तुम्हाला शपथ आहे साहेबांची ....!
मी पंकजा गोपीनाथ मुंडे अन
टाळ्यांचा कडकडाट
-गणेश सावंत-9422742810
त्या धिरोदत्ताच्या संघर्षाचे वर्णन काय ते करावे, करायचेच झाले तर त्या संघर्षाचं वर्णन एकाच ओळीत करता येईल. ती म्हणजे साक्षात काळालाही आपल्या कर्तृत्वाच्या मिरवणुकीत नाचण्यास भाग पाडणारे स्व. गोपीनाथ मुंडे असच करता येईल. त्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची छबी कुठे नसेल, त्या धिरोदत्ताची किमया आणि जादूची कांडी कुठे कुठे असेल असे उत्तरातले प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडायचे. त्याच संघर्षशील व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्ववान मुलीने त्याच धिरोदत्ताची पताका खांद्यावर घेतली. तेव्हा धैर्य ठेवून जो संघर्ष करतो तोच यशाची पताका फडकावतो हे सिद्ध होते आणि हे सिद्ध झालेही एका दु:खद घटनेतल्या संयमातून महाराष्ट्राने नव्हे अवघ्या देशाने पाहितला. त्या ३४-३५ वर्षाच्या युवतीचा संयम. तिच्या भावना आणि डोळ्यातून ओघळणार्या आश्रूंबरोबर कंठातून निघणारा तो संयमी आवाज, तो तो आणि तोच होता, तुम्हाला शपथ आहे साहेबांची..! या एका वाक्यातून आपल्या चाहत्या माणसाला परत या परत या मुंडे साहेब परत या, म्हणत आपल्या भावनांना बांध फोडणारे आणि बघता बघता संयम तोडू पाहणारे चाहते जेंव्हा आक्रमक होतात तेव्हा त्याच संयमाने सर्वात लाडाची लेक जेव्हा अत्यंत संयमीपणे ‘तुम्हाला शपथ आहे सोबांची,’ अशी जेंव्हा साद घालते आणि त्या सादेला लाखोंचा सायश्रू जमाव साद देतो तेव्हाच कळून चुकते, महाराष्ट्राचे नेतृत्व ईही लोकी जाताना त्या नेतृत्वाची जबाबदारी ज्या संयमी व्यक्तीवर दिली ती दुसरी-तिसरी कोणी नसून पोटची, लाडाची लेक पंकजा हीच होती. हे वर्णन एवढ्यासाठीच करायचं होतं जे वय नटण्या-सजण्याचं होतं, हातातल्या बांगड्या खणखण्याचं होतं त्या वयात धिरोदत्त असलेल्या पित्याच्या स्वप्नांची खुणगाठ मनि बाळगायची होती. महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे आणि ऊसतोड कामगारांची माता व्हायचं होतं. आणि ते झालंही पंकजा मुंडेंनी साहेबांसारखी संघर्षयात्रा काढली. अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. तळागाळातल्या आणि सर्वक्षेत्रातल्या लोकांना मी मुंडे साहेब तर होऊ शकत नाही, परंतु मुंडे साहेबांची लेक म्हणून तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. हा विश्वास अवघ्या महाराष्ट्राला दिला आणि बघता-बघता तो दिवस उगवला. ज्या दिवसाची स्व. मुंडे साहेब स्वप्न पहायचे आणि त्याच दिवशी जेंव्हामी पंकजा गोपीनाथ मुंडे
असा शब्द राज्यपालांच्या उपस्थितीत उच्चारण्यात आला तेव्हा शपथविधीसाठी मैदानात जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैदानात तब्बल ४० सेकंद ते दीड मिनिट टाळ्यांचा कडकडाट सुरू होता तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात टीव्हीसमोर बसलेल्या लोकांच्या छात्याही त्या शब्दाने फुगल्या होत्या. अनेकांच्या धमण्यातलं रक्त त्या शब्दांमुळे सळसळत होतं. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. काहींच्या डोळ्यात आनंदाबरोबर आठवणींच्या अश्रूंनीही जागा घेतली होती. अनेकांचे उमाळे दाटून आले होते. कोणाला कंठ फुटत नव्हता, तो दिवस होता पंकजा गोपीनाथ मुंडे या नावानी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतानाचा. त्या दिवसापासून ते आजपावेतो या तिन साडेतीन वर्षांच्या कालखंडात पंकजा मुंडेंनाही तेवढाचसंघर्ष करावा लागला जेवढा स्व. मुंडे साहेबांना करावा लागत होता. पंकजा मुंडेंच्या खांद्यावर वयाच्या ३५ व्या वर्षी राजकीय जबाबदारी पडली आणि ती जबाबदारी अखंडपणे त्या निभावत राहिल्या. या कालखंडात पंकजा मुंडेंवर अनेक वेळा आरोप झाले. कधी राजकीय गड आणि धार्मिक गड तर कधी सेलफी तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत समर्थकांचे आक्षेपार्ह विधान तर कधी चिक्की घोटाळा मात्र या सर्व प्रकरणातून अत्यंत संयमीपणे पंकजा मुंडे बाहेर येत राहिल्या त्या केवळ धैर्य ठेवून संघर्ष करत कर्तृत्व कर्माला महत्त्व देतात म्हणूनच. हे उघड सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. पंकजा मुंडेंनी आपली काम करण्याची पद्धत मुंडे साहेबांसारखी ठेवली नाही हे जेवढे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे तेवढेच सत्य त्या आपल्या कार्यकाळामध्ये कर्तृत्व कर्माला महत्त्व देतात हेही खरे आहे. म्हणूनच पंकजा मुंडे सातत्याने वादाच्या भोवर्यात अडकलेल्या असतात. आज हा सोक्षमोक्षचा खटाटोप एवढ्यासाठीच की पंकजा मुंडेंचा वाढदिवस आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडेंनी वाढदिवस साजरे केले नाहीत, आताही त्यांना वाढदिवस साजरा करायचा नव्हता कारण बाबाची लाडकी लेक असल्याने वाढदिवसादिवशी बाबा कुठेही असोत ते पंकजांजवळ यायचेच. त्यामुळे साहजिकच साहेबांची प्रकर्षाने आठवण येते. परंतु साहेबांच्या कर्तृत्व-कर्माकडे पाहत त्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याचं नेतृत्व जेव्हा पंकजाताई करतायत तेव्हा त्यांचं अभिष्टचिंतनही तेवढच महत्त्वाचं आजचा वाढदिवस साजरा होणे ताईंना आवडेल की नाही हा नंतरचा प्रश्न परंतु या निमित्ताने ताईंशी संवाद साधण्याचा आणि
ताईंमध्ये गोपीनाथ मुंडे
पहाण्याचा योग स्व. मुंडे अनुयायांना येतो. तो हक्क त्यांच्यापासून बहुदा कोणीही हिरावून घेणार नाही. राहीला प्रश्न स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या कर्तृत्व कर्मावर राजकीय सामाजिक धोरणांचा आणि कार्यकर्त्यांसह आप्तस्वकियांना सांभाळण्याचा त्याचबरोबर प्रश्न आहे तो बीड जिल्ह्याच्या विकासाचा आणि प्रश्न आहे तो मराठवाड्याच्या अनुशेषाचा. स्व. मुंडे आणि स्व. विलासराव देशमुखांची मैत्री मराठवाड्याचा अनुशेष भविष्यात भरूण काढेल, हा जो मराठवाड्यातील जनतेचा आशावाद होता तो आशावाद काळाला पचला नाही. काळाला तो खुपला आणि काळाने देशमुखांसह मुंडेंना मराठवाड्यापासून हिरावून घेतले. त्यानंतर तेवढ्या ताकतीचा, तेवढ्या तोलामोलाचा नेता आता होणे नाही, असे मराठवाड्यातील जनतेने मनोमनी मानले खरे. परंतु तीन वर्षांच्या कालखंडात पंकजा मुंडेंनी जी काही भरारी घेतली आहे त्या भरारीतून नक्कीच त्यांच्याकडून आशावाद करणे गैर नाही. बीड जिल्ह्यामध्ये लाख-लाख नव्हे तर कोट-कोट रुपये आणले. कोट्यवधी रुपयांचा फंड आणला गेला. रेल्वेचे काम सुरु झाले. परंतु हा सर्व पैसा यथोचितपणे मार्ग लागतोय का हेही पाहणे गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिकारी कोंडी करत असतात. आणि ती कोंडी फोडण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं. परंतु पंकजा मुंडे इथे अधिकार्यांनी जी कोंडी केली आहे ती कोंडी फोडण्याचं काम करताना दिसून येत नाही. खरं तर आज ताईंना द्यायचा दिवस आहे. पण आम्ही त्यांच्याकडे मागणं मागण्याचा उद्देश एवढ्यासाठीच ठेवतोय, बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी कोंडी करत असतील तर ती कोंडी तोडून सर्वसामान्यातील प्रत्येक व्यक्तीला ताईंनी म्हणावं, ते काम माझ्यावर सोपवा, गो अहेड... म्हणजे मुंडे साहेबांची प्रशासनावरील पकड त्यामध्ये दिसून येईल. कष्ट आहेत, कर्तृत्व आहे, ममत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे, कठोरता आहे, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे परंतु अनेक वेळा कुठे ना कुठे माशी शिंकते आणि पंकजा मुंडेंना आपल्या कर्तृत्व कर्मात यशस्वी होण्यापासून रोखते. आपल्या जवळच्या कोंडवाड्यांनी हुजरेपणा केला आणि त्यातूनच बीड आणि महाराष्ट्र पाहितला तर नक्कीच हुजरेपणातलं बीड आणि महाराष्ट्राचं दर्शन हे हरितक्रांतीचं असेल मात्र प्रत्यक्षात बीड आणि महाराष्ट्रात वाळवंट असेल त्यामुळे कुठे ना कुठे बदल होणे गरजेचं आहे. मग तो स्वभावात करायचाय, कामात करायचाय की निर्णय क्षमतेबरोबर मार्गदर्शन घेणारात करायचाय हे ताईंनी आता ठरवायलाच हवं. कारण साहेब सेकंदा सेकंदाला आपल्या मनातील निर्णयाला अनेकांच्या माध्यमातून चाचपायचे आणि त्यांना म्हणण्यापेक्षा लोकांना पटणार असेल तोच निर्णय अमलात आणायचे. ताईंच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. मग मुंडे साहेबांचं स्वप्नही तेवढच मोठं आहे. मुंडे साहेबांचे कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे आणि ऊसतोड कामगार हे पाल्य आहेत त्यामुळे तुम्ही माता झालात तेव्हा तुमच्या माथ्याला ताप होणारच. त्या तापाने फणफणायचे कारण नव्हे एवढच सत्य त्रिकाल आहे. आज उभा साहेबांचा अनुयायी तुमच्यात साहेबांना पाहतोय. तसं तुम्ही साहेब व्हायलाच हवं
No comments:
Post a Comment