला विरोधही करणार नाही. समाजासाठी एखादा काम करत असेल अन् ते आपल्याला आवडत नसेल तर ते आपण शांत बसून पहायलं हवं. मध्यंतरी जयंतीचा विषय समोर आला होता. माझं म्हणणं होतं महाराजांना, जिजाऊ मॉ साहेबांना डोक्यावर घेवू नाचण्यापेक्षा डोक्यात घेतलं तर अधिक बरं होईल. त्यामुळे तेंव्हा मी शांत राहिलो. गटतट म्हणता येणार नाही परंतू, काही लोक संघटनेशी, विविध पक्षाशी जोडले गेलेले असल्याने त्यांना त्यांचा अजेंडा क्रांती मोर्चाच्या रूपात राबवायचा असावा एवढेच काय ते. विचार जरी भिन्न असले तरी समाजाचं काम करतांना आजही एकत्रितच येतात हेही तेवढेच खरे.
राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर समाधानी आहात काय?
आरक्षण मिळालं यावर समाधानी असणारच. २०१६ पासून लढा सुरू आहे. तसा तो १९८४ पासून सुरूय. त्या लढ्याला आता कुठं यश मिळालं. २०१४ साली जे आरक्षण मिळालं होतं तेंव्हा ते टिकलं नाही. आता जे आरक्षण मिळालं त्याला बेस आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे वाटतं हे आरक्षण टिकेल. आता जरी समाधानी असलो तरी वाटत होतं, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं. जसं तामीळनाडू सरकारने केलं, ओबीसींना धक्का न लावता त्यातच मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं होतं. आणि त्याच धर्तीवर द्यावं असं अपेक्षित होतं. 
अनेक बुद्धीजीवी,निवृत्त न्यायाधीश यांच्या मतानुसार आज दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तुम्हाला काय वाटतं?
त्यांचा अभ्यास सहाजिकच माझ्यापेक्षा जास्त आहे. न्याय क्षेत्र हा त्यांचं विषय आहे. परंतू आतापर्यंत न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्यामध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्त्वाचा होता आणि  तो अहवाल आता मिळाला आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाच्या ५२ टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही अशा सूचना असल्या तरी संविधानामध्ये एखादा समाज मागास असेल तर त्याला आरक्षण देता येतं. हे तामीळनाडू राज्यात दिसून येतं, त्या व्यतिरीक्त कर्नाटकमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलं आहे. कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे. एका भावाला आहे आणि दुसर्‍याला नाही, पत्नी कुणबी म्हणून तिला आरक्षण आणि मला आरक्षण नाही हा सामाजिक असमतोल झाल्यासारखं वाटत नाही का? आपल्याला. खरतर आता शासनासह सर्वांनीच हे आरक्षण टिकेल यासाठी बाजू मांडायला पाहिजे आणि तसे प्रयत्न तुम्ही आम्ही करू. 
एका दुर्दैैवी घटनेने समाज एकवटला, क्रांती झाली, यश 
आले.आता हा समाज पुढे ही एकजुटीने राहील का?
राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो वेगवेगळ्या पक्ष संघटनामध्ये विखुरला गेलेला आहे. एकत्र येणं ही फार अवघड गोष्ट होती. महाराष्ट्रात नाही तर देशात कोणालाही विचारलं मराठा समाज एखाद्या घटनेवरून एकत्र येईल का? तर त्याचं उत्तर नाही यायचं. पण कोपर्डीत दुर्दैवी घटना घडली, समाज एकत्र आला आणि देशात हा संदेश गेला मराठा समाज कोणत्याही क्षणी एकत्र येवू शकतो. मराठा क्रांतीमध्ये जे लोक पुढे आहेत त्या राज्यभरातील लोकांची नावे पाहिली तर ते फार सामान्य आहेत. परंतू आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत. त्यांच्या लोकांनी विश्‍वास टाकला. यातील दोन-पाच टक्के लोक राजकीय पक्ष संघटनेशी जोडले गेलेले असले तरी अन्य लोक इनामदारीने समाजाचे काम करत आहेत. आत्तापर्यंत समाज जसा एकत्रित आला तसा यापुढेही समाज एकत्रितच येईल हा विश्‍वास आहे. तसा आम्ही प्रयत्न कायम सुरू ठेवणार आहोत. समाजाचे कुठले प्रश्‍न सोडवायचे, आजपर्यंत समस्यांच्या आणि प्रश्‍नांच्या विळाख्यात असलेला मराठा समाज आता कुठं एकत्रित येवून प्रश्‍न सोडू लागला आहे. अशा स्थितीमध्ये जेवढा दबाव तंत्राचा वापर करता येईल तेवढा एकीमधून होत आला आहे. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आणि आमच्या बांधवांवरचा अन्यायही सहन करणार नाही. आता मध्यंतरी पोखरी येथे मराठा समाजावर अन्याय झाला होता. त्याठिकाणी मराठा क्रांतीने ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे तेथिल लोकांचे प्रश्‍न सुटले त्यावेळीही गटतटाची चर्चा होतीच परंतू तरीही एकजुट झालीच आणि ती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. 
या आरक्षणाचं श्रेय फडणवीस सरकारला द्यायची की मराठा आंदोलन आणि बलीदान देणार्‍या समाजातील मुलांना?
आपण पाहिलं याआधी २०१४ साली मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं होतं. त्यावर स्टे आला. या फडणवीस सरकारने २०१४ ते २०१६ या दोन वर्षाच्या काळात काहीच केलं नाही. एक-एक वर्षाने तारीख वाढवून घ्यायची त्यामुळे या सरकारने आरक्षणाचं श्रेय घेवू नये. क्रांती मोर्चाच्या रूपाने दबावगट तयार झाला. त्याचा परिणाम म्हणून शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. या सरकारचा आरक्षण देण्याच अजेंडा नव्हता. आता हेच पहा, २०१६ मध्ये क्रांती मोर्चा सुरू झाले. नंतर या चळवळीला वर्ष सहा महिन्याने मरगळ आली. शासनाला वाटलं आता सर्व शांत झालं. मुंबई ९ ऑगस्ट २०१७ रोजी महामोर्चा निघाला. तेंव्हाही प्रशासनाने कुठल्याही हालचाली केल्या नाहीत, नुसतं लेखी दिलं. तारखांवर तारखा देत गेले, परंतू जेंव्हा परळीमध्ये ठोक मोर्चाला सुरूवात झाली आणि राज्यभर अगडोम उसळला तेंव्हा मुख्यमंत्री फडणवीस डीडी वाहिनीवर आले आणि मागासवर्गीय अहवाल नोव्हेंबरपर्यंत येईल अशी तारीख दिली. हे श्रेय कोणी घेवू नये कारण हा क्रांतीचा विजय आहे. यासाठी ४०-४२ मराठा तरूणांनी बलीदान दिलं आहे. 
मराठा समन्वयक पदाचा आपल्या व्यवसायाला फायदा झाला का?
मी २००२ पासून प्रॅक्टीस करत असल्यामुळे तसा कामाचा विचार केला तर माझ्याकडे ओव्हरलोड कामं आहेत. अठरा ते वीस कर्मचारी माझ्याकडे काम करत आहेत. आणि या कर्मचार्‍यांना मी पगारही तसा देत आहे. खर तर कोणी आपल्या कामात भागीदारी देत नाही. परंतू मी आपल्या समाजाचे गाडे नावाने भागीदार म्हणून घेतले. व्यावसाय वाढवावा हा ही त्यामागचा उद्देश आहे. आणि मराठा क्रांती मोर्चाचा विषय असेल तर नक्कीच मी म्हणेल याचा माझ्या व्यावसायाला फायदा झाला. 
सुरूवातीच्या काळात आपली परिस्थिती हालाकीची होती,
यावर मात कशी केली आणि आपले पाठीराखे कोण होते?
सुरूवातीपासून पहायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यात आमचं कुटुंब फार प्रसिद्ध कुटुंब आहे. आजही जुन्या लोकांकडे गेलो तर आमच्या आजोबाचं नाव विचारलं जातं. भानुदासराव तुमचे कोण? असं लोक आजही विचारतात. मधल्या काळात वडिलांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात करता आलं नाही. शेती शहरालगत असल्यामुळे विकल्या गेली. तेंव्हा मी दहा ते बारा वर्षाचा होतो. परिस्थिती ढासळली पण या परिस्थितीशी दोन हात माझ्या आईने केले. मला सामर्थ्य दिले, माझा पाठीराखापणा केला, मला धैर्य दिले, संघर्ष करण्याचे धडे तिनेच दिले. माझ्यावर अपार विश्‍वास ठेवला. आईमुळेच आज मी आहे, तेंव्हा माझ्या भाऊजींनीही मला मोठी आर्थिक मदत केली त्यामुळे मी उभा राहू शकलो हे ही मला विसरून चालणार नाही.
आजच्या पिढीसाठी तुमचा संदेश काय?
आत्ता आपण पाहतो आजची पिढी पाहण्यावर आणि ऐकण्यावर जास्त विश्‍वास ठेवते. वाचन संस्कृती कमी झाली आहे, अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते. याचं जसं आहे तसं व्यावसायाचंही झालं. व्यावसायातही आपण दुसर्‍याने काय व्यवसाय केला तो पाहतो आणि तोच व्यवसाय करतो. त्यातल्या अडचणी पाहत नाही, त्याच यश येईल की नाही हे पाहत नाही. त्याने टाकला म्हणून आपण टाकला. आजची पिढी शैक्षणिकदृष्ट्या नैराश्यखाली आली आहे. भावाला, बहिणीला नोकर्‍या मिळाल्या नाहीत मग आपल्याला कुठुन मिळणार. परंतू क्षेत्र निवडतांना असं क्षेत्र निवडा त्या क्षेत्रात आपण यशस्वी होवू. आणि शक्यतो संघर्ष, जिद्द अंगी बाळगा. आज आपण पाहतो. सी.ए.साठी जाहिरात दिली तर कोणी भेटणार नाही. डॉक्टरसाठी दिली तर तिथंही कमी आहे. मग एखाद्या व्यावसायाची अथवा भविष्याची निवड करतांना संघर्ष करावाच लागेल, अभ्यास करावाच लागेल हे लक्षात ठेवा आणि त्या क्षेत्रामध्ये उतरा.