Thursday, 1 October 2020

सत्याच्या प्रयोगात , सत्तेचा भोग


                       गणेश सावंत,बीड 

-9422742810
पारतंत्र्याच्या साखळ दंडात अडकुन पडलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या. कित्येकांनी प्राणाची आहुती दिली. पारतंत्र्यच हे आपलं भाग्य समजणार्‍यांच्या काळजात धाडस निर्माण केलं. स्वतंत्र्य हा आपला हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी एकत्रित येवून लढा उभारायलाच हवा असे अनेकांनी सांगितले. परंतू इंग्रजांच्या फोडा आणि तोडाच्या राजकारणात आम्ही कित्येकदा विखुरलो गेलो. कधी जात,पात, धर्म, पंताच्या नावावर तर कधी स्पर्शता अस्पर्शतेच्या मुद्यावर. अशावेळी असा एक माणुस विचार घेवून आला की त्याने अवघ्या देशाला आपल्या कव्येत घेतले. पाच पन्नास किलोचा दिसायला कुरूप असलेला, मोठं डोकं, कान सुपासारखे आणि अंगात फक्त अंग झाकण्याऐवढे कपडे असलेला मोहन करमचंद गांधी नावाचा हा योद्धा काठी टेकत-टेकत देशाची भ्रमंती करत राहायला. एकच ध्यास भारत स्वातंत्र्याचा आणि तोही अहिंसेच्या मुद्यावर लोक येत गेले, कारवा बनत राहिला आणि महात्मा गांधींच्या अहिंसक सत्याग्रहातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या विरोधात वीराची अहिंसा जिंकली. गेल्या सत्तर-बाहत्तर वर्षाच्या काळ खंडात स्वतंत्र भारताने काय मिळवलं? काय गमावलं? याची गोळा बेरीज करण्यापेक्षा भारतीय माणुस माणसात आहे का? भारतीय राजकारणात समाजकारणाचा दृष्टीकोन आहे का? तेंव्हाचा भारत आणि आजचा भारत याच काय फरक? ज्यांनी-ज्यांनी स्वतंत्र भारतासाठी बलिदान दिले, प्राणाची आहुती दिली त्यांच्या विचारावर आज भारत चालतोय का? भारतीय सरकार त्या दृष्टीकोनातून पाऊल उचलतय का? महात्मा गांधींच्या सत्त्याच्या प्रयोगातून आजचं सरकार काय शिकलं? सत्तेचा योग की सत्तेचा भोग असे एक ना अनेक प्रश्‍न धर्माच्या आधारावर जात,पात आणि कर्मकांडाच्या मोहात असलेल्या लोकांना विचारावा लागणार आहे. महात्मा गांधींचे सत्त्याचे प्रयोग आणि आज सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे असत्याचे प्रयोग लोकांना अधोगतीकडे नेणारे आहे की प्रगतीकडे? हा जेंव्हा प्रश्‍न उपस्थित होतो तेंव्हा मोदी सरकारच्या सहा वर्षाच्या कालखंडात घेतलेल्या निर्णयातून समाजकारण किती होतं? राजकारण किती होतं? हे जेंव्हा समोर येतं तेंव्हा 
*हा गांधींचाच भारत आहे का?*
हा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मोहन करमचंद गांधी नावाच्या या अहिंसेच्या पुजार्‍याने आपलं उभं आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या कामी लावलं आणि त्यातून एक स्वतंत्र स्वाभिमानी भारत निर्माण केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मित्तिला कुठला भारत निर्माण करू इच्छितात हा सवाल सातत्त्याने जेंव्हा विचारला जातो तेंव्हा नक्कीच देश चालविणार्‍याचे कुठे तरी काही तरी चुकतय हे लोकांच्याही लक्षात येते. परंतू सरकार जेंव्हा एखाद्या उद्योग,व्यावसायिक, व्यापारी अथवा दलालाची भुमिका बजावते तेंव्हा कुठलेही काम करतांना शेतात काय पिकतय हे पाहण्यापेक्षा बाजारात काय विकतय हे पाहुन निर्णय घेतं तेंव्हा ते निर्णय वरून कितीही चांगले असले तरी भविष्यात त्या निर्णयाची परिणीती काय? ही भिती अभ्यासक, बुद्धीजिवी लोकांना नक्कीच असते. परंतू त्याची जाणीव सर्वसामान्यांना नसते. त्यातही भक्तीचा डांगोरा पिटवतांना भक्त जेंव्हा अंधळे होतात तेंव्हा जोपर्यंत भक्तांना ठेच लागत नाही तोपर्यंत सत्त्याचा प्रकाश डोळ्यासमोर येत नाही आणि तेच सध्याच्या परिस्थितीमध्ये देशात घडतांना दिसून येतं. इथं बाई मारली गेली तर तेवढं काहूर उठत नाही जेवढं काहुर गाय मारल्या गेल्यावर उठलं जातं. इथं सत्त्यासाठी कोणी आवाज उठवला तर तो आवाज गगनभेदी होत नाही. परंतू हाच आवाज सत्तेतल्या हुकुमासाठी जयघोष म्हणून काढला गेला तर ती ललकारी होते. इथे बलात्कार पिडित मुलीला संरक्षण दिले जात नाही तर इथे एखाद्या राज्यातल्या देशाच्या आर्थिक राजधानीबाबत कोणी अपशब्द काढत असेल तर अशा मुलीला मात्र संरक्षण दिले जाते. इथे राज्या राज्यात प्रांतवादाला महत्त्व आहे, भाषा वादाला महत्त्व आहे परंतू शिक्षणात बहुभाषा शिकवण्याला महत्त्व नाही. गेल्या सहा वर्षाच्या कालखंडातला, मोदी सरकारच्या कार्यकाळातला चांगल्या, वाईटचा आलेख काढला तर वरतुनी सर्व काही ठाकठिक दिसेल. परंतू त्या निर्णयातल्या अर्ंतमनाचं जेंव्हा विवेचन केलं जाईल तेंव्हा मात्र सत्य समोर येईल. 
*मोदी आणि गेली सहा वर्षे*
चा लेखाजोखा आपण पाहिला तर मोदी सरकारने पहिल्या पंचवार्षिकमध्ये पाचशे हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खोट्या नोटा आणि काळापैसा चलनातुन बाद करण्याच्या इराद्याने घेतल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्यातील सर्व सामान्य भारतीयांना, गोरगरीबांना हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा वाटला. कारण त्यांच्याकडे पैसा तर नव्हता त्यामुळे काळा पैसा असण्याचे कारणच नव्हते. दुसरा निर्णय जीएसटीचा घेवून कर बुडव्या धनदांडग्या उद्योजकांना धडा शिकवण्याचा होता. हा निर्णयही लोकांना वरतुनी चांगला वाटला. आपण कुठे उद्योजक आहोत आणि खरच लोक कर बुडवत आहेत आणि पुन्हा नमो-नमोचा नारा दिला. काश्मिरातील पुलवामा येथे लष्कारी ताफ्यावर २०० किलो आरडीएक्स दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात ४१ जवान शहीद झाले. याला प्रतिउत्तर म्हणून मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. ऑपरेशन बालाकोट करून पुन्हा ते २०१९ च्या निवडणुकीमध्ये सत्तेत आले. त्यानंतर जम्मू काश्मिरातील स्वायत्ताचा दर्जा देणारे संविधानातील ३७० कलम रद्द केले. हे सर्व निर्णय नक्कीच स्वागतार्ह वाटतात परंतू हे निर्णय घेतांना मोदी सरकारने 
*सत्तेचा हत्यारासारखा* 
वापर नक्कीच केल्याचे दिसून येते. पाचशे आणि हजारच्या नोटा ज्या उदाक्त हेतूने रद्द करण्यात आल्या. त्यात किती काळा पैसा उघड झाला? बाहेर देशातून स्वीय बँकेतून किती पैसा आणला गेला? तर याचं उत्तर अत्यंत शुन्यासारखं येईल. याचाच अर्थ या निर्णयातून केवळ देशामध्ये काही काळ अस्थिरता निर्माण झाली. लोकांना आर्थिक निकडीच्या संकटाला सामोरे जावे लागले. आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले. दुसरा घेण्यात आलेला निर्णय तो जीएसटीचा होता. कर बुडव्या व्यापारी, उद्योजकांना चाप लावण्यासाठी नक्कीच हा योग्य आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त असणार्‍या राज्यातले उत्पन्न आर्थिकदृष्ट्या अशक्त असलेल्या राज्यांना देण्यात येणार हा हेतूही मोदी सरकारकडून सांगण्यात आला होता. परंतू जीएसटीच्या या निर्णयातून केंद्राने आर्थिक उत्पन्न तर मोठ्या प्रमाणावर उभं केलं. परंतू महाराष्ट्रासारख्या आणि अन्य भाजप विरहित राज्यांना त्यांचा वाटा द्यायलाही आज सरकार कुचराई करतं याचाच अर्थ मोदी सरकार हे समाजकारणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देतं. ज्या पुलवाना हल्ल्यामध्ये ४१ भारतीय जवान धारातिर्थ पडले. त्या जवानांचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन बालाकोट करून शेकडो दहशतवाद्यांना कंटस्नान घातल्याचे सांगितले गेले खरे परंतू एका दहशतवाद्याचा मुडदाही देशाला दाखवण्यात आला नाही. उलट भारतीय जवान पाकिस्तान हद्दीत पाकिस्तान एजन्सीला सापडला. त्याला सोडवून कसं आणलं याचा डांगोरा मात्र पिटवण्यात आला. ३७० कलम रद्द करून तेथिल जनतेला संपुर्णपणे राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला. हा दावा अत्यंत चांगला होता. उद्देशही चांगला होता असं लोकांना वाटू लागलं. परंतू प्रत्यक्षात आज मित्तीला जम्मु काश्मिरमध्ये परिस्थिती काय आहे? याचा विचार केला तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणि रस्त्यावर लष्करी राजवट आहे. तेथिल नेते नजरकैदेत आहेत. मग खरच जम्मु काश्मिरातील लोकांचे भाग्य उजलळे का? हा जेंव्हा प्रश्‍न उपस्थित होतो तेंव्हा फारूक अब्दुल्लांचं ते एक स्टेटमेंट लक्षात येतं. ते एका मुलाखतीत म्हणाले होते. फाळणीच्यावेळी आम्ही काश्मिरींना पाकिस्तानात जाता आलं असतं पण आम्ही गांधींचा भारत स्विकारला मोदींचा नाही. त्यांच्या या टिपण्णीवर अनेक मत प्रवाह असू शकतात. परंतू जेंव्हा गांधींचा भारत आणि मोदींचा भारत अशी तुलना होते तेंव्हा सत्य आणि अत्य याची तुलना करावी लागते. गेल्या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी जे बोलतात ते खरच करतात का? भाजप जे निर्णय जनहिताचे म्हणून घेते ते जनहिताचे असतात का? हा जेंव्हा प्रश्‍न उपस्थित होतो तेंव्हा भारतामध्ये 
*समाजकारणापेक्षा राजकारणाला*
अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं दिसून येतं. काही ठळक खोडारडेपरा जाहिरपणे दिसून येतो. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कच्चा तेलाचे भाव कमी होता आणि पेट्रोल, डिझेल कमी भावाने देशभरात दिलं जातं. हा काळ २०१४-१५ चा असावा. त्यावेळी मोदी सरकार सत्तेत आलेलं होतं. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहिर भाषणात आपल्या ५६ इंची छाती बडवून पेट्रोल-डिझेल के भाव कम हुये की नही हा सवाल उपस्थितांना विचारायचे आणि जाहिर सभेमधले लोक नमो-नमोचा गजर करत त्यांना साद घालायचे. मात्र त्यानंतर वर्षभराच्या कालखंडामध्ये याच कच्चा तेलाचे भाव अक्षरश: चहाच्या कटींग एवढे झाले होतेे. त्यावेळेस मात्र भारतातला पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढत होता. मग कच्चा तेलाचे भाव अत्यंत कमी प्रमाणात आल्यानंतर मोदी सरकारने जनहिताचा निर्णय म्हणून पेट्रोल-डिझेलचे भाव आजपारीत कमी का केले नाही? हा सवाल उपस्थित करण्यापेक्षा हा खोटारडेपणा नव्हे काय? पंधरा लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू हे दिलं गेलेलं आश्‍वासन खोटारडेपणाचा कळस नव्हे काय? राजकारण करतांना समाजकारणाचा भाव नक्कीच सत्ताधार्‍यांच्या तनामनात असायला हवा. परंतू समाजकारणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देत सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसांना दुर्लक्षित करून मोदी सरकार ज्या पद्धतीने धनदांडग्या उद्योगपतींना फायदा होईल असे निर्णय घेतात तेंव्हा मात्र मोदींकडे सत्याचे नव्हे तर असत्याचे प्रयोग करणारे म्हणून पाहिले जाते. गेल्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी एखादी कंपनी सरकारकडून स्थापली जाईल असे वाटायचे. परंतू ज्या कंपन्या होत्या त्या जाहिरपणे विकल्या. हिंदुस्तानच्या इतिहासात रेेल्वेला विकणारा पहिला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं नाव इतिहासामध्ये घेतलं जाईल. मग खरच हा मोहन करमचंद गांधी नावाच्या अहिंसा वीराचा हा देश आहे का? आज मित्तीला देशात जी स्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीवर निधर्मवाद आणि अहिंसावाद महत्त्वाचा नाही का? असे प्रश्‍न उपस्थित करून गांधींच्या अहिंसेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

*महात्मा गांधी*
जेंव्हा सात वर्षाचे होते तेंव्हा त्यांनी राजा हरिश्‍चंद्राचं नाटक एक वेळेस पाहिलं होतं. त्या नाटकाचा प्रभाव त्या सात वर्षाच्या मोहन करमचंद गांधी नावाच्या मुलावर एवढा पडला की उभं आयुष्य या मुलाने सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्विकारत कार्य करत हा व्यक्ती महात्मा झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यावर महात्मा गांधींचा प्रभाव असल्याचं दाखवतात. त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने महात्मा गांधींचा उल्लेख असतो. मग महात्मा गांधी गुजरातचे आहेत म्हणून ते उल्लेख करतात का? की महात्मा गांधीशिवाय भारत नाही हे त्यांना चांगलं माहित आहे म्हणून राजकारणासाठी मोदी महात्मा गांधींचं नाव घेतात का? असे एक ना अनेक प्रश्‍न एवढ्यासाठीच उपस्थित होता. मोदींच्या तोंडी गांधींचं नाव कर्तव्य कर्मात मात्र अभाव दिसून आलेला आहे.

Thursday, 10 September 2020

किल्ले रामशेज थरार

 



                                                             किल्ले रामशेज थरार 



हिमालयाच्या मदतीला धावणार्‍या सह्याद्रीची सोबत कशी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीने कुठली मदत केली असेल, संभाजी महाराजांना सह्यद्रीने तेवढीच मदत केली होती. तर मग महाराजांना संघर्ष का करावा लागला असे एक ना अनेक प्रश्‍न महाराजांचा इतिहास वाचतांना उपस्थित व्हायचे अन् त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांबाबत कुतूहल वाटायचे, गड किल्ल्यांचा इतिहास आणि त्या गड किल्ल्यांच्याच जोरावर उभा राहिलेलं स्वराज्य हे माणसाला माणसात आणणारं होतं. तर मग आज साडे तीनशे चारशे वर्षांनंतर ते गडकिल्ले माणसात आहेत का? हे पाहण्याची उत्सूकताही शिगेला पोहच होती, म्हणूनच 2008 सालापासून प्रत्येक वर्षी 4 ते 6 किल्ले पहायचे असे जणू अभिवचनच स्वत:ला स्वत:ने घेतले आणि गडकिल्ल्यांची सफर सुरू ठेवली. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे तीन दिवस गडकिल्ल्याच्या सफारीसाठी निवडली. माझे आजपर्यंतचे बहुतांशी प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिन आणि कामगार दिन हे गडकिल्ल्यावर ध्वज फडकवूनच झाले. या वर्षीही गडकिल्ल्याला जायचे होते, परंतू कोरोना महामारीने अवघ्या जगाला कुलपात बंद करून ठेवलं, त्यामुळं गडकिल्ल्यावर जाणार तरी कसा, दिवसांमागून दिवस जात होते, लॉकडाऊन उठण्याचं नाव घेत नव्हतं परंतू लॉकडाऊन उठलं की दुसर्‍याच दिवशी आपण गडकिल्ल्याच्या सफरीसाठी जाणार हे निश्‍चित केलं. अन् सप्टेंबर महिन्यात राज्यातलं लॉकडाऊन उठलं. कुठं जायचं हे ठरवलेलं नव्हतं, सह्याद्रीच्या कुशीमध्ये जायचं आहे, त्या काळ्या काताळाला पहायचं आहे आणि त्या काळ्या काताळात उभ्या असलेल्या गडकोटाची परिक्रमा करायची आहे, अचानक सह्याद्रीची डोंगर रांग असलेली ब्रम्हगिरी आठवली आणि ठरलं, यावेळेस ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालायची, ब्रम्हगिरीवर जायचं, शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं अन् त्यानंतर हरीहर गडावर जावून रामशेजही याचीदेही याचीडोळा पाहायचं, आम्ही पहिल्या दिवशी ब्रम्हगिरीवर पोचलो, सह्याद्रीच्या पर्वतरांगा असलेल्या ब्रम्हगिरीचे ते अथांग रूप डोळ्यातच साठवून आम्ही खाली उतरलो, नाशीकला मुक्काम केला अन् दुसर्‍या दिवशी हरीहरसाठी जावू असे ठरवले परंतू वन विभागाने आता त्या ठिकाणी पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही जाता येणार नाही असा नियम बनवल्यामुळे अचानक परवानगीची गरज भासली, त्यामुळे आम्ही हरीहर जाणार नाही असा निर्णय घेत, साडे पाच ते सहा वर्षे झुंज देणार्‍या रामशेज किल्ल्यावर जायचे ठरवले. नाशीक मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर असलेल्या नाशिक-दिंडोरी रस्त्यावर हा गड आपल्याला दिसून येतो.

रामशेजचा इतिहास

हा अत्यंत थरारक आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी तो जोडलेला आहे. महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणूनही रामशेजकडं पाहितलं जातं. संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा गड एक नाही दोन नाही, महिना नाही दोन महिने नाही तर तब्बल 65 महिने म्हणजेच साडेपाच वर्षे दुश्मनाशी झुंज देत ठेवला होता. संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारीत कादंबर्‍यांमध्ये आणि पुस्तकांमध्ये याची नोंद आपल्याला पहायला मिळते. मराठा साम्राज्यातले बहूतांशी किल्ले हे सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात घनदाट जंगलात आहेत, परंतू रामशेज किल्ला मात्र याला अपवाद आहे. नाशीकजवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे तरीही त्याची उंची समूद्रसपाटीपासून 3270 मिटर असल्याचे सांगण्यात येते. नाशीकच्या जवळ असल्याने हा किल्ला नाशीकमधून सर्वांना स्पष्टपणे निदर्शनास येतो. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान त्यानुसारच या किल्ल्याचा इतिहासही तसाच आहे. रामशेजच्या लढाईचे वर्णन मुघलांच्या कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम वाचायला मिळाले होते आणि तेथूनच रामशेजच्या लढाईचा खरा इतिहास उजेडात आला.
‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टलाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तजहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकवरून आम्ही थेट रामशेजला जाण्यासाठी निघालोत मात्र वाटेमध्ये फेसबूक मित्राचा संपर्क झाला. आमचे नाशिक जिल्ह्यातले फोटो सोशलमिडियावर पाहून त्याने आम्हाला निमंत्रीत केले. आम्ही त्याच्या शेतात गेलोत, द्राक्षाचा बाग पाहितला, मनुके तयार कसे होतात हेही पाहितले, पाहुणचार घेतला आणि आम्ही पुढे रामशेजसाठी निघालो. नाशीक पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला आपल्याला दृष्टीक्षेपात पडतो. पेठेकडे जाणार्‍या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. तशी आमची गाडीही किल्ल्याच्या दिशेने नाशीकच्या निपाणीजवळील पेठ नाका येथून जशी खाजगी वाहनांची सोय आहे तसे आम्हीही त्या रस्त्यानेच आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे, त्या गावाकडे जाण्यासाठी निघालो, रस्त्यात आम्हाला पिंपळनारे हे गाव भेटले, माझ्या गावाचे नाव पिंपळनेर असल्याने मी त्याला पिंपळनेर या नावानेच वाचले परंतू नंतर ती दुरूस्ती करून मनोमनी हे पिंपळनेर नाही तर पिंपळनारे आहे असं म्हणत किल्ल्याला पाहत राहिलो. आशेवाडीजवळ जेव्हा आलो तेव्हा किल्ल्याकडेजाण्यासाठी एक मोठी वेस आहे अन् त्या वेशीतून आम्ही आतमध्ये गेलो मात्र गौण खणीजाची ने आण करणार्‍या मोठमोठे टिप्पर त्या रस्त्याने ये जा करत असल्यामुळे तो रस्ता अक्षरश: खोदून गेला होता. खोल खोल एकार (खड्डे) पडले होते. आमची गाडी छोटी असल्याने त्यातून जाणे मुश्कील असल्याचे दिसत असले तरी किल्ला जवळ असल्यामुळे आम्ही गाडीतून खाली उतरून फक्त चालकाला त्या किल्ल्याकडे जाण्याच्या सूचना केल्या आणि आम्ही पायी चालत राहिलोत मात्र पुढे गाडी जात नसल्याचे पाहून आम्ही विचारात अडकलो, आता गाडी कोठे सोडायची? परंतू स्थानिक गावकर्‍यांनी आम्हाला आवाज देत हा रस्ता खराब आहे, गाडी येणार नाही आपण पाठीमागे जावे आणि गावातून एक रस्ता येतो त्या रस्त्याने किल्ल्याकडे यावे अशा सूचना दिल्या, त्यावेळी आम्ही चालकाला वापस गाडीसह पाठवलं तोपर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळावर येवून पोहोचलो होतो. तेथून आम्हाला रामशेज या टूमदार किल्ल्याचे दर्शन याचिदेही याचीडोळा झाले.  तसे संभाजी महाराजांची आठवणही आली. नव्हे नव्हे तर किल्लेदार सुर्याजी जेधे कसा पहाडासारखा माणूस असेल याची मनोमनी मनासोबतच खलबते सुरू झाली. तेवढ्यात प्रभूरामचंद्रही वनवासात असतांना या किल्ल्यावर विश्रांतीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले तेव्हा हा किल्ला साधा सूधा दिसायला असला तरी कर्तबगारीने प्रचंड मोठा म्हणावा लागेल. कारण 600 मावळ्यांच्या जोरावर साडेपाच वर्षे हा किल्ला मोगलांच्या अफाट सैन्यासोबत झुंज देत होता. हे मनातले वादळ घटनाक्रम आठवून शांत होत नव्हते तेवढ्यात आमची गाडी आली, पार्कींगला गाडी लावून आम्ही गडाकडे निघालो-पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने किल्ला स्पष्टपणे नजरेत पडत होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि आदल्या दिवशी 40 कि.मी.ची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केल्यामुळे थकवा जरी असला तरी किल्ल्याची उंची अधिक नसल्याने हा किल्ला आम्ही सर करू असे वाटत होते. पाऊस नव्हता, उन्हाची तिव्रता होती, उन चांगलं चटकत होतं, ढग येतील, पावसाच्या सरी कोसळतील असे मनोमनी वाटत असतांना पाऊस मात्र येते नव्हता. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्या बांधल्या आहेत. पायर्या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गुहेच्या समोरून जाणार्या पायर्‍या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.
किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही. रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते या किल्ल्याची रचना साधीच आहे परंतू तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजवत ठेवला यावरूनच त्यांच्या पराक्रमाची परिचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत झाले असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिडीपर्यंत पोहचवावी यासाठी किल्ल्याचे जतन व संवर्धन व्हायला हवे मात्र ते होताना दिसून येत नाही, किल्ल्यावर आज पाहण्यासारखं उभं काही नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजेंचा इतिहास मात्र किल्ल्यावर आल्यानंतर डोळ्यासमोर येतो आणि अपसूकपणे गगनभेदी ललकारी द्यावी वाटते- जय जिजाऊ! जय शिवराय!! हर हर महादेव!! अन् आम्हीही तेच केले. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयघोष करत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी सायंकाळी 6 च्या दरम्यान पोहोचलोत. सोबत सुशिल क्षीरसागर, एकनाथ नरवडे मामा, खांडे सर, चालक दादा सातपूते हे होतेच. परतीच्या प्रवासाला लागलोत अन् लागलीच पुढचे किल्ले कुठले करायचे यावर चर्चा करत आहोत.

                                                       


  
गणेश सावंत कार्यकारी संपादक सांय दैनिक बीड रिपोर्टर 9422742810 /9822652810