Sunday, 29 January 2017

। सिद्धंति ममगात्राणि मुखचं प्रशिष्यती ।

कोण कौरव, कोण पांडव?

महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र

-गणेश सावंत

       ज्या माणसांना शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय हे कळून चुकतं तो माणूस सोनं पांघरुण बाजारात चिंध्याही विकू शकतो. याचा अनुभव सध्या अवघ्या देशाला आला. कारण अशाच चिंध्या विकण्याचा धंदा महाराष्ट्रामध्ये तेजीत आलाय तो अच्छे दिनचे स्वप्न दाखवून. अच्छे दिन नेमके कशाला म्हणायचे ? याचं उत्तर जरी कुणाला देता येत नसलं तरी स्वप्नातल्या दुनियेत हरपणार्‍यांना अच्छे दिनचे बिस्कुट घोड्याने सरळ चालावे म्हणून टांग्याला समोर हिरवा चारा ज्याप्रमाणे लावतात त्याप्रमाणे ‘परिवर्तन तर होणारच, हा चारा भाजपाने महाराष्ट्राच्या टांग्याला लावला,’ परंतु अचानक म्हणा किंवा हुकुमशाही वृत्तीतून म्हणा भाजपाने शिवसेनेशी गेल्या दीड दोन वर्षापासून जी काही वर्तवणूक चालवली त्याचा अंत अखेर उद्धव ठाकरेंनी परवा करून 25 वर्षांचा घरोबा मोडीत काढला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला रणांगणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रित आले हे जेवढे उघड सत्य तेवढेच भाजप हे महाराष्ट्रात ब्यालासुद्धा गेल्या 25 वर्षांपूर्वी पहायला मिळत नव्हती ती केवळ शिवसेनेमुळेच मोठी झाली आणि केंद्रातील सत्ता केंद्राचा वटवृक्ष म्हणून ती महाराष्ट्रात राक्षसीवृत्ती आणि हावरेपणाची भूमिका बजावू लागली. आज भाजपाची स्थिती हम करे सो... आणि हुकुमशाही पद्धतीची उघडपणे पहावयाला मिळते. युती तुटण्याचे किंवा युती तोडण्याचे दु:ख कोणाला असेल नसेल परंतु युती तोडण्यास प्रवृत्त करणारी भाजपाची वृत्ती तेवढी पॉझिटिव्ह आहे असे म्हणता येणार नाही उलट ही वृत्ती एकप्रकारची विषवल्लीच. भाजपाने एवढे तरी लक्षात ठेवायला हवे होते, ज्या पक्षाकडे सेठजी-भटजीचा पक्ष म्हणून पाहितलं जात होतं त्या पक्षाला अखंड बहुजनाचं स्वरुप देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या नेत्यांनी केलं. स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन हे ज्या पद्धतीने भाजप चालवायचे ती पद्धत सत्ता केंद्राबरोबर समाजकारण आधारभूत होती. आजची भाजपाची पद्धत देवेंद्र ते सत्तेंद्र, नरेंद्र ते सत्तेंद्र एवढीच पहावयास मिळते. ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. तसं पाहिलं तर शिवसेनेची अन् भाजपाची कधी युती नव्हतीच असंही म्हणता येईल. परंतु शिवसेना ज्या उर्मिने महाराष्ट्रात फोपावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला महाराष्ट्रात जो आयाम दिला तो दखलपात्र म्हणावा लागेल. शिवसेनेचा सुरुवातीचा


इतिहास 

पाहितला तर शिवसेना कधी प्रजा समाजवादी पक्ष तर कधी कॉंग्रेस असा सोयीप्रमाणे राजकीय घरोबा करत प्रामुख्याने मुंबईत राजकीय वाटचाल सुरू करणारी संघटना म्हणून पाहितलं जाई. या प्रवासात शिवसेनेची नाळ खर्‍या अर्थाने तेंव्हा जनसंघाशी जुळली आणि नंतर भाजपाशी. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक, मनोहर जोशी भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढले पण त्यावेळी या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. इ.स. 1985 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून भाजप शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलात सामील झाली तेव्हा भाजपाला खास ठाकरे शैलीत बाळासाहेबांनी चांगले टोलेही लगावले होते. एकमेकांपासून दूर गेलेल्या सेना-भाजपाला भविष्यात एकत्रित आणलं ते हिंदुत्वाने. देशामध्ये हिंदुत्वाचे वारे वाहत असताना राज्यभरात विस्तारत असलेली शिवसेना आपल्या साथीला हवी याची जाणीव जेव्हा भाजपाच्या धुरंधरांना झाली तेंव्हा शिवसेना आपला मोठा भाऊ म्हणून भाजप त्यांच्यासोबत गेली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांचा तो ऐन भरातला काळ होता. प्रमोद महाजनांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज शिवसेनाप्रमुखांना पटवून दिली आणि 1989 मध्ये भाजप-सेना युती साकारली. या युतीचे मुख्य शिलेदार होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन. त्यानंतरचा इतिहास बहुदा आजकालच्या सर्वच अबालवृद्धांना माहित असावा. 25 वर्षांचा कालखंड हा मोठा कालखंड मानला जातो. स्व. महाजन आणि मुंडे जोपर्यंत होते तोपर्यंत युतीमध्ये सर्वकाही अलबेल होते. परंतु त्यानंतर मात्र भाजपाची सत्ता लालच वाढली, सत्तेचं रगात तोंडाला लागल्यागत एखादा हिंस्त्र पशू ज्या पद्धतीने आपल्या सावजावर झडप घालण्यासाठी काहीही करतोत ती पद्धत भाजपाने अवलंबवायला सुरुवात केली आणि यावर्षी तर महाराष्ट्रात 

महाभारत 

पहावयास मिळू लागलं. भाजपाची राजकीय इच्छाशक्ती ही हिटलरच्या इच्छाशक्तीपेक्षा अधिक राजकीय कामांध असावी, असा कयास काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. म्हणूनच देशातल्या राज्या-राज्यामध्ये असलेले प्रादेशीक पक्ष समुळ नष्ट करणे आणि शत-प्रतिशत भाजपच्या नार्‍याला अधिक बळ देणे ही जी हावरी भूमिका भाजपाची दिसून येते ती भाजपाला परवडणारी किंवा आसुरी आनंद देणारी असू शकते परंतु या आसुरी आनंदाचा थोडासाही फायदा देशातील जनतेला विकासाच्या दृष्टीने होईल, असं तसूभरही वाटत नाही. उलट शिवसेनेने युती तोडल्यानंतर आम्ही किती स्वच्छ आहोत आणि आम्हीच पांडव आहोत. श्रीकृष्ण आमच्याच बाजुने आहे, शिवसेना ही साक्षात कौरव आहे. शिवसेनेमध्ये शकुनी मामा आहेत, दुर्योधन, दुश्शासन आहे हा दाखवण्याचा प्रयत्न काल झाला, एवढ्यावरही मुख्यमंत्री थांबले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत घेत फडणवीसांनी पाणी पाजण्याची भाषा केली. परंतु पाणी पाजण्याची भाषा करतेवेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुन जेव्हा लढायला जातो तेव्हा आप्तस्वईक समोर पाहून अर्जुनाची । सिद्धंति ममगात्राणि मुखचं प्रशिष्यती । तशी स्थिती मुख्यमंत्र्यांची झाली आणि त्यांचा आवाज बसला आणि भाषण थांबवावा लागला. एकूणच भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेसोबत आपली हावरी भूमिका दाखवत चाललाय त्याचा फायदा शिवसेनेलाच होत चाललाय. शिवसेना आज केविलवाणी आहे असे लोक म्हणतात आणि भाजप हे मस्तवाल आणि सत्तेच्या मदमस्तीतले हावरे आहेत हे लोकांचे म्हणणे आहे. सेना-भाजपाची युती रहावीच असं आमचं म्हणण्याचं कारणच नाही. परंतु ज्या पद्धतीने भाजपाने शिवसेनेला ट्रीट केलं आणि प्रादेशिक पक्ष समुळ नष्ट करण्याचे धोरण जे आखलं ते लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात लोकशाहीच गळचेपी आहे हेही तेवढच खरं. आज भाजप महाराष्ट्राला कुरुक्षेत्र करू पहायतोय. साम-दाम-दंडाच्या भूमिकेत निवडणुका लढतय. लोकांच्या मुलभूत गरजा काय आहे यापेक्षा पक्षाला सत्तेची गरज कशी आहे याचा जो सिद्धांत मांडतायत तो सिद्धांत कुठल्याच राज्याला आणि राज्यातील रयतेला यशोशिखरावर नेणारा नक्कीच नाही. परिवर्तन तर नाहीच नाही उलट परिवर्तनाच्या नावाखाली वरुण कीर्तन आतून तमाशा हेच धोरण भाजपाचं आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, पोटात एक आणि ओठात एक ही जी भाजपाची खेळी आहे ती खेळी महाराष्ट्र उमजून चुकलाय. त्याचबरोबर भाजपाच्या सत्तेतील मंत्र्यांची, आमदारांची भूमिका जी आहे ती हुकुमशाही आणि एक व्यक्तीकेंद्रित सत्ता हे महाराष्ट्राच्या स्वराज्याला कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे आता भाजप जरी शिवसेनेला कौरव म्हणत असलं तरी कोण कौरव, कोण पांडव, कोण अर्जून, कोण दुर्योधन? हे लोक उघडपणे महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावर लवकरच सांगतील.

No comments:

Post a Comment