Tuesday, 23 January 2018


कुतुबोद्दीन, तोगडियांच्या अश्रूंची जात कोणती? त्यांच्या भीतीचा धर्म कुठला ?

-गणेश सावंत-9422742810

डोळ्यात अश्रूंच्या धारा, हात जोडलेले आणि समोरच्याकडून दयेची याचना करणारे भेदरलेले डोळे... अशा अवतारातील कुतुबुद्दीन अन्सारीच्या ङ्गोटोनं २००२च्या गुजरात दंगलीची क्रूरता आणि भयावहता जगासमोर
आणली होती. आज त्या फोटोची पुन्हा एकदा आठवण झाली ती केवळ आणि केवळ गुजरात दंगलीचे उघड समर्थन करणारे ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्करते प्रवीण तोगडिया यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेने. हिंदुस्थान हा फक्त  आणि फक्त  हिंदूंचा देश आहे. इथे फक्त  हिंदूच राहू शकतात ज्यांना हिंदू राष्ट्र पसंत नसेल त्यांनी देश सोडून जावे हे वेळोवेळी सांगणारे तोगडिया आज जेव्हा हताश होऊन डोळ्यात अश्रू आणत हात जोडून माझ्या जीवाला धोका आहे. ‘माझा एन्काऊंटरचा डाव होता, पण ईश्वरकृपेने मी बचावलो आहे,’ असं सांगतात तेव्हा कुतुबुद्दीन अन्सारीच्या डोळ्यातली भीती अन तोगडियांच्या डोळ्यातली शंका देशवासी कुठल्या मापाने मोजतील, कुतुबुद्दीन अन्सारीच्या डोळ्यातले पाणी आणि प्रवीण तोगडियांच्या डोळ्यातल्या पाण्याची जात कशी शोधतील ? त्या दोघांच्या डोळ्यातल्या भीतीचे, पाण्याचे धर्म कोणते असतील? या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांच्या डोळ्यातून घळघळ ओघळणारे अश्रू, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने एन्काऊंटर करण्याचा कट केला होता, हे सांगताना त्यांचे थरथरणारे ओठ, आपण आयुष्यात सगळं सोडून हिंदुंच्या उत्थानासाठी काम करत आहोत, आपल्या घरात दोन जोडी कपडे आणि पुस्तकांशिवाय काहीही मिळणार नाही, असं म्हणताना त्यांनी तमाम वृत्तवाहिन्यांसमोर जोडलेले हात, हे सगळे पाहिल्यावर अन्सारींशिवाय इतर कुणाचीच प्रतिमा डोळ्यासमोर येणे शक्यच नव्हते. जिवाची भिती अन्सारी काय आणि तोगडियाजी काय सगळ्यांना सारखीच ना, पण तोगडियांच्या जीवाला भीती हि नवी नाही. या अगोदरही त्यांना
ठार मारण्याचे
मनसुबे आखले गेलेले आहेत. प्रवीण तोगडियांच्या जिवाला याअगोदरही धोका होताच कधी कट्टरवादी अतिरेकी संघटनांकडून तर कधी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आणि नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमक्या अवघ्या देशाला माहित आहेत. आताही प्रवीण तोगडिया म्हणाले असते, की आपल्या जिवाला अतिरेकी संघटनांकडून धोका आहे तर समजून घेता आलं असतं परंतु ज्या जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या आणि हिंदुतत्वाच्या जोरावर देशात आणि राज्या-राज्यात सरकार आणणार्‍या भाजपा सरकारलाच तोगडिया टार्गेट करत असतील आणि ते उघडपणे आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत असतील तर याची दखल घ्यावीच लागेल. तोगडिया जर जाणीवपूर्व खोटं बोलत असतील तर त्यामधलं उघड सत्यही जगासमोर यायलाच हवं. हिंदुतत्व आणि हिंदुत्व एवढच धोरण आखत तोगडियांनी आजपर्यंत हिंदुत्वासाठी जे भाष्य केले ते नुसतं पोटतिडकीचं नव्हतं तर हिंदू सोडून इतर जाती-धर्मांना आरोपीच्या पिजर्‍यात उभं करणारं धोरण होतं हेही याठिकाणी मांडावं लागणार आहे. परंतु तोगडिया जेव्हा हात जोडून डोळ्यात अश्रू आणून मी निडर आहे, मी कुणाला भीत नाही, असं म्हणत आपल्या जिवाला धोका आहे, आपला एन्काऊंटर करण्याचा डाव होता असं जेव्हा सांगतात तेव्हा सत्तेच्या सारीपाटावर आपले आणि परके हे सारखेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते. देशाचा इतिहास आणि खासकरून सत्तेचा हव्यास असणार्‍या राजे-महाराजे यांचा इतिहास तपासला तर शिरपेचात राजमुकुट परिधान करण्यासाठी रक्तमांसाचा चिखल तोही आप्तस्वकियांचा केल्याचे उघडपणे पहावयास मिळते आणि तीच भूमिका बहुदा सत्ताधारी भाजपातील मोदी-शहांची आहे का? ही शंका मनात चुपचुपली तर त्यात गैर काय?
नको असलेली माणसे गायब करणं
हे हव्यासी राजकर्त्यांचं आणि सत्ताधार्‍यांचं काम आहे. परंतु सार्वभौमत्व असलेल्या भारत देशाच्या लोकशाहीमध्ये हे कितपत योग्य ? हे तपासणंही तेवढच महत्त्वाचं. कारण नको असलेली माणसे गायब करणे हे धोरण आजपर्यंत इराक, इराणसारख्या देशांमध्ये किंवा हुकुमशाही नांदणार्‍या देशांमध्ये पहावयास मिळालं आहे. भारतानेही याअगोदर सत्ताधार्‍यांची ही भूमिका अनुभवलेली आहे. जेव्हा स्व. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी होती त्यावेळी इंदिराजींनी सुद्धा अकांडतांडव करत नको असलेली माणसे आणि वरचढ माणसे पंगु करण्याचे काम केले होते. कधी मानसिकदृष्ट्या तर कधी आर्थिकदृष्ट्या पंगु करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं धोरण इंदिराजींनी राबवलं होतं. त्यापेक्षा कितीतरी पटीने स्लो पॉईझनने नव्हे नव्हे तर थेट अटॅकने भाजप सरकारमधील मोदी-शहांची जोडगोळी आता तसे काम करते की काय? हा प्रश्‍नच नव्हे तर तोगडियांसारख्या हिंदुुत्ववाद्यांच्या तोंडून आलेल्या जिवाच्या भितीच्या याचनेतून ते स्पष्ट होताना दिसून येते. विशेष म्हणजे
तोगडिया बेपत्ता
झाल्याचे वृत्त जेव्हा देशभर पसरले तेव्हा आमच्यासारख्यांनाच नव्हे कित्येकांना या बातमीवर विश्‍वास ठेवावं की नाही, असं झालं. तोगडियांना अटक करण्यासाठी राजस्थानची पोलिस गुजरातमध्ये येते काय, एखादा माणूस तोगडियांजवळ येऊन ‘तुमचं एन्काऊंटर केलं जाणार,’ असल्याचे सांगतो काय, तोगडिया घराबाहेर पडतात काय, ऑटोत बसल्यानंतर बेशुद्ध होतात काय आणि थेट रुग्णालयाच्या बेडवर त्यांना शुद्धी येते काय आणि तेथून पुढे शुद्धीवर आल्यावर अश्रू ढाळत, हात जोडत स्वत:वरची आपबिती जगाला ओरडून सांगतात काय. या सर्व गोष्टी एवढ्या दखलपात्र आहेत की, तोगडियांसारखा झेड सिक्युरिटी असलेला माणूस बेपत्ता होऊ शकतो तर तिथं तुमच्या-आमच्यासारख्याचं काय? तोगडियांची हात जोडलेली आणि याचना केलेली प्रतिमा जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा २००२ साली गुजरात दंगलीत कुतुबोद्दीन अन्सारीने जे हात जोडले होते तेच त्या मुद्रेमध्ये दिसते. स्वभावीक ही तोगडियांची घटना एवढी साधी नाही. तोगडीया जर असुरक्षित असतील तर भाजप सरकारचे विरोधक भाजपाच्या विचारसरणीला विरोध करणारे किती सुरक्षित असतील हे न सांगितलेलं बरं. तोगडियांची पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ज्या पद्धतीने
तोगडिया स्वत:हून बेपत्ता
झाल्याचे डांगोरे पिटवण्यात आले ते देशासाठी नवे नाही. कारण ही घटना घडण्याच्या तत्पूर्वी दोन-चार दिवसात देशामध्ये काहुर उडवून सोडणारी घटना घडली होती. सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या ध्येय-धोरणाच्या चिंधड्या उडवल्या होत्या. तेव्हाही सरकारने त्या चौघांना सोशल नेटवर्किंग मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य कुठल्या मार्गाने म्हणा कॉंग्रेसच हस्तक म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. आताही भाजप सरकारच्या चुकांवर कुणी बोट ठेवत असेल, त्यांच्याविरोधात कुणी बोलत असेल, लिहित असेल तर त्याची मुस्कटदाबी करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. मग पत्रकार, लेखक, वक्ता कोणीही असो त्याचं तोंड दाबून दहशत माजवण्याचा जो प्रयत्न होत आला तो याआधी या देशामध्ये पारतंत्र्य असतानाच झाला. तोगडीया स्वत:हून बेपत्ता झाल्याचे जेवढ्या पद्धतीने सांगण्यात आले तेवढ्याच पद्धतीने यातलं गौडबंगाल देशासमोर येणं नितांत गरजेचं आहे. तोगडिया जर खोटं वागत असतील तर ते जगासमोर आणायलाच हवं आणि तोगडियांची भीती खरी असेल तर त्याचा शोध आणि बोधही घ्यायलाच हवं. देशातल्या बहुतांशी राज्यांमध्ये सध्या भाजपाचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे. सर्वत्र मोदींचा निनाद होत आहे तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या हाती सर्व सुत्रं आहेत मग हिंदुंच्या पुत्रांना डोळ्यांत पाणी आणून ‘हमे बचाव,’ म्हणण्याची वेळ का येते? तोगडियांच्या जिवाला भिती म्हणजे सरकारविरुद्ध बोलणार्‍यांच्या जिवाला भीती आहे काय?किंवा सरकारची भूमिका अचानक हिंदूवाद्यांबद्दल बदलली काय? की हुकुमशाही वृत्तीने सत्तेचा मुकुट शिरपेचात ठेवण्यासाठी आप्तस्वकियांचा रक्तपात पुन्हा या देशाची माती चाखणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत असले तरी आज आम्हाला २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीतील भयावहता ज्या कुतुबोद्दीनच्या डोळ्यांमध्ये दिसली ती भयावता तोगडियांच्या डोळ्यांत दिसली त्यामुळे आम्हाला सहाजिकच कुतुबोद्दिनच्या आणि तोडियांच्या डोळ्यातली पाण्याची जात कोणती? त्यांच्या भीतीचा धर्म कोणता? हा सवाल आम्हाला पडला. तो अद्यापही तसाच आहे. त्यामुळे यामधली सत्यता बाहेर येणं अत्यावश्यक आहे.

साय दै.बीड रिपोर्टर मधील आजचा २१ जानेवारी रविवार अग्रलेख

No comments:

Post a Comment