अंत्ययात्रा ते संवाद यात्रा
मृत शरीरास पितांबर । घरी नसल्यास
विका घर ॥
तरी आमुच्या घरचे कैसे चाले । नाही
ठाऊक शास्त्राशी ॥
-गणेश सावंत -९४२२७४२८१०
कुरुक्षेत्रावर मायाजाळाच्या योगानं आलेला मोह दूर करून श्रीकृष्णाने अर्जुनाकडून त्याच्या क्षात्रवृत्तीमुळं भोगाला आलेलं कर्तव्य कर्म करवून घेतलं त्यासाठी कृष्णाला गीता सांगावी लागली. निमित्त अर्जुनाचं झालं परंतु अवघ्या जगाला गितेचा सार समजला. आता कलयुगी सत्तेच्या कुरुक्षेत्रावर शेतीचा सार सांगण्यासाठी सर्वच पक्षांना आपण स्वत: श्रीकृष्णाचे अवतार आहोत, असे आभास होताना दिसून येते. म्हणूनच कोणी आसूड यात्रा तर कोणी संघर्ष यात्रा अन् कोणी-कोणी संवाद यात्रा काढण्याच्या इराद्याने रणांगणावर निघाले आहेत. इथे शेतीचा सार समजण्यासाठी शेतकरी उरलेत की पुरलेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी यात्रा काढणार्यांनी आधी महाराष्ट्रातल्या गावागावांतील मसनवाट्यात जावं. कधी नापिकीला तर कुठं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या त्या शेतकर्यांच्या आत्म्यांना मसनवाट्यातच बोलवून घ्यावं, तिथं संघर्ष करण्याची त्यांना उमेद द्यावी आणि सत्ताधार्यांनी त्या मृतात्म्यांसोबत संवाद साधावा. काय हे कलियुगी सत्ताधारी आणि विरोधकांचं कोडकौतुक? शेतकरी त्याच्या मरणाने मरतोय, अठराविश्व दारिद्य्रात खितपत पडतोय, घराघरात उंदरं खेळतायत, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या अबलांचे पांढरे कपाळ अन् बापाला पोरके झालेले लेकरांना पाहितलं की, पोटात गोळा यावा अशी माणूस म्हणून जगणार्यांची स्थिती होते. परंतु सत्तेसाठी सत्ताधारी किंवा विरोधक झालेल्या पुढार्यांच्या पोटात गोळा येतोच का? हे सांगणं कठीण आहे. सध्या चैत्राचा महिना आहे. महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये ग्रामदैवतांच्या यात्रा भरवल्या जात आहेत. इथं पक्षी आणि प्राण्यांचा बळी दिला जातो. इडा-पिडा टळावी, पीक चांगलं यावं, घरादारात सुख नांदावं, कणग्यांपासून लादण्यांपर्यंत अन्नधान्यांनी भरून जाव्यात, असं मागणं गावकरी आपल्या ग्रामदैवतांकडे करतात. अंधश्रध्देच्या परिपाठात पहिल्यापासून अडकलेल्या खेड्यापाड्यातील वाडी-वस्ती तांड्यावरील आणि गावागावांतील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा श्रध्देचा आधार आणि अंधश्रध्देचा बाजार याच महिन्यात गावागावात पहावयास मिळतो. जसा ग्रामदैवतांना बळी दिला जातो तसा महाराष्ट्रातील आणि राज्यातील सत्ताधार्यांनी आणि विरोधकांनी आपल्या राजकीय स्थैर्यासाठी आणि सत्तेच्या उबेसाठी शेतकर्यांच्या आत्महत्या कायम टिकाव्यात, शेतकर्यांकडे दोन पैशेही येऊ नयेत, असेच धोरण आखून त्यांची बोळवण करण्यासाठी या चैत्राच्या महिन्यात जणू यात्रावर यात्रा यांच्या चालू आहेत. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती गंभीर आहे आणि इथला माणूस तेवढाच संतापलेला आहे. संतापलेला हा कष्टकरी, कामगार, शेतकरी ग्रामदैवतालाच नव्हे तर सत्तेतल्या देवांनाही
देऊळीचा देव मेला । अंतरीचा जागवा रे ॥
असा टाहो फोडून आपल्याच जन्माला दोष देतात. अंधश्रध्देत जो अडकला तो जिथं-तिथं नडला हे जेवढं उघड सत्य आहे तेवढच स्वप्नाळू दुनियेमध्ये जो जोपर्यंत अडकला तो कधी ना कधी भडकला हेही तेवढच सत्य अहो. ‘अच्छे दिन’ची गुहार देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीकृष्णाचा अवतार होत राज्या राज्यात निवडणुकीच्या काळामध्ये सारथ्य केलं आणि आपल्या भाजपाचा झेंडा कोणाला कोणाला त्याच्या राज्याचा मुखिया करून फडकवला. परंतु हे सारथ्य करताना अनेक राज्यात वेगवेगळ्या प्रश्नांची जणू गिताच शब्दबद्ध अश्वस्थ केली खरी परंतु दुर्दैवाने या सार्थ्याचे आश्वास्थ केलेले शब्द भविष्यात खरे ठरलेच हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्रातही भुलभलैय्या झालं, महाराष्ट्रातील जनतेचा, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा भाजप सरकारने भ्रमनिरास केला. शेतकर्यांना उघडं केलं, आर्थिकदृष्ट्या नागवं केलं आणि अशा स्थितीतही हमी भावाच्या नावाखाली भोगविलासी दुकान सरकारनं थाटलं. या दुकानात मुर्खात काढण्याचा माल संपल्यानंतर या सरकारने पुन्हा शेतकर्यांच्या मालावर कर्ज देण्याचं नविन सावकाराचं दुकान थाटलं तेंव्हा मात्र महाराष्ट्रातील शेकर्यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली अन् नुसताच मोठापणा सांगणार्या भाजप सरकारचं करायचं काय? हा जिथलातिथला प्रश्न चर्चेत येऊ लागला. अशा वेळी काहींनी सावध होत आत्म्याचं ज्ञान ओळखण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच
मृत शरीरास पितांबर । घरी नसल्यास विका घर ॥
दु:ख भोगा जन्मभर । ऐसा कोणी न करावे ॥
असेल तैसेची वागावे । जुनेही वस्त्र स्वच्छ करावे ॥
खुशाल अंगी बांधुनी न्यावे । मृताचिया गरिबांनी ॥
नवेची वस्त्रे पाहिजे आणिले । ऐसे शास्त्राने जरी सांगितले
तरी आमुच्या घरचे कैसे चाले । नाही ठाऊक शास्त्राशी ॥
हा जगद्गुरू संत तुकोबांचा अभंग आजच्या शेतकर्यांच्या आत्म्हत्येबरोबर त्यांच्या कर्मकांडांना समोर आणत स्वप्नाळू दुनियेच्या सत्ताधार्यांना चपराक हाणणारा आहे. अठराविश्व दारिद्य्रात अडकलेल्या एखाद्या शेतकर्याने आत्महत्या करावी आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पितांबर आणायचा हट्ट धरावा, त्यासाठी घर का विकणं होईना आणि अशी मानसिकता तयार केली जावी, त्यावर तुकोबा म्हणतात, जुन्या वस्त्रातही मृतदेहाला अग्निडाग देता येतो, शास्त्र जरी सांगत असेल नवे कपडे मृताला घाला, परंतु शास्त्रास हे माहित नाही, आमचे घर आम्ही कसे चालवतो. विरोधकांनी संघर्षयात्रा काढून शेतकर्यांच्या न्यायिक मागण्या समोर मांडल्या, शेतकरी संघटनांनी आसुड यात्रा काढून आपलं तोंड सरकारविरोधात वाजवून घेतलं. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून या सर्व घटनाक्रमांना पोतारा फिरवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे जेंव्हा उमजून येतं तेव्हा शेतकर्यांचे मूळ प्रश्न जसा अंधश्रध्देचा राक्षस आजही चैत्राच्या महिन्यात मानगुटीवर आहे तसा ‘अच्छे दिन’चा
स्वप्नाळू राक्षससंवाद यात्रेतून कायम राहण्याचे चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या संघर्ष आणि आसुड यात्रेसह अन्य यात्रांवर त्या दिवशी चिडून बोलले. आता आम्ही संवादयात्रा काढणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत, त्यांची गार्हाणी ऐकणार आहोत. असे सांगितले खरे परंतु आज संवाद साधण्याची वेळ नाही, आज शेतकर्यांचे संसार सावरण्याची खरी वेळ आहे हे बहुदा मुख्यमंत्र्यांना उमजलं नसावं. संवाद साधायचाच असेल तर इमाने इतबारे महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यात, गाववाड्यात, वाडी-वस्ती-तांड्यावर मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा आणाव्यात. मुख्यमंत्र्यांना संवाद साधायचेच असेल तर ज्या भागामध्ये शेतकर्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या त्या भागातील मसनवाट्यात जावून त्या भागातील शेतकर्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा आणि खरीच हिम्मत असेल सरकारची आणि खरचं त्यांना शेतकर्यांबद्दल प्रेम, आस्था असेल तर कुठलेही संरक्षण न घेता या संवाद यात्रा गावागावांत आणि शेतकर्यांच्या दारादारात घेऊन जाव्यात. म्हणजे निर्भयपणे शेतकर्यांना आपले प्रश्न मांडता येतील. अपाल्या राजासमोर, आपल्या कर्त्या-करवित्या समोर या शेतकर्यांना आपल्या घरातलं अठराविश्व दारिद्य्र दाखविता येईल. पांढर्या कपाळाने समोर येणार्या शेतकर्यांच्या विधवांच्या डोळ्यातले अश्रू या संवाद यात्रेत बरचं काही सांगून जातील. म्हातारपणाची काठी मसनवाट्यात गेलेल्या त्या शेतकर्यांच्या मायबापांचे हालअपेष्टा देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळतील. बापाचं छत्र हरवलेल्या लेकरांचा केविलवाणा चेहरा तुम्हाला दिसेल. यात्रा किती आणि कुठं काढायच्या आणि त्या कशासाठी काढायच्या हे आधी ठरवा. विरोधकांनी संघर्षयात्रा कौली आणि सत्ताधार्यांविरोधात बोंब मारली, कोणी आसुड यात्रा काढून सत्ताधार्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा काढली, केवळ या वक्तव्यांना उत्तर द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही संवाद यात्रा काढूच नका. तुमची संवाद यात्रा ही शेतकर्यांच्या हिताची असली पाहिजे आणि ती हिताची आहे हे दाखवण्यासाठी सर्वप्रथम शेतकर्यांची कर्जमाफी केली पाहिजे. महाराष्ट्रात जे विक्रम तुरीचं उत्पादन झालं आहे ती तूर हमी भावाने खरेदी केली पाहिजे. आता खरीपाचा हंगाम येणार आहे. उरल्यासुरल्या शेतकर्यांनी शेतीची मशागत केली आहे. 42 पेक्षा जास्त टेंपरेचरमध्ये नांगरट, मोगडापाळी करून घामाचं रक्त ओकत शेतकर्यांनी काळ्या आईची मशागत केली आहे. त्यासाठी लागणारं बि-बियाणं दर्जेदार आणि मोफत दिलं तर संवाद यात्रेला महत्त्व येईल. परंतु असं कुठलंही धोरण या संवाद यात्रेचं असेल असं आम्हाला वाटत नाही. कारण केवळ विरोधकांनी आरोप केले म्हणून संवाद यात्रेच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी जणू शेतकर्यांचे बळी देत चैत्रातली यात्रा सुरू केली आणि या यात्रेतून केवळ आणि केवळ विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना विरोधक किती नालायक आहेत हे सांगण्याचंच धोरण या यात्रेत असणार. खरं पाहिलं तर सत्यासाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी झगडणारा शेतकरी आज जेवढा नागवला जातोय हे उघड सत्य सत्ताधार्यांना माहित असताना फडणवीस फक्त आजपर्यंतच्या सरकारने असं केलं नाही म्हणून तसं झालं एवढं सांगण्यात आणि त्यांचे उणेदुणे काढण्यात धन्यता मानतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. शेवटी एवढच सांगायचं, यात्रा काढण्यापेक्षा अन् जत्रा भरवण्यापेक्षा शेतकर्यांसमोर जो खतरा आहे तो दूर करा, शेतकर्यांच्या आत्महत्या रोखा, त्यांना मसनवाट्यामध्ये जाऊ देऊ नका, त्यासाठी जे आश्वासन दिले आहे ते तरी पूर्ण करा. स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकर्यांचा उद्धार करा.
आजचा सायं दै बीड रिपोर्टर मधील ३० एप्रिल रविवार अग्रलेख