महाजनादेश यात्रेतलं
महाभारत
रोखठोक - गणेश सावंत -9422742810
रोखठोक - गणेश सावंत
मोठ्या भावाने यात्रा काढल्यावर त्या यात्रेचं स्वागत करणं हे छोट्या भावाचं कर्तव्य म्हणत आ.विनायक मेटेंनी महाजनादेश यात्रेत चिंगारी चेतवून दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरू आहेत, त्यांच्यासाठी अंगठाही कापून द्यायला तयार आहे. परंतू तो अंगठा अर्जुनासाठी असावा असं म्हणत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी आपली नाराजगी दाखवून दिली. महाजनादेश यात्रेने बीड जिल्हा हा कुरूकक्षेत्र बनल्याचे दिसून आले. तिकडे महाजनादेश यात्रेत केवळ आष्टी येथील जाहीर सभा अधिकृत असतांना सुरेश धसांनीही कड्यात ढोल वाजवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. एकूणच बीड जिल्ह्याच्या राजकारणात महाजनादेश यात्रेतलं महाभारत पहावयास मिळालं.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याला राजकीय नाट्य नवे नाही. जेव्हा केव्हा राज्याच्या राजकारणात धरणीकंप होतो तेव्हा त्या धरणीकंपाचे केंद्रस्थान हे बीडच असते. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला, जबाबदार माणसाला बीड जिल्ह्यात आल्यानंतर ताकही फुंकून प्यावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आ.विनायक मेटेंचं स्वागत स्वीकारून युती धर्म पाळला. मात्र लोकसभा निवडणुकीत विनायक मेटेंनी युती धर्म पाळला नाही, याची खदखद राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना कायम राहिली आणि ती सल सातत्याने बोचत गेली. महाभारतामध्ये अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर राहावा, असे गुरु द्रोणाचार्यांना वाटायचे मात्र एकलव्य हा लपूनछपून द्रोणाचार्याची धनुर्विद्या शिकायचा. ज्या वेळी एकलव्य हा अर्जुनाला वरचढ ठरू शकेल हे द्रोणाचार्यांच्यात लक्षात आले तेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला आणि तो एकलव्याने दिलाही. म्हणूनच बीडमध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचा सत्कार स्वीकारत होते तेव्हा पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे या भगिनी खाली यात्रेच्या रथातच बसून राहिल्या. मेटेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये ही थेट भूमिका पंकजा मुंडेंची होती. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी विरोध केला त्यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करूनये ही अपेक्षा पंकजा मुंडेंनी केली. परंतु महाजनादेश यात्रेत कुठंही नियोजन नसतांना, दौर्यात वेळ दिलेला नसताना अचानक काकडहिरा येथे विनायक मेटेंनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार ठेवला आणि मुख्यमंत्रीही तो सत्कार स्वीकारण्यास सज्ज राहिले. जनादेश यात्रेच्या रथावर शिवसंग्रामचे मेटे चढले, भाषण ठोकत मोठ्या भावाने जनादेश यात्रा काढली. त्या यात्रेचं स्वागत करणं छोट्या भावाचं आद्यकर्तव्य असल्याचे सांगत मेटेंनी बीडमध्ये चिंगारी चेतवून दिली. याबाबत मुख्यमंत्री अन्नभिन्न असतील असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण मुंडे-मेटेंचं राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला जेवढं माहित नाही तेवढं फडणवीसांना माहित आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी सत्कार तर स्विकारलाच परंतू त्या सत्काराला उत्तर देतांना भाषणही ठोकलं. ही बाब पंकजा मुंडेंना खटकली आणि त्या नाराज झाल्या. माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये जाहीर सभेचं आयोजन होतं. सभेची वेळ झाली होती. मात्र पंकजा मुंडे सभास्थळी येण्यास नकार देत होत्या. असे उघडपणे बोलले जात होते. त्यांची नाराजगी प्रचंड वाढली होती. तिथे मुख्यमंत्र्यांना जावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या विनवणीवर त्या व्यासपीठावर आल्या, असे म्हणण्यापेक्षा आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांनी विनवणी केली तेव्हा त्या महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेमध्ये डेरेदाखल झाल्या. तोपर्यंत मेटेंचा सत्कार आणि पंकजाताईंची नाराजगी ही उपस्थितांमध्ये जावून पोहचली होती. पंकजा मुडेंचे समर्थक मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराजगी व्यक्त करत होते. महाजनादेश यात्रेसाठी बहुसंख्येने लोक उपस्थित होते, परंतु नाराजी नाट्याने व्यासपीठासह समोरचा पँडॉल अक्षरश: अस्वस्थ झाला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली. मला जेव्हा पत्रकार तुमचे
राजकीय गुरू कोण? असं विचारतात तेव्हा साहजिकच माझे वडील स्व.गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरू आहेत, असे स्पष्टपणे सांगते, त्यानंतर माझे कोणी गुरू असतील तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांना मी अंगठा द्यायला तयार अहे, परंतु तो अंगठा अर्जुनासाठी असावा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मेटेंचा सत्कार स्वीकारला. यावर पंकजा मुंडेंनी मेटे हे अर्जुन नाहीत, हे स्पष्ट करून दिले. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांचा चेहरा हा नक्कीच तणावातला दिसून येत होता. सभा संपल्यानंतर या विषयावर बरच काही चिंतनमंथन झालं असेल परंतु सकाळी जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा पत्रकारांनी याबाबत छेडले तेव्हा लोकसभा निवडणुकीत ज्यांनी विरोध केला ते विरोधी पक्षनेते असोत अथवा घटक पक्षातले नेते असोत त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगून जनता भाजपाच्या आणि पंकजा मुंडेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. मात्र दुसर्या प्रश्नावर ही भाजपाची जनादेश यात्रा आहे आणि यात्रेत घटक पक्षच काय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही महाजनादेश यात्रेचं स्वागत करणार आहेत. तेही आपण स्वीकारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून आपण युती धर्म पाळत असल्याचे दाखवून दिले. मात्र महाजनादेश यात्रेत हा जो बीड जिल्ह्याच्या राजकीय कुरुक्षेत्रावर महाभारताचा रंग चढला, तो बीड पुरताच मर्यादीत होता असे नव्हे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर राज्याच्या राजकारणात ज्यांचा नामोल्लेख धसमुसळे म्हणून केला जातो त्या विधान परिषदेचे आ.सुरेश
धसांनीही ढोल वाजवलेसुरेश धसांचं राजकारण हे प्रबळ इच्छाशक्तीचे मोठे गचकरण आहे. असं त्यांना जवळून ओळखणारे मोठ-मोठे नेते स्पष्टपणे म्हणत असतात. यामध्ये सिरीअस सेन्स किती? आणि विनोद किती हा शोधाचा आणि बोधाचा विषय असू शकतो. परंतू आष्टी, पाटोदा, मतदार संघामध्ये सुरेश धसांची पकड ही मजबूत आहे. तळागळातल्या माणसापर्यंत हा माणूस रांगडा म्हणून जात आला आहे. राष्ट्रवादी सोडून जेंव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये धसांनी प्रवेश केला तेंव्हा एका म्यानात दोन तलवारी बसणार कशा? हा प्रश्न अवघ्या जिल्ह्याला पडला होता. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी आता तलवार नाही तर हातात धनुष्यबाण ठेवून पाठीवर भाता ठेवला आहे. त्यात अनेक बाण अस्त्र रूपाने राहू शकतात असे म्हटले होते. मात्र त्यानंतर धोंडे-धसांची अंतर्गत धुसपूस ही सवतीच्या भांडणासारखी राहत गेली. आणि सवतासुभा हे दोघेही करत राहिले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेत हा सवतासुभा दिसायचा नाही असे वाटले होते. परंतू नियोजीत आष्टी येथील सभेपेक्षा सुरेश धसांना कडा येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावासा वाटला. तसं नियोजनही केले. परंतू मुख्यमंत्री तालुक्याच्या प्रवेशद्वारावर येताच कडा येथे जबरदस्त मिरवणूक धसांनी तर काढलीच उलट त्या मिरवणूकीमध्ये धसांनी मनसोक्त ढोल वाजवले. ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हा ढोल जरी वाजत असला तरी येणार्या विधानसभा निवडणूकीत हा ढोल कोणासाठी बडवला जाईल हे सांगणे आतमित्तीला कठीण कारण, यात्रेत नियोजन नसतांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. आणि ही सभा भाजपाचे विद्यमान आमदार भिमराव धोंडे यांच्यापेक्षा मोठी राहिली. त्यामुळे महाभारताचा अध्याय आष्टीतच सुरू झाला. बीडच्या राजकीय महाभारतात जिल्ह्याच्या कुरूक्षेत्रावर जे नाट्य घडले. जो रंगारंग कार्यक्रम झाला या रंगात मुंडे-फडणवीसांना तोटा की नफा हा नंतरचा प्रश्न असला तरी फडणवीस-मुंडेंमधला अंतरमनातल्या मळभाला वाव देणारा आणि त्या आशयाने जिल्ह्यात चर्चा घडवून आणणारा नक्कीच ठरेल. देवेंद्र हे एकाधिकारशाहीचे पुजक अन्
ईलेक्शन मुव्हमेंट वर राहणारे सक्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ताच म्हणावे लागतील. देवेंद्र फडणवीस यांची ही यात्रा साधीसुधी नाही, यात्रेतला दुसरा टप्पा ज्यांनी कोणी याची देही याची डोळा पाहितला त्यांना या यात्रेतली ताकत दिसून येईल. २०१४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हे दुसर्या वा तिसर्या फळीतले नेते होते. परंतु २०१४ मध्ये मोदी-शहा या जोडगोळीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या गळ्यात माळ टाकल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले कतृत्व-कर्म दाखवून देत आले आहेत. दुसर्या टप्प्यामध्ये थेट महाराष्ट्रातील जनतेसमोर जाताना शेतकर्यांच्या आत्महत्या, सांगली-कोल्हापूरचा महापूर, शिक्षकांचे उपोषण, मराठवाड्यातला दुष्काळ, देशात आणि राज्यात आलेली मंदी, बेरोजगारांचा वाढता आलेख यासह अंगावर येण्यासारखे अनेक विषयांचे वेताळ घुमत असता मुख्यमंत्री तेवढ्याच ताकतीने महाराष्ट्राची यात्रा करताता. याचाच अर्थ मुख्यमंत्री नायक या भूमिकेत लढण्याची इच्छा व्यक्त करतात अथवा देवेंद्र बाहुबली सारखी भूमिका बजावतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकिर्द म्हणावी तशी लढवय्ये नसली तरी फडणवीसांच्या विचारपीठावर आरएसएसचे अधिराज्य असल्याने आणि नरेंद्र मोदींसारख्या हिटलरशाहीचे मार्गदर्शन असल्याने देवेंद्र हे महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावर स्वत:च श्रीकृष्ण अन् अर्जुन होऊ पाहत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे मोदींची एकाधिकारशाही आणि अमित शहांच्या इलेक्शन मोडवरचे एक अजब रसायन म्हणावे लागेल. कारण फडणवीसांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जे काही आंदोलने झाली, जो काही संघर्ष झाला त्या सर्वांना हा माणूस पुरुन उरला. अशा स्थितीत बीडमधलं राजकीय महाभारत हे फडणवीसांसाठी नवखं नक्कीच नाही. तसं पंकजा मुंडेंसाठीही विरोधकांसह स्वपक्षांना आव्हान देणं किंवा अंगठा हा अर्जुनासाठी असावा, असं ठणकावून सांगणं हे जरी अतिताईपणाचं असलं तरी बीड जिल्ह्यातली ताकत आणि स्व. गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद हा पंकजा मुंडेंच्या पाठिशी असल्याने कोणाला द्रोणाचार्य आणि कोणाला झारीतला शुक्राचार्य संबोधणे हे पंकजा मुंडेंसाठीही नवं नाही परंतु ती ताकत, तो संघर्ष फडणवीस-मुंडेंनी एकमेकांना दाखवणं हे त्यांच्याच भविष्यातील राजकारणासाठी भलं नाही, कुठच महाभारत हे चांगलं नसतं कारण एक धर्मासाठी तर दुसरं सत्तेसाठी ते असतं.
No comments:
Post a Comment