Monday, 18 September 2017

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 17 सप्टेंबर रविवार अग्रलेख

सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना

‘अच्छे
की लुच्चे दिन’


-गणेश सावंत-9422742810
एवढे तुम्ही षंड कसे, पायाखाली आग तरी थंड कसे या प्रशनावर तरी राग येतोय का? होय आम्हीच विचारतोय हा प्रश्‍न, स्वप्नाळू दुनियेत घेऊन जाणार्‍या सरकारला नाही तर नमो रुग्णांना. काय हालत आहे सध्या देशाची? कुठयत अच्छे दिन? संपली का महागाई? हे रोजचेच प्रश्‍न झाले. अरे इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तरी आहे काय? भाजपाच्या आमदारांना, पदाधिकार्‍यांना आणि मंत्र्यांना प्रश्‍न विचारण्याचाही लाग नाही. यालाच लोकशाही म्हणायचं का? नव्हे नव्हे भाजपाच्या भाषेत रामराज्य म्हणायचं का? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि कुठं नेऊन ठेवलाय हा देश? हा प्रश्‍न सातत्याने का विचारण्यात येऊ नये? परंतु हे प्रश्‍न विचारण्याचे धाडस दाखवणार्‍याच्या मुसक्या बांधण्याचे मनसुबे जेंव्हा आखले जातात तेव्हा गेल्या काही दशकापूर्वी आपल्या लेखणीतून आग ओकणार्‍या कवि अवतार सिंह संधू उर्ङ्ग ‘पाश’ यांच्या या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पाश धगधगत्या निखार्‍यासारखं या कवितेतून बोलतात-
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुठ्ठी सबसे खतरनाक नहीं होती
बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जखड़े जाना बुरा तो है
पर सबसे खतरनाक नहीं होता
सबसे खतरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
सबसे खतरनाक होती है, कलाई पर
चलती घडी, जो वर्षों से स्थिर है|
सबसे खतरनाक होती है वो आंखें
जो सब कुछ देख कर भी पथराई सी है
वो आंखें जो संसार को प्यार से
निहारना भूल गयी है
वो आंखें जो भौतिक संसार के
कोहरे के धुंध में खो गयी हो
जो भूल गयी हो दिखने वाली
वस्तुओं के सामान्य
अर्थ और खो गयी हो व्यर्थ के खेल
के वापसी में
सबसे खतरनाक होता है वो चांद
जो प्रत्येक हत्या के बाद उगता है
सूने हुए आंगन में
जो चुभता भी नहीं आंखों में
गर्म मिर्च के समान
सबसे खतरनाक होता है वो गीत जो
मातमी विलाप के साथ कानों में पडता है
और दुहराता है बुरे आदमी की दस्तक
डरे हुए लोगों के दरवाजेपर
मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे खतरनाक नहीं होती
सबसे खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना

आठवा ते भाषण, डिझेल के भाव कम हुये की नही... पेट्रोल के दाम निचे आये के नही.... अच्छे दिन आये की नही.... लोग कहते है मोदी नसिब लेके आया है.... फिर बोलो तुम्हे नसिबवाला चाहिये या बदनसिब... असं म्हणत ‘कसमे वादे-प्यार-वफा’ची बात करणार्‍या भाजपाच्या नेतृत्वाने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या देशाला स्वप्नाळू दुनियेत नेले. अच्छे दिनची वाट बघता-बघता तिन वर्षे निघून गेले आणि देशवासियांची अक्षरश: वाट लागली. कवि पाश आपल्या कवितांमधून सर्व काही ठिक आहे, पोलिसांची मार अवघड नाही, लूट अवघड नाही, परंतु आमच्या स्वप्नांची राखरांगोळी, सर्वसामान्यांच्या स्वप्नांची हत्या, सर्वात खतरनाक असल्याचे सांगतो आणि तिच हत्या भाजप सरकारकडून आता होताना दिसते. ज्या डिझेल-पेट्रोलच्या बढाया मोदी सरकारकडून मारल्या जात होत्या त्याच मोदी सरकारच्या कालखंडात डिझेल-पेट्रोलचे भाव एवढे काही वाढले की देशवासियांना अक्षरश: 
दिवसा लुटण्याचे धंदे 
भाजपने सुरू केल्याचे उघडपणे दिसून येऊ लागले. विरोधी बाकावर असताना सत्ताधारी कॉंग्रेसला धारेवर धरत भाजप महंगाई डायन खाए जात है...चा नारा देत रस्त्यावर उतरत होती. संसद बंद पाडत होती. विशेष म्हणजे त्या वेळेस क्रुड तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता क्रुड तेलाच्या किमती ५० टक्क्यावर आलेल्या असताना पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. या पापाचे बाप भाजप सरकारच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच नाही हे उघड सत्य नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असताना ज्या पद्धतीने वेगवेगळे टॅक्स लावून सरकार देशातल्या सर्वसामान्य जनतेला लुटतय ते पाहून हे सरकार दरोडेखोरांचं आहे की, एखाद्या पक्षाचं आहे हे सांगणं कठीण होऊन बसलं. २०१३ सालची आकडेवारी पाहितली तर त्यावेळी क्रुड ऑईल ११० डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळेस पेट्रोल ७५ आणि डिझेल ५५ रुपये होते, मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात क्रुड तेलाचं बॅरल ५० डॉलरपेक्षा अधिक झालं नाही तरीही पेट्रोल ८३ रुपयांपर्यंत विकलं जातय. काय म्हणावं या सरकारला? हे सरकार आल्यानंतर आणि क्रुड तेलाचे भाव कमी झाल्यानंतर एक्साईज ड्युटी कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु एक्साईज ड्युटी कमी तर सोडा ती कितीतरी पटीने वाढविण्यात आली आहे. पेट्रोलवर यापूर्वी ६ ते ७ रुपये एक्साईज ड्युटी होती, ती वाढवून या सरकारने २० ते २१ रुपये केली आहे. महाराष्ट्रात तर एक्साईज ड्युटी व्यतिरिक्त एक लिटर पेट्रोल मागे ११ रुपये दुष्काळ कर वसूल केला जातोय आणि १६ टक्के व्हॅट. केेंद्र सरकार २२ रुपये आणि राज्य सरकार २७ रुपये असा एकूण ४९ रुपयांचा टॅक्स जनतेच्या खिशातून वसूल केला जातो तेव्हा हे सरकार लोकांच्या हितासाठी आहे की लोकांच्या खिशावर आणि घरांवर दरोडे टाकण्यासाठी हेच समजायला मार्ग नाही. डिझेलच्या बाबतीतही चार ते पाच रुपयांवरची एक्साईज ड्युटी १२ ते १३ रुपयांवर या सरकारने नेली. महाराष्ट्रात २ रुपयांचा दुष्काळ कर आणि ९ रुपयांचा व्हॅट कर त्यातच पालिका, स्वच्छ भारत सेज यासह अन्य करही यात लावले जात आहेत. आम्हाला आश्‍चर्य याचं वाटतं, एखाद्याने मर्सिडिज गाडी खरेदी केली तर त्यावर ४२ टक्के कर द्यावा लागेल, परंतु गोरगरीबाने एक लिटर पेट्रोल खरेदी केलं तर त्यावर ५५ टक्के कर सध्या द्यावा लागत आहे. मग सांगा हे ‘अच्छे दिन’ आहेत? नव्हे नव्हे हे तर लुच्च्यांचे दिन आहेत! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचा जो भडका उडाला आहे आणि या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य ज्या पद्धतीने होरपळून निघत आहे ती पद्धत प्रचंड जिवघेणी आहे. केंद्र सरकार एकीकडून दोर खेचतय आणि राज्य सरकार एकीकडून दोर खेचतय, मधे सर्वसामान्यांना थेट फाशी दिली जाते. सरकारला नेमकं करायचं काय? इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, धार्मिक दहशतवाद्याच्या बंदुका खांद्यावर लावल्या जातात, इथं सत्य बोलेल, सत्य लिहिल तर त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या जातात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि प्रभू रामांचं नाव घेत 
शिवराज्य आणि रामराज्य 
ची भाषा या सरकारकडून केली जाते ती भाषा निव्वळ लोकांना भावनिक करून मुख्य मुद्यांकडील लक्ष विचलित करण्यासाठी. राज्य सरकार ज्या पद्धतीने पेट्रोलवर ११ रुपयांचा दुष्काळ कर वसूल करत आहे आणि डिझेलवर ५ रुपयांचा दुष्काळ कर लादत आहे, विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालखंडात एकदाही महाराष्ट्रात पूर्णत: दुष्काळ जाहीर केलेला नाही. असे असतानाही कराची रक्कम मात्र प्रचंड प्रमाणात वसूल केली जाते. कुठे जातो हा पैसा? शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही, शिक्षणासाठी पैसा नाही, राज्यातील रस्त्यांची बोंब आहे, लोकांना मुलभूत गरजा दिल्या जात नाहीत, विजेची टंचाई प्रचंड प्रमाणात आहे, भारनियमन वाढलं आहे, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा टाहो फोडून ओरडत आहे. छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांचे व्यापार सरकारच्या तुघलकी कारभारामुळे अक्षरश: आतबट्‌ट्याचे होऊ लागले आहेत. एकीकडे ‘मेकिंग इंडिया’ आणि ‘शाईनिंग इंडिया’ची भाषा केली जाते, सिंहापासून वाघापर्यंतची छप्पन इंचाची छाती दाखवून शिवराज्य आणि रामराज्याची भाषा बोलली जाते, दुसरीकडे मात्र केवळ या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला स्वप्नाळू दुनियेत घेऊन जात त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली जाते. लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणे ही सर्वात खतरनाक गोष्ट आहे हे सत्ताधार्‍यांनी लवकर उमजून घ्यावे.

No comments:

Post a Comment