साय दै बीड रिपोर्टर मधील रविवार अग्रलेख
गांधींची अहिंसा अन् मौत के सौदागर
- गणेश सावंत - ९४२२७४२८१०
अग्रलेखाचं शिर्षक वाचून अनेकांची मने प्रतिक्रिया द्यायला उचंबळली असतील. परंतु पूर्ण अग्रलेख वाचा मग उचंबळलेल्या मनांना प्रतिक्रिया द्यायला सांगा. शेकडो वर्षे पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले ? असा प्रश्न जर कोणी विचारलाच तर आम्ही मोठ्या अभिमानाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेऊ. त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले अर्थात नंतर महात्मा गांधींचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्या अहिंसेलाही वंदन करावं लागेल. कारण महात्मा गांधींची अहिंसा ही वीरांची अहिंसा होती हेही विसरून चालणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस हे दुसर्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेचे सरसैनानी झाले. डावा हात मृत्यूच्या खांद्यावर टाकून उजव्या हाताने लढत त्यांनी ब्रिटिशांचा ठिकठिकाणी पराभव केला पण दुर्दैवाने स्वातंत्र्यासाठी आणखी फक्त एक धक्का हवा असतानाच ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या महान पराक्रमामुळे हिंदी सैनिकात व पोलिस दलात स्वातंत्र्याची आकांक्षा उसळली, राजनिष्ठा संपली आणि ब्रिटिशांच्या राज्याचा पाया ढासळला. त्यानंतर गांधींचे सत्याग्रह सर्वश्रूत आहेत. हे सांगण्याचं एवढच कारण, आता जे सरकार आहे, जे राज्यकर्ते आहेत ते भोगविलासी आणि प्रसिद्धीस लालसी अशा प्रतिमेचे आहेत. हे सांगायला कुठल्याही भविष्यकाराची गरज नाही. आपण काय करतोय, आपण कुठणं प्रसिद्धी मिळवतोय याचंही भान राज्यकर्त्यांना बहुदा नसावं म्हणून ज्या गांधींनी स्वातंत्र्याबरोबर ग्रामीण भागांमध्ये खेडुतांना आणि गोरगरिबांना काम-धंदा लावण्याच्या उद्देशाने सूत काटायला लावले, सुताचे वस्त्र परिधान करायला लावले त्या खादी ग्राम उद्योगाला त्याकाळी भरभराटी दिली. त्या कॅलेंडरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो तोही गांधींसारखाच परंतु सुटा-बुटात आणि जॅकेटात सूत काटतानाचा पहावयास मिळाला. नक्कीच गांधींचा फोटो हटवून मोदींचा फोटो त्याठिकाणी प्रकाशीत केल्याने प्रसिद्धीचा हवरापणा यातून थेट उघड होतो. जे गांधी स्वत:चं शरीर झाकण्यापुरते कपडे वापरायचे आणि सुताला महत्त्व द्यायचे त्याच गांधींच्या देशात देशाचे पंतप्रधान फोटो काढण्यासाठी सुटाला महत्त्व देतात तेंव्हा कॅलेंडरवरून गांधींचा फोटो फाटणे हे विशेष, असं त्यांच्या दृष्टीने तरी काहीच नसेल. कारण सध्या देशाला
मोदी नावाचं गारुड
ने भारावून सोडलं आहे. देशाच्या लोक माणसावर मोदी नावाचं गारुड अक्षरश: स्वार झाला आहे. भारतीय लोक माणसात असं गारुड यापूर्वी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या रुपाने पहायला मिळालं होतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, लोकनायक जयप्रकाश नारायण, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि आता आताचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गारुड चांगलच दिसून आलेलं आहे. परंतु या सर्व नेत्यांना त्यासाठी त्यांच्या आयुष्यातले अनमोल वर्ष खर्च करावे लागले आहेत. मात्र मोदींना तेवढे वर्ष खर्च करण्याची गरज पडलेली नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मोदींनी राजकारणामध्ये आपले तिन दशके खर्च पाडले हे नक्की परंतु या तीन दशकातल्या पहिल्या दीड दशकामध्ये मोदी देशभरात नव्हे तर जगभरामध्ये मौत के सौदागर म्हणून परिचीत झाले होते. नरेंद्र मोदींकडे देशातली मीडिया आणि विरोधक अक्षरश: खुनी दरिंदा म्हणून पहात होते. अशा स्थितीमध्ये हा माणूस चहाच्या केटलीपासून पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत जाईल हे सांगणे कठीण होते. परंतु मोदींचा आत्मविश्वास आणि राजकीय इच्छाशक्ती इतकी बलदंड होती की पक्षातील अंतर्गत विरोधाला न जुमानता मुख्य माळेच्या मुगुटमण्याला आपला धनी माणून मोदींनी स्वत:च त्या माळेचा मुगुटमणी होण्याचा मान मिळवला. ‘मौत का सौदागर’ ही नकारात्मक उपाधी पाठीमागे असताना मोदींनी आपलं लक्ष गाठलं हे नक्कीच दखलपात्र परंतु त्यानंतर मोदींना जो भास होऊ लागला ‘हम करे सो कायदा’ असं जेंव्हा वाटू लागलं आणि मोदी..मोदी... नावाचा गजर कानात जेंव्हा घुमू लागला तेंव्हा मोदींना आम्ही आहोत तर देश आहे, असा बहुदा भास होऊ लागला आणि त्या भासातूनच उलटसुलट निर्णयाबरोबर आपण कोणाची जागा घेतोय याचाही त्यांना विसर पडत गेला. कॉंग्रेसमुक्त देश करण्याची त्यांची मनिषा हा राजकीय भाग असू शकतो, राजकारणातील डावपेच असू शकतात. परंतु या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखे झिजवले, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले त्या लोकांची अवहेलना करणे आणि त्यांच्या नावाचा वापर करत सत्ता मिळवणे हे जरी देशातील आजच्या मोदी.. मोदी.. करणार्या नमो रुग्णांना पटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वामी विवेकानंद आणि शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत संत नामदेवांपासून जगद्गुरू संत तुकोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रभावीत असलेल्या देशवासियांना हे पटेलच हे सांगणे कठीण आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, देशाची विकासाची धुरा त्यांच्या हातात आहे. त्या धुरेला सांभाळण्यापेक्षा जर देशभरात केवळ सत्ता आपलीच असेल आणि हिटलरसारखा हुकुम आपलाच चालेल असं जर मोदींना वाटत असेल तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात हे सर्वकाळ टिकेलच हे सांगणे कठीण आहे. राहिला प्रश्न गांधींची जागा घेण्याचा, आम्ही तर नेहमी म्हणतो,
‘नंगा फकीर’
हा माणूस जेवढा सिधासाधा तेवढाच नुसत्या अहिंसेच्या ताकतीवर पांढरतोंड्या इंग्रजांना पळताभुई थोडी करणारा विरांच्या अहिंसेचा पुजारी म्हणून गांधींकडे आजही पाहितलं जातं. आम्हाला आश्चर्य वाटतं, येसू ख्रिस्त म्हणायचे, एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा, परंतु ही बिरुदावली गांधींच्या नावावर हिंदू महासभेने म्हणा अथवा गांधींना नापसंत करणार्या गोडसेंच्या पिलावळींनी खपवली. गांधींची भूमिका थेट होती, गांधींना स्वातंत्र्य हवं होतं. इथली जनता सुखी आणि समाधानी असावी ही त्यांची भूमिका होती. खेड्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांना अन्न-वस्त्र-निवारा आणि शिक्षण मिळावं असंही त्यांना वाटत होतं. सूत काटणं आणि एका पंचावर शरीर झाकणं याला गांधी म्हणत नाहीत, हे पुन्हा-पुन्हा सांगावसं वाटतं. जेंव्हा कोलकातामध्ये हिंदू-मुस्लिमांची दंगल उसळली, कापाकापी सुरू झाली तेंव्हा महात्मा गांधींनी स्वत: कुठलेही पोलिस प्रोटेक्शन न घेता प्रक्षुब्ध जमाव शांत करण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा केली. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत दंगल उसळली. हिंदू-मुस्लिम एकमेकांवर धावून येत होते, कापाकापी सुरू होती अशा वेळी ती दंगल थांबविण्यासाठी मोरारजी देसाईंनी त्याठिकाणी जायला हवं होतं, ते गेले नाहीत त्यामुळे गांधी मोरारजींना म्हणाले, दंगल थांबवण्यासाठी तू त्याठिकाणी का गेला नाहीस? मोरारजी म्हणाले, त्यांनी मला मारलं असतं तर तेंव्हा गांधी म्हणाले, प्रक्षुब्ध जमावाला शांत करताना त्यांनी तुझ्यावर हल्ला केला असता आणि त्यामध्ये तू मेला असतास तर मला तुझा अधिक अभिमान वाटला असता. अहिंसा ही आत्मिक आहे, स्वत:पासून स्वत:च्या विचारापासून आणि स्वत:च्या अंत:करणापासून माणूस जेंव्हा अहिंसक होतो तेंव्हाच त्याच्या हातून सत्कार्य घडतात हा साधं आणि सोपं समिकरण आहे परंतु गांधीनंतर राजकारणाच्या सारीपाटावर आत्मिक अहिंसेचा नेता किंवा नंगा फकीर कोणी झाल्याचे दिसून येत नाही. ज्याच्या माथी मौत का सौदागरचा तिलक आहे त्याच्या हाती सूत काटले तर तो अहिंसेचा पुजारी अथवा नंगा फकीर होईल का ? खादी ग्राम उद्योग हा ग्रामोद्योग व्हावा, ग्रामीण जनतेला त्याचा फायदा व्हावा या संकल्पनेतून महात्मा गांधींनी खादी ग्रामोद्योग आणि शेळीपालन याला तेव्हा महत्व दिलं होतं. परंतु त्यानंतर या उद्योगाला भरभराटी देण्याचं काम शक्य तो कोणी केलं नाही. महात्मा गांधींचा सूत काटतानाचा फोटो देशातल्या प्रत्येक नागिरकाला माहित आहे त्यामुळे खादी परिचीत आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज मितीला खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरील फोटोत महात्मा गांधींची प्रतिमा गायब होऊन त्याठिकाणी सुटाबुटातला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूत काटतानाचा फोटो आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी क्षुद्र नाहीत, त्यांचा फोटोही खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर असायला हवा, हेही आम्ही मानायला तयार आहोत, परंतु गांधींची जी भूमिका खादी ग्रामोद्योगाबाबत होती ती भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे का? जर असेल तर या दोन वर्षांच्या कालखंडात देशात खादी ग्रामद्योगाबाबत ग्रामीण भागात कुठल्या उपाययोजना केल्या? कुठले उद्बोधन केले? ग्रामीण भागातल्या लोकांना उद्योग धंद्यांसाठी काय दिले? उद्योग धंदे वाढविण्यासाठी महात्मा गांधी शेळी पालनाचं महत्त्व पटवून देत होते आणि धंदेही वाढवत होते. मग पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील आणि वाडी-वस्ती-तांड्यांवरील लोकांसाठी असे काही उद्योग धंदे उभारले आहेत का? या सर्व प्रश्नांचं उत्तर नाहीच येईल. कारण 21 व्या शतकातले हे पंतप्रधान मेड इन इंडिया, कॅशलेस या सर्व हायफाय आणि वायफायसारख्या योजनांमध्ये गुंतलेले आहेत.
आम्हालाही माहिती तंत्रज्ञानाच्या युगासोबत पुढं जायचय परंतु केवळ नाव लिहिता येणारे असे देशात 67 टक्के लोक साक्षर आहेत. मग या 67 टक्के लोकांना जर आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगातले पीएच. डी. करणारे समजत असू तर धन्य तुमच्या विचारांना. गांधींची जागा घेण्यासाठी अगोदर गांधींचे विचार आत्मसात करणे आणि त्यांच्या पावलावर चालणे महत्वाचे आहे. परंतु आचार-विचारावर लक्ष न देता गांधींना जवळ केलं म्हणजे कॉंग्रेस लंगडी होईल, गांधींच्या ठिकाणी त्यांच्यासारखाच फोटो टाकला म्हणजे आपणास पुजतील असं जर वाटत असेल आणि शिवाजी महाराजांना जवळ घेतलं तर मराठे जवळ येतील, आंबेडकरांना जवळ घेतलं तर त्यांचे अनुयायी जवळ येतील, फुलेंना जवळ घेतलं तर त्यांचे अनुयायी आपल्याजवळ येतील, आणि असे एक-एक महापुरुष आपल्याजवळ घेत देशात एककलमी मोदी हुकुम चालेल, असं जर वाटत असेल तर गांधींच्या हातातल्या काठीकडेही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीकडे व बाबासाहेबांच्या हातात असलेल्या संविधानाकडे अशा लोकांचंं लक्ष जाणं त्यांच्यासाठीच गरजेचं आहे.
No comments:
Post a Comment