Friday, 25 August 2017

मुख्यमंत्री अन् दुकानदारी

मुख्यमंत्री अन्


दुकानदारी

गणेश सावंत _9422742810


शिंदळसाल्याचा नाही हा विश्‍वास| बाईल तो त्यास न विसंबे॥दुष्ट बुद्धी चोर करी निरंतर| तो म्हणे इतर लोक तैसे॥तुका म्हणे जया चित्ती जे वासना| तयाची भावना तया परी॥

असाच काहीसा भास बहूदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होतोय. कावीळ झालेल्या माणसाला जसं जग पिवळं दिसतं तसं मुख्यमंत्र्यांना आपल्या कर्तृत्वकर्मातून शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या सुकाणू समितीमध्ये जीवाणू दिसू लागलेत तर सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानलीया नाही बहूमता हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून पत्रकारीता करणार्‍या पत्रकारांमध्ये मुख्यमंत्र्यांना दुकानदारी दिसतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ज्या पदापर्यंत आहेत ते पत्रकारांच्या दुकानदारीमुळेच आहेत हे बहूदा ते विसरले. एकीकडे पत्रकारांना आणि त्यांच्या पत्रकारीतेला दुकानदारी म्हणून हिनवणारे मुख्यमंत्री आणि त्यांचं भाजप किती मोठी दुकानदारी करतायत बहूदा हे त्यांना माहित नसावं. अच्छे दिनची गुहार आणि स्वप्नाळू दुनियेत घेवून जाणारी भाजपाची दुकानदारी अक्षरश: महाराष्ट्रालाच नव्हे देशाला मुर्खात काढणारी हे उघड सत्य लपवून राहिलं नसतांनाही स्वत:ची दुकानदारी झाकण्यासाठी दुसर्‍याकडे जीवाणू आणि दुकानदारी म्हणून बोट करण्याचं धारिष्ट्य जया चित्ती जे वासना| तयाची भावना तया परी॥ हेच दाखवून देणारी म्हणावी लागेल. गल्ली ते दिल्ली अनेक व्यवसायीक आपली दुकानदारी चालवण्यासाठी आपआपल्या वस्तूंची मार्केटींग भलेही वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील परंतू त्या मार्केटींगमध्ये हे व्यवसायीक आपल्या दुकानदारीतून कोठेतरी इमानदारी ठेवतायत तर काही ठिकाणी हे दुकानदारही इमानदारीपासून कोसोदूर असतायत हेही उघड आहे. एखाद्या तिर्थस्थळी तुळशीची माळ मिळतेय म्हणून अवघ्या देशातून त्या तिर्थस्थळी आल्यानंतर लोक तुळशीची माळ घेतात परंतू नफ्याची चटक लागलेले दुकानदार तुळशीची माळ विकण्यापेक्षा अन्य माळ विकातात. हे विकताना तुळशीच्या माळेमध्ये जो मुकूटमणी असतो तो मात्र तुळशीचा ठेवतात आणि ग्राहकाला त्या मण्याला धरून ही शंभरटक्के तुळशीचा मणी आहे असं म्हणत ग्राहकाला विश्‍वास देण्यासाठी अखंड विश्‍वातल्या नव्हे नव्हे तर ब्रम्हांडातल्या देव देवतांची शपथ घेतात आणि आपला माल खपवतात. तेच धोरण भारतीय जनता पार्टीने गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये देशात आणि राज्यात राबवले. जात-पात-धर्म-पंथ आणि भ्रष्टाचाराचा भस्मासूर संपूष्टात आणू असं म्हणणारे भाजपवाले अच्छेदिनचा मुकूटमणी हातात घेवून कसमे-वादे-शपथा घेतात आणि आपली दुकानदारी चालवतात हेही लपवून राहिलं नाही. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मस्तकातली आळी थेट सत्यासाठी कायम झटणार्‍या पत्रकारीतेवर बोलतांना वळवळतेय आणि थेट दुकानदारी म्हणून संबोधतेय तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घ्यावासाच वाटतो.
अच्छे दिनची गुहार लावणार्‍या भाजपाने देशात आणि राज्यात सत्ता मिळवली. अनेक स्वप्न दाखवले. देशातील जनतेला स्वप्नाळू दुनियेत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले. केवळ आणि केवळ भाजपाची दुकानदारी चांगली होती. मार्केटींग चांगली होती एवढ्यामुळेच. कारण भाजपाला आपली दुकानदारी चालवण्यासाठी कसं राहावं लागतं, कसं बोलावं लागतं, कसं चालावं लागतं, हे चांगलं उमजलं. भावनिकतेच्या राजकारणासह लोकांना मुर्ख कसं बनवायचं असतं हे या सरकारला चांगलं ठावूक असल्यामुळेच चिंध्या पांघरून सोनं विकायला बसण्यापेक्षा अच्छे दिनचे स्वप्न पुढे करत स्वत: सोनं पांघरून चिंध्या विकायला बसणारे राज्यकर्ते यशस्वी ठरले आणि बघता बघता सोन्याच्या रूपात बसलेला हा विक्रेता आपल्या चिंध्या असा काही विकत सुटला आणि देशवासिही त्याच्या भुलभूलैय्याला भुलून चिंध्या घेत सुटला की शेवटी या विक्रेत्याला आपण थेट बापालाच मुर्खात काढतोय हेही कळलं नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी काही मोहिनी टाकली आणि त्या मोहिनीच्या मायाजाळात देशवासी असे काही अडकले की त्यातून सुटका करताना आता देशवासियांना नाकी नऊ येतांना दिसून येत आहे. सत्तेत येवून तीन वर्षे उलटले असतांना देशातल्या जनतेच्या मुलभूत प्रश्‍नांना सत्ताधार्‍यांनी सातत्याने बगल दिली मात्र चर्चेत राहण्यासाठी गढे मुर्दे उकरण्याचं काम हे सरकार या तीन वर्षांच्या कालखंडात करत राहिलं. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्‍नाकडून जनतेचं लक्ष जात-पात-धर्म-पंथ आणि भावनीक मुद्यांकडं वळलं गेलं. त्याचीच दुकानदारी किंवा त्याचीच रि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने ओढायला सुरूवात केली परंतू फडणवीसांना माहित असावं हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे राज्य शाहू-फुले-आंबेडकरांचं आहे. इथं जेवढा संयम आहे, तेवढा संताप आहे. जेवढी शांतता आहे, तेवढा आक्रोश आहे. परंतू सत्तेची धुंदी मस्तकात गेल्यानंतर मस्तवाल हत्ती ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवतो किंवा नाकात वारं शिरलेला वळू ज्या पद्धतीने वर शेपूट करून उधळतो, त्या प्रमाणेच देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या मातीत उधळण्याचा प्रयास करत आहेत. आज जरी उधळलेल्या या वळूंना कोणाला रोखता येत नसेल परंतू अशा वळूंच्या नाकात वेसन टाकणारे महाराष्ट्राच्याच मातीत निपजलेत. मस्तावलेल्या हत्तीशी दोन हात करणारेही महाराष्ट्राच्याच मातीत होवून गेलेत हा इतिहास सत्तेच्या धुंदीत बहूदा देवेंद्र फडणवीस विसरले असावेत म्हणूनच फडणवीस सत्य बोलणार्‍यांना आणि लिहिणार्‍यांना हिनवतायत. खरं पाहिलं तर भाजपाने आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून हे धोरण ठेवलं असलं तरी हे फार चिरकाळ टिकेलच हे सांगणे कठीण आहे. आम्ही तर उघडपणे म्हणू गेल्या तीन वर्षांच्याकालखंडात राज्यातील जनतेला मुर्ख बनवण्याशिवाय दुसरा तो उद्योग आणि फडणवीसांच्या भाषेत दुकानदारी या लोकांनी केलीच नाही. खरं पाहिलं तर राज्यातील जनतेने मोठ्या आशा अपेक्षेने या सरकारला निवडून दिले. परंतू सत्तेची उब अशी काही यांच्या अंगात शिरली की वर्षा बंगल्यावर या उबेतून बाहेर पडण्याचं नाव मुख्यमंत्री घेईनात. केवळ शब्दाचे फवारे उडवायचे, लोकांना स्वप्नाळू दुनियेत घेवून जायचे आणि कर्तव्य कर्मात

वांझ ते वांझच

राहायचे. फडणवीसांच्या अशा दिखावूगिरीला तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर
व्याल्याविन करी शोभनतांतडी| चार ते गधडी करितसे॥
कासाया पल्हाळ अनेकाचीदेखी| सांगता नव्हे सुखी साखरेसी॥
कुंथाच्या ढेकरे न देवेल कुस्ती| रुप दावी कष्टी मळीन वरी॥
तुका म्हणे अरे वाचाळा हो ऐका| अनुभवे विन नका वाव घेवू॥
तुकोबा म्हणतात एखादी स्त्री प्रसूत न होता प्रसूतीचा देखावा लोकांना दाखवू लागली अशी ही मुर्ख स्त्री किती चाळे करणार आहे. खर्‍या प्रसूत झालेल्या स्त्रीयांचा सर्व प्रकार पाहून त्या वांझेने बाझ, शेक, शेगडी, सुईनीकडून अंगाला तेल लावणे वगैरे खटाटोप केला तरी त्याचा उपयोग होणार आहे का? साखर गोड आहे हे केवळ सांगण्याने कोणाचं समाधान होणार आहे का? ती खाल्ली तरच तिच्या गोडपणाचा अनुभव येईल. परंतू हा अनुभव देण्यापेक्षा फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजीमध्ये मशगूल असतं. आम्ही हे करून, ते करू, किंवा आम्ही अमूक केलं, तमूक केलं अशा अर्विभावात कर्तव्य कर्मात वांझ असतांना अंगाला सुईनीकडून तेल लावून घेतलं जातं. बाझ आणली जाते, शेक घेतला जातो, शेगडी लावली जातेय आणि आम्हीच विकास कामाच्या बाळाला जन्माला घातल्याचा देखावा या सरकारकडून दाखवला जातोय. हे नक्कीच दुर्दैवं आहे. अशा कर्तव्य कर्मात वांझ असलेल्या राज्यकर्त्यांपेक्षा हे राज्य कर्तव्य कर्मातून उभारी देणार्‍याच्या हाती दिलेलं बरं, असंच आज तरी म्हणावंसं वाटतं. गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील जनतेने ज्या यातना खाल्ल्या, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर जे संकटं आली ते पराकोटीचे आहेत परंतू या संकटातून शेतकर्‍यांची सूटका करण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी जणू आपण संकटाशी युद्ध करतोय हे दाखवत थेट शेतकर्‍यांशी युद्ध केलं, त्या शेतकर्‍यांना नामोहरम करण्याचं पाप या सरकारकडून झालं. जाहिरातबाजीत मार्केटंीगमध्ये आघाडीवर असलेल्या भाजप सरकारने जे बोट पत्रकारांकडे दाखवलं आहे त्या बोटाचे जन्मदातेच हे सरकार आहे. यांना युद्धात आणि तहात जिंकता येतं हे आता उघड उघड होवून बसलंय त्यामुळेच या सरकारचा अहंकार वाढला. म्हणूनच फडणवीस सरकार राज्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या व्यथांना समजून घेत नाही. आज तरी हे

तहात जिंकत

सत्याची आणि कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची अवहेलना करत असले तरी शेतकरी हा राजा आहे. शेतकरी हा बाप आहे. हा शेतकरी याच महाराष्ट्रातला आहे आणि याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आहे. त्यामुळे सत्तेत मशगूल असलेल्या देवेंद्र फडणवीस रुपी रांझेगावच्या पाटलाचा महाराष्ट्रातलाच शेतकरी राजकारणात चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधार्‍यांविरोधात रोष एवढा आहे की भविष्यात हे सत्ताधारी रस्त्यावर निघाले तरी लोक त्यांच्याकडे अत्यंत अवहेलनेने पाहतील. आजपर्यंत राज्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांच्या बाबतीत फडणवीस सरकारने जी भुमिका घेतली ती भुमिका केवळ आणि केवळ त्या सर्वसामान्य लोकांना मुर्खात काढणारी होती. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ आहे हे उघड सत्य नाकारता येणारं नाही. दुष्काळ एवढा आहे की प्रत्येक दिवसाला मराठवाडा, विदर्भात चार शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकर्‍यांना या दुष्काळचक्रातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची आर्थिक विवंचना संपुष्टात आणण्यासाठी कर्जमाफीची मागणी ही शेतकर्‍यांची न्यायीक होती. परंतू या सरकारने शेतकर्‍यांना मुर्खात काढत कर्जमाफीची घोषणा केली खरी परंतू त्यामध्ये एवढ्या काही अटी आणि अडीअडचणी टाकून ठेवल्या, शेतकर्‍यांना अद्याप तरी कर्जमाफी मिळाली नाही. उलट या आंदोलनाचं नेतृत्व करणार्‍या सुकाणू समितीला जीवाणू म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली राजकीय जात दाखवली ती कधी न कधी मुख्यमंत्र्यांना भारी ठरणारी आहे. या सरकारला सत्य बोललेलं चालत नाही, प्रश्‍न विचारलेले आवडत नाहीत, लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात आपण राजकारभार करतोय याचाही बहूदा विसर फडणवीस सरकारला झालाय म्हणूनच फडणवीसांच्या मस्तकातल्या आळ्या अशा वळवळ करतायत. स्वत:ची दुकानदारी थाटलेली असतांना आणि त्या दुकानदारीतून अवघ्या महाराष्ट्राला मुर्खात काढले जात असतांना पत्रकार जर प्रश्‍न विचारत असतील, पत्रकार जर या व्यवस्थेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा व्यवस्थेतलं सत्य बाहेर काढत असतील आणि त्यांच्या पत्रकारीतेला दुकानदारी म्हणून मुख्यमंत्री संबोधीत असतील तर होय सत्याची दुकानदारी ही कायम राहिल आणि राज्यकर्त्यांच्या व्यवस्थेतील खरे स्वरूप जनतेला सातत्याने दाखवून देण्यात येईल हे छातीठोकपणे सांगण्याचं कारणच एवढं, राज्यात आणि देशात नरेंद्रभाई आणि देवेंद्रभाई यांची जी मिसाज चालू आहे ती सत्य बोलणार्‍यांची मुस्कट दाबणारी, खरं बोलणार्‍या आणि खरं लिहिणार्‍या व्यक्तींविरोधात बोलणारे हे सरकार यांच्या मतानुसार देशभक्तही जेव्हा ठरवू लागतात तेव्हा हे सरकार हुकूमशहा मार्गाने दौड करतयं हे उघड होतं.

No comments:

Post a Comment