Thursday, 10 September 2020

किल्ले रामशेज थरार

 



                                                             किल्ले रामशेज थरार 



हिमालयाच्या मदतीला धावणार्‍या सह्याद्रीची सोबत कशी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीने कुठली मदत केली असेल, संभाजी महाराजांना सह्यद्रीने तेवढीच मदत केली होती. तर मग महाराजांना संघर्ष का करावा लागला असे एक ना अनेक प्रश्‍न महाराजांचा इतिहास वाचतांना उपस्थित व्हायचे अन् त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांबाबत कुतूहल वाटायचे, गड किल्ल्यांचा इतिहास आणि त्या गड किल्ल्यांच्याच जोरावर उभा राहिलेलं स्वराज्य हे माणसाला माणसात आणणारं होतं. तर मग आज साडे तीनशे चारशे वर्षांनंतर ते गडकिल्ले माणसात आहेत का? हे पाहण्याची उत्सूकताही शिगेला पोहच होती, म्हणूनच 2008 सालापासून प्रत्येक वर्षी 4 ते 6 किल्ले पहायचे असे जणू अभिवचनच स्वत:ला स्वत:ने घेतले आणि गडकिल्ल्यांची सफर सुरू ठेवली. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे तीन दिवस गडकिल्ल्याच्या सफारीसाठी निवडली. माझे आजपर्यंतचे बहुतांशी प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिन आणि कामगार दिन हे गडकिल्ल्यावर ध्वज फडकवूनच झाले. या वर्षीही गडकिल्ल्याला जायचे होते, परंतू कोरोना महामारीने अवघ्या जगाला कुलपात बंद करून ठेवलं, त्यामुळं गडकिल्ल्यावर जाणार तरी कसा, दिवसांमागून दिवस जात होते, लॉकडाऊन उठण्याचं नाव घेत नव्हतं परंतू लॉकडाऊन उठलं की दुसर्‍याच दिवशी आपण गडकिल्ल्याच्या सफरीसाठी जाणार हे निश्‍चित केलं. अन् सप्टेंबर महिन्यात राज्यातलं लॉकडाऊन उठलं. कुठं जायचं हे ठरवलेलं नव्हतं, सह्याद्रीच्या कुशीमध्ये जायचं आहे, त्या काळ्या काताळाला पहायचं आहे आणि त्या काळ्या काताळात उभ्या असलेल्या गडकोटाची परिक्रमा करायची आहे, अचानक सह्याद्रीची डोंगर रांग असलेली ब्रम्हगिरी आठवली आणि ठरलं, यावेळेस ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालायची, ब्रम्हगिरीवर जायचं, शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं अन् त्यानंतर हरीहर गडावर जावून रामशेजही याचीदेही याचीडोळा पाहायचं, आम्ही पहिल्या दिवशी ब्रम्हगिरीवर पोचलो, सह्याद्रीच्या पर्वतरांगा असलेल्या ब्रम्हगिरीचे ते अथांग रूप डोळ्यातच साठवून आम्ही खाली उतरलो, नाशीकला मुक्काम केला अन् दुसर्‍या दिवशी हरीहरसाठी जावू असे ठरवले परंतू वन विभागाने आता त्या ठिकाणी पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही जाता येणार नाही असा नियम बनवल्यामुळे अचानक परवानगीची गरज भासली, त्यामुळे आम्ही हरीहर जाणार नाही असा निर्णय घेत, साडे पाच ते सहा वर्षे झुंज देणार्‍या रामशेज किल्ल्यावर जायचे ठरवले. नाशीक मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर असलेल्या नाशिक-दिंडोरी रस्त्यावर हा गड आपल्याला दिसून येतो.

रामशेजचा इतिहास

हा अत्यंत थरारक आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी तो जोडलेला आहे. महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणूनही रामशेजकडं पाहितलं जातं. संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा गड एक नाही दोन नाही, महिना नाही दोन महिने नाही तर तब्बल 65 महिने म्हणजेच साडेपाच वर्षे दुश्मनाशी झुंज देत ठेवला होता. संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारीत कादंबर्‍यांमध्ये आणि पुस्तकांमध्ये याची नोंद आपल्याला पहायला मिळते. मराठा साम्राज्यातले बहूतांशी किल्ले हे सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात घनदाट जंगलात आहेत, परंतू रामशेज किल्ला मात्र याला अपवाद आहे. नाशीकजवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे तरीही त्याची उंची समूद्रसपाटीपासून 3270 मिटर असल्याचे सांगण्यात येते. नाशीकच्या जवळ असल्याने हा किल्ला नाशीकमधून सर्वांना स्पष्टपणे निदर्शनास येतो. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान त्यानुसारच या किल्ल्याचा इतिहासही तसाच आहे. रामशेजच्या लढाईचे वर्णन मुघलांच्या कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम वाचायला मिळाले होते आणि तेथूनच रामशेजच्या लढाईचा खरा इतिहास उजेडात आला.
‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टलाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तजहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकवरून आम्ही थेट रामशेजला जाण्यासाठी निघालोत मात्र वाटेमध्ये फेसबूक मित्राचा संपर्क झाला. आमचे नाशिक जिल्ह्यातले फोटो सोशलमिडियावर पाहून त्याने आम्हाला निमंत्रीत केले. आम्ही त्याच्या शेतात गेलोत, द्राक्षाचा बाग पाहितला, मनुके तयार कसे होतात हेही पाहितले, पाहुणचार घेतला आणि आम्ही पुढे रामशेजसाठी निघालो. नाशीक पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला आपल्याला दृष्टीक्षेपात पडतो. पेठेकडे जाणार्‍या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. तशी आमची गाडीही किल्ल्याच्या दिशेने नाशीकच्या निपाणीजवळील पेठ नाका येथून जशी खाजगी वाहनांची सोय आहे तसे आम्हीही त्या रस्त्यानेच आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे, त्या गावाकडे जाण्यासाठी निघालो, रस्त्यात आम्हाला पिंपळनारे हे गाव भेटले, माझ्या गावाचे नाव पिंपळनेर असल्याने मी त्याला पिंपळनेर या नावानेच वाचले परंतू नंतर ती दुरूस्ती करून मनोमनी हे पिंपळनेर नाही तर पिंपळनारे आहे असं म्हणत किल्ल्याला पाहत राहिलो. आशेवाडीजवळ जेव्हा आलो तेव्हा किल्ल्याकडेजाण्यासाठी एक मोठी वेस आहे अन् त्या वेशीतून आम्ही आतमध्ये गेलो मात्र गौण खणीजाची ने आण करणार्‍या मोठमोठे टिप्पर त्या रस्त्याने ये जा करत असल्यामुळे तो रस्ता अक्षरश: खोदून गेला होता. खोल खोल एकार (खड्डे) पडले होते. आमची गाडी छोटी असल्याने त्यातून जाणे मुश्कील असल्याचे दिसत असले तरी किल्ला जवळ असल्यामुळे आम्ही गाडीतून खाली उतरून फक्त चालकाला त्या किल्ल्याकडे जाण्याच्या सूचना केल्या आणि आम्ही पायी चालत राहिलोत मात्र पुढे गाडी जात नसल्याचे पाहून आम्ही विचारात अडकलो, आता गाडी कोठे सोडायची? परंतू स्थानिक गावकर्‍यांनी आम्हाला आवाज देत हा रस्ता खराब आहे, गाडी येणार नाही आपण पाठीमागे जावे आणि गावातून एक रस्ता येतो त्या रस्त्याने किल्ल्याकडे यावे अशा सूचना दिल्या, त्यावेळी आम्ही चालकाला वापस गाडीसह पाठवलं तोपर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळावर येवून पोहोचलो होतो. तेथून आम्हाला रामशेज या टूमदार किल्ल्याचे दर्शन याचिदेही याचीडोळा झाले.  तसे संभाजी महाराजांची आठवणही आली. नव्हे नव्हे तर किल्लेदार सुर्याजी जेधे कसा पहाडासारखा माणूस असेल याची मनोमनी मनासोबतच खलबते सुरू झाली. तेवढ्यात प्रभूरामचंद्रही वनवासात असतांना या किल्ल्यावर विश्रांतीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले तेव्हा हा किल्ला साधा सूधा दिसायला असला तरी कर्तबगारीने प्रचंड मोठा म्हणावा लागेल. कारण 600 मावळ्यांच्या जोरावर साडेपाच वर्षे हा किल्ला मोगलांच्या अफाट सैन्यासोबत झुंज देत होता. हे मनातले वादळ घटनाक्रम आठवून शांत होत नव्हते तेवढ्यात आमची गाडी आली, पार्कींगला गाडी लावून आम्ही गडाकडे निघालो-पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने किल्ला स्पष्टपणे नजरेत पडत होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि आदल्या दिवशी 40 कि.मी.ची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केल्यामुळे थकवा जरी असला तरी किल्ल्याची उंची अधिक नसल्याने हा किल्ला आम्ही सर करू असे वाटत होते. पाऊस नव्हता, उन्हाची तिव्रता होती, उन चांगलं चटकत होतं, ढग येतील, पावसाच्या सरी कोसळतील असे मनोमनी वाटत असतांना पाऊस मात्र येते नव्हता. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्या बांधल्या आहेत. पायर्या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गुहेच्या समोरून जाणार्या पायर्‍या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.
किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही. रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते या किल्ल्याची रचना साधीच आहे परंतू तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजवत ठेवला यावरूनच त्यांच्या पराक्रमाची परिचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत झाले असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिडीपर्यंत पोहचवावी यासाठी किल्ल्याचे जतन व संवर्धन व्हायला हवे मात्र ते होताना दिसून येत नाही, किल्ल्यावर आज पाहण्यासारखं उभं काही नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजेंचा इतिहास मात्र किल्ल्यावर आल्यानंतर डोळ्यासमोर येतो आणि अपसूकपणे गगनभेदी ललकारी द्यावी वाटते- जय जिजाऊ! जय शिवराय!! हर हर महादेव!! अन् आम्हीही तेच केले. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयघोष करत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी सायंकाळी 6 च्या दरम्यान पोहोचलोत. सोबत सुशिल क्षीरसागर, एकनाथ नरवडे मामा, खांडे सर, चालक दादा सातपूते हे होतेच. परतीच्या प्रवासाला लागलोत अन् लागलीच पुढचे किल्ले कुठले करायचे यावर चर्चा करत आहोत.

                                                       


  
गणेश सावंत कार्यकारी संपादक सांय दैनिक बीड रिपोर्टर 9422742810 /9822652810

                                                                                                                                 

No comments:

Post a Comment