शेवट समोर दिसतोय,
पाश तुटत नाहीय
नटसम्राट पंतप्रधान
-गणेश सावंत-9422742810
आपल्या मोहिनीवर्धक भाषणाने अवघ्या देशाला भुरळ घालणारे आणि नोटबंदीच्या निर्णयाने बहुचर्चित झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रथमच लोक उत्सुकतेने टीव्हीसमोर बसले. नोटबंदीच्या निर्णयाने गेली 50 दिवस सर्वसामान्यांची जी त्रेधातिरपीट झाली. जी माणसे बँकेच्या रांगेत उभी राहून यमसदनी गेली, त्यांच्या घरात तरी नोटबंदीवर जालिम उपाय अथवा तोडगा काढून पंतप्रधान देशवासियांचा उध्दार करतील आणि नमो रुग्णांच्या जयघोषाला आणि जपाला यश येईल, असे वाटत असताना काल पंतप्रधानांचे भाषण ऐकले, तेंव्हा ते पंतप्रधान नव्हे हे तर एक उत्तम कलाकार आहेत. यांच्याकडे खलनायकाचा, नायकाचा अथवा झिलक्याचा रोल दिला तरी, ते उत्तमपणे रंगमंचावर साकारतील, हे यावरून सिध्द झाले आणि पंतप्रधान नटसम्राट झाले. नटसम्राटमधला हा संवाद पंतप्रधानांच्या गेल्या 52 दिवसाच्या प्रवासाला यथोचीत उदाहरण ठरू शकतो. म्हणून हा प्रपंच आम्ही करतोय.
चहा घ्या,चहा... काय बाबा कसा काय आजचा दिवस? छान! आनंद आहे!! कळसासारखा आहे आजचा दिवस आयुष्यात !!! बांधकाम पुर्ण झाल्याचे दु:ख आहे. पण देऊळ पुर्ण झाल्याचा आनंद आहे. दु:ख अटळ आहे म्हणून आनंद आहे. घ्या, चहा घ्या चहा.. नको, चहा नको, सरबत द्या सरबत, गरमी वाढलीय भयंकर!. गरमी भयंकर??? मुर्तीवंत भयंकरपणा जेंव्हा पृथ्वीच्या पाठीवर संचारत असतो, तेंव्हा तुझं एक अभिकपटी रूप लपवण्यासाठी निबिड अंध:काराची दरी कोठे सापडणार? म्हणून हे बहुरूपी कपटा, तू अशी जागा न शोधता, आपले हे हिडीस रूप स्मित वदनात झाकावं, हेच खरं आंधळेपणाचं वरदान न मागताच मिळतं. ऐकू न येण्याचा शाप जाता जात नाही. नटसम्राट मधला हा संवाद ऐकला आणि नोटबंदीच्या निर्णयावेळी आणि निर्णयाच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकलं तर ‘मुेंगेरीलाल के हसीन सपने’ देशवासियांना दाखवण्यात नटसम्राट पंतप्रधान यशस्वी झाले असेच कालच्या भाषणाचं वर्णन करावं लागेल. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशाची खालावलेली अर्थव्यवस्था. हा निर्णय ज्या काळ्या पैशामुळे घेण्यात आला ते न मिळाल्याने सरकारची झालेली आत्मकोंडी, अर्थव्यवस्थेबरोबर देशातल्या ग्रामीण भागातल्या जनतेवर आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नोटबंदीच्या निर्णयातून लादली गेलेली पारतंत्र्याची बेडी ही 50 दिवसानंतरही तुटली नाही.
2016 चा मावळतीचा सुर्य, 2017 च्या उगवतीच्या सुर्याला वंदन करताना त्या संध्या समयेच्या रंगांच्या उधळणीतून जे काही सुखद स्वप्न देशवासिय पाहत होते त्या देशवासियांना अखेर निबिड अंधकाराची दरी मिळाली असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या आत्मविश्वासाने नोटबंदीच्या आश्वासनावर देशवासियांना जे स्वप्न दाखवले ते स्वप्न तर सोडा पण देशवासियांना हातचं सोडून पदराच्याचा मागं धावावं लागलं. जेंव्हा 15 लाख 80 हजार करोड रूपये देशाची एकूण करन्सी असताना 14 लाख करोड रूपयांपेक्षा जास्त करन्सी बँकेत जमा होते. तेंव्हा नोटबंदीचा निर्णय हा थ्री इडीएट्स चित्रपटामध्ये आमेर खान चड्ड्या काढून लोकांना ढुंगणं दाखवत,
जहॉंपणा तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो
असे सन्मानाने वंदन करतो, तसाच काहीसा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 दिवसात नोटबंदीच्या निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित न झाल्याने देशासमोर येवून चाबकाचे फटके खाण्यापेक्षा फेब्रुवारीतला अर्थसंकल्प पूर्वसंकल्प म्हणून काल शब्दबद्ध केला. या पुर्वसंकल्पाला भविष्यात किती महत्त्व असेल हे सांगणे कठीण असले तरी देशाचा पहिला नागरीक पंतप्रधान आपल्या वाचेतून संकल्प सोडतोय, म्हणून यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. परंतू लोकांना देशभक्तीच्या कथा सांगायच्या. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या व्यथा सांगायच्या, त्यांना भारत मातेच्या तिरंग्याच्या आणा- भाका घालायच्या. शब्दबध्द मोहिनी घालायची आणि आपल्या सुरात सूर मिसळण्यास भाग पाडायचे. ही जी विषकन्येची निती अवलंबवत पंतप्रधान देशवासियांचा मुका घेतात तेव्हा देशवासियांना नुसती भुरळ येणार नाही तर विषकन्येच्या या मुक्याने देशवासिय आणि देशाची अर्थव्यवस्था मृतावस्थेत जाईल हे उघड सत्य पंतप्रधानांनाही माहित आहे. माहित नाही ते फक्त देशातील नमो रुग्णांना, हे अखंड देशवासियांचे दुर्दैव मानायला हरकत नाही. हा निर्णय योग्य की अयोग्य यावर देशात कितीही घमासान असलं तरी सरकार हा निर्णय योग्यअसल्याचा भास आणतं. परंतु हा निर्णय तितकाच चांगला असता तर पंतप्रधानांना देशवासियांना संबोधण्यासाठी रेकॉर्डेड भाषण चालवायची गरज पडली नसती. अर्थसंकल्पाच्या अगोदर पूर्वसंकल्पाची लाच देशवासियांना देण्याची गरज पडली नसती. काल मोठ्या उत्सुकतेने जणू काही भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना टीव्हीवर चालू आहे आणि सचिन तेंडुलकर-विरेंद्र सेहवाग चौकार आणि षटकारांची बरसात करत आहेत, ते पाहण्यासाठी ज्या पद्धतीने लोक ओढीने टीव्हीसमोर जातात त्या पद्धतीने पंतप्रधानांचं भाषण ऐकण्यासाठी लोक साडेसात वाजता टीव्हीसमोर गेले. तेंव्हा पंतप्रधानांचे रेकॉर्डेड भाषणातील छबी पाहून, त्यांची बॉडी लँगवेज पाहून भल्या भल्या देशवासियांनी अंगठे खाली करून मोदींच्या निर्णयाचे भविष्यात पडसाद काय असतील याची चिंता करायला सुरुवात केली. नव्या वर्षाचं स्वागत उत्साहाने करायचं, असं प्रत्येकाला वाटत होतं. परंतु मोदींचा पूर्वसंकल्प हा लाचेच्या स्वरुपात आहे की काय, ही धास्ती आणि भविष्यात नोटबंदीच्या निर्णयाने आपली चार-पाच हजाराची नोकरी जाते की काय या चिंतेने लोकांनी शेकोटी नव्हे स्वत:ची चिता पेटवून शेकत बसावं तसं नववर्षाचं सेलिब्रेशन केलं. नरेंद्रमोदींचे भाषण म्हणजे एखादी मोहिनी आणि कालही त्यांनी मोहिनी घातली ती गरोदर महिलांना 6 हजाराची मदत, ग्रामीण भागात घर बांधायचं... अमूक-अमूक टक्के व्याजदरात सूट, किसान कार्डाचे रूपांतर क्रेडिट कार्डात, जिल्हा बँक, सोसायटींना कर्ज हप्त्यासाठी साठ दिवसांची मुदत, लघू उद्योजगांसाठी क्रेडिट गॅरंटी एक कोटीवरून दोन कोटीवर, कॅश क्रेडीटची मर्यादा 20 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणि काही व्याजाची भुरळ दाखवली. त्यामुळे यातून नेमकं साध्य काय होणार? हा शोधाचाच विषय राहील. देशवासियांनी पन्नास दिवसांच्या कालखंडात कष्ट कसे सोसले, देशावर त्यांचे किती प्रेम आहे, सत्यासाठी ते किती आसुसले आहेत, असे एक ना अनेक विश्लेषणं लावून देशवासिय किती मोंे आणि ते सत्याच्या पाठिशी कसे खंबीरपणे उभे राहतात हे सांगण्याचा प्रयास केला खरा, परंतु शेवटी ‘नटसम्राट’मधलाच एक संवाद याठिकाणी देऊनसततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का ?
हा सवाल आम्ही विचारणार आहोत. उद्धवा, उद्धवा आता तरी सांग खरंखरं... आता पुन्हा टाळू नकोस, मानवाचं सारं जिवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्याच्याशी झुंजण्यात जावं आणि या सगळ्या संकटात तुक केवळ प्राप्तन म्हणून संपवावस हा कसला रे न्याय योगेश्वरा ? धिक्कार करतो कमी या तुझ्या प्राप्तनाच्या योजनेचा! तू कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा, त्याचं काय फळ दिलं मला? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुणतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर मग तरीही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का ? का हो नमो, मी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा, कष्टाने पै पै जमा केली, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी अर्धपोटी राहून, बँकेत पैसे जमा केले आणि पुन्हा मलाच माझेच पैसे काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं. नुसतं रांगेत उभं राहावं लागलं नाही तर मला स्मशानात जावं लागलं. तुझा हा निर्णय एवढाच चांगला होता तर धनदांडगे रांगेत का उभे राहिले नाही ? पैशावाले, मातब्बर, उद्योगपती आजही जशास तसे आहेत. कुठं गेलाय काळा पैसा ? कुठं आहेत ‘अच्छे दिन ?’ असे एक ना अनेक प्रश्न कायम असले तरी नट सम्राटानंतर राजकीय पटलावर आणि राजकारणाच्या फडात नमो तूच खरा रे नटसम्राट! आमचा तर शेवट समोर दिसतोय, पाश तुटत नाही, जिव गुंतलाय रे या देशात आणि अच्छे दिन पाहण्याच्या स्वप्नात!
No comments:
Post a Comment