Wednesday, 29 November 2017

विशेष संपादकीय...

मातेची जो थाने फाडी |
                                                                                                                                                                       

-गणेश सावंत-9422742810


कोपर्डीतील घटना महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरून सोडणारी. स्त्री जातीच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी. कोपर्डीतील छकुलीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या ही उभ्या महाराष्ट्राला शरमून टाकणारी बाब. या घटनेमुळे उभा महाराष्ट्र पेटून उठला. अखेर आज न्यायदेवतेने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार करणारे बलात्कारी हे नुसते नराधमच नाहीत तर ज्या स्त्री जातीच्या उदरातून यांची पैदास झाली अक्षरश: त्या उदरालाच हे तिघे म्हणजे एक शिवी आहे, नव्हे नव्हे शाप आहे.
ज्या महाराष्ट्राचा इतिहास बलात्कार्‍यांचा चौरंगा करणारा आहे. ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍याच्या भाजीच्या देठाला हात लावण्याची हिंम्मत ही कोणी करत नव्हतं, त्याच महाराष्ट्रात वड्या वगळीच्या पैदाशी गेल्या काही वर्षात थय्या..थय्या नाचत आहेत. कामातूर झालेले श्‍वापदाच्या औलादी आपली कामवासना भागवण्यासाठी कवळ्या कळ्या कुस्कारीत आहेत. तळपायाची आग मस्तकाला जावी, हाताच्या मुठी वळाव्यात, ओठ दाताखाली यावेत, मस्तकाला आट्या पडाव्यात इतका संताप या बलात्कार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिन्दुस्तानात पहावयास मिळतो. कानून अंधा होता हैं, न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणून असे गुंड मवाली आणि कामांध सावज टिपूण आपली वासना क्षमावतात आणि निष्पापांना जिवानीशी मारतात अशीच काहीशी भावना लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चावलेल्या लोकशाहीच्या राज्यामध्ये वावारणार्‍या प्रत्येकांची झाली होती. परंतू दिल्लीत निर्भयाचा बलात्कार झाला, तिची क्रुरतेने हत्या करण्यात आली. त्या हत्त्येने अवघा देश एवकटला अन् बलात्काराच्या गुन्ह्यात बदल करण्यास शासन व्यवस्थेला भाग पाडले. त्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आता तरी देशातील भगिनी मुक्त संचार करेल, निर्भयपणे वावरले. परंतू नाही, कामातुरा भय ना लज्जा असलेले काम पिपासू आपलं काम दाखवतच राहिले. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात बलात्काराच्या घटना घडतच राहिल्या, परंतु कायदा कठोर झाला आणि त्या कठोर कायद्यातून बलात्कार्‍यांविरोधात निकाल लागू लागले. अशा वातावरणातही महाराष्ट्र गेल्या वर्षी पुन्हा काही तथाकथीत नराधमांनी आपल्या क्रुर कृत्यातून काळवंडून टाकला. जणू मातेच्या थानाचीच फाडाफाडी या हरामींनी केली. ज्या स्त्री जातीच्या उदरातून जन्म घेतला जातो तिचं स्तनपान करून अंगात बळ आणलं जातं त्याच स्त्रीच्या संगोपनामुळे स्वत:च्या पायावर ही माणसं उभी राहिली जातात, तिचं बोट धरून हेच माणसं चालायला शिकतात, बोलायला शिकतात, पुढे मोठी होतात अन् समाज व्यवस्थेच्या म्हणा अथवा स्वत:च्या क्रूर कर्माचे फळ म्हणा हे लोक पुन्हा त्या स्त्री जातीच्या वर्णाकडे वाकडी नजर टाकतात. तिच्या छातीवरचा पदर खाली कसा पडेल, अशी निर्लज्ज अपेक्षा बाळगतात. तिच अपेक्षा कोपर्डीतल्या त्या तीन नराधमांनी बाळगली अन् १३ जूलै २०१६ च्या भल्या सकाळी छकुली अक्षरश: कुसकरली गेली. छकुलीच्या या बलात्कार आणि हत्याकांडाने अवघा 

महाराष्ट्र पेटला

कोपर्डीतल्या त्या छकुलीवर बलात्कार्‍यांनी नुसता बलात्कार केला नाही तर तिच्या शरीराचे लचके तोडले, तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृत शरीराची घोर विटंबणा केली. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेने कुठल्याही माणसाच्या मस्तकातली अळी सटकेल आणि असे कृत्य करणार्‍या नराधमाच्या नरडीचा घोट घ्या, असे म्हणेन आणि तेच झाले. बलात्कार झाल्यानंतर दोन-तीन दिवस या बलात्कार आणि हत्याकांडाकडे महाराष्ट्र पोलिसांनी तेवढ्या दखलतेने पाहितलं नाही, परंतु घटनेचं गांभीर्य आणि अशा निर्दयी घटनेला अंजाम देणार्‍या नराधमांच्या क्रूरकृत्याची वाच्यता महाराष्ट्रभर नव्हे देशभर झाली अन् माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाच्या तळपायाची आग अक्षरश: मस्तकात गेली. कोपर्डीतल्या छकुलीला न्याय मिळावा आणि बलात्कार करून हत्याकांड करणार्‍या नराधमांना जेरबंद करावे यासाठी न भूतो न भविष्यती महाराष्ट्रात एकी झाली. विखुरलेला मराठा समाज या घटनेने एकत्रित आला, नुसता एकत्रित आला नाही, आया बाया, बाया-बापडे, अबालवृद्ध बलात्कार्‍यांच्या नरडीचा घोट घ्या, नराधमांना भरचौकात फाशी द्या, गोळ्या घाला, अशा संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले. औरंगाबादेत पहिला मोर्चा निघाला. या मोर्चातल्या लोकांची संख्या किती हजार-पाचशे, लाख-दोन लाख नव्हे नव्हे किती तरी लाख असा एक नव्हे महाराष्ट्रात ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले. या मोर्चेकर्‍यांची सर्वात पहिली मागणी ही कोपर्डीतील छकुलीचा बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्या म्हणून सरकारला या घटनेची गंभीर दखल घ्यावी लागली आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला लढवावा लागला. जागतिक किर्तीचे उज्ज्वल निकम हे वकील छकुलीच्या बाजुने लढत होते. अखेर तब्बल १६ महिन्यांनी निकाल लागला आणि छकुलीला न्याय मिळाला. तिन्ही नराधमांना फासावर चढवण्याची शिक्षा झाली. त्यात पुन्हा त्यांना अपिलाची संधीही देण्यात आली. आज सकाळी ११ वाजून २३ मिनिटाने मा. न्यायाधीशांनी या तिघांना उभे करून फाशी घोषीत केली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचा संताप तोच होता, डोळ्यात दाहही तीच होती. प्रतिक्रिया संतप्त दिल्या जात होत्या. दुसरीकडे छकुलीची माता मात्र धाय मोकळून टाहो फोडत होती. कुठय माझी छकुली... माझ्या छकुलीचे हाल केले... ती देवाघरी गेली.... इथून पुढे तरी छकुलींना सांभाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी माझी छकुली आहे... त्या मातेच्या टाहोने उभा
महाराष्ट्र गहिवरला
निकाल लागल्यानंतर छकुलीची आई कोर्टाबाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते, कंठ फुटला होता, डोळ्यात अश्रू बसेनासे झाले होते. धाय मोकळू रडत होती. अवघ्या महाराष्ट्राचे आभार मानत होती. न्याय देवतेवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. वेगवेगळ्या संघटना, प्रत्यक्ष न्यायासाठी उभा राहिलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नरविराचे ती जाहीर आभार रडत-रडत मानत होती. तिच्या बोलण्यामध्ये आवाज रडका असला तरी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धार आम्हीही अनुभवली. आम्ही तर टेलिव्हिजन चॅनलसमोर बसून हे सर्व पहात होतो. ती माता म्हणत होती, ‘माझी छकुली गेली, शनिवार आला की आजही मला छकुलीची आठवण येते, महाराष्ट्रातील कुठल्याही छकुलीवर असा प्रसंग येऊ नये, यापुढे जिथं कुठं असा प्रसंग येईल तिथं-तिथं मी न्यायासाठी उभा राहिल, समाज बांधव एकत्र आले, परंतु हे सर्व पहायला माझी छकुली नाही, असं म्हणत पुन्हा ती आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती तर तिच्या आजुबाजुला असलेल्या काही महिला वकिल तिला धीर देत होत्या. छकुली तुमची नाही अवघ्या महाराष्ट्राची आहे, अवघ्या समाजाची आहे. छकुलीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र उभा राहिल, हे चित्र आम्ही जेव्हा पहात होतो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या प्रसंग डोळ्यासमोर येत होतो. राजेगावच्या पाटलाने एका गरीब महिलेची अब्रू लुटली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टात हे प्रकरण आलं, महाराजांनी राजेगावच्या पाटलाला बोलावणं धाडलं, पाटील मस्तवाल होता. तुम्ही नामधारी राजे असं म्हणून राजेंच्या आज्ञेवर यायला नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसक्या बांधून आणण्याचे आदेश दिले. फैसला झाला आणि राजेगावच्या पाटलाचा चौरंग केला. हात-पाय तोडले आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिला. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोपर्डीतल्या छकुलीला न्याय दिला. त्या तीन नराधमांना फासावर चढवले. कोपर्डीतले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे काम वासनेने पछाडलेले नराधम आज भारतीय लोकशाहीच्या आणि संविधानाच्या फटकार्‍याने गारद झाले. परंतु अशा कित्येक हरामी औलादी आजही
मातेचे थाने फाडी
अशा स्थितीमध्ये वागत आहेत. हे लोक नुसते वाचाळच नव्हे तर यांची पैदासही शुद्ध बिजाची असेल हे सांगणे कठीण असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता ऐकावयास येत आहे आणि ती सत्य आहे. जगद्गुरू संत तुकोबा अशा वृत्तीच्या लोकांबाबत बोलताना म्हणतात...
मातेची जो थाने फाडी | तया जोडी कोण ते ॥
वेदा निंदी तो चांडाळ | भ्रष्ट सुतकियाचा खळ ॥
आगी लावी घरा | मग वस्ती कोठे थारा ॥
तुका म्हणे वर्म | येरा नाचवितो भ्रम ॥
अशा औलादी खरंतर जन्मताच मरायला हव्यात. जो माणूस आईचे उर फुटेल अशा पद्धतीने वागतो, समाजामध्ये आई-बापांची मान खाली होईल, असे वागतो, त्यांना दु:ख देतो आणि त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो, माणूस म्हणून जगण्यापेक्षा एखाद्या जनावरागत जगतो. जणू तो मातेची थानेच फाडतो. अशा माणसांना कुठेच थारा नसतो. त्याच औलादी म्हणजे संतोष भवाळ, जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे हे तिघे आहेत. न्यायव्यवस्थेने या तिघांना बलात्काराची शिक्षा ठोठावली. हे जेवढे समाधानकारक आहे तेवढेच भारताच्या या लोकशाहीतील संविधानाने आणि संविधानाच्या भाषेत न्याय व्यवस्थेने पुढच्या कोर्टातही ही फाशी कायम ठेवत जलदगतीने या फाशीला अंतिम मुहूर्तमेढ द्यावी तेव्हाच कुठे समाजामध्ये बाया-बापडयांना निर्भयपणे वागता येईल.

No comments:

Post a Comment