बाबांनी वैष्णव धर्म वाढवला
आम्ही काय वाढवतोय?
-गणेश सावंत-9422742810
तुकोबा विमानात बसून जावू शकतात तसे ते येवू ही शकतात. मी तर म्हणतो तुकोबा आपल्यातून गेलेच नाही ते इथेच आहेत. मन करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण या दृष्टीने आणि साध्य ते असाध्य या वृत्तीने तुकोबांना शोधलं तर ते नक्कीच तुमच्या आमच्यात सापडतील. काळ कोणताही असो त्याचे नाव वेगळे असेल, रूप वेगळष असेल, कर्तव्य कर्म वेगळे असेल त्यामुळे केवळ त्याच्या नावारूपात न अडकता तुकोबा संत असून काठी हाणतात पण कोणाचे डोके फोडा म्हणत नाहीत. ही काठी शब्दाची, विवेकाची, ज्ञानाची, विचाराची, काम, क्रोध, लोभाचा त्याग करायचा सांगणारी जीच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येतील आणि काम, क्रोध, लोभाला सोबत घेवून झोपलेल्यांना जाग येईल. अधुनिकता म्हणत असाल तर ती काळाशी नाही तर विचाराशी संबंधित असते याचा विचार आता करावाच लागेल. तुकोबानंतर संत पदाला कोणी गेले असेल तर ते माझ्या जिल्ह्यातले, माझे गुरूवर्य अखंड मानव जातीचे उद्धारकर्ते संत भगवान बाबा यांचंच नाव घ्यावं लागेल. बुद्धांकडे पाहिले तर आम्हाला तुकाराम दिसतात. तुकारामांकडे पाहिलं तर आम्हाला आज भगवान बाबा दिसतात. तुकोबांच्या विचारावर भागवत धर्माची पताका फडकवणारे संत बहिणाबाई शिऊरकरानंतर २० व्या शतकातले महान संत भगवान बाबच. बाबांचं कर्तृत्व कर्म, बाबांचा त्याग आणि बाबांची समाजाकडे पहाण्याची दृष्टी तुमच्या आमच्यात आली तर नक्कीच बाबांनी वैष्णव धर्म वाढवलाय आम्ही काय वाढवतोय हा प्रश्नच पडणार नाही. संत भगवान बाबांचं कर्तृत्व कर्म याची देही याची डोळा पाहणारे देह आजही बीड जिल्ह्यातल्या कानाकोपर्यात कुठे ना कुठे श्वास घेतात. त्यांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या ह्रदयातून आणि त्यांच्या नैनातून भगवान बाबा आम्ही जेंव्हा पाहतो तेंव्हा बाबांचं ते सुजवळ रूपडं डोळ्यासमोर येतं त्याचबरोबर त्यांची त्यागी वृत्ती आणि संतत्वाच महान कार्यही डोळ्यासमोर येईल. अलगदपणे निघून जातं. वाटतं बाबा आपल्यात आहेत, अजूबाजुलाच आहेत आणि ते सांगतायत काम, क्रोध, लोभ सोडा मस्सर सोडा आणि मानवता ही जात समजून माणुसकी हा धर्म उमजून कामाला लागला. माणसातलं माणूस पण जागृत करण्याचं कार्य जसं तुकोबांनी केलं तसच कार्य संत भगवान बाबांनी केलं. तुकोबांचा अवडता अभंग बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने निवडायचे तेंव्हाच त्या अभंगाचा मतीत अर्थ उमजायला वेळ लागत नाही. कारण त्या अभंगातच
खेळ आहे.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचति वैष्णव भाई रे ॥
क्रोध अभिमान गेला पाटवनि | एका एका लागती पाई रे ॥
गोपिचंद ओटू तुळशीच्या माळा | हार मिळविती गळा ॥
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव | अनुपम्य सुख सोहळा रे ॥
वर्ण अभिमान विसरलीय याती | एक एका लोटांगणी जाती ॥
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥
होतो जय जयकार गर्जत अंबर | मातले हे वैष्णव वीर रे ॥
विठ्ठलाचं नामस्मरण करत तुकोबांचा जयघोष जेंव्हा होतो तेंव्हा क्रोध, अभिमान पालटून जातो आणि जो तो एकमेकांच्या पायी लागतो. तोच क्रोध अभियान संपुष्टात आणायचाय, स्वत:च मन निर्मळ ठेवायचय, चित्त स्वच्छ ठेवायचय म्हणजे पाषाणाला ही पाझर सुटेल आणि पुन्हा वैष्णवांचा नारा अंबरापर्यंत पोहचेल. माझे वैष्णव वीर जे जे कार करत तेंव्हा मातलेले असतील परंतू हा मातलेला पणा सज्जनांचा असेल, आनंदाचा असेल, उत्सवाचा असेल भगवान बाबा हे कर्तृत्व कर्माचे जेवढे जिवंत मुर्तीमंत उदाहरण होते तेवढेच उद्धारकर्ते आणि समाज मनाचे पुरस्कर्ते ही होते. बीड जिल्ह्यात बाबांचा जन्म व्हावा म्हणजे या जिल्ह्याचे परमभाग्य त्यांचा सहवास लाभावा म्हणजे स्वर्गीयानंद आणि बाबांचं गुरूवत्त्व लाभावं हा सात्विक आनंद. परंतू बाबांच्या आणि तुकोबांच्या कुठल्या विचाराशी तुम्ही आम्ही सुसंगत राहतोय का? भागवत धर्म असेल, वैष्णव धर्म असेल, वारकरी धर्म असेल या तीन नावातल्या धर्मातला माणूस धर्म आज तुम्ही आम्ही जगतोय का? हा जाहीर सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो गेल्या दोन वर्षापासून दुर्दैवाने ज्या भगवानगडावरून माणूस धर्म शिकवला त्या संत भगवानबाबांच्या गडावर सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागत आहे. बाबांनाही हे रूचत नसेल, माझे भक्त हट्टी, अट्टहासी असू शकतात असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. अरे जिथं भगवान बाबांच्या समोर
प्रति (पत्री) सरकार झुकले
तिथं तुमच्या आमच्या सारख्या पामराचे काय? आजच्या तरूणांना प्रति सरकार किंवा पत्री सरकार याची माहिती नसेल, भगवान बाबांचा छळकर्यांनी जेंव्हा छळ मांडला, धुम्या गडावरून बाबांनी जावं म्हणून पराकुटीचे कटकारस्थान केले. तेंव्हा आणि तेंव्हाच या नतदृष्ट छळकर्यांनी बाबांवर पराकुटीचे आरोप केले. बाबा हे इंग्रजांचे आणि निजामांचे हेर आहेत. अशी चुकीची माहिती तेंव्हाचे प्रति सरकार क्रांतीसिंह क्रांतीकारी नाना पाटलांना देण्यात आली. नाना पाटील बीड जिल्ह्यात आले आणि बाबांचा समाचार घेवू म्हणाले. बाबांपर्यंत जावून पोहोचले परंतू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे बीड जिल्ह्यात आल्यानंतर बाबांची देशभक्ती, बाबांच माणूस प्रेम आणि बाबातलं संतत्व नाना पाटलांना दिसलं. क्रांतीसिंह नाना पाटील त्याठिकाणी बाबांच्या चरणी नतमस्तक झाले मात्र छळकर्यांनी आपली नतदृष्ट कटकारीस्थानाची पैदाशी सोडली नाही. बाबा जेंव्हा भगवानगडावर आले तेंव्हा मनामध्ये कुठलेही कटकारस्थान न ठेवता आपलं उदाक्त कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. ज्या बाबांच्या समोर पत्री सरकार झुकले, त्या भगवानगडाच्या समोर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही सरकारला झुकावे लागेल. कारण तुकोबांचा जो जाज्वल इतिहास आहे तोच इतिहास २० व्या शतकात जीवंत ठेवण्याचं कार्य बाबांनी केलं. तुकोबांनी अंधश्रद्धेवर प्रखर कोरडे ओढले. जिथं आम्हाला, लिहिण्याचा, बोलण्याचा, कवित्व करण्याचा अधिकार नव्हता तिथं तुकोबांनी कधीही न भंग पावणारी अभंगगाथा लिहिली. आणि तथाकथित धर्म मार्तंडांना वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा असे ठणकावून सांगितले. तर बाबांनीही आपल्या उपदेशात समाजाला दिशा देणारं कार्य सांगितलं. बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने लोकांना समजतील असे साधे आणि सोपे उपदेश करायचे. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, निती, प्रिती आणि कर्तव्य कर्माच पालन करण्याचं धोरण आखा म्हणून सांगायचे. कर्ज काढून अथवा प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तिर्थ यात्रेला जाणे ही सर्वात मोठी चुक असल्याचेही ते ठणकावून सांगायचे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचं चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी रहा पण कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जावू नका, लाचार बनू नका, हिंसा करू नका, जातीभेद अस्पृश्यता मानू नका असे रोख ठोक समाजाला बजावत समाज उद्धारक कर्मयोगीपणाचे दातृत्व बाबा दाखवून द्यायचे. आम्ही जरी आज बाबांना याची देही याची डोळा पाहिले नसेल परंतू आमच्या आजी-आजोबांच्या नेत्रातून आणि ह्रदयातून जेंव्हा आम्ही बाबांना पाहतो तेंव्हा भगवानगडावर आज वाद विवाद दिसून येतो तो आम्हाला तरी संतापाच्या खाईत घेवून जातो. आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो होय आम्ही तुकोबांचे भक्त आणि भगवानबाबांचे शिष्य, भगवान बाबांना आणि त्यांच्या कार्याला जेंव्हा एकचित्ती आम्ही मस्तकात उतरण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा आजच्या
भगवान गडावरील
वादाबाबत कोण चुकतय आणि कोण चुकवतोय यावर भाष्य ही करावसं वाटत नाही. भगवानगड हे चेतना देणारं भक्तीस्थान आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंना भगवानगडावरून दिल्ली दिसायची हे जेवढं त्रिकाल सत्य आहे तेवढंच भगवानगडावर जाणार्या प्रत्येक भक्तांना आणि बाबांच्या समाधीशी नतमस्तक होणार्या प्रत्येक निर्मळ वृत्तीला भगवानगडावरून स्वत:चं भविष्य दिसत आलं आहे. आणि हे भविष्य माणसाला माणूस म्हणून काटेरी वाटावरूनही संकटे दूर करत मार्गस्थ होण्यास मदत करत आला आहे. आज आम्ही पाहतोय गेल्या दोन वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळाव्यापासून दोन गट पडले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गडावर राजकीय भाषण करण्यास बंदी घातली आहे. आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसह त्यांचे समर्थक गडावर दसरा मेळावा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय, गडाचे समर्थक पंकजा मुंडेंच्या समर्थकांवरल आग पाखड करताय आणि पंकजा मुंडे समर्थक गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींविरूद्ध आग ओकतायत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय की एकमेकांना बदनाम करण्याची कुठलीही संधी आता सोडली जात नाहीय. आमचा या दोन्ही समर्थकांना जाहीर सवाल आहे. कुठय बाबांचा वैष्णव धर्म? कुठय भगवानबाबांचे विचार? कुठय भगवानबाबांची सहष्णूता? केलाय का काम, क्रोध, लोभाचा त्याग? भगवानगडावर जे वैष्णव यायचे ते वैष्णव आहेत का आता? कुठयत वारकरी? कुठयत माळकरी? कुठयत टाळकरी? किती जणांच्या कपाळी गोपीचंद आहे? किती जणांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत? किती जण वर्ण अभिमान विसरेलत? आणि किती जण भगवानगडावर मेळा लागल्यानंतर खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचति वैष्णव भाई रे म्हणत एकमेकांच्या पाई किती लोक लागतायत? विचार करा संघर्षाची चेतना भगवानगड आहे. न्युनगंडतेत अडकलेल्या माणसाला संघर्ष करण्याची क्षमता देणारा भगवानगड आहे. आणि तुमचा आमचा मालक संत भगवानबाबा आहेत. एवढं वाचल्यावर तरी भगवान बाबांना स्मरण करा, आम्हाला जसे गौतम बुद्धात तुकोबा दिसतात तसे तुकोबात भगवानबाबा दिसतात. तुम्हाला खरच सांगा कोण दिसत?
सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 24 सप्टेंबर रविवार अग्रलेख