Sunday, 28 January 2018


वैतागवाडी ते तक्रारवाडी एक प्रवास 

-गणेश सावंत
रोज सकाळी उठायचं दिनचर्या आटोपयाची, ऑफिसला यायचं, ऑफीस झालं की रात्री घरी जायचं, सकाळी पुन्हा तेच...तेच. अक्षरश: वैताग, जिव कंटाळला. जे काम मी करतो त्या कामात समाजकार्य मोठं दिसत असलं तरी हे करत असताना खून, दरोडे, बलात्कार यासारखे रक्तरंजित बातम्यांशिवाय काहीच सापडत नाही. नाविन्यपूर्ण काही द्यायचं म्हटलं तर ते शोधावं लागतं. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर लोक स्वीकारतील का? असाही प्रश्‍न पडतो. अशा एक ना अनेक प्रश्‍नातून वैतागलेला माणूस एकतर न्यूनगंडतेत जातो, नसता आपल्या कामामध्ये टोपले टाकण्याचे काम करतो. त्या कामामध्ये गोडी नसते, रस नसतो. काम करायचय म्हणून तो काम करत असतो, असच काहीसं झालं. वैतागलेला मी तसा सुपरिचीत पिंपळनेर (गणपतीचे) या गावचा. परंतु जसं वर आपण शिर्षक वाचलं ‘वैतागवाडी ते तक्रारवाडी’ त्याचं स्पष्टीकरण द्यायचं म्हणून सांगतो. माझ्या गावात वैतागवाडी आहे. म्हणून शिर्षकाची सुरुवात आणि अंत हा शेवटी कळेलच. जसा मी वैतागलेला तसा पॉझिटिव्ह दृष्टीकोन ठेवणाराही. परंतु हे पॉझिटिव्ह स्पिरीट कुठे मिळेल?
ते टॉनिक कुठे असेल? हा प्रश्‍न मला पडायला नको. परंतु तरीही पडला आणि आपसुक ते स्पिरिट, ते..ते...ते टॉनिक, स्पिरिट इथेच, याच मातीत, सह्याद्रीच्या पर्वतरांगात नक्की सापडेल. कारण तिथलं टॉनिक मिळालं, तिथल्या मातीतलं सुगंध, तिथली हवा अंगाला झोंबली की झोपलेला माणूस जागा होतो, जागा झालेला माणूस उठून बसतो. उठून बसलेला माणूस पळता होतो आणि तोच पळणारा माणूस आपल्या यशाचा ध्वज फडकवतो. ते टॉनिक कुठलं 
माझ्या शिवाजीराजांचं 
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहितलं, ते स्वप्न शून्यातून प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आठवले की, उर भरून येतो. छाती छप्पन इंचाची होते. परंतु ही छाती त्या थापाड्या छप्पन इंचाची नाही तर मराठमोळ्या, रांगड्या मराठ्यांची छाती असते. आणि तो मराठा म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला, कुठल्याही कुळातला, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्मातला तो मराठाच. म्हणून म्हटलं, चला आपण रायगडावर जावं, सदरेवर महाराजांना मुजरा करावा. रायरेश्‍वराच्या मंदिरात जाताना आधी शंभू महादेवांचं दर्शन घेण्यापेक्षा थेट माझ्या राजाच्या समाधीशी नतमस्तक व्हावं. ठरलं, ठरलं, अन् प्रजासत्ताकदिन एकतर महाडच्या चवदार तळ्यावर ध्वजारोहण करून रायगड सर करायचा नाहीतर रायगडावर जावून तिरंग्याला सलामी देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा. त्यामुळे २५ जानेवारीच्या रात्री ९ वाजता आम्ही पिंपळनेरहून निघालो. सोबत चालक, बाळू वरपे, मित्र सुशिल क्षीरसागर हे तर होतेच परंतु पंचेचाळीशी ते पन्नाशी ओलांडलेले, कधीही गड न चढलेले माझ्या
पतसंस्थेचे सचिव अशोक भुजबळ आणि व्यवस्थापक एकनाथ नरवडे उर्फ मामा हेही महाराजांच्या समाधीशी नतमस्तक होण्यासाठी माझ्यासोबत आले. रात्रीचा प्रवास केला. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास आम्ही महाडला पोहचलो. त्याठिकाणी एका लॉजवर फ्रेश होण्यासाठी थांबलो. एक-दीड तासाची झोप घेतली. भल्या सकाळी उठलो, फ्रेश होऊन थेट तिरंग्याला सलामी देण्यासाठी बाहेर पडलो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना रायगडावर जाण्याचे मनसुबे आखले. खरे तर बाकीचे सर्व रोपवेने येतील, असा मी ठरवलं होतं. परंतु त्यांनीही रायगड पायी चालायचं ठरवलं. सुट्‌ट्यांचे दिवस असल्याने रायगडावर तुफान गर्दी होती. किमान लाखभर लोक २६ जानेवारी रोजी तिथे असतील. आम्ही सकाळी साडेनऊला गड सर करायला सुरुवात केली अन् 



पावलोपावली महाराजांची आणि महाराजांसोबत असलेल्या अठरा पगड जातीतील माळ्यांची आठवण त्यावेळी येत होती. आमच्यातला अशोक भुजबळ हा अर्ध्यावरती थकला. तो तेथूनच परतला. मात्र आम्ही चढाई कायम ठेवली. गेल्या दहा वर्षांपासून वर्षातून दोन वेळेस मी रायगडाशी नतमस्तक होण्यासाठी जातोच. आजही जात असताना एक विशेष वाटलं, ते म्हणजे महिलांची आणि लहान मुलांची संख्या गडावर वाढताना दिसली. आज आणखी एक नवं दिसलं ते म्हणजे हळदीच्या अंगाने एक जोडपं करवले-करवल्यांसह गड सर करत होतं. बिचार्‍या नव्या नवरीची दमछाक होत होती. नरदेव मात्र हाडामांसाचा शिवभक्त वाटला. तसं नवी नवरीही कमी नव्हती. चालताना दम भरायचा, त्रास व्हायचा परंतु काल - परवाच डोक्यावर अक्षता पडलेल्या आणि हातात हात दिलेल्या त्या नवर्‍यावर तिचा प्रचंड
विश्‍वास दिसून येत होता. तो तिला प्रोत्साहीत करायचा, आणखी पाच-पंचेवीस पायर्‍या चढायच्या, मग महाराजांची समाधी आलीच, असं म्हणायचा तर कधी जिजाऊ मॉ साहेबांच्या कथा सांगून शिवाजी जन्माला येईल कसा? असेही म्हणायचा. ती नवरी नवर्‍याच्या हाकेला साद देत त्याच्या पावलावर पाऊल देऊन पुढे चलायची, परंतु करवले-करवल्या मात्र बोट मोडत होते. मुडद्या म्हणून मागं बोलतही होते. मी तब्बल एक तास या जोडप्याच्या मागे-पुढे होतो. रायगडाचा पहिला दरवाजा म्हणजे चित्ते दरवाज्यापर्यंत आलो त्यावेळी दोन गोंडस लेकरं गड चढत होते. पाच ते सात वर्षे वयोगट असेल त्या मुला-मुलींचं, दोन पायर्‍या चढायचे, बोबड्या बोलाने ‘शिवाची मालाच की जय...’ असा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडायचा. त्यांची ती ललकारी ऐकून मीही प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की... म्हटलं त्याबरोबर या दोन्ही लेकरांनी एवढ्या जोरात ‘जय’ म्हणून आवाज दिला. त्या आवाजाबरोबर अन्य आवाजांनी चित्ते दरवाजा दणाणून गेला, जणू सह्याद्रीच्या पर्वत रांगातच हा आवाज निनादत होता. असं जाणवलं. आम्ही गडावर गेलो, माझ्या सोबत जे नवखे आले होते, त्यांना सोबत घेतले. गडाची शक्य तो पूर्ण माहिती दिली. महाराजांच्या सदरेवर जाऊन महाराजांना मुजरा केला. समाधीशी नतमस्तक होऊन टकमक टोकापासून हिरकणी बुरुज यासह अन्य महत्त्वाचे पॉईंट त्यांना दाखविले आणि परतीचा प्रवास पुन्हा पायीच गेला. येताना अवघ्या ४५ मिनिटात येणार आम्ही या वेळेस मात्र सव्वातास गड उतरताना लागला. खाली आलो आणि रायगडवरच मुक्काम करायचा ठरवलं. पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत मुक्काम केला आणि ठरलं, जावळीचं खोरं पहायचं, प्रताप गडाचा प्रताप पहायचा, अफजल खानाचा कोथळा पहायचा, शिवनिती, शिवतंत्र, शिवमंत्र तेथूनच घ्यायचा. २७ जानेारीला सकाळी आम्ही निघालो, प्रताप गडाच्या 

जाज्वल्य प्रताप 
 याची देही याची डोळा अनुभण्याचा रायगडवरून महाड पंचेवीस किलोमीटर आणि तेथून २७ ते २८ किलोमीटरवर प्रतापगड. तब्बल वीस-तीस किलोमीटरचा घाट आणि या घाटातून दिसणारं जावळीचं खोरं आजही तेवढच किर्र जंगलाचं, आताही त्या जंगलामध्ये कुठं कुठं सुर्यकिरण पोहचत नसत मग आम्हाला कोडं पडलं, त्या वेळेसचं जंगल कसं असेल. जसा जसा प्रतापगड जवळ येत गेला तशी तशी शिवभक्तांची मांदियाळी वाढती दिसून येऊ लागली. महाबळेश्‍वरवरून येणारे पर्यटक वेगळे आणि आम्ही रायगडाकडून जाणारे वेगळे. प्रताप गडाच्या जवळ रस्ते वाहनांनी खचाखच भरलेले होते. गेल्या काही तासांपासून ट्रॅफिक जॅम होती, मात्र अशा स्थितीतूनही थोडा अडेलतट्टुपणा करत माझ्या
गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बरीचशी पुढे नेली. परंतु एक ठिकाण असं होतं, एका पर्यटकाने स्वत:ची व्हॅगनर रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुळे गडावर येणारी एस.टी. बस आणि गड चढणारी एसटी बस यांच्यासाठी जागाच नव्हती. तब्बल एक ते दीड तासापासून ते लोक त्याठिकाणी थांबले होते. काय करायचं, यापेक्षा गाडी उभी केलेल्या माणसाला शिव्या शाप देत होते, आमची गाडी बरीचशी पाठीमागे होती. नेमके काय झाले म्हणून पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो, पुढे आलो तर 
व्हॅगनरा अडथळा 
आम्हाला दिसला. आम्हालाही काहीच कळेना. मात्र एवढ्या गर्दीमधला एक पर्यटक सहज म्हणून गेला. उचलाना ती गाडी,
मी मागचा पुढचा विचार केला नाही, चला रे हात लावा म्हटलं, सुरुवातीला पाच-सहा जण आणि माझ्यासोबत असलेला सुशिल हा त्याठिकाणी आला मात्र गाडी पाच सहा जणांना पाठीमागून उचलली नाही. त्याचक्षणी आमच्या सुशीलने छत्रपती शिवाजी महाराज की... अशी ललकारी दिली त्यावेळी दहा-पंधरा जण त्याठिकाणी जमा झाले. ‘जय’ म्हणत अवघ्या तीन सेकंदात गाडी किमान दोन फुट रस्त्याच्या बाजुला केली. दुसर्‍यांदा पुन्हा तीच घोषणा आणि तिसर्‍यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज की जय व हर हर महादेवच्या निनादात व्हॅगनरला सोळा - सतरा जणांनी अक्षरश: उचलून बाजू ठेवले. काय त्या नावात ताकत, त्या घोषणेमध्ये काय ती ताकत. मी सुरुवातीला म्हटलं ना तुम्हाला स्पिरीट आणि टॉनिक तिथेच मिळते. कारण शिवाजी हे नाव उलटं वाचलं की, 
जीवाशी 
असा शब्द तयार होतो. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज जिवशी खेळले म्हणून ते सामर्थ्यशाली होत जगातले
नित्यांमधले सर्वोत्तम जगज्जेते ठरले. सर्वत्र पारतंत्र्याचा अंधार असताना मातेने स्वातंत्र्यचं स्वप्न पाहितलं म्हणून ते स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा व्यक्ती फक्त शिवाजी महाराजच हे उघड सत्य सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. प्रतापगडावर आम्ही गेलो, प्रतापगड तसा इतर गडांपेक्षा बरा होता, कारण आजही हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा गड आहे. प्रतापगडाचा प्रताप आठवल्यावर आजही अंगावर शहारे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मोगलांना पळताभुई थोडी करून सोडली होती. दिल्लीत बडी बेगम चीड चीड करत होती. अपने सल्तनत मे ऐसा कोई माई का लाल नही जो शिवा को पकडके ला सके, ऐसा कोई मर्द नही, जो मराठो को जेरबंद कर सके, छि..थू करत बडी बेगम आपल्या सरदारांना कोसत
होती. त्याच वेळी सरदारांच्या सर्वशेवटी रांगेत उभा राहीलेला एक सरदार म्हणाला, मै लाऊंगा शिवा को जिंदा या मुडदा पकडके, तो कोण? तो तोच एका बसनीला बोकड फस्त करायचा. तो तोच लोखंडी पहारीचा चौव्वा करायचा, तो तोच ज्याने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी महाराजांना जेरबंद केलेला, तो तोच शहाजी महाराजांचे धाकटे बंधू संभाजी महाराजांची हत्या केलेला, तो तोच अफजल खान. अफजल खान पुढं आला, बडी बेगमच्या समोर असलेल्या ताटातला पानाचा विडा उचलला, तोंडात टाकला. तो कचाकचा खालला. मै लाऊंगा ऊस पहाडी चुहे को पकडके, जिंदा या मुडदा. इकडे रायगडावर ही बातमी कळाली. अफजल खान स्वराज्यावर चालून येतो, शिवाजी महाराजही प्रश्‍नचिन्हात अडकले. आलेल्या या संकटाचा सामना कसा करायचा? राजमाता जिजाऊही या संकटाने व्याकुळ होत जगदंबेसमोर बसून राहिल्या. तेवढ्याच धिराने राजमातांनी शिवाजी राजांना या संकटाचा सामना करण्यासाठी मानसिक बळ

दिले आणि ठरलं, बलाढ्य अफजल खानाशी ताकतीने नव्हे तर डोक्याने लढायचं. अफजल खान पन्नास हजाराची फौज घेऊन जावळीच्या खोर्‍यापर्यंत आला होता. येताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी हिंदूंची अनेक मंदिरे पाडली होती. शेतकर्‍यांची शेती लूटली होती, बाया-पोरी बाटवल्या होत्या. स्वराज्यात अक्षरश: काहुर माजवून सोडला होत. अफजल खानाच्या टोलधाडीने जो तो दहशतीखाली होता. राजांनी ठरवलं प्रताप गडावर अफजल खानाचा सामना करायचा, मग त्यांनी अफजल खानाच्या मानसिकतेचा अभ्यास केला. अफजल खानाचा पत्र शिवाजी राजांना जेव्हा आलं तेव्हा शिवाजी राजांनी त्यांना उत्तर देताना ‘ आप तो हमारे पिता समान, शहाजी राजे और आप एकही जहागिरी मे रहेते थे, आपही हमारे पास आओ और हमे ले जाओ,’ असे एक-दोन पत्र व्यवहार झाले. मानसिक मनोबल अफजल खानाचं खचवून राजेंनी प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला आणि तेथेच अफजल खानाचा कोथळाही बाहेर काढला. आज अफजल खानाच्या कबरेला सुरक्षा पाहून हसावं की रडावं, असा प्रश्‍न पडतो. खान संपला, वैर संपलं म्हणत दिवाबत्तीची सोय करणार्‍या जिजाऊ मॉ साहेब आठवल्या की, आजच्या राडेखोरांबद्दल काय बोलावं, कोणाला तिथे कबर नकोय तर कोणला हवीय, हे वादाचे विषय का आणि कशासाठी? नाही कळले. मीही हा विषय इथेच सोडून देतो. प्रतापगड पूर्णत: आत्मसात केल्यानंतर आम्ही रायगड जशी स्वराज्याची राजधानी होती तसा 

रायगडचा कारागृह 
असलेला लिंगाणा किल्ला सर करण्याच्या इराद्याने निघालो, समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा


किल्ला कमालीचा अवघड. जाण्यासाठी कुठलीही सोय नाही. परंतु तरीही मला तर हा किल्ला सर करायचा होता. ते मनसुबे आखूनच मी निघालो होतो, परंतु मला माहित होतं मी हा किल्ला पहिल्या टप्प्यात सर करू शकणार नाही. तरही किल्ल्याच्या पायथ्यापासून माछीपर्यंत जाण्याचा माझा अट्टाहास होताच. मी लिंगाण्याजवळ आलो. लिंगाण्याची थोडक्यात माहिती रायगडापासून २५ किलोमीटर अंतरावर हा लिंगाणा किल्ला आहे. गुन्हेगारांसाठी या किल्ल्यामध्ये पहिलं कारागृह होतं. किल्ल्याच्या उंचावर सुमारे दीड ते दोन हजार फुटावर पन्नास ते साठ माणसे बसतील एवढे डोंगरी कपार आहेत. पाण्याचा स्त्रोत शंभर-दीडशे फुटावर पहायला मिळेल. पुण्यावरून आपण सिंगापूर नावाचं एक खेडेगाव आहे, त्याठिकाणी आल्यानंतर आपण लिंगाण्यावर जाऊ शकतो. मात्र आम्ही उलट दिशेने आलो होतो. त्या गावातला एक व्यक्ती आम्हाला पायथ्यापर्यंत नेण्यासाठी तयार झाला. शेंडगे नावाचा तो व्यक्ती होता. आम्ही भर उन्हात लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी निघालो खरं, आम्ही पाच जण पाण्याच्या पाच बाटल्या, नदी - नाले, दगड-धोंडे पार करत घणदाट जंगलातून आम्ही लिंगाण्याचा डोंगर चढत होतो. पायवाट जरी असली तरी वाळलेला गवत आणि निसटती माती असल्याने पाय घसरत होते. पाऊल न पाऊल सावधतेने टाकावा लागत होता. एक तासाची चढाई झाल्यानंतर आमच्या जवळचा पाणी पूर्णत: संपला त्यापूर्वी दोघे जण २० टक्क्यातच कंटाळले होते. चालक बाळु वरपे, पन्नास वर्षांचा आमचा एकनाथ नरवडे ऊर्फ मामा जणू आज शेलार मामाच झाला होता. त्याच्यातली स्फूर्ती पाहून मी आचंबीत तर होतोच परंतु मलाही बळ मिळत होतं. मी आमच्या वाटाड्याला विचारले, पुढे पाणी मिळेल का? त्याने नाही म्हटलं, मी घामाघूम झालो होतो, माझ्या शरीरातलं पाणी कमी झाल्याची जाणीव मला होत होती. तोंडाला कोरडही पडली होती. एकनाथ मामाही घामाघूम होता आणि तो शुगर-बीपीचा पेशंट असल्याने माझी काळजी वाढली होती. मी तसं बोलून दाखवलं नाही, त्याचा उत्साह मात्र जाम होता. परंतु चढाई करताना शरीरातलं पाणी संपू न देणं गरजेचं
असतं, त्यामुळे मीच थोडं पायथ्यापर्यंत गेल्यानंतर आता आपण इथेच थांबू आणि परत डोंगर उतरायला सुरुवात केली. तब्बल दोन तास आम्ही चलत होतो. त्या खेड्या गावात आल्यानंतर आम्ही विसावा घेतला. गावात दोन-चार माणसं होती. सातवीपर्यंत शाळा असणार्‍या त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन शिक्षक आणि अवघी १२ विद्यार्थी शिक्षण घेत होती. तिथलं खाणंपिणं, रहाणं, पिकपाणी या नेहमीच्या गोष्टींवर चर्चा केली. साळ हे प्रमुख उत्पन्न असलेल्या त्या गावात आम्ही सहज म्हणालो, तुम्ही जो तांदुळ खाताय तो मिळेल का, तर एकाने दुसर्‍याला, दुसर्‍याने तिसर्‍याला ‘तू भरड आणलीस का?’ म्हणत आम्हाला एक चुंगडं तांदुळ दिला. आम्ही किती पैशे द्यायचे म्हटल्यावर, द्या काय द्यायचे ते असे म्हणल्याने आम्ही पंधरा-वीस किलो तांदळाचे चारशे रुपये त्या व्यक्तीला दिले. त्यानेही समाधानाने स्वीकारले. तेथून वाटाड्याला आम्ही स्वखुशीने दोनशे रुपये दिले. बस का, म्हटल्यावर त्यानेही मान डोलावून हसत बस म्हटलं. परंतु मी नंतर पुन्हा त्याच्या हातावर शंभर रुपये टेकवले. ते शंभर रुपये याचे होते, तो जाताना सोबतच चालत होता. माझ्या जवळची एक लिटरची पाण्याची बाटली संपली, आम्हा सर्वांकडले पाणी संपले, त्याने जाताना आणि येताना घोटभरही पाणी प्याला नाही हे आम्हाला विशेष वाटले. परतीच्या प्रवासाला लागलो, तसं महाबळेश्वर हिल स्टेशन पहायचं होतं परंतु तिथेही भिडे गुरुजींचा कडेलोट आणि मुक्कामी असलेले समर्थक पाहून दुसरा दिवस किटकिटीचा, वैतागवाडीचा आणि तक्रारवाडीचा जाऊ नये म्हणून मी म्हटलं, आपण परत जावं. जेवढा वैतागून निघालो होतो तेवढा स्पिरीट घेऊन मी आलो. परंतु पुणे-नगर या दोन जिल्ह्यांच्या बॉंड्रीवर असलेल्या एका खेडे गावात मी चहा पिण्यासाठी रात्री अडीच वाजता उतरलो, चहा घेतला आणि सहज पाठीमागे असलेल्या बसस्थानकाच्या बोर्डकडे लक्ष गेलं तर ‘तक्रारवाडी’ असं त्या गावचं नाव वाचायला मिळालं. म्हटलं वैतागवाडीतून निघाले आणि परत जातानाही तक्रारवाडीचं दर्शन झालं. परंतु या मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ज्वलंत इतिहास याची देही याची डोळा पहावयास मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय! चा निनाद करता आला तो शिवबासारखी दृष्टी, युक्ती आणि शक्ती देणारा नक्कीच आहे.
   

    गणेश सावंत ९४२२७४२८१०
                                                                                       

Tuesday, 23 January 2018


कुतुबोद्दीन, तोगडियांच्या अश्रूंची जात कोणती? त्यांच्या भीतीचा धर्म कुठला ?

-गणेश सावंत-9422742810

डोळ्यात अश्रूंच्या धारा, हात जोडलेले आणि समोरच्याकडून दयेची याचना करणारे भेदरलेले डोळे... अशा अवतारातील कुतुबुद्दीन अन्सारीच्या ङ्गोटोनं २००२च्या गुजरात दंगलीची क्रूरता आणि भयावहता जगासमोर
आणली होती. आज त्या फोटोची पुन्हा एकदा आठवण झाली ती केवळ आणि केवळ गुजरात दंगलीचे उघड समर्थन करणारे ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्करते प्रवीण तोगडिया यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेने. हिंदुस्थान हा फक्त  आणि फक्त  हिंदूंचा देश आहे. इथे फक्त  हिंदूच राहू शकतात ज्यांना हिंदू राष्ट्र पसंत नसेल त्यांनी देश सोडून जावे हे वेळोवेळी सांगणारे तोगडिया आज जेव्हा हताश होऊन डोळ्यात अश्रू आणत हात जोडून माझ्या जीवाला धोका आहे. ‘माझा एन्काऊंटरचा डाव होता, पण ईश्वरकृपेने मी बचावलो आहे,’ असं सांगतात तेव्हा कुतुबुद्दीन अन्सारीच्या डोळ्यातली भीती अन तोगडियांच्या डोळ्यातली शंका देशवासी कुठल्या मापाने मोजतील, कुतुबुद्दीन अन्सारीच्या डोळ्यातले पाणी आणि प्रवीण तोगडियांच्या डोळ्यातल्या पाण्याची जात कशी शोधतील ? त्या दोघांच्या डोळ्यातल्या भीतीचे, पाण्याचे धर्म कोणते असतील? या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांच्या डोळ्यातून घळघळ ओघळणारे अश्रू, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने एन्काऊंटर करण्याचा कट केला होता, हे सांगताना त्यांचे थरथरणारे ओठ, आपण आयुष्यात सगळं सोडून हिंदुंच्या उत्थानासाठी काम करत आहोत, आपल्या घरात दोन जोडी कपडे आणि पुस्तकांशिवाय काहीही मिळणार नाही, असं म्हणताना त्यांनी तमाम वृत्तवाहिन्यांसमोर जोडलेले हात, हे सगळे पाहिल्यावर अन्सारींशिवाय इतर कुणाचीच प्रतिमा डोळ्यासमोर येणे शक्यच नव्हते. जिवाची भिती अन्सारी काय आणि तोगडियाजी काय सगळ्यांना सारखीच ना, पण तोगडियांच्या जीवाला भीती हि नवी नाही. या अगोदरही त्यांना
ठार मारण्याचे
मनसुबे आखले गेलेले आहेत. प्रवीण तोगडियांच्या जिवाला याअगोदरही धोका होताच कधी कट्टरवादी अतिरेकी संघटनांकडून तर कधी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आणि नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमक्या अवघ्या देशाला माहित आहेत. आताही प्रवीण तोगडिया म्हणाले असते, की आपल्या जिवाला अतिरेकी संघटनांकडून धोका आहे तर समजून घेता आलं असतं परंतु ज्या जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या आणि हिंदुतत्वाच्या जोरावर देशात आणि राज्या-राज्यात सरकार आणणार्‍या भाजपा सरकारलाच तोगडिया टार्गेट करत असतील आणि ते उघडपणे आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत असतील तर याची दखल घ्यावीच लागेल. तोगडिया जर जाणीवपूर्व खोटं बोलत असतील तर त्यामधलं उघड सत्यही जगासमोर यायलाच हवं. हिंदुतत्व आणि हिंदुत्व एवढच धोरण आखत तोगडियांनी आजपर्यंत हिंदुत्वासाठी जे भाष्य केले ते नुसतं पोटतिडकीचं नव्हतं तर हिंदू सोडून इतर जाती-धर्मांना आरोपीच्या पिजर्‍यात उभं करणारं धोरण होतं हेही याठिकाणी मांडावं लागणार आहे. परंतु तोगडिया जेव्हा हात जोडून डोळ्यात अश्रू आणून मी निडर आहे, मी कुणाला भीत नाही, असं म्हणत आपल्या जिवाला धोका आहे, आपला एन्काऊंटर करण्याचा डाव होता असं जेव्हा सांगतात तेव्हा सत्तेच्या सारीपाटावर आपले आणि परके हे सारखेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते. देशाचा इतिहास आणि खासकरून सत्तेचा हव्यास असणार्‍या राजे-महाराजे यांचा इतिहास तपासला तर शिरपेचात राजमुकुट परिधान करण्यासाठी रक्तमांसाचा चिखल तोही आप्तस्वकियांचा केल्याचे उघडपणे पहावयास मिळते आणि तीच भूमिका बहुदा सत्ताधारी भाजपातील मोदी-शहांची आहे का? ही शंका मनात चुपचुपली तर त्यात गैर काय?
नको असलेली माणसे गायब करणं
हे हव्यासी राजकर्त्यांचं आणि सत्ताधार्‍यांचं काम आहे. परंतु सार्वभौमत्व असलेल्या भारत देशाच्या लोकशाहीमध्ये हे कितपत योग्य ? हे तपासणंही तेवढच महत्त्वाचं. कारण नको असलेली माणसे गायब करणे हे धोरण आजपर्यंत इराक, इराणसारख्या देशांमध्ये किंवा हुकुमशाही नांदणार्‍या देशांमध्ये पहावयास मिळालं आहे. भारतानेही याअगोदर सत्ताधार्‍यांची ही भूमिका अनुभवलेली आहे. जेव्हा स्व. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी होती त्यावेळी इंदिराजींनी सुद्धा अकांडतांडव करत नको असलेली माणसे आणि वरचढ माणसे पंगु करण्याचे काम केले होते. कधी मानसिकदृष्ट्या तर कधी आर्थिकदृष्ट्या पंगु करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं धोरण इंदिराजींनी राबवलं होतं. त्यापेक्षा कितीतरी पटीने स्लो पॉईझनने नव्हे नव्हे तर थेट अटॅकने भाजप सरकारमधील मोदी-शहांची जोडगोळी आता तसे काम करते की काय? हा प्रश्‍नच नव्हे तर तोगडियांसारख्या हिंदुुत्ववाद्यांच्या तोंडून आलेल्या जिवाच्या भितीच्या याचनेतून ते स्पष्ट होताना दिसून येते. विशेष म्हणजे
तोगडिया बेपत्ता
झाल्याचे वृत्त जेव्हा देशभर पसरले तेव्हा आमच्यासारख्यांनाच नव्हे कित्येकांना या बातमीवर विश्‍वास ठेवावं की नाही, असं झालं. तोगडियांना अटक करण्यासाठी राजस्थानची पोलिस गुजरातमध्ये येते काय, एखादा माणूस तोगडियांजवळ येऊन ‘तुमचं एन्काऊंटर केलं जाणार,’ असल्याचे सांगतो काय, तोगडिया घराबाहेर पडतात काय, ऑटोत बसल्यानंतर बेशुद्ध होतात काय आणि थेट रुग्णालयाच्या बेडवर त्यांना शुद्धी येते काय आणि तेथून पुढे शुद्धीवर आल्यावर अश्रू ढाळत, हात जोडत स्वत:वरची आपबिती जगाला ओरडून सांगतात काय. या सर्व गोष्टी एवढ्या दखलपात्र आहेत की, तोगडियांसारखा झेड सिक्युरिटी असलेला माणूस बेपत्ता होऊ शकतो तर तिथं तुमच्या-आमच्यासारख्याचं काय? तोगडियांची हात जोडलेली आणि याचना केलेली प्रतिमा जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा २००२ साली गुजरात दंगलीत कुतुबोद्दीन अन्सारीने जे हात जोडले होते तेच त्या मुद्रेमध्ये दिसते. स्वभावीक ही तोगडियांची घटना एवढी साधी नाही. तोगडीया जर असुरक्षित असतील तर भाजप सरकारचे विरोधक भाजपाच्या विचारसरणीला विरोध करणारे किती सुरक्षित असतील हे न सांगितलेलं बरं. तोगडियांची पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ज्या पद्धतीने
तोगडिया स्वत:हून बेपत्ता
झाल्याचे डांगोरे पिटवण्यात आले ते देशासाठी नवे नाही. कारण ही घटना घडण्याच्या तत्पूर्वी दोन-चार दिवसात देशामध्ये काहुर उडवून सोडणारी घटना घडली होती. सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या ध्येय-धोरणाच्या चिंधड्या उडवल्या होत्या. तेव्हाही सरकारने त्या चौघांना सोशल नेटवर्किंग मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य कुठल्या मार्गाने म्हणा कॉंग्रेसच हस्तक म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. आताही भाजप सरकारच्या चुकांवर कुणी बोट ठेवत असेल, त्यांच्याविरोधात कुणी बोलत असेल, लिहित असेल तर त्याची मुस्कटदाबी करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. मग पत्रकार, लेखक, वक्ता कोणीही असो त्याचं तोंड दाबून दहशत माजवण्याचा जो प्रयत्न होत आला तो याआधी या देशामध्ये पारतंत्र्य असतानाच झाला. तोगडीया स्वत:हून बेपत्ता झाल्याचे जेवढ्या पद्धतीने सांगण्यात आले तेवढ्याच पद्धतीने यातलं गौडबंगाल देशासमोर येणं नितांत गरजेचं आहे. तोगडिया जर खोटं वागत असतील तर ते जगासमोर आणायलाच हवं आणि तोगडियांची भीती खरी असेल तर त्याचा शोध आणि बोधही घ्यायलाच हवं. देशातल्या बहुतांशी राज्यांमध्ये सध्या भाजपाचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे. सर्वत्र मोदींचा निनाद होत आहे तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या हाती सर्व सुत्रं आहेत मग हिंदुंच्या पुत्रांना डोळ्यांत पाणी आणून ‘हमे बचाव,’ म्हणण्याची वेळ का येते? तोगडियांच्या जिवाला भिती म्हणजे सरकारविरुद्ध बोलणार्‍यांच्या जिवाला भीती आहे काय?किंवा सरकारची भूमिका अचानक हिंदूवाद्यांबद्दल बदलली काय? की हुकुमशाही वृत्तीने सत्तेचा मुकुट शिरपेचात ठेवण्यासाठी आप्तस्वकियांचा रक्तपात पुन्हा या देशाची माती चाखणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत असले तरी आज आम्हाला २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीतील भयावहता ज्या कुतुबोद्दीनच्या डोळ्यांमध्ये दिसली ती भयावता तोगडियांच्या डोळ्यांत दिसली त्यामुळे आम्हाला सहाजिकच कुतुबोद्दिनच्या आणि तोडियांच्या डोळ्यातली पाण्याची जात कोणती? त्यांच्या भीतीचा धर्म कोणता? हा सवाल आम्हाला पडला. तो अद्यापही तसाच आहे. त्यामुळे यामधली सत्यता बाहेर येणं अत्यावश्यक आहे.

साय दै.बीड रिपोर्टर मधील आजचा २१ जानेवारी रविवार अग्रलेख