Wednesday, 29 November 2017

विशेष संपादकीय...

मातेची जो थाने फाडी |
                                                                                                                                                                       

-गणेश सावंत-9422742810


कोपर्डीतील घटना महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरून सोडणारी. स्त्री जातीच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी. कोपर्डीतील छकुलीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या ही उभ्या महाराष्ट्राला शरमून टाकणारी बाब. या घटनेमुळे उभा महाराष्ट्र पेटून उठला. अखेर आज न्यायदेवतेने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार करणारे बलात्कारी हे नुसते नराधमच नाहीत तर ज्या स्त्री जातीच्या उदरातून यांची पैदास झाली अक्षरश: त्या उदरालाच हे तिघे म्हणजे एक शिवी आहे, नव्हे नव्हे शाप आहे.
ज्या महाराष्ट्राचा इतिहास बलात्कार्‍यांचा चौरंगा करणारा आहे. ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍याच्या भाजीच्या देठाला हात लावण्याची हिंम्मत ही कोणी करत नव्हतं, त्याच महाराष्ट्रात वड्या वगळीच्या पैदाशी गेल्या काही वर्षात थय्या..थय्या नाचत आहेत. कामातूर झालेले श्‍वापदाच्या औलादी आपली कामवासना भागवण्यासाठी कवळ्या कळ्या कुस्कारीत आहेत. तळपायाची आग मस्तकाला जावी, हाताच्या मुठी वळाव्यात, ओठ दाताखाली यावेत, मस्तकाला आट्या पडाव्यात इतका संताप या बलात्कार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिन्दुस्तानात पहावयास मिळतो. कानून अंधा होता हैं, न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणून असे गुंड मवाली आणि कामांध सावज टिपूण आपली वासना क्षमावतात आणि निष्पापांना जिवानीशी मारतात अशीच काहीशी भावना लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चावलेल्या लोकशाहीच्या राज्यामध्ये वावारणार्‍या प्रत्येकांची झाली होती. परंतू दिल्लीत निर्भयाचा बलात्कार झाला, तिची क्रुरतेने हत्या करण्यात आली. त्या हत्त्येने अवघा देश एवकटला अन् बलात्काराच्या गुन्ह्यात बदल करण्यास शासन व्यवस्थेला भाग पाडले. त्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आता तरी देशातील भगिनी मुक्त संचार करेल, निर्भयपणे वावरले. परंतू नाही, कामातुरा भय ना लज्जा असलेले काम पिपासू आपलं काम दाखवतच राहिले. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात बलात्काराच्या घटना घडतच राहिल्या, परंतु कायदा कठोर झाला आणि त्या कठोर कायद्यातून बलात्कार्‍यांविरोधात निकाल लागू लागले. अशा वातावरणातही महाराष्ट्र गेल्या वर्षी पुन्हा काही तथाकथीत नराधमांनी आपल्या क्रुर कृत्यातून काळवंडून टाकला. जणू मातेच्या थानाचीच फाडाफाडी या हरामींनी केली. ज्या स्त्री जातीच्या उदरातून जन्म घेतला जातो तिचं स्तनपान करून अंगात बळ आणलं जातं त्याच स्त्रीच्या संगोपनामुळे स्वत:च्या पायावर ही माणसं उभी राहिली जातात, तिचं बोट धरून हेच माणसं चालायला शिकतात, बोलायला शिकतात, पुढे मोठी होतात अन् समाज व्यवस्थेच्या म्हणा अथवा स्वत:च्या क्रूर कर्माचे फळ म्हणा हे लोक पुन्हा त्या स्त्री जातीच्या वर्णाकडे वाकडी नजर टाकतात. तिच्या छातीवरचा पदर खाली कसा पडेल, अशी निर्लज्ज अपेक्षा बाळगतात. तिच अपेक्षा कोपर्डीतल्या त्या तीन नराधमांनी बाळगली अन् १३ जूलै २०१६ च्या भल्या सकाळी छकुली अक्षरश: कुसकरली गेली. छकुलीच्या या बलात्कार आणि हत्याकांडाने अवघा 

महाराष्ट्र पेटला

कोपर्डीतल्या त्या छकुलीवर बलात्कार्‍यांनी नुसता बलात्कार केला नाही तर तिच्या शरीराचे लचके तोडले, तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृत शरीराची घोर विटंबणा केली. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेने कुठल्याही माणसाच्या मस्तकातली अळी सटकेल आणि असे कृत्य करणार्‍या नराधमाच्या नरडीचा घोट घ्या, असे म्हणेन आणि तेच झाले. बलात्कार झाल्यानंतर दोन-तीन दिवस या बलात्कार आणि हत्याकांडाकडे महाराष्ट्र पोलिसांनी तेवढ्या दखलतेने पाहितलं नाही, परंतु घटनेचं गांभीर्य आणि अशा निर्दयी घटनेला अंजाम देणार्‍या नराधमांच्या क्रूरकृत्याची वाच्यता महाराष्ट्रभर नव्हे देशभर झाली अन् माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाच्या तळपायाची आग अक्षरश: मस्तकात गेली. कोपर्डीतल्या छकुलीला न्याय मिळावा आणि बलात्कार करून हत्याकांड करणार्‍या नराधमांना जेरबंद करावे यासाठी न भूतो न भविष्यती महाराष्ट्रात एकी झाली. विखुरलेला मराठा समाज या घटनेने एकत्रित आला, नुसता एकत्रित आला नाही, आया बाया, बाया-बापडे, अबालवृद्ध बलात्कार्‍यांच्या नरडीचा घोट घ्या, नराधमांना भरचौकात फाशी द्या, गोळ्या घाला, अशा संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले. औरंगाबादेत पहिला मोर्चा निघाला. या मोर्चातल्या लोकांची संख्या किती हजार-पाचशे, लाख-दोन लाख नव्हे नव्हे किती तरी लाख असा एक नव्हे महाराष्ट्रात ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले. या मोर्चेकर्‍यांची सर्वात पहिली मागणी ही कोपर्डीतील छकुलीचा बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्या म्हणून सरकारला या घटनेची गंभीर दखल घ्यावी लागली आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला लढवावा लागला. जागतिक किर्तीचे उज्ज्वल निकम हे वकील छकुलीच्या बाजुने लढत होते. अखेर तब्बल १६ महिन्यांनी निकाल लागला आणि छकुलीला न्याय मिळाला. तिन्ही नराधमांना फासावर चढवण्याची शिक्षा झाली. त्यात पुन्हा त्यांना अपिलाची संधीही देण्यात आली. आज सकाळी ११ वाजून २३ मिनिटाने मा. न्यायाधीशांनी या तिघांना उभे करून फाशी घोषीत केली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचा संताप तोच होता, डोळ्यात दाहही तीच होती. प्रतिक्रिया संतप्त दिल्या जात होत्या. दुसरीकडे छकुलीची माता मात्र धाय मोकळून टाहो फोडत होती. कुठय माझी छकुली... माझ्या छकुलीचे हाल केले... ती देवाघरी गेली.... इथून पुढे तरी छकुलींना सांभाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी माझी छकुली आहे... त्या मातेच्या टाहोने उभा
महाराष्ट्र गहिवरला
निकाल लागल्यानंतर छकुलीची आई कोर्टाबाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते, कंठ फुटला होता, डोळ्यात अश्रू बसेनासे झाले होते. धाय मोकळू रडत होती. अवघ्या महाराष्ट्राचे आभार मानत होती. न्याय देवतेवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. वेगवेगळ्या संघटना, प्रत्यक्ष न्यायासाठी उभा राहिलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नरविराचे ती जाहीर आभार रडत-रडत मानत होती. तिच्या बोलण्यामध्ये आवाज रडका असला तरी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धार आम्हीही अनुभवली. आम्ही तर टेलिव्हिजन चॅनलसमोर बसून हे सर्व पहात होतो. ती माता म्हणत होती, ‘माझी छकुली गेली, शनिवार आला की आजही मला छकुलीची आठवण येते, महाराष्ट्रातील कुठल्याही छकुलीवर असा प्रसंग येऊ नये, यापुढे जिथं कुठं असा प्रसंग येईल तिथं-तिथं मी न्यायासाठी उभा राहिल, समाज बांधव एकत्र आले, परंतु हे सर्व पहायला माझी छकुली नाही, असं म्हणत पुन्हा ती आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती तर तिच्या आजुबाजुला असलेल्या काही महिला वकिल तिला धीर देत होत्या. छकुली तुमची नाही अवघ्या महाराष्ट्राची आहे, अवघ्या समाजाची आहे. छकुलीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र उभा राहिल, हे चित्र आम्ही जेव्हा पहात होतो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या प्रसंग डोळ्यासमोर येत होतो. राजेगावच्या पाटलाने एका गरीब महिलेची अब्रू लुटली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टात हे प्रकरण आलं, महाराजांनी राजेगावच्या पाटलाला बोलावणं धाडलं, पाटील मस्तवाल होता. तुम्ही नामधारी राजे असं म्हणून राजेंच्या आज्ञेवर यायला नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसक्या बांधून आणण्याचे आदेश दिले. फैसला झाला आणि राजेगावच्या पाटलाचा चौरंग केला. हात-पाय तोडले आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिला. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोपर्डीतल्या छकुलीला न्याय दिला. त्या तीन नराधमांना फासावर चढवले. कोपर्डीतले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे काम वासनेने पछाडलेले नराधम आज भारतीय लोकशाहीच्या आणि संविधानाच्या फटकार्‍याने गारद झाले. परंतु अशा कित्येक हरामी औलादी आजही
मातेचे थाने फाडी
अशा स्थितीमध्ये वागत आहेत. हे लोक नुसते वाचाळच नव्हे तर यांची पैदासही शुद्ध बिजाची असेल हे सांगणे कठीण असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता ऐकावयास येत आहे आणि ती सत्य आहे. जगद्गुरू संत तुकोबा अशा वृत्तीच्या लोकांबाबत बोलताना म्हणतात...
मातेची जो थाने फाडी | तया जोडी कोण ते ॥
वेदा निंदी तो चांडाळ | भ्रष्ट सुतकियाचा खळ ॥
आगी लावी घरा | मग वस्ती कोठे थारा ॥
तुका म्हणे वर्म | येरा नाचवितो भ्रम ॥
अशा औलादी खरंतर जन्मताच मरायला हव्यात. जो माणूस आईचे उर फुटेल अशा पद्धतीने वागतो, समाजामध्ये आई-बापांची मान खाली होईल, असे वागतो, त्यांना दु:ख देतो आणि त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो, माणूस म्हणून जगण्यापेक्षा एखाद्या जनावरागत जगतो. जणू तो मातेची थानेच फाडतो. अशा माणसांना कुठेच थारा नसतो. त्याच औलादी म्हणजे संतोष भवाळ, जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे हे तिघे आहेत. न्यायव्यवस्थेने या तिघांना बलात्काराची शिक्षा ठोठावली. हे जेवढे समाधानकारक आहे तेवढेच भारताच्या या लोकशाहीतील संविधानाने आणि संविधानाच्या भाषेत न्याय व्यवस्थेने पुढच्या कोर्टातही ही फाशी कायम ठेवत जलदगतीने या फाशीला अंतिम मुहूर्तमेढ द्यावी तेव्हाच कुठे समाजामध्ये बाया-बापडयांना निर्भयपणे वागता येईल.

Wednesday, 15 November 2017

फुंकार वेदनांची ! विकृती मनोवृत्तीची!!
अन् कायद्याचा कोथळा
-गणेश सावंत
जगाच्या पाठीवर महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या एकशे तिस कोटीच्या देशात असे काही प्रसंग आणि घटनांना अंजाम दिला जातो की त्या घटना आणि प्रसंग नुसत्या आठवल्या तरी समाजाचं भान हरवलं की हिरावून घेतलं हा प्रश्‍न माणूस म्हणून जगणार्‍यांना भेडसावून सोडतं. गुरूग्राम येथील रॉयन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी प्रद्यूम्न ठाकूर या चिमुरड्याची हत्या होते. हत्यारा अकरावीत शिकणारा विद्यार्थी असतो आणि या हत्येचं कारण परिक्षा लांबणीवर पडाव्यात म्हणून शाळेत काहीतरी व्हावं हे किरकोळ कारण असतं. यातून गुन्हेगारी विश्‍व वाढत चाललंय या पेक्षा अल्पवयीन मुलात गुन्हेगारीचं पालन होतयं हे अधिक गंभीर म्हणावं लागेल. आपल्या मुलांचं आयुष्य आणि भविष्य उज्वल व्हावं, भविष्यात त्यांनी काहीतरी करून दाखवावं यासाठी प्रत्येक माता-पिता आपल्या जीवाचं रान करतात. मुलांना लहानाचं मोठं करतात. त्यांना शिकवतात, समाजाचं ज्ञान देतात. परंतू हेच मुले अल्पवयीन असतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये गंभीर गुन्हा करण्याच्या आळ्या जेव्हा वळवळ करतात तेव्हा दोष गुन्हेगारी स्वरूपाच्या त्या मुलांना द्यायचा की त्यांच्या मातापित्यांना की अजून समाज व्यवस्थेला द्यायचा? हेच कळायला मार्ग नाही. सदरची घटना ही जेवढी गंभीर तेवढीच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नव्हे नव्हे तर वाडीवस्ती तांड्यापासून शहरी भागापर्यंत आपल्या पाल्याचा सांभाळ करणार्‍या पालकांना चिंतेत टाकणारी आणि समाज व्यवस्थेला आत्मपरिक्षण करावयास लावणारी म्हणावी लागेल. वेदनांवर फुंकार टाकत जो तो आपल्या मुलांचा सांभाळ करत असतो परंतू हा सांभाळ करतांना मानवी जीवनामध्ये जे आक्रमन होते ते आक्रमन रोखण्यासाठी किंवा त्या अक्रमनाला प्रतिविरोध करण्यासाठी मुलांची अकलनशक्ती वाढवावी यासाठी पालकांसह समाजजीवनातील तुम्ही आम्ही प्रयत्नशील आहोत का? हा प्रश्‍न आता प्रत्येकाने स्वत:ला विचारायलाच हवा! प्रद्यूम्नची हत्या आणि हत्यार्‍याचं वय त्याचबरोबर त्या हत्येचं कारण जेव्हा समजून घेतलं जातं तेव्हा 
अल्पवयीन गुन्हेगारी 
मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे उघड स्पष्ट होतं. शालेय विद्यार्थ्यांमधली ही गुन्हेगारी एका स्वरूपात नाही हेही तेवढंच खरं. वर्गमित्रावर गोळीबार करणं, वर्गमैत्रीणीवर बलात्कार करणं, चाकू मारणं, शिक्षकांची हत्या करणं अशा कैक घटना महाराष्ट्रासह देशात जेव्हा घडतात तेेव्हा घराबरोबर ज्या शाळांना गुरूकुल म्हणून ओळखलं जातं त्यांची जबाबदारी आता समाजज्ञानाबरोबर समाजासोबत भरकटत येणार्‍या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आपल्या मुलांना शिवूही नयेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचं म्हणावं लागेल. प्रद्यूम्नची हत्या ही केवळ शाळेमध्ये असं काहीतरी भयानक कृत्य व्हावं आणि त्या कृत्यातून आपली अकरावीची परीक्षा लांबणीवर पडावी एवढंच कारण यामध्ये असेल तर अल्पवयीन मुलांच्या मस्तकामध्ये गुन्हेगारी कृत्याचा हा जो किडा वळवळतोय तो किडा वेळीच ज्ञानअर्जनाने म्हणा, भावनेनेन म्हणा ठेचायला हवा. हा किडा ठेचणे म्हणजे सिमेवरच्या अतिरेकी कारवाया रोखणे सोपे परंतू हा किडा ठेचणे तेवढा अवघड हे उघड सत्य प्रत्येक पालकांनी नक्कीच आत्मसात करायला हवं. मुलांच्या डोक्यांमध्ये गुन्हेगारी वृत्तीचा किडा का वळवळतोय याचे असंख्य कारण आहेत. समाजामध्ये असलेली विकृती घडत चाललेले गुन्हेगारी स्वरूपाचे घटनाक्रम आणि वेगवेगळ्या प्रसिद्धीमाध्यम म्हणा अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमामधून दाखवले जाणारे कार्यक्रम म्हणा, हे सर्वच अल्पवयीन मुलाच्या मस्तकात गुन्हेगारी वृत्तीचा किडा जन्माला घालण्याचं साधन समजायला हवं. आम्ही नेहमी म्हणतो मोहन करमचंद गांधी नावाच्या मुलाने वयाच्या ७ व्या वर्षी राजा हरिश्‍चंद्राचं नाटक एक वेळेस पाहितलं आणि या मुलावर या नाटकाचा प्रभाव एवढा पडला की मस्तकातल्या राजा हरिश्‍चंद्राच्या किड्याने मोहन करमचंद गांधींना उभं आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेलं आणि सरतेशेवटी हाच मुलगा गांधी नावाचा महात्मा म्हणून जगभर ओळखला जावू लागला. मग एक सांगा जर एका नाटकाचा प्रभाव सकारात्मक दृष्टीने एवढा पडू शकतो तर मग  आपली मुले रोज वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्यांमधून पहात असलेले बलात्काराचे प्रसंग, मारधाडीचे प्रसंग, खूनासारखे अतिरंजीत दृष्य दिवसातून दहा ते पन्नास वेळा पहात असतील. तर मग त्यांच्या मस्तकात राजा हरिश्‍चंद्राचा किडा जन्म घेईल की एखाद्या खुन्याचा किडा वळवळ करील याचाही शोध आणि बोध या संवेदनशिल विषयात नक्कीच घ्यावा लागेल. वेदनांच्या फुंकारवर जेव्हा विकृती मनोवृत्ती अरुढ होते तेव्हा अशा घटना वाढत जातात आणि त्या घटनांना अन्जाम देणार्‍यांची संख्याही तेवढीच मोठी होते ही समाजासाठी प्रचंड घातक अशी दिशा म्हणावी लागेल. ‘मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ किंवा ‘शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी’ हे जेवढे त्रिवार सत्य तेवढेच ‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण’ हेही नाकारण्याजोगे नक्कीच नाही. याला जबाबदार कुठल्या एका घटकाला किंवा कुठल्या एका घराला नक्कीच धरता येणार नाही. सध्याच्या या स्पर्धेच्या युगात शुल्लक वाद, किरकोळ भांडण कधी जीवघेणे ठरेल हे जसं सांगता येत नाही तसंच याचं लोण आता शाळेकरी मुलांपर्यंत येवून पोहचलं आहे हे सत्यही आता स्विकारावं लागणार आहे.  मित्र मित्रांचे खंडणीसाठी अपहरण करतो, कधी त्याची हत्या करतो, कधी वर्गमैत्रीणीवर सामूहिक बलात्कार होतात, किरकोळ वादातून विद्यार्थ्याचा बळी दिला जातो हे सर्व प्रकार पाहितले तर समाजमनाचा वाढलेला स्वार्थ आणि हरपत चाललेली संवेदनशिलता हे आता तुमच्या आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणावे लागेल. अल्पवयीन विकृतीचे आव्हान कसे पेलवायचे? हा जसा प्रश्‍न तुमच्या आमच्यासमोर आणि अखंडसमाजासमोर आऽ करून उभा आहे तसा 
कायद्याचा कोथळा
काढणारा प्रसंगही कायद्याच्या रक्षकांकडूनच उभा राहतो तेव्हा मात्र समाजमनाबरोबरच कायदाही आता रक्षकांच्या हाती सुरक्षित नाही याचीही भिती वाटू लागते. सांगलीमध्ये अनिकेत कोथाळे नावाच्या तरुणाचा मृत्यू कोठडीत होतो, पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याने कोठडीत प्रचंड मारहाण केल्याने अनिकेत यमसदनी जातो हे जेवढे दुर्दैवं त्यापेक्षाही पोलिसांनी त्या पुढे केलेले कृत्य हे गुन्हेगारीवृत्तीला प्रोत्साहन देणारे म्हणावे लागेल. सांगलीतल्या अनिकेत कोथाळेला अटक केली जाते, त्याला मारहाण केली जाते, मारहाणीत त्याचा मृत्यू होतो, मृत्यूनंतर कामटे नावाचा पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस तो मृतदेह सांगलीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी घेवून जातात. दरीमध्ये तो एकदा नव्हे तर दोनदा जाळण्याचा प्रयत्न होतो आणि नंतर अनिकेत कोथाळेची हत्या करण्यासाठीच पोलीसांनी सुपारी घेतल्याचा आरोप होतो, किती  हे भयंकर! ज्या पोलीसांकडे कायद्याचा रक्षक म्हणून पाहितलं जातं तेच पोलिस समाज जीवनामध्ये जगतांना कायदा हातात घेवून कायद्याचे भक्षक होतात तेव्हा कायद्याचा दबदबा किंवा कायद्याची सकारात्मक दृष्टी ही समाजमनाबरोबर शालेय जीवनात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर कशी असेल आणि विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन कायद्याच्या बाबत कसा असेल हे समजून घ्यावंच लागेल. प्रद्यूम्नची हत्या आणि अनिकेतची हत्या हे दोन वेगवेगळे प्रसंग असले तरी समाज जीवनात विकृती वाढवणारे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणारे प्रसंग म्हणावे लागतील आणि हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. अनिकेतची हत्या करणारा पोलीस अधिकारी हा कामटे नावाचा आहे, आम्हाला आठवतं जेव्हा मुंबई महानगरीवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेव्हा अशोक कामटे नावाच्या दमदार आणि देशभक्त कायदा रक्षक अधिकार्‍याने अखंड मानवजातीला सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाचं रान करत दहशतवाद्यांशी दोन हात केले. या दोन हातामध्ये आमचे अशोक कामटे शहिद झाले, आजही अशोक कामटेंची कामगिरी आठवली की सिना चौडा होतो, मान उंचावते आणि निधड्या छातीने अशोक कामटेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला मनोमनी सलाम ठोकावासा वाटतो! परंतू दुसरीकडे अनिकेत कोथळेची हत्या करणारा कामटे नावाचा अधिकारी जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा अशा अधिकार्‍याला भर चौकात चाबकाने फोडावं असा संताप मनोमनीच नव्हे तर पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संताप आणि संताप व्यक्त करावासा वाटतो. ज्यांच्या हाती कायदा आहे, ज्यांच्यावर समाज सुरक्षेची धुरा आहे त्याच लोकांनी सुपारीबाज होत गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहीत करण्याचं धोरण आखलं असेल तर त्या कामटे नावाच्या अधिकार्‍याने जणू कायद्याचाच कोथळा बाहेर काढला म्हणावा लागेल. हे दोन्ही प्रसंग वेगवेगळे आहेत परंतू समाजाला दिशा देणारे किंवा समाजाला दिशा देण्यासाठी एक चिमटा नव्हे तर सरळ वार करणारे आहेत त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीची नांगी ठेचण्यासाठी सर्वप्रथम कायद्याच्या रक्षकांना सरळ करण्याचं काम सरकारनं करावं. अनिकेत कोथळेची हत्या झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात महाराष्ट्रात पोलीसांविरोधात कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त बावीस गुन्हे दाखल झालेे आहेत. हत्या करण्याचा प्रयत्न, बनावट नोटा प्रकरण या गंभीर गुन्ह्यासह आत्महत्यासारख्या घटनांना प्रोत्साहन देणारे गुन्हेही या पोलीस दलातील कर्मचार्‍यांवर दाखल झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात असलेलं गृहविभाग आता गुन्हेगारी विभाग होतयं का? हा सवाल नक्कीच विचारला तर तो चुकीचा असणार नाही. पोलीस खात्यामधली गुन्हेगारी प्रवृत्ती जशी राज्याला आणि देशाला घातक आहे तशीच अल्पवयीन मुलांमध्ये शिरत चाललेली गुन्हेगारी मनोवृत्ती ही देशाच्या भविष्याला घातक आहे असं आता समजून घ्यावं लागेल. त्यासाठी कोणी उपाय योजना करो अथवा न करो प्रत्येक माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी आधी स्वत:साठी झटावं म्हणजे त्याच्यातील ही मनोवृत्ती सकारात्मक असेल आणि ती सकारात्मक मनोवृत्ती आपल्या पाल्याच्या डोक्यात गुन्हेगारी वृत्तीचा किडा जन्माला घालू देणार नाही.