Sunday, 29 January 2017

। सिद्धंति ममगात्राणि मुखचं प्रशिष्यती ।

कोण कौरव, कोण पांडव?

महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र

-गणेश सावंत

       ज्या माणसांना शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय हे कळून चुकतं तो माणूस सोनं पांघरुण बाजारात चिंध्याही विकू शकतो. याचा अनुभव सध्या अवघ्या देशाला आला. कारण अशाच चिंध्या विकण्याचा धंदा महाराष्ट्रामध्ये तेजीत आलाय तो अच्छे दिनचे स्वप्न दाखवून. अच्छे दिन नेमके कशाला म्हणायचे ? याचं उत्तर जरी कुणाला देता येत नसलं तरी स्वप्नातल्या दुनियेत हरपणार्‍यांना अच्छे दिनचे बिस्कुट घोड्याने सरळ चालावे म्हणून टांग्याला समोर हिरवा चारा ज्याप्रमाणे लावतात त्याप्रमाणे ‘परिवर्तन तर होणारच, हा चारा भाजपाने महाराष्ट्राच्या टांग्याला लावला,’ परंतु अचानक म्हणा किंवा हुकुमशाही वृत्तीतून म्हणा भाजपाने शिवसेनेशी गेल्या दीड दोन वर्षापासून जी काही वर्तवणूक चालवली त्याचा अंत अखेर उद्धव ठाकरेंनी परवा करून 25 वर्षांचा घरोबा मोडीत काढला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला रणांगणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रित आले हे जेवढे उघड सत्य तेवढेच भाजप हे महाराष्ट्रात ब्यालासुद्धा गेल्या 25 वर्षांपूर्वी पहायला मिळत नव्हती ती केवळ शिवसेनेमुळेच मोठी झाली आणि केंद्रातील सत्ता केंद्राचा वटवृक्ष म्हणून ती महाराष्ट्रात राक्षसीवृत्ती आणि हावरेपणाची भूमिका बजावू लागली. आज भाजपाची स्थिती हम करे सो... आणि हुकुमशाही पद्धतीची उघडपणे पहावयाला मिळते. युती तुटण्याचे किंवा युती तोडण्याचे दु:ख कोणाला असेल नसेल परंतु युती तोडण्यास प्रवृत्त करणारी भाजपाची वृत्ती तेवढी पॉझिटिव्ह आहे असे म्हणता येणार नाही उलट ही वृत्ती एकप्रकारची विषवल्लीच. भाजपाने एवढे तरी लक्षात ठेवायला हवे होते, ज्या पक्षाकडे सेठजी-भटजीचा पक्ष म्हणून पाहितलं जात होतं त्या पक्षाला अखंड बहुजनाचं स्वरुप देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या नेत्यांनी केलं. स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन हे ज्या पद्धतीने भाजप चालवायचे ती पद्धत सत्ता केंद्राबरोबर समाजकारण आधारभूत होती. आजची भाजपाची पद्धत देवेंद्र ते सत्तेंद्र, नरेंद्र ते सत्तेंद्र एवढीच पहावयास मिळते. ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. तसं पाहिलं तर शिवसेनेची अन् भाजपाची कधी युती नव्हतीच असंही म्हणता येईल. परंतु शिवसेना ज्या उर्मिने महाराष्ट्रात फोपावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला महाराष्ट्रात जो आयाम दिला तो दखलपात्र म्हणावा लागेल. शिवसेनेचा सुरुवातीचा


इतिहास 

पाहितला तर शिवसेना कधी प्रजा समाजवादी पक्ष तर कधी कॉंग्रेस असा सोयीप्रमाणे राजकीय घरोबा करत प्रामुख्याने मुंबईत राजकीय वाटचाल सुरू करणारी संघटना म्हणून पाहितलं जाई. या प्रवासात शिवसेनेची नाळ खर्‍या अर्थाने तेंव्हा जनसंघाशी जुळली आणि नंतर भाजपाशी. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक, मनोहर जोशी भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढले पण त्यावेळी या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. इ.स. 1985 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून भाजप शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलात सामील झाली तेव्हा भाजपाला खास ठाकरे शैलीत बाळासाहेबांनी चांगले टोलेही लगावले होते. एकमेकांपासून दूर गेलेल्या सेना-भाजपाला भविष्यात एकत्रित आणलं ते हिंदुत्वाने. देशामध्ये हिंदुत्वाचे वारे वाहत असताना राज्यभरात विस्तारत असलेली शिवसेना आपल्या साथीला हवी याची जाणीव जेव्हा भाजपाच्या धुरंधरांना झाली तेंव्हा शिवसेना आपला मोठा भाऊ म्हणून भाजप त्यांच्यासोबत गेली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांचा तो ऐन भरातला काळ होता. प्रमोद महाजनांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज शिवसेनाप्रमुखांना पटवून दिली आणि 1989 मध्ये भाजप-सेना युती साकारली. या युतीचे मुख्य शिलेदार होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन. त्यानंतरचा इतिहास बहुदा आजकालच्या सर्वच अबालवृद्धांना माहित असावा. 25 वर्षांचा कालखंड हा मोठा कालखंड मानला जातो. स्व. महाजन आणि मुंडे जोपर्यंत होते तोपर्यंत युतीमध्ये सर्वकाही अलबेल होते. परंतु त्यानंतर मात्र भाजपाची सत्ता लालच वाढली, सत्तेचं रगात तोंडाला लागल्यागत एखादा हिंस्त्र पशू ज्या पद्धतीने आपल्या सावजावर झडप घालण्यासाठी काहीही करतोत ती पद्धत भाजपाने अवलंबवायला सुरुवात केली आणि यावर्षी तर महाराष्ट्रात 

महाभारत 

पहावयास मिळू लागलं. भाजपाची राजकीय इच्छाशक्ती ही हिटलरच्या इच्छाशक्तीपेक्षा अधिक राजकीय कामांध असावी, असा कयास काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. म्हणूनच देशातल्या राज्या-राज्यामध्ये असलेले प्रादेशीक पक्ष समुळ नष्ट करणे आणि शत-प्रतिशत भाजपच्या नार्‍याला अधिक बळ देणे ही जी हावरी भूमिका भाजपाची दिसून येते ती भाजपाला परवडणारी किंवा आसुरी आनंद देणारी असू शकते परंतु या आसुरी आनंदाचा थोडासाही फायदा देशातील जनतेला विकासाच्या दृष्टीने होईल, असं तसूभरही वाटत नाही. उलट शिवसेनेने युती तोडल्यानंतर आम्ही किती स्वच्छ आहोत आणि आम्हीच पांडव आहोत. श्रीकृष्ण आमच्याच बाजुने आहे, शिवसेना ही साक्षात कौरव आहे. शिवसेनेमध्ये शकुनी मामा आहेत, दुर्योधन, दुश्शासन आहे हा दाखवण्याचा प्रयत्न काल झाला, एवढ्यावरही मुख्यमंत्री थांबले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत घेत फडणवीसांनी पाणी पाजण्याची भाषा केली. परंतु पाणी पाजण्याची भाषा करतेवेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुन जेव्हा लढायला जातो तेव्हा आप्तस्वईक समोर पाहून अर्जुनाची । सिद्धंति ममगात्राणि मुखचं प्रशिष्यती । तशी स्थिती मुख्यमंत्र्यांची झाली आणि त्यांचा आवाज बसला आणि भाषण थांबवावा लागला. एकूणच भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेसोबत आपली हावरी भूमिका दाखवत चाललाय त्याचा फायदा शिवसेनेलाच होत चाललाय. शिवसेना आज केविलवाणी आहे असे लोक म्हणतात आणि भाजप हे मस्तवाल आणि सत्तेच्या मदमस्तीतले हावरे आहेत हे लोकांचे म्हणणे आहे. सेना-भाजपाची युती रहावीच असं आमचं म्हणण्याचं कारणच नाही. परंतु ज्या पद्धतीने भाजपाने शिवसेनेला ट्रीट केलं आणि प्रादेशिक पक्ष समुळ नष्ट करण्याचे धोरण जे आखलं ते लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात लोकशाहीच गळचेपी आहे हेही तेवढच खरं. आज भाजप महाराष्ट्राला कुरुक्षेत्र करू पहायतोय. साम-दाम-दंडाच्या भूमिकेत निवडणुका लढतय. लोकांच्या मुलभूत गरजा काय आहे यापेक्षा पक्षाला सत्तेची गरज कशी आहे याचा जो सिद्धांत मांडतायत तो सिद्धांत कुठल्याच राज्याला आणि राज्यातील रयतेला यशोशिखरावर नेणारा नक्कीच नाही. परिवर्तन तर नाहीच नाही उलट परिवर्तनाच्या नावाखाली वरुण कीर्तन आतून तमाशा हेच धोरण भाजपाचं आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, पोटात एक आणि ओठात एक ही जी भाजपाची खेळी आहे ती खेळी महाराष्ट्र उमजून चुकलाय. त्याचबरोबर भाजपाच्या सत्तेतील मंत्र्यांची, आमदारांची भूमिका जी आहे ती हुकुमशाही आणि एक व्यक्तीकेंद्रित सत्ता हे महाराष्ट्राच्या स्वराज्याला कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे आता भाजप जरी शिवसेनेला कौरव म्हणत असलं तरी कोण कौरव, कोण पांडव, कोण अर्जून, कोण दुर्योधन? हे लोक उघडपणे महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावर लवकरच सांगतील.

Sunday, 15 January 2017

साय दै बीड रिपोर्टर मधील रविवार अग्रलेख


गांधींची अहिंसा अन् मौत के सौदागर 


- गणेश सावंत - ९४२२७४२८१०



अग्रलेखाचं शिर्षक वाचून अनेकांची मने प्रतिक्रिया द्यायला उचंबळली असतील. परंतु पूर्ण अग्रलेख वाचा मग उचंबळलेल्या मनांना प्रतिक्रिया द्यायला सांगा. शेकडो वर्षे पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले ? असा प्रश्‍न जर कोणी विचारलाच तर आम्ही मोठ्या अभिमानाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेऊ. त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले अर्थात नंतर महात्मा गांधींचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्या अहिंसेलाही वंदन करावं लागेल. कारण महात्मा गांधींची अहिंसा ही वीरांची अहिंसा होती हेही विसरून चालणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस हे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेचे सरसैनानी झाले. डावा हात मृत्यूच्या खांद्यावर टाकून उजव्या हाताने लढत त्यांनी ब्रिटिशांचा ठिकठिकाणी पराभव केला पण दुर्दैवाने स्वातंत्र्यासाठी आणखी फक्त एक धक्का हवा असतानाच ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या महान पराक्रमामुळे हिंदी सैनिकात व पोलिस दलात स्वातंत्र्याची आकांक्षा उसळली, राजनिष्ठा संपली आणि ब्रिटिशांच्या राज्याचा पाया ढासळला. त्यानंतर गांधींचे सत्याग्रह सर्वश्रूत आहेत. हे सांगण्याचं एवढच कारण, आता जे सरकार आहे, जे राज्यकर्ते आहेत ते भोगविलासी आणि प्रसिद्धीस लालसी अशा प्रतिमेचे आहेत. हे सांगायला कुठल्याही भविष्यकाराची गरज नाही. आपण काय करतोय, आपण कुठणं प्रसिद्धी मिळवतोय याचंही भान राज्यकर्त्यांना बहुदा नसावं म्हणून ज्या गांधींनी स्वातंत्र्याबरोबर ग्रामीण भागांमध्ये खेडुतांना आणि गोरगरिबांना काम-धंदा लावण्याच्या उद्देशाने सूत काटायला लावले, सुताचे वस्त्र परिधान करायला लावले त्या खादी ग्राम उद्योगाला त्याकाळी भरभराटी दिली. त्या कॅलेंडरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो तोही गांधींसारखाच परंतु सुटा-बुटात आणि जॅकेटात सूत काटतानाचा पहावयास मिळाला. नक्कीच गांधींचा फोटो हटवून मोदींचा फोटो त्याठिकाणी प्रकाशीत केल्याने प्रसिद्धीचा हवरापणा यातून थेट उघड होतो. जे गांधी स्वत:चं शरीर झाकण्यापुरते कपडे वापरायचे आणि सुताला महत्त्व द्यायचे त्याच गांधींच्या देशात देशाचे पंतप्रधान फोटो काढण्यासाठी सुटाला महत्त्व देतात तेंव्हा कॅलेंडरवरून गांधींचा फोटो फाटणे हे विशेष, असं त्यांच्या दृष्टीने तरी काहीच नसेल. कारण सध्या देशाला 

मोदी नावाचं गारुड

ने भारावून सोडलं आहे. देशाच्या लोक माणसावर मोदी नावाचं गारुड अक्षरश: स्वार झाला आहे. भारतीय लोक माणसात असं गारुड यापूर्वी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या रुपाने पहायला मिळालं होतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, लोकनायक जयप्रकाश नारायण, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि आता आताचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गारुड चांगलच दिसून आलेलं आहे. परंतु या सर्व नेत्यांना त्यासाठी त्यांच्या आयुष्यातले अनमोल वर्ष खर्च करावे लागले आहेत. मात्र मोदींना तेवढे वर्ष खर्च करण्याची गरज पडलेली नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मोदींनी राजकारणामध्ये आपले तिन दशके खर्च पाडले हे नक्की परंतु या तीन दशकातल्या पहिल्या दीड दशकामध्ये मोदी देशभरात नव्हे तर जगभरामध्ये मौत के सौदागर म्हणून परिचीत झाले होते. नरेंद्र मोदींकडे देशातली मीडिया आणि विरोधक अक्षरश: खुनी दरिंदा म्हणून पहात होते. अशा स्थितीमध्ये हा माणूस चहाच्या केटलीपासून पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत जाईल हे सांगणे कठीण होते. परंतु मोदींचा आत्मविश्‍वास आणि राजकीय इच्छाशक्ती इतकी बलदंड होती की पक्षातील अंतर्गत विरोधाला न जुमानता मुख्य माळेच्या मुगुटमण्याला आपला धनी माणून मोदींनी स्वत:च त्या माळेचा मुगुटमणी होण्याचा मान मिळवला. ‘मौत का सौदागर’ ही नकारात्मक उपाधी पाठीमागे असताना मोदींनी आपलं लक्ष गाठलं हे नक्कीच दखलपात्र परंतु त्यानंतर मोदींना जो भास होऊ लागला ‘हम करे सो कायदा’ असं जेंव्हा वाटू लागलं आणि मोदी..मोदी... नावाचा गजर कानात जेंव्हा घुमू लागला तेंव्हा मोदींना आम्ही आहोत तर देश आहे, असा बहुदा भास होऊ लागला आणि त्या भासातूनच उलटसुलट निर्णयाबरोबर आपण कोणाची जागा घेतोय याचाही त्यांना विसर पडत गेला. कॉंग्रेसमुक्त देश करण्याची त्यांची मनिषा हा राजकीय भाग असू शकतो, राजकारणातील डावपेच असू शकतात. परंतु या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखे झिजवले, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले त्या लोकांची अवहेलना करणे आणि त्यांच्या नावाचा वापर करत सत्ता मिळवणे हे जरी देशातील आजच्या मोदी.. मोदी.. करणार्‍या नमो रुग्णांना पटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वामी विवेकानंद आणि शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत संत नामदेवांपासून जगद्गुरू संत तुकोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रभावीत असलेल्या देशवासियांना हे पटेलच हे सांगणे कठीण आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, देशाची विकासाची धुरा त्यांच्या हातात आहे. त्या धुरेला सांभाळण्यापेक्षा जर देशभरात केवळ सत्ता आपलीच असेल आणि हिटलरसारखा हुकुम आपलाच चालेल असं जर मोदींना वाटत असेल तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात हे सर्वकाळ टिकेलच हे सांगणे कठीण आहे. राहिला प्रश्‍न गांधींची जागा घेण्याचा, आम्ही तर नेहमी म्हणतो, 

‘नंगा फकीर’

हा माणूस जेवढा सिधासाधा तेवढाच नुसत्या अहिंसेच्या ताकतीवर पांढरतोंड्या इंग्रजांना पळताभुई थोडी करणारा विरांच्या अहिंसेचा पुजारी म्हणून गांधींकडे आजही पाहितलं जातं. आम्हाला आश्‍चर्य वाटतं, येसू ख्रिस्त म्हणायचे, एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा, परंतु ही बिरुदावली गांधींच्या नावावर हिंदू महासभेने म्हणा अथवा गांधींना नापसंत करणार्‍या गोडसेंच्या पिलावळींनी खपवली. गांधींची भूमिका थेट होती, गांधींना स्वातंत्र्य हवं होतं. इथली जनता सुखी आणि समाधानी असावी ही त्यांची भूमिका होती. खेड्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांना अन्न-वस्त्र-निवारा आणि शिक्षण मिळावं असंही त्यांना वाटत होतं. सूत काटणं आणि एका पंचावर शरीर झाकणं याला गांधी म्हणत नाहीत, हे पुन्हा-पुन्हा सांगावसं वाटतं. जेंव्हा कोलकातामध्ये हिंदू-मुस्लिमांची दंगल उसळली, कापाकापी सुरू झाली तेंव्हा महात्मा गांधींनी स्वत: कुठलेही पोलिस प्रोटेक्शन न घेता प्रक्षुब्ध जमाव शांत करण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा केली. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत दंगल उसळली. हिंदू-मुस्लिम एकमेकांवर धावून येत होते, कापाकापी सुरू होती अशा वेळी ती दंगल थांबविण्यासाठी मोरारजी देसाईंनी त्याठिकाणी जायला हवं होतं, ते गेले नाहीत त्यामुळे गांधी मोरारजींना म्हणाले, दंगल थांबवण्यासाठी तू त्याठिकाणी का गेला नाहीस? मोरारजी म्हणाले, त्यांनी मला मारलं असतं तर तेंव्हा गांधी म्हणाले, प्रक्षुब्ध जमावाला शांत करताना त्यांनी तुझ्यावर हल्ला केला असता आणि त्यामध्ये तू मेला असतास तर मला तुझा अधिक अभिमान वाटला असता. अहिंसा ही आत्मिक आहे, स्वत:पासून स्वत:च्या विचारापासून आणि स्वत:च्या अंत:करणापासून माणूस जेंव्हा अहिंसक होतो तेंव्हाच त्याच्या हातून सत्कार्य घडतात हा साधं आणि सोपं समिकरण आहे परंतु गांधीनंतर राजकारणाच्या सारीपाटावर आत्मिक अहिंसेचा नेता किंवा नंगा फकीर कोणी झाल्याचे दिसून येत नाही. ज्याच्या माथी मौत का सौदागरचा तिलक आहे त्याच्या हाती सूत काटले तर तो अहिंसेचा पुजारी अथवा नंगा फकीर होईल का ? खादी ग्राम उद्योग हा ग्रामोद्योग व्हावा, ग्रामीण जनतेला त्याचा फायदा व्हावा या संकल्पनेतून महात्मा गांधींनी खादी ग्रामोद्योग आणि शेळीपालन याला तेव्हा महत्व दिलं होतं. परंतु त्यानंतर या उद्योगाला भरभराटी देण्याचं काम शक्य तो कोणी केलं नाही. महात्मा गांधींचा सूत काटतानाचा फोटो देशातल्या प्रत्येक नागिरकाला माहित आहे त्यामुळे खादी परिचीत आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज मितीला खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरील फोटोत महात्मा गांधींची प्रतिमा गायब होऊन त्याठिकाणी सुटाबुटातला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूत काटतानाचा फोटो आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी क्षुद्र नाहीत, त्यांचा फोटोही खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर असायला हवा, हेही आम्ही मानायला तयार आहोत, परंतु गांधींची जी भूमिका खादी ग्रामोद्योगाबाबत होती ती भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे का? जर असेल तर या दोन वर्षांच्या कालखंडात देशात खादी ग्रामद्योगाबाबत ग्रामीण भागात कुठल्या उपाययोजना केल्या? कुठले उद्बोधन केले? ग्रामीण भागातल्या लोकांना उद्योग धंद्यांसाठी काय दिले? उद्योग धंदे वाढविण्यासाठी महात्मा गांधी शेळी पालनाचं महत्त्व पटवून देत होते आणि धंदेही वाढवत होते. मग पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील आणि वाडी-वस्ती-तांड्यांवरील लोकांसाठी असे काही उद्योग धंदे उभारले आहेत का? या सर्व प्रश्‍नांचं उत्तर नाहीच येईल. कारण 21 व्या शतकातले हे पंतप्रधान मेड इन इंडिया, कॅशलेस या सर्व हायफाय आणि वायफायसारख्या योजनांमध्ये गुंतलेले आहेत.

          आम्हालाही माहिती तंत्रज्ञानाच्या युगासोबत पुढं जायचय परंतु केवळ नाव लिहिता येणारे असे देशात 67 टक्के लोक साक्षर आहेत. मग या 67 टक्के लोकांना जर आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगातले पीएच. डी. करणारे समजत असू तर धन्य तुमच्या विचारांना. गांधींची जागा घेण्यासाठी अगोदर गांधींचे विचार आत्मसात करणे आणि त्यांच्या पावलावर चालणे महत्वाचे आहे. परंतु आचार-विचारावर लक्ष न देता गांधींना जवळ केलं म्हणजे कॉंग्रेस लंगडी होईल, गांधींच्या ठिकाणी त्यांच्यासारखाच फोटो टाकला म्हणजे आपणास पुजतील असं जर वाटत असेल आणि शिवाजी महाराजांना जवळ घेतलं तर मराठे जवळ येतील, आंबेडकरांना जवळ घेतलं तर त्यांचे अनुयायी जवळ येतील, फुलेंना जवळ घेतलं तर त्यांचे अनुयायी आपल्याजवळ येतील, आणि असे एक-एक महापुरुष आपल्याजवळ घेत देशात एककलमी मोदी हुकुम चालेल, असं जर वाटत असेल तर गांधींच्या हातातल्या काठीकडेही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीकडे व बाबासाहेबांच्या हातात असलेल्या संविधानाकडे अशा लोकांचंं लक्ष जाणं त्यांच्यासाठीच गरजेचं आहे.

Thursday, 12 January 2017



‘जिजाऊ मॉ साहेब

-गणेश सावंत _9422742810 


जिथं कष्ट उपसले, मान पेरला तरी अपमानच उगवायचा. सूर्य उगवला काय आणि मावळला काय माणसाची जिंदगानी गुलामीतच जायची. आजच्या छप्पन इंच छातीपेक्षा निधड्या छात्या असूनही तेंव्हा नसल्यागत होत्या. शिवशिवते मनगट, पराचक्रकर्त्यांना मुजरा घालायचे. या महाराष्ट्राच्या मातीत धडाने माणसं असायची मात्र मनाने मुरदाड आणि निसत्व होती. पारतंत्र्य आणि गुलामीबद्दल कोणालाही तिटकारा येत नव्हता की राग-संताप होत नव्हता. स्वातंत्र्य गमावल्याबाबत खेद नव्हता की पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडून ठेवल्याचा अपमानही वाटत नव्हता. सह्याद्रीच्या कुषीत जन्मलेल्या भूमिपुत्रांना मुस्टकदाबी सहन करावी लागत होती. आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देता-देता रयत पिचली जात होती. हा अन्याय हा अत्याचार म्हणजे आपल्या नशिबाचे फळ म्हणत जो तो नशिबाला कोसत होता. आजचं मरण उद्यावर ढकलत होता. मर्दासारखे मर्द म्हणणारे मराठी मुलुखाचे लोक अक्षरश: गुलाम झाले होते. तर पारतंत्री राजवट आपला हैवानी खेळ खेळून दहशत माजवत होती. अशावेळी कोणीतरी या अन्यायी पातशाहीविरुद्ध आवाज उठवावा, स्वातंत्र्याचे स्वप्न पहावे, लेकी-बाळीच्या अब्रूचा रखवालदार म्हणून एखादा नर पुरुष जन्माला घालावा असं प्रत्येकाला वाटायचं मात्र प्रत्यक्षात असं स्वप्न बघण्याचं धाडसही कोणी करत नव्हतं. परंतु हे धाडस केलं, हे स्वप्न पाहितलं ते सर्वप्रथम जिजाऊ मॉ साहेबांनी. मराठी मुलुखात असलेल्या या प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी जिजाऊंनी स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला आणि आपल्या उदरातून शिवरायांना जन्म देऊन तो अमलातही आणला. जिजाऊ मॉ साहेबांचा स्वराज्य विचार ही मराठी मुलुखात नव्या युगाची नांदीच होती. एकीकडे चार पातशाहीचा दहशतवाद होता तर दुसरीकडे मनुवाद्यांनी स्त्रियांना गुलामीचं जिनं बहाल केलं होतं. मसल पॉवरची जेवढी दहशत होती तेवढीच धार्मिक दहशतवाद्याचीही दहशत होती. सर्वसामान्यातील सर्वसामान्य असलेला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा वर्ग सनातन्यांनी दैववादी बनवून टाकला होता. माणसा-माणसामध्ये जाती-जातीच्या उंच-उंच भिंती उभ्या केल्या होत्या आणि समाज एकप्रकारे बलहीन, सत्वहिन, अस्वाभिमानी आणि तेजोहिन बनला होता. या परिस्थितीत जिजाऊ मॉ साहेबांनी प्रयत्नवादाची कास धरली. रयतेतला स्वाभिमान जागा केला. गमावलेल्या सत्वाला फुंकार घातली. त्यांच्यातले क्षत्रियत्व जागे केले. हे करण्यासाठी जिजाऊ मॉ साहेबांनी मसल पॉवरचा दहशतवाद संपवण्यापेक्षा सर्वप्रथम धार्मिक दहशतवादाचा नित्पात करण्याचे ठरवले अन् ती सुरुवात चारचौघांमध्ये सर्वप्रथम पुणे परगण्यातून केली.
एकाने धार्मिक दहशतवाद फैलवायचा
अन् दुसर्‍याने त्याची रि ओढून तो टिकवायचा
असा संतप्त प्रतिप्रश्‍न तेंव्हाच्या पंडितांना जेंव्हा उघडपणे केला तो काळ शहाजीराजे भोसलेंचा होता. शहाजीराजे भोसलेंकडे पुणे, सुपे, इंदोर, बारा मावळची जहागिरी होती. तेंव्हा शहाजीराजेंनी निजामांना विरोध केला. आदिलशाहलाही दणका दिला. संतापलेल्या आदिलशहाने मुरार जगदेव पंडित या ब्राह्मण सरदाराला शहाजीराजेंच्या पुणे परगण्यावर आक्रमण करायला लावले. मुरार जगदेवने साक्षात यम बनून या भागात दिसेल त्याला कापायला सुरुवात केली, जाळपोळ केली. शेतं जाळली, लुटालूट केली. मुरार जगदेवच्या या आक्रमणाने या भागातील लोक परागंदा झाले. पुणे परगणा ओसाड पडली. एवढ्यावरही मुरार जगदेव थांबला नाही. पुणे परगण्याच्या उजाड शहरावर उभी पहार ठोकली आणि त्या पहारीला फाटकी वहान (चप्पल) लटकवली. याचा धार्मिक शास्त्रानुसार अर्थ जो कोणी या ठिकाणी जमीन कसेल अथवा वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या धार्मिक दहशतवादामुळे पुणे परगण्यात कोणीही राहायला यायना, जमीन कसेना, वस्ती होईना अशावेळी राजमाता जिजाऊ आपल्या बाल शिवाला घेऊन पुणे परगण्यात आल्या. लाल महाल बांधला आता या भागातील रयतेतला धार्मिक आणि मसल पॉवर दहशतवाद संपवायचा होता. जिजाऊंनी बाल शिवाजींच्या हस्ते नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि जमीन कसायला सुरुवात केली. तेवढ्यात वेदमूर्ती पुरुषोत्तम भट त्याठिकाणी आला अन् त्याने धर्मशास्त्राचा आधार सांगत जमीन नांगरू नका, जमीन कसू नका. जमीन नांगरली तर निर्वंश होईल, असे सांगितले. या वेळी संतापलेल्या जिजाऊंनी एकाने मसल पॉवरच्या जोरावर गाढवाचा नांगर फिरवायचा, धार्मिक दहशतवाद माजवायचा आणि दुसर्‍याने त्याचीच री ओढत हा धार्मिक दहशतवाद फोपवायचा. ही जमीन तुम्हाला दान दिली तर तुम्ही कसणार नाहीत का? सोन्यासारखं पिक काढणार नाहीत का? यावर वेदमूर्ती पुरुषोत्तमला उत्तर देता आलं नाही. जिजाऊ मॉ साहेबांनी उपस्थित रयतेदेखत हा धार्मिक दहशतवाद धुडकावून लावला. ही अंधश्रध्दा आहे हे उघड सांगून त्याठिकाणी जमीन नांगरली आणि बघता बघता पुणे परगण्यात पुन्हा रयत आली. विषय एवढाच, राजमाता जिजाऊंनी अंधश्रध्देला कधीच महत्त्व दिले नाही. श्रध्देला, संस्काराला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याला त्यांनी महत्त्व दिलं. जिजाऊ नसत्याच तर स्वराज्याची चेतना निर्माण झाली नसती, मरगटलेले मन भरून आले नसते. दुबळे झालेल्या हातापायतलं बळ स्वराज्यासाठी लढायला पुन्हा मिळालं नसतं. राजमाता जिजाऊंनी आपल्या कार्यकाळामध्ये आदर्श पत्नी, आदर्श राजकारणी, आदर्श माता याचबरोबर अर्थकारण, समाजकारण, युद्धकारण यामध्ये आपली वेगळी छटा आणि पकड दाखवून दिली. बायाबापड्यांना बाटवल्याजाणार्‍या शत्रूंवर तुटून पडण्याचे आत्मबल रक्षणकर्त्यांना जिजाऊंनीच दिले. म्हणूनच जिजाऊ मॉ साहेब महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगाच्या पाठीवर आदर्श माता म्हणून चर्चेत आजही राहिल्या.

Monday, 2 January 2017

शेवट समोर दिसतोय,

पाश तुटत नाहीय


नटसम्राट पंतप्रधान




-गणेश सावंत-9422742810


             आपल्या मोहिनीवर्धक भाषणाने अवघ्या देशाला भुरळ घालणारे आणि नोटबंदीच्या निर्णयाने बहुचर्चित झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रथमच लोक उत्सुकतेने टीव्हीसमोर बसले. नोटबंदीच्या निर्णयाने गेली 50 दिवस सर्वसामान्यांची जी त्रेधातिरपीट झाली. जी माणसे बँकेच्या रांगेत उभी राहून यमसदनी गेली, त्यांच्या घरात तरी नोटबंदीवर जालिम उपाय अथवा तोडगा काढून पंतप्रधान देशवासियांचा उध्दार करतील आणि नमो रुग्णांच्या जयघोषाला आणि जपाला यश येईल, असे वाटत असताना काल पंतप्रधानांचे भाषण ऐकले, तेंव्हा ते पंतप्रधान नव्हे हे तर एक उत्तम कलाकार आहेत. यांच्याकडे खलनायकाचा, नायकाचा अथवा झिलक्याचा रोल दिला तरी, ते उत्तमपणे रंगमंचावर साकारतील, हे यावरून सिध्द झाले आणि पंतप्रधान नटसम्राट झाले. नटसम्राटमधला हा संवाद पंतप्रधानांच्या गेल्या 52 दिवसाच्या प्रवासाला यथोचीत उदाहरण ठरू शकतो. म्हणून हा प्रपंच आम्ही करतोय.

     

 चहा घ्या,चहा... काय बाबा कसा काय आजचा दिवस? छान! आनंद आहे!! कळसासारखा आहे आजचा दिवस आयुष्यात !!! बांधकाम पुर्ण झाल्याचे दु:ख आहे. पण देऊळ पुर्ण झाल्याचा आनंद आहे. दु:ख अटळ आहे म्हणून आनंद आहे. घ्या, चहा घ्या चहा.. नको, चहा नको, सरबत द्या सरबत, गरमी वाढलीय भयंकर!. गरमी भयंकर??? मुर्तीवंत भयंकरपणा जेंव्हा पृथ्वीच्या पाठीवर संचारत असतो, तेंव्हा तुझं एक अभिकपटी रूप लपवण्यासाठी निबिड अंध:काराची दरी कोठे सापडणार? म्हणून हे बहुरूपी कपटा, तू अशी जागा न शोधता, आपले हे हिडीस रूप स्मित वदनात झाकावं, हेच खरं आंधळेपणाचं वरदान न मागताच मिळतं. ऐकू न येण्याचा शाप जाता जात नाही. नटसम्राट मधला हा संवाद ऐकला आणि नोटबंदीच्या निर्णयावेळी आणि निर्णयाच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकलं तर ‘मुेंगेरीलाल के हसीन सपने’ देशवासियांना दाखवण्यात नटसम्राट पंतप्रधान यशस्वी झाले असेच कालच्या भाषणाचं वर्णन करावं लागेल. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशाची खालावलेली अर्थव्यवस्था. हा निर्णय ज्या काळ्या पैशामुळे घेण्यात आला ते न मिळाल्याने सरकारची झालेली आत्मकोंडी, अर्थव्यवस्थेबरोबर देशातल्या ग्रामीण भागातल्या जनतेवर आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नोटबंदीच्या निर्णयातून लादली गेलेली पारतंत्र्याची बेडी ही 50 दिवसानंतरही तुटली नाही.

2016 चा मावळतीचा सुर्य, 2017 च्या उगवतीच्या सुर्याला वंदन करताना त्या संध्या समयेच्या रंगांच्या उधळणीतून जे काही सुखद स्वप्न देशवासिय पाहत होते त्या देशवासियांना अखेर निबिड अंधकाराची दरी मिळाली असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या आत्मविश्‍वासाने नोटबंदीच्या आश्‍वासनावर देशवासियांना जे स्वप्न दाखवले ते स्वप्न तर सोडा पण देशवासियांना हातचं सोडून पदराच्याचा मागं धावावं लागलं. जेंव्हा 15 लाख 80 हजार करोड रूपये देशाची एकूण करन्सी असताना 14 लाख करोड रूपयांपेक्षा जास्त करन्सी बँकेत जमा होते. तेंव्हा नोटबंदीचा निर्णय हा थ्री इडीएट्स चित्रपटामध्ये आमेर खान चड्ड्या काढून लोकांना ढुंगणं दाखवत, 

जहॉंपणा तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो

     असे सन्मानाने वंदन करतो, तसाच काहीसा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 दिवसात नोटबंदीच्या निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित न झाल्याने देशासमोर येवून चाबकाचे फटके खाण्यापेक्षा फेब्रुवारीतला अर्थसंकल्प पूर्वसंकल्प म्हणून काल शब्दबद्ध केला. या पुर्वसंकल्पाला भविष्यात किती महत्त्व असेल हे सांगणे कठीण असले तरी देशाचा पहिला नागरीक पंतप्रधान आपल्या वाचेतून संकल्प सोडतोय, म्हणून यावर विश्‍वास ठेवायला हरकत नाही. परंतू लोकांना देशभक्तीच्या कथा सांगायच्या. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या व्यथा सांगायच्या, त्यांना भारत मातेच्या तिरंग्याच्या आणा- भाका घालायच्या. शब्दबध्द मोहिनी घालायची आणि आपल्या सुरात सूर मिसळण्यास भाग पाडायचे. ही जी विषकन्येची निती अवलंबवत पंतप्रधान देशवासियांचा मुका घेतात तेव्हा देशवासियांना नुसती भुरळ येणार नाही तर विषकन्येच्या या मुक्याने देशवासिय आणि देशाची अर्थव्यवस्था मृतावस्थेत जाईल हे उघड सत्य पंतप्रधानांनाही माहित आहे. माहित नाही ते फक्त देशातील नमो रुग्णांना, हे अखंड देशवासियांचे दुर्दैव मानायला हरकत नाही. हा निर्णय योग्य की अयोग्य यावर देशात कितीही घमासान असलं तरी सरकार हा निर्णय योग्यअसल्याचा भास आणतं. परंतु हा निर्णय तितकाच चांगला असता तर पंतप्रधानांना देशवासियांना संबोधण्यासाठी रेकॉर्डेड भाषण चालवायची गरज पडली नसती. अर्थसंकल्पाच्या अगोदर पूर्वसंकल्पाची लाच देशवासियांना देण्याची गरज पडली नसती. काल मोठ्या उत्सुकतेने जणू काही भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना टीव्हीवर चालू आहे आणि सचिन तेंडुलकर-विरेंद्र सेहवाग चौकार आणि षटकारांची बरसात करत आहेत, ते पाहण्यासाठी ज्या पद्धतीने लोक ओढीने टीव्हीसमोर जातात त्या पद्धतीने पंतप्रधानांचं भाषण ऐकण्यासाठी लोक साडेसात वाजता टीव्हीसमोर गेले. तेंव्हा पंतप्रधानांचे रेकॉर्डेड भाषणातील छबी पाहून, त्यांची बॉडी लँगवेज पाहून भल्या भल्या देशवासियांनी अंगठे खाली करून मोदींच्या निर्णयाचे भविष्यात पडसाद काय असतील याची चिंता करायला सुरुवात केली. नव्या वर्षाचं स्वागत उत्साहाने करायचं, असं प्रत्येकाला वाटत होतं. परंतु मोदींचा पूर्वसंकल्प हा लाचेच्या स्वरुपात आहे की काय, ही धास्ती आणि भविष्यात नोटबंदीच्या निर्णयाने आपली चार-पाच हजाराची नोकरी जाते की काय या चिंतेने लोकांनी शेकोटी नव्हे स्वत:ची चिता पेटवून शेकत बसावं तसं नववर्षाचं सेलिब्रेशन केलं. नरेंद्रमोदींचे भाषण म्हणजे एखादी मोहिनी आणि कालही त्यांनी मोहिनी घातली ती गरोदर महिलांना 6 हजाराची मदत, ग्रामीण भागात घर बांधायचं... अमूक-अमूक टक्के व्याजदरात सूट, किसान कार्डाचे रूपांतर क्रेडिट कार्डात, जिल्हा बँक, सोसायटींना कर्ज हप्त्यासाठी साठ दिवसांची मुदत, लघू उद्योजगांसाठी क्रेडिट गॅरंटी एक कोटीवरून दोन कोटीवर, कॅश क्रेडीटची मर्यादा 20 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणि काही व्याजाची भुरळ दाखवली. त्यामुळे यातून नेमकं साध्य काय होणार? हा शोधाचाच विषय राहील. देशवासियांनी पन्नास दिवसांच्या कालखंडात कष्ट कसे सोसले, देशावर त्यांचे किती प्रेम आहे, सत्यासाठी ते किती आसुसले आहेत, असे एक ना अनेक विश्‍लेषणं लावून देशवासिय किती मोंे आणि ते सत्याच्या पाठिशी कसे खंबीरपणे उभे राहतात हे सांगण्याचा प्रयास केला खरा, परंतु शेवटी ‘नटसम्राट’मधलाच एक संवाद याठिकाणी देऊन 



सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का ?



        हा सवाल आम्ही विचारणार आहोत. उद्धवा, उद्धवा आता तरी सांग खरंखरं... आता पुन्हा टाळू नकोस, मानवाचं सारं जिवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्याच्याशी झुंजण्यात जावं आणि या सगळ्या संकटात तुक केवळ प्राप्तन म्हणून संपवावस हा कसला रे न्याय योगेश्वरा ? धिक्कार करतो कमी या तुझ्या प्राप्तनाच्या योजनेचा! तू कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा, त्याचं काय फळ दिलं मला? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुणतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर मग तरीही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का ? का हो नमो, मी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा, कष्टाने पै पै जमा केली, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी अर्धपोटी राहून, बँकेत पैसे जमा केले आणि पुन्हा मलाच माझेच पैसे काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं. नुसतं रांगेत उभं राहावं लागलं नाही तर मला स्मशानात जावं लागलं. तुझा हा निर्णय एवढाच चांगला होता तर धनदांडगे रांगेत का उभे राहिले नाही ? पैशावाले, मातब्बर, उद्योगपती आजही जशास तसे आहेत. कुठं गेलाय काळा पैसा ? कुठं आहेत ‘अच्छे दिन ?’ असे एक ना अनेक प्रश्‍न कायम असले तरी नट सम्राटानंतर राजकीय पटलावर आणि राजकारणाच्या फडात नमो तूच खरा रे नटसम्राट! आमचा तर शेवट समोर दिसतोय, पाश तुटत नाही, जिव गुंतलाय रे या देशात आणि अच्छे दिन पाहण्याच्या स्वप्नात!




 हा  साय दै.बीड रिपोर्टर मधील १ जानेवारी २०१७ रविवार या रोजीचा अग्रलेख आहे