Wednesday, 26 July 2017

तुम्हाला शपथ आहे साहेबांची ....!



 
तुम्हाला शपथ आहे साहेबांची ....!

मी पंकजा गोपीनाथ मुंडे अन 

टाळ्यांचा कडकडाट 

-गणेश सावंत-9422742810

त्या धिरोदत्ताच्या संघर्षाचे वर्णन काय ते करावे, करायचेच झाले तर त्या संघर्षाचं वर्णन एकाच ओळीत करता येईल. ती म्हणजे साक्षात काळालाही आपल्या कर्तृत्वाच्या मिरवणुकीत नाचण्यास भाग पाडणारे स्व. गोपीनाथ मुंडे असच करता येईल. त्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची छबी कुठे नसेल, त्या धिरोदत्ताची किमया आणि जादूची कांडी कुठे कुठे असेल असे उत्तरातले प्रश्‍न अवघ्या महाराष्ट्राला पडायचे. त्याच संघर्षशील व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्ववान मुलीने त्याच धिरोदत्ताची पताका खांद्यावर घेतली. तेव्हा धैर्य ठेवून जो संघर्ष करतो तोच यशाची पताका फडकावतो हे सिद्ध होते आणि हे सिद्ध झालेही एका दु:खद घटनेतल्या संयमातून महाराष्ट्राने नव्हे अवघ्या देशाने पाहितला. त्या ३४-३५ वर्षाच्या युवतीचा संयम. तिच्या भावना आणि डोळ्यातून ओघळणार्‍या आश्रूंबरोबर कंठातून निघणारा तो संयमी आवाज, तो तो आणि तोच होता, तुम्हाला शपथ आहे साहेबांची..! या एका वाक्यातून आपल्या चाहत्या माणसाला परत या परत या मुंडे साहेब परत या, म्हणत आपल्या भावनांना बांध फोडणारे आणि बघता बघता संयम तोडू पाहणारे चाहते जेंव्हा आक्रमक होतात तेव्हा त्याच संयमाने सर्वात लाडाची लेक जेव्हा अत्यंत संयमीपणे ‘तुम्हाला शपथ आहे सोबांची,’ अशी जेंव्हा साद घालते आणि त्या सादेला लाखोंचा सायश्रू जमाव साद देतो तेव्हाच कळून चुकते, महाराष्ट्राचे नेतृत्व ईही लोकी जाताना त्या नेतृत्वाची जबाबदारी ज्या संयमी व्यक्तीवर दिली ती दुसरी-तिसरी कोणी नसून पोटची, लाडाची लेक पंकजा हीच होती. हे वर्णन एवढ्यासाठीच करायचं होतं जे वय नटण्या-सजण्याचं होतं, हातातल्या बांगड्या खणखण्याचं होतं त्या वयात धिरोदत्त असलेल्या पित्याच्या स्वप्नांची खुणगाठ मनि बाळगायची होती. महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे आणि ऊसतोड कामगारांची माता व्हायचं होतं. आणि ते झालंही पंकजा मुंडेंनी साहेबांसारखी संघर्षयात्रा काढली. अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. तळागाळातल्या आणि सर्वक्षेत्रातल्या लोकांना मी मुंडे साहेब तर होऊ शकत नाही, परंतु मुंडे साहेबांची लेक म्हणून तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. हा विश्‍वास अवघ्या महाराष्ट्राला दिला आणि बघता-बघता तो दिवस उगवला. ज्या दिवसाची स्व. मुंडे साहेब स्वप्न पहायचे आणि त्याच दिवशी जेंव्हा 

मी पंकजा गोपीनाथ मुंडे 

असा शब्द राज्यपालांच्या उपस्थितीत उच्चारण्यात आला तेव्हा शपथविधीसाठी मैदानात जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैदानात तब्बल ४० सेकंद ते दीड मिनिट टाळ्यांचा कडकडाट सुरू होता तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात टीव्हीसमोर बसलेल्या लोकांच्या छात्याही त्या शब्दाने फुगल्या होत्या. अनेकांच्या धमण्यातलं रक्त त्या शब्दांमुळे सळसळत होतं. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. काहींच्या डोळ्यात आनंदाबरोबर आठवणींच्या अश्रूंनीही जागा घेतली होती. अनेकांचे उमाळे दाटून आले होते. कोणाला कंठ फुटत नव्हता, तो दिवस होता पंकजा गोपीनाथ मुंडे या नावानी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतानाचा. त्या दिवसापासून ते आजपावेतो या तिन साडेतीन वर्षांच्या कालखंडात पंकजा मुंडेंनाही तेवढाच 
संघर्ष करावा लागला जेवढा स्व. मुंडे साहेबांना करावा लागत होता. पंकजा मुंडेंच्या खांद्यावर वयाच्या ३५ व्या वर्षी राजकीय जबाबदारी पडली आणि ती जबाबदारी अखंडपणे त्या निभावत राहिल्या. या कालखंडात पंकजा मुंडेंवर अनेक वेळा आरोप झाले. कधी राजकीय गड आणि धार्मिक गड तर कधी सेलफी तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत समर्थकांचे आक्षेपार्ह विधान तर कधी चिक्की घोटाळा मात्र या सर्व प्रकरणातून अत्यंत संयमीपणे पंकजा मुंडे बाहेर येत राहिल्या त्या केवळ धैर्य ठेवून संघर्ष करत कर्तृत्व कर्माला महत्त्व देतात म्हणूनच. हे उघड सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. पंकजा मुंडेंनी आपली काम करण्याची पद्धत मुंडे साहेबांसारखी ठेवली नाही हे जेवढे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे तेवढेच सत्य त्या आपल्या कार्यकाळामध्ये कर्तृत्व कर्माला महत्त्व देतात हेही खरे आहे. म्हणूनच पंकजा मुंडे सातत्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या असतात. आज हा सोक्षमोक्षचा खटाटोप एवढ्यासाठीच की पंकजा मुंडेंचा वाढदिवस आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडेंनी वाढदिवस साजरे केले नाहीत, आताही त्यांना वाढदिवस साजरा करायचा नव्हता कारण बाबाची लाडकी लेक असल्याने वाढदिवसादिवशी बाबा कुठेही असोत ते पंकजांजवळ यायचेच. त्यामुळे साहजिकच साहेबांची प्रकर्षाने आठवण येते. परंतु साहेबांच्या कर्तृत्व-कर्माकडे पाहत त्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याचं नेतृत्व जेव्हा पंकजाताई करतायत तेव्हा त्यांचं अभिष्टचिंतनही तेवढच महत्त्वाचं आजचा वाढदिवस साजरा होणे ताईंना आवडेल की नाही हा नंतरचा प्रश्‍न परंतु या निमित्ताने ताईंशी संवाद साधण्याचा आणि 

ताईंमध्ये गोपीनाथ मुंडे 
पहाण्याचा योग स्व. मुंडे अनुयायांना येतो. तो हक्क त्यांच्यापासून बहुदा कोणीही हिरावून घेणार नाही. राहीला प्रश्‍न स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या कर्तृत्व कर्मावर राजकीय सामाजिक धोरणांचा आणि कार्यकर्त्यांसह आप्तस्वकियांना सांभाळण्याचा त्याचबरोबर प्रश्‍न आहे तो बीड जिल्ह्याच्या विकासाचा आणि प्रश्‍न आहे तो मराठवाड्याच्या अनुशेषाचा. स्व. मुंडे आणि स्व. विलासराव देशमुखांची मैत्री मराठवाड्याचा अनुशेष भविष्यात भरूण काढेल, हा जो मराठवाड्यातील जनतेचा आशावाद होता तो आशावाद काळाला पचला नाही. काळाला तो खुपला आणि काळाने देशमुखांसह मुंडेंना मराठवाड्यापासून हिरावून घेतले. त्यानंतर तेवढ्या ताकतीचा, तेवढ्या तोलामोलाचा नेता आता होणे नाही, असे मराठवाड्यातील जनतेने मनोमनी मानले खरे. परंतु तीन वर्षांच्या कालखंडात पंकजा मुंडेंनी जी काही भरारी घेतली आहे त्या भरारीतून नक्कीच त्यांच्याकडून आशावाद करणे गैर नाही. बीड जिल्ह्यामध्ये लाख-लाख नव्हे तर कोट-कोट रुपये आणले. कोट्यवधी रुपयांचा फंड आणला गेला. रेल्वेचे काम सुरु झाले. परंतु हा सर्व पैसा यथोचितपणे मार्ग लागतोय का हेही पाहणे गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिकारी कोंडी करत असतात. आणि ती कोंडी फोडण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं. परंतु पंकजा मुंडे इथे अधिकार्‍यांनी जी कोंडी केली आहे ती कोंडी फोडण्याचं काम करताना दिसून येत नाही. खरं तर आज ताईंना द्यायचा दिवस आहे. पण आम्ही त्यांच्याकडे मागणं मागण्याचा उद्देश एवढ्यासाठीच ठेवतोय, बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी कोंडी करत असतील तर ती कोंडी तोडून सर्वसामान्यातील प्रत्येक व्यक्तीला ताईंनी म्हणावं, ते काम माझ्यावर सोपवा, गो अहेड... म्हणजे मुंडे साहेबांची प्रशासनावरील पकड त्यामध्ये दिसून येईल. कष्ट आहेत, कर्तृत्व आहे, ममत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे, कठोरता आहे, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे परंतु अनेक वेळा कुठे ना कुठे माशी शिंकते आणि पंकजा मुंडेंना आपल्या कर्तृत्व कर्मात यशस्वी होण्यापासून रोखते. आपल्या जवळच्या कोंडवाड्यांनी हुजरेपणा केला आणि त्यातूनच बीड आणि महाराष्ट्र पाहितला तर नक्कीच हुजरेपणातलं बीड आणि महाराष्ट्राचं दर्शन हे हरितक्रांतीचं असेल मात्र प्रत्यक्षात बीड आणि महाराष्ट्रात वाळवंट असेल त्यामुळे कुठे ना कुठे बदल होणे गरजेचं आहे. मग तो स्वभावात करायचाय, कामात करायचाय की निर्णय क्षमतेबरोबर मार्गदर्शन घेणारात करायचाय हे ताईंनी आता ठरवायलाच हवं. कारण साहेब सेकंदा सेकंदाला आपल्या मनातील निर्णयाला अनेकांच्या माध्यमातून चाचपायचे आणि त्यांना म्हणण्यापेक्षा लोकांना पटणार असेल तोच निर्णय अमलात आणायचे. ताईंच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. मग मुंडे साहेबांचं स्वप्नही तेवढच मोठं आहे. मुंडे साहेबांचे कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे आणि ऊसतोड कामगार हे पाल्य आहेत त्यामुळे तुम्ही माता झालात तेव्हा तुमच्या माथ्याला ताप होणारच. त्या तापाने फणफणायचे कारण नव्हे एवढच सत्य त्रिकाल आहे. आज उभा साहेबांचा अनुयायी तुमच्यात साहेबांना पाहतोय. तसं तुम्ही साहेब व्हायलाच हवं

साय दै.बीड रिपोर्टर मधील आज चा अग्रलेख

Sunday, 23 July 2017

मेळघाट ते बालाघाट बालकांच कुपोषण मग पोषण कोणाचं होतय?

साय दै, बीड रिपोर्टर मधील आजचा रविवार अग्रलेख

मेळघाट ते बालाघाट बालकांच कुपोषण         

 मग पोषण कोणाचं होतय?

-गणेश सावंत-9422742810

जागतिक महासत्तेचे स्वप्न पाहणार्‍या आणि जगात सर्वात तरूण तुर्क देश होवु पाहणार्‍या हिंदुस्तानात कुपोषणाचा आकडा का वाढतोय, शिवबाच्या नावावर राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांच्या काळात महाराष्ट्रात मेळघाट ते बालाघाटापर्यंत कुपोषण का पोसलं जातयं? जिथं अन्न ठेवायला कोठारे अपुरे आहेत तिथं कुपोषण का होतयं? अन्न धान्यांनी देश भरभरून भरलेला असतांना अनेकांच्या पोटाला अन्न का मिळत नाहीयं, जगाच्या पाठीवर कुपोषणामुळे भारतातच सर्वात जास्त बालकांचा मृत्यू का होतोयं? या जबाबदार कोण? राज्यकर्ते, नौकरदार की समाज व्यवस्था याचं आत्मचिंतन आता नक्कीच व्हायला हवं. ज्या नवजात बालकांनी आपले डोळेही निटसे उघडले नाहीत, त्या बालकांचा भारतात जन्म झाला हा त्यांचा गुन्हा आहे का? असा जळजळीत सवाल आज आम्हाला राज्यकर्त्यांसह नौकरदार आणि समाज व्यवस्थेला विचारावासा वाटतो. जगामध्ये कुपोषणाने हाहाकार माजवला हे उघड सत्य असलं तरी भारतात सर्वाधिक कुपोषण पोसलं जात हे ही त्रिवार सत्य मानायला हवं. एकेकाळी ज्या देशात दुध, दह्याच्या गंगा वाहिल्या जायच्या, सोन्याची चिडीया म्हणून पाहिलं जात होत त्या देशात कुपोषणाने सर्वाधिक बळी जात असतील तर आजच्या व्यवस्थेकडे बोट दाखवावेत लागेल. नशिबाला दोष देत कुपोषित मुलांचे माता-पिता त्या बालकाच्या मृत्यूनंतर सावरले जात असले तरी कुपोषणामुळे देशात आणि राज्यात ज्या बालकांचा मृत्यू होतो त्यांची जबाबदारी ही राज्य कर्त्यांची आणि व्यवस्थेचीच आहे. एकीकडे सर्वांगीण विकासाच्या गप्पा मारायच्या, जग चंद्रावर जातयं म्हणून सांगायचं, माहिती तंत्रज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात भारत बलशाली आहे, तरणा ताठा आहे या स्वाभिमानाच्या शेख्या मिरवायच्या आणि त्याच देशात जणू अन्न-अन्न करत बालके मृत्यूमुखी पडत असतील तर तुमचा तो कोरडा स्वाभिमान, तुमच्या त्या शेख्या चुलीत घाला. आमचे लेकरे मसनवाट्यात जात असतील आणि तुम्ही नुसत्या पुढार पणात आयुष्य घालवत कुपोषण होवू नये म्हणून ज्या योजना आखल्या आहेत त्या योजनेत भ्रष्टाचार करून सदृढ होत असाल तर हे पाप तुम्ही कुठे फेडाल? हा सवाल विचारण्याचा हक्क प्रत्येक देशवासियांना आहे. आम्हाला आश्‍चर्य वाटतं भारतासारख्या देशात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात कुपोषणाचा आकडा पाहिला आणि त्या कुपोषणामुळे मृत्यू होणार्‍या बालकांचा आकडा पाहिला तर राज्यकर्त्यांविरोधात शेमऽ शेमऽऽ म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. कुपोषण हे बालकांचे होत असले तरी व्यवस्थेच्या कर्तव्य कर्माचे ते खरे कुपोषण नव्हे-नव्हे तर नपुंसकत्व म्हणावं लागेल. शब्दाच्या मार्‍यात राज्यकर्त्यांना नेहमी चिड येते परंतु ही चिड कुपोषणाच्या विरोधात राज्यकर्त्यांनी आणि व्यवस्थेने निर्माण केली तर नवजात बालकांवर मसनवाटा पाहण्याची वेळ येणार नाही. भारतात 

कुपोषणाची समस्या 

अतिशय गंभीर आहे. दररोज सुमारे ४ हजाराहून अधिक बालके मृत्यूमुखी पडत आहेत. जागतिक आकडेवारी पाहितली तर या आकडेवारीमध्ये पाच वर्षांखालील तब्बल १९ हजार बालके दररोज मृत्यूमुखी पडतात, असे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे. भारत, नायझेरिया, कॉंगो, पाकिस्तान आणि चिन येथे जगातील सर्वाधिक बालक मृत्यू झाले आहेत. भारतातील बालमृत्यूचा दर हा जगात सर्वाधिक असून गतवर्षी भारतात सुमारे १६ लाखांहून अधिक बालके मृत्यूमुखी पडले आहेत. कुपोषणाची समस्या भारतातील खेड्यापाड्यात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोक वडापाव खाऊन जगतात. एकीकडे देशाच्या राज्यकर्त्यांनी तब्बल तिन दशके अन्नसुरक्षेसाठी भरीव प्रयत्न करत कोठारे कमी पडतील एवढे अन्न उत्पादन क्षमता देशाची करून ठेवली. परंतु दुसरीकडे भूकमारी आणि कुपोषणाचा प्रश्‍न सोडवण्यास सरकार अपयशी पडतय हेही तितकच खरं. वेगवेगळ्या संस्थांच्या आकडेवारीनुसार भारतात किमान ३० टक्के मुले ही कमी वजनाची असतात. एकट्या महाराष्ट्रात कुपोषणाने मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. यात प्रामुख्याने लहान बालकांचा समावेश दिसून येतो. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी नंदी फाऊंडेशनने डॉ. मनमोहनसिंग यांना कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूच्या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. या अहवालात जगातील प्रत्येक तिन बालकांमागे एक बालक कुपोषित असल्याचे उघड सत्य समोर आले होते. २०११ मध्ये १७ हजार ६८८ बालके कुपोषणामुळे मरण पावली. मेळघाटमध्ये ही संख्या १४ हजार ५८३ होती. जी परिस्थिती २०११ मध्ये होती ती परिस्थिती २०१५ मध्ये आणि तिच परिस्थिती २०१७ मध्ये पहावयास मिळते. याउलट देशात आणि महाराष्ट्रात चालू दोन वर्षात कुपोषित बालकांचा आकडा आणि कुपोषणामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा हा मोठा आहे. परंतु गेल्या दीड-दोन वर्षात मेळघाटातील काही जिल्हे सोडले तर अन्य जिल्ह्यात राज्यकर्त्यांनी आणि व्यवस्थेने कुपोषणाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिलेले नाही. आम्ही तर म्हणू 

शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी 

माता-पिता सदृढ असतील, तंदुरुस्त असतील त्यांना चार घास चांगले खायला मिळत असतील, ते निरोगी असतील तर आणि तरच त्यांच्या पोटी जन्मलेले बालके हे सदृढ जन्माला येतील. परंतु भपकेबाजीच्या आणि मार्केटिंगच्या नादी लागलेल्या राज्यकर्त्यांना शुद्ध बिज निर्माण करणेच आता योग्य वाटत नाही की काय म्हणूनच कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे आणि गोरगरीब यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम व्यवस्थेकडून सातत्याने होताना दिसून येतं. गेल्या आठवड्यामध्ये ज्या जिल्ह्यात बालकल्याण आहे, ज्या जिल्ह्यात राज्याच्या बालकल्याण मंत्र्यांचा अधिष्ठाण आहे त्या जिल्ह्यात कुपोषणाने डोकं वर काढल्याचं उघड सत्य जगासमोर आलं. आम्ही सर्वप्रथम माजलगाव तालुक्यातील कुपोषित बालकांचं वृत्त प्रकाशीत केलं. हे वृत्त प्रकाशीत करताना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती अधिक घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं दिसून आलं, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या आरोग्य समन्वय समितीची गेल्या दोन वर्षांमध्ये बैठकच झाली नाही. तेही वृत्त आम्ही ठळकपणे प्रकाशीत केलं. त्यावेळेस शासन आणि प्रशासन यांच्यात जुंपलं, अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांकडे बोट केलं तर पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांकडे बोट करून तो विषय तेथेच संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचा साधा प्रश्‍न असा आजही आहेे, जर आरोग्य समन्वय समितीच्या बैठका झाल्या असत्या तर या दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्यात जे कुपोषित बालके जन्माला आले आहेत ते कुपोषित जन्मले असते का? त्या बैठकांमध्ये या विषयी चर्चा झाली असती परंतु इथे ना शासन ना प्रशासन या कुठल्याही व्यवस्थेला सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयी म्हणावी तशी काळजी दिसून आलेली नाही. एकूणच हा सर्व प्रकार जेंव्हा उघडकीस आला तेव्हा गेवराई आणि शिरूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे २१ बालके या दोन तालुक्यात कुपोषित असल्याचे निदर्शनास आले. बाकी तालुक्यात शोध घेणे बाकी आहे. यावरून राज्यकर्त्यांची आणि प्रशासन व्यवस्थेतील अधिकार्‍यांची रयतेच्या आरोग्याविषयी किती काळजी ते दिसून येते. विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावापासून जगापर्यंतचा आहे. हे आम्हीही मान्य करू. परंतु गावागावांत, जिल्ह्या-जिल्ह्यात आणि राज्या-राज्यात कुपोषणाविषयी राज्यकर्त्यांनी, नोकरदारांनी जागता पहारा ठेवला. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना वेळेवर आरेग्य सेवा दिली तरी कुपोषणासारख्या या महाभयंकर मसनवाट्याचा अंत होणे सहज शक्य आहे. बीड जिल्हा हा कष्टकर्‍यांचा आणि ऊसतोष कामगारांचा जिल्हा. गरोदर महिला उसाच्या फडात बाळांत होतेय, तिथे बाळाची नाळ कापली जातेय याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली आणि त्यानुसार त्या त्या जिल्ह्याच्या सर्वसामान्यांकडे लक्ष दिलं तर असं होणार नाही. परंतु इथे कर्त्याचं कुपोषण होतोय आणि करवित्याचं पोषण होतय. हे दुर्दैव कधी संपेल?