Sunday, 30 April 2017

अंत्ययात्रा ते संवाद यात्रा



मृत शरीरास पितांबर । घरी नसल्यास
विका घर ॥

तरी आमुच्या घरचे कैसे चाले । नाही 
ठाऊक शास्त्राशी ॥

-गणेश सावंत -९४२२७४२८१०
कुरुक्षेत्रावर मायाजाळाच्या योगानं आलेला मोह दूर करून श्रीकृष्णाने अर्जुनाकडून त्याच्या क्षात्रवृत्तीमुळं भोगाला आलेलं कर्तव्य कर्म करवून घेतलं त्यासाठी कृष्णाला गीता सांगावी लागली. निमित्त अर्जुनाचं झालं परंतु अवघ्या जगाला गितेचा सार समजला. आता कलयुगी सत्तेच्या कुरुक्षेत्रावर शेतीचा सार सांगण्यासाठी सर्वच पक्षांना आपण स्वत: श्रीकृष्णाचे अवतार आहोत, असे आभास होताना दिसून येते. म्हणूनच कोणी आसूड यात्रा तर कोणी संघर्ष यात्रा अन् कोणी-कोणी संवाद यात्रा काढण्याच्या इराद्याने रणांगणावर निघाले आहेत. इथे शेतीचा सार समजण्यासाठी शेतकरी उरलेत की पुरलेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी यात्रा काढणार्‍यांनी आधी महाराष्ट्रातल्या गावागावांतील मसनवाट्यात जावं. कधी नापिकीला तर कुठं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या त्या शेतकर्‍यांच्या आत्म्यांना मसनवाट्यातच बोलवून घ्यावं, तिथं संघर्ष करण्याची त्यांना उमेद द्यावी आणि सत्ताधार्‍यांनी त्या मृतात्म्यांसोबत संवाद साधावा. काय हे कलियुगी सत्ताधारी आणि विरोधकांचं कोडकौतुक? शेतकरी त्याच्या मरणाने मरतोय, अठराविश्‍व दारिद्य्रात खितपत पडतोय, घराघरात उंदरं खेळतायत, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या अबलांचे पांढरे कपाळ अन् बापाला पोरके झालेले लेकरांना पाहितलं की, पोटात गोळा यावा अशी माणूस म्हणून जगणार्‍यांची स्थिती होते. परंतु सत्तेसाठी सत्ताधारी किंवा विरोधक झालेल्या पुढार्‍यांच्या पोटात गोळा येतोच का? हे सांगणं कठीण आहे. सध्या चैत्राचा महिना आहे. महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये ग्रामदैवतांच्या यात्रा भरवल्या जात आहेत. इथं पक्षी आणि प्राण्यांचा बळी दिला जातो. इडा-पिडा टळावी, पीक चांगलं यावं, घरादारात सुख नांदावं, कणग्यांपासून लादण्यांपर्यंत अन्नधान्यांनी भरून जाव्यात, असं मागणं गावकरी आपल्या ग्रामदैवतांकडे करतात. अंधश्रध्देच्या परिपाठात पहिल्यापासून अडकलेल्या खेड्यापाड्यातील वाडी-वस्ती तांड्यावरील आणि गावागावांतील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा श्रध्देचा आधार आणि अंधश्रध्देचा बाजार याच महिन्यात गावागावात पहावयास मिळतो. जसा ग्रामदैवतांना बळी दिला जातो तसा महाराष्ट्रातील आणि राज्यातील सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनी आपल्या राजकीय स्थैर्यासाठी आणि सत्तेच्या उबेसाठी शेतकर्‍यांच्या आत्महत्या कायम टिकाव्यात, शेतकर्‍यांकडे दोन पैशेही येऊ नयेत, असेच धोरण आखून त्यांची बोळवण करण्यासाठी या चैत्राच्या महिन्यात जणू यात्रावर यात्रा यांच्या चालू आहेत. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती गंभीर आहे आणि इथला माणूस तेवढाच संतापलेला आहे. संतापलेला हा कष्टकरी, कामगार, शेतकरी ग्रामदैवतालाच नव्हे तर सत्तेतल्या देवांनाही 

देऊळीचा देव मेला । अंतरीचा जागवा रे ॥

असा टाहो फोडून आपल्याच जन्माला दोष देतात. अंधश्रध्देत जो अडकला तो जिथं-तिथं नडला हे जेवढं उघड सत्य आहे तेवढच स्वप्नाळू दुनियेमध्ये जो जोपर्यंत अडकला तो कधी ना कधी भडकला हेही तेवढच सत्य अहो. ‘अच्छे दिन’ची गुहार देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीकृष्णाचा अवतार होत राज्या राज्यात निवडणुकीच्या काळामध्ये सारथ्य केलं आणि आपल्या भाजपाचा झेंडा कोणाला कोणाला त्याच्या राज्याचा मुखिया करून फडकवला. परंतु हे सारथ्य करताना अनेक राज्यात वेगवेगळ्या प्रश्‍नांची जणू गिताच शब्दबद्ध अश्‍वस्थ केली खरी परंतु दुर्दैवाने या सार्थ्याचे आश्‍वास्थ केलेले शब्द भविष्यात खरे ठरलेच हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्रातही भुलभलैय्या झालं, महाराष्ट्रातील जनतेचा, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा भाजप सरकारने भ्रमनिरास केला. शेतकर्‍यांना उघडं केलं, आर्थिकदृष्ट्या नागवं केलं आणि अशा स्थितीतही हमी भावाच्या नावाखाली भोगविलासी दुकान सरकारनं थाटलं. या दुकानात मुर्खात काढण्याचा माल संपल्यानंतर या सरकारने पुन्हा शेतकर्‍यांच्या मालावर कर्ज देण्याचं नविन सावकाराचं दुकान थाटलं तेंव्हा मात्र महाराष्ट्रातील शेकर्‍यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली अन् नुसताच मोठापणा सांगणार्‍या भाजप सरकारचं करायचं काय? हा जिथलातिथला प्रश्‍न चर्चेत येऊ लागला. अशा वेळी काहींनी सावध होत आत्म्याचं ज्ञान ओळखण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच 

मृत शरीरास पितांबर । घरी नसल्यास विका घर ॥
दु:ख भोगा जन्मभर । ऐसा कोणी न करावे ॥
असेल तैसेची वागावे । जुनेही वस्त्र स्वच्छ करावे ॥
खुशाल अंगी बांधुनी न्यावे । मृताचिया गरिबांनी ॥
नवेची वस्त्रे पाहिजे आणिले । ऐसे शास्त्राने जरी सांगितले
तरी आमुच्या घरचे कैसे चाले । नाही ठाऊक शास्त्राशी ॥

हा जगद्गुरू संत तुकोबांचा अभंग आजच्या शेतकर्‍यांच्या आत्म्हत्येबरोबर त्यांच्या कर्मकांडांना समोर आणत स्वप्नाळू दुनियेच्या सत्ताधार्‍यांना चपराक हाणणारा आहे. अठराविश्‍व दारिद्य्रात अडकलेल्या एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या करावी आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पितांबर आणायचा हट्ट धरावा, त्यासाठी घर का विकणं होईना आणि अशी मानसिकता तयार केली जावी, त्यावर तुकोबा म्हणतात, जुन्या वस्त्रातही मृतदेहाला अग्निडाग देता येतो, शास्त्र जरी सांगत असेल नवे कपडे मृताला घाला, परंतु शास्त्रास हे माहित नाही, आमचे घर आम्ही कसे चालवतो. विरोधकांनी संघर्षयात्रा काढून शेतकर्‍यांच्या न्यायिक मागण्या समोर मांडल्या, शेतकरी संघटनांनी आसुड यात्रा काढून आपलं तोंड सरकारविरोधात वाजवून घेतलं. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून या सर्व घटनाक्रमांना पोतारा फिरवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे जेंव्हा उमजून येतं तेव्हा शेतकर्‍यांचे मूळ प्रश्‍न जसा अंधश्रध्देचा राक्षस आजही चैत्राच्या महिन्यात मानगुटीवर आहे तसा ‘अच्छे दिन’चा 

स्वप्नाळू राक्षस 

संवाद यात्रेतून कायम राहण्याचे चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या संघर्ष आणि आसुड यात्रेसह अन्य यात्रांवर त्या दिवशी चिडून बोलले. आता आम्ही संवादयात्रा काढणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत, त्यांची गार्‍हाणी ऐकणार आहोत. असे सांगितले खरे परंतु आज संवाद साधण्याची वेळ नाही, आज शेतकर्‍यांचे संसार सावरण्याची खरी वेळ आहे हे बहुदा मुख्यमंत्र्यांना उमजलं नसावं. संवाद साधायचाच असेल तर इमाने इतबारे महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यात, गाववाड्यात, वाडी-वस्ती-तांड्यावर मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा आणाव्यात. मुख्यमंत्र्यांना संवाद साधायचेच असेल तर ज्या भागामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या त्या भागातील मसनवाट्यात जावून त्या भागातील शेतकर्‍यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा आणि खरीच हिम्मत असेल सरकारची आणि खरचं त्यांना शेतकर्‍यांबद्दल प्रेम, आस्था असेल तर कुठलेही संरक्षण न घेता या संवाद यात्रा गावागावांत आणि शेतकर्‍यांच्या दारादारात घेऊन जाव्यात. म्हणजे निर्भयपणे शेतकर्‍यांना आपले प्रश्‍न मांडता येतील. अपाल्या राजासमोर, आपल्या कर्त्या-करवित्या समोर या शेतकर्‍यांना आपल्या घरातलं अठराविश्‍व दारिद्य्र दाखविता येईल. पांढर्‍या कपाळाने समोर येणार्‍या शेतकर्‍यांच्या विधवांच्या डोळ्यातले अश्रू या संवाद यात्रेत बरचं काही सांगून जातील. म्हातारपणाची काठी मसनवाट्यात गेलेल्या त्या शेतकर्‍यांच्या मायबापांचे हालअपेष्टा देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळतील. बापाचं छत्र हरवलेल्या लेकरांचा केविलवाणा चेहरा तुम्हाला दिसेल. यात्रा किती आणि कुठं काढायच्या आणि त्या कशासाठी काढायच्या हे आधी ठरवा. विरोधकांनी संघर्षयात्रा कौली आणि सत्ताधार्‍यांविरोधात बोंब मारली, कोणी आसुड यात्रा काढून सत्ताधार्‍यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा काढली, केवळ या वक्तव्यांना उत्तर द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही संवाद यात्रा काढूच नका. तुमची संवाद यात्रा ही शेतकर्‍यांच्या हिताची असली पाहिजे आणि ती हिताची आहे हे दाखवण्यासाठी सर्वप्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी केली पाहिजे. महाराष्ट्रात जे विक्रम तुरीचं उत्पादन झालं आहे ती तूर हमी भावाने खरेदी केली पाहिजे. आता खरीपाचा हंगाम येणार आहे. उरल्यासुरल्या शेतकर्‍यांनी शेतीची मशागत केली आहे. 42 पेक्षा जास्त टेंपरेचरमध्ये नांगरट, मोगडापाळी करून घामाचं रक्त ओकत शेतकर्‍यांनी काळ्या आईची मशागत केली आहे. त्यासाठी लागणारं बि-बियाणं दर्जेदार आणि मोफत दिलं तर संवाद यात्रेला महत्त्व येईल. परंतु असं कुठलंही धोरण या संवाद यात्रेचं असेल असं आम्हाला वाटत नाही. कारण केवळ विरोधकांनी आरोप केले म्हणून संवाद यात्रेच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी जणू शेतकर्‍यांचे बळी देत चैत्रातली यात्रा सुरू केली आणि या यात्रेतून केवळ आणि केवळ विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना विरोधक किती नालायक आहेत हे सांगण्याचंच धोरण या यात्रेत असणार. खरं पाहिलं तर सत्यासाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी झगडणारा शेतकरी आज जेवढा नागवला जातोय हे उघड सत्य सत्ताधार्‍यांना माहित असताना फडणवीस फक्त आजपर्यंतच्या सरकारने असं केलं नाही म्हणून तसं झालं एवढं सांगण्यात आणि त्यांचे उणेदुणे काढण्यात धन्यता मानतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. शेवटी एवढच सांगायचं, यात्रा काढण्यापेक्षा अन् जत्रा भरवण्यापेक्षा शेतकर्‍यांसमोर जो खतरा आहे तो दूर करा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखा, त्यांना मसनवाट्यामध्ये जाऊ देऊ नका, त्यासाठी जे आश्‍वासन दिले आहे ते तरी पूर्ण करा. स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकर्‍यांचा उद्धार करा.

आजचा सायं दै बीड रिपोर्टर मधील ३० एप्रिल रविवार अग्रलेख

Sunday, 9 April 2017


शेतकर्‍यांच्या 

संपाचा आसूड





साय दै.बीड रिपोर्टर मधील आज चा रविवार अग्रलेख

मॅराथॉन अग्रलेख भाग -1

-गणेश सावंत-९४२२७४२८१०


       शेतकर्‍यांच्या आत्महत्येने आणि शेतकर्‍यांच्या आजच्या परिस्थितीने राज्यातच नव्हे तर देशभरात काहुर माजवून सोडलं आहे. शेतकर्‍यांच्या घरातली परिस्थिती अठराविश्‍व दारिद्य्राची असताना केवळ शेतकरी हा संघटित नसल्याने शेतकर्‍यांच्या कुठल्याही प्रश्‍नाकडे शासन-प्रशासन व्यवस्थेचे कायम दुर्लक्ष असते हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची नक्कीच गरज नाही. जेंव्हा शासन व्यवस्थेतील पुढार्‍यांना आपलं राजकारण टिकवायचं असतं, सत्ताकारणाचं गणित जुळवायचं असतं तेंव्हा मात्र शासन व्यवस्थेतले लोकशाहीचे तथाकथीत पुजारी सरशेवटी कोणाचेही पाय धुवून प्यायला तयार असतात. परंतु शेतकर्‍यांचे पाय धुवायचं सोडा त्यांच्या गळ्यातला फास काढण्याची तसदीही सरकार घेत नाही. याचाच अर्थ संघटितपणे सत्ताधार्‍यांचं गचुरं ज्याला धरता येतं त्याच्या पदरात काहीतरी पडतं, असं उघड सत्य आजच्या शासन-प्रशासन व्यवस्थेच्या कार्यप्रणालीतून उघडपणे दिसून येतं. एखाद्या कर्मचार्‍यांच्या अधिकार्‍यांच्या संघटनेने संघटित होऊन एखादं आंदोलन उभं केलं की त्या आंदोलनाला यश येतं आणि सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतो. काल-परवाचच उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टरांचं आंदोलन अत्यंत टोकाचं आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना वेठीस धरणारं असताना सरकारला त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करता आल्या. त्यांच्या सोबत आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना लोटांगण घालावं लागलं. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून माझा शेतकरी बाप शेतीमालाला भाव द्या, बी-बियाणे आणि खताचे भाव कमी ठेवा, शेतीसाठी पाणी द्या, वीज द्या म्हणून टाहो फोडतोय. दुष्काळाच्या फरफडीने घरात अठराविश्‍व दारिद्य्र आल्यामुळे फासावर जातोय, तरीही सरकार शेतकर्‍यांच्या कुठल्याच प्रश्‍नाकडे लक्ष देत नाही ते केवळ शेतकरी हा संघटित नाही, तो संघटित होऊन आंदोलन करीत नाही, संपावर जात नाही म्हणूनच शासन-प्रशासन व्यवस्थेतील हे लोक शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करतात आणि शेतकर्‍यांच्या जळणार्‍या चितेवर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजतात. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देवेंद्र फडणविस सरकारने तात्काळ कर्जमाफी करावी, ही जेवढी आमची उघड मागणी तेवढीच अधिकारी, कर्मचार्‍यांचे वेतनातील आजपर्यंतच्या वाढी पाहता शेतकर्‍यांच्या शेतीमालाला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भाववाढ मिळावी यासाठी नियोजन करावे ही शेतकर्‍यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून पोटतिडकीने आम्ही सरकार दरबारी मागणी करतो. माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान युगाच्या आजच्या देशात जसं सांघिक खेळात पराभवाची जबाबदारी दुसर्‍या ढकलता येते तसे संघटितपणे एखादा संप पुकारला तर सरकारलाही खाली खेचता येते हे उघड सत्य नाकारता येणार नाही. आजमितीला महाराष्ट्रातील शेतकरी संपावर जाण्याच्या विचाराधीन असल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या भवितव्याला भविष्यात जो धोका आहे तो धोका जाणून राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचं जेव्हा केव्हा शेतकरी संकटात सापडला तेव्हा तेव्हा शेतकर्‍याला जोडधंद्याच्या नावाखाली असे काही आतबट्ट्याचे धंदे समोर ठेवले की त्या आतबट्ट्याच्या धंद्याने शेतकर्‍यांचं पुरतं वाटोळं झालं. घरामध्ये सर्व माणसे कर्ते असताना त्या घरात अठराविश्‍व दारिद्य्र असतं आणि नोकरदारांच्या घरात एकटा कमवता असताना त्या घरात पंच पकवानाचं ताट असतं. म्हणून आम्हाला तरी वाटतं
 
कलेक्टरच्या बायकोने जोडधंदा


म्हणून म्हशी सांभाळाव्यात 




शेतकर्‍याच्या घरातला माणूस न माणूस घामाचे रक्त ओकत रात्रंदिवस काम करतो, परंतु त्याच्या कामाला कधीच यश येत नाही. जोडधंदा दिला जातो तो संक्रित गाईचा, दुग्ध व्यवसायाचा. मात्र दुधाला भाव पाण्यापेक्षा कमी असतो. कधी एखाद्या नोकरदाराच्या घरामध्ये डोकावून पाहितलं का, त्या घरातला एक व्यक्ती कामावर असतो, अख्खं घर त्याच्या कमाईवर खात असतं. खरं पाहिलं तर जोडधंद्याची गरज या लोकांना आहे, कारण कमावणारा एक, खाणारे दहा जिथे असतात तिथे जोडधंद्याची गरज खर्‍या अर्थाने असते. परंतु असं चित्र पहावयास मिळत नाही. ते केवळ आणि केवळ संघटितपणामुळे शिक्षक असो वा प्राध्यापक, दारावरचा शिपाई असो अथवा खुर्चीवरचा कलेक्टर हे लोक संघटितपणे एकत्रित येतात, कधी दुसरा वेतन आयोग, तिसरा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग यासाठी आंदोलने करतात तीस वर्षापूर्वीचा सहाशे रुपयांवरचा माणूस आज सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत संघटितपणाच्या ताकतीवर पगारी घेतो. हे जेंव्हा आता शेतकर्‍यांच्या लक्षात आलं तेंव्हा काळ्या आईच्या छाताडात बीज पेरून एका दाण्याचे हजारो दाणे काढणार्‍या शेतकर्‍याला आता हे लक्षात आलय, गचुरं धरल्याशिवाय आणि महात्मा फुलेंच्या शब्दातला शेतकर्‍यांचा आसुड हातात घेतल्याशिवाय सरकारची नशा उतरणार नाही. नोकरदारांच्या घरामध्ये केवळ संघटितपणामुळेच जर त्यांच्या कामाला ते म्हणतील तेवढे पैसे मिळत असतील तर मग मढे झाकून पेरण्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या मेहनतीला किती आणि कसे पैसे मिळायला हवेत याची जाण आता शेतकर्‍यांना बर्‍यापैकी झाली. त्यामुळे आजचा शेतकरी जेवढ्या पद्धतीने कर्जमाफीच्या बाजुने बोलतोय त्यापेक्षा कितीतरी पटीने 20-30 वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, ऊस यासह अन्य कडधान्यांना भाजीपाल्यासह पिकांना जे भाव होते ते भाव आणि आजचे भाव पाहितले तर जास्तीत जास्त अठरा ते बावीस पटीच्या वाढीचे दिसून येतात. कधी-कधी तेही ढेपाळलेले असतात, परंतु कर्मचारी, अधिकारी नोकरदारांचे वीस ते तीस वर्षांपूर्वीचे भाव आणि आजचे भाव पाहितले तरी कमीत कमी 128 ते 181 पटीने वाढ झाल्याचे उघड आणि स्पष्टपणे दिसून येते तेव्हा लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात शेतकर्‍यांवर अन्याय होत नाही का? शेतकर्‍यांकडून जेंव्हा उपस्थित होतो आणि त्यांनाही तो जेव्हा पडतो तेंव्हा हातात रुमणं घेतल्याशिवाय पर्याय नाही हे उघडपणे त्यांना उमजून येते. म्हणूनच ते संपाची भाषा करतात आणि शेतकरी आता संपाच्या तयारीत आहे, हे उघडपणे दिसून येत असताना केवळ आडाणी, खेडवळ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांच्या संघटितपणात आपण विघ्न आणून तो संप मोडीत काढू, हे दिव्य स्वप्न पाहणे म्हणजे फडणविस सरकारने स्वत:च्या शेपटीला आग लावून हनुमान बनण्याची भूमिका बजावणे होय. आम्ही तर उघडपणे आणि स्पष्टपणे म्हणू, शेतकर्‍यांकडे जेवढ्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ती पद्धत पाहता 

खरंच हा तो हिंदुस्तान आहे का,

तो महाराष्ट्र आहे का ?


    ज्या हिंदुस्तानाला एकेकाळी सोने की चिडिया म्हटलं जायचं, ज्या भारतात एकेकाळी दूध-दहयाच्या गंगा वहायच्या तोच हा भारत आहे का? ज्याला कृषिप्रधान देश म्हणून म्हटलं जातय आणि इथल्या शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधलं जातय असे एक ना अनेक प्रश्‍न एवढ्यासाठीच पडतात, कारण ज्या देशामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जात होतं त्या देशामध्ये कनिष्ठ नव्हे तर अत्यंत तुच्छतेने शेती आणि शेतकर्‍यांकडे पाहितलं जातं. हा काळ केवळ पाच दशकांचा आहे आणि या पाच दशकांच्या कालखंडामध्ये शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्यकर्त्यांनी जे काही धोरण आखले ते धोरण कमालीचे मूर्खपणाचे म्हणावे लागतील. कारण कांदा साठ रुपये किलो झाला की जिवनावश्यक वस्तूंच्या कायद्याखाली बोंबाबोंब केली जाते, खरच कांदा जिवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये मोडला जातो का ओ, एखाद्याने पंधरा दिवस कांदा खाल्लाच नाही तर तो मरायला टेकल का हो? परंतु मुठभरांनी ढिगभरांना कसं वेठीस धरायचं आणि त्या वेठीस धरण्याला चळवळीचं नाव कसं द्यायचं हे उद्योगपतींबरोबर राज्यकर्त्यांनाही चांगलच जमून आलं म्हणूनच आजपर्यंत शेतकर्‍यांचं वाटोळं त्यांना करता आलं. आम्हाला सातत्याने प्रश्‍न पडलेला असतो. घरातले पाच माणसं शेतात राबराब राबत असतील तर त्यांच्या घामाला किती महत्त्व आणि मोल असायला हवा आणि एखाद्या घरातला एक व्यक्ती एसीच्या घरात खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्याच्या घामाला किती मोल असायला हवं ? याचं उत्तर एसीच्या घरातल्या माणसाला मोठं महत्त्व दिलं जाईल. कारण घामाला ना राज्यकर्त्यांनी ओळखलं, ना समाज व्यवस्थेने ओळखलं. हमाम मे सब नंगे असल्यागत ज्याने त्याने स्वत:लाच महत्त्व दिलं. अशाच वातावरणात हा देश चालत राहिला तर किमान साठ टक्के शेतकरी असलेला देशातला वर्ग जेव्हा संपाचा आसुड बाहेर काढेल, असेही मरत आहोत, मरणार आहोत, अशी टोकाची भूमिका या शेतकर्‍यांनी घेतली तर बेभाव पद्धतीने पाणी विकणार्‍यांपासून ते सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या करावर ढेकर देणार्‍यापर्यंत प्रत्येकाला त्यांचा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणावं सरकारला आणि राज्यकर्त्यांना, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत, मरतायत. त्यांना वाचवणं सरकारला महत्त्वाचं वाटत नाही परंतु गाईला वाचवणं महत्त्वाचं वाटू लागलय. शेतकरी मरतोय मरू द्या, पण या देशातली गाय मरू नये यासाठी कायद्यावर कायदे केले जात आहेत. आयुष्यात कधी शेतीचं तोंड न पाहणार्‍यांनो गाय वाचवायची तर अगोदर शेतकरी वाचवावं लागेल. तेव्हा त्यांच्या गोठ्यात तुमची माय किंवा गाय आबाधितपणे सुरक्षित राहिल. हे साधं आणि सोपं गणित राज्यकर्त्यांना कळत नाही आणि नाही तिथं खुसपट टाकून जल्लोषाला, उत्सवाला, देव-देवाला आणि जात-पात धर्माला पैशे देऊन उधळपट्टी करण्यात धन्यता मानतात. पुढच्या वर्षी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी उत्सवाला तिनशे वर्षे पूर्ण होतायत. त्या निमित्त राज्य सरकारने 300 कोटी रुपये त्या उत्साहसाठी मंजूर केले. मला सांगा, हातात कटोरा घेऊन जनकल्याणासाठी दारोदार हिंडणार्‍या साईबाबांना तरी ही उधळपट्टी मान्य असेल काय ? म्हणूनच म्हणतो, अंत पाहू नका. शेतकर्‍यांना संपावर जाण्यापासून रोखा किंवा त्यांची मानसिकता ओळखा. 

(उद्याच्या अंकात देवेंद्रजी साई किव करत अतील, शेतकर्‍यांचा जीव घेऊ नका.)