Sunday, 28 May 2017

छातीवर वार करणारे पाठ केंव्हापासून दाखवायलेत?




जिवंतपणावर शोक व्यक्त करणं 
महाराष्ट्राची संस्कृती नाही 



गणेश सावंत-९४२२७४२८१०

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला परवा - परवा लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यात गंभीर अपघात झाला. हेलिकॉप्टर उडालं आणि बाजुच्या खांबाला जाऊन धडकलं. खाली जमीनीवर येऊन पडलं, काही क्षण त्याठिकाणी धावपळ उडाली. स्फोट होण्याच्या भितीने जो तो जिव वाचवित पळत सुटला. शासन-प्रशासन व्यवस्थेतील अधिकारीही आपला जिव वाचविण्याच्या बेतात राहीले. असा तो यमाच्या दारातून परत येण्याचा प्रसंग देवेंद्र फडणविसांनी याची देही याची डोळा अनुभवला. दैव बलवत्तर म्हणून फडणवीस या अपघातातून बचावले. फडणवीसांनी भवानी मातेचे, विठ्ठलाचे आणि महाराष्ट्रातील अकरा कोटी पेक्षा जास्त जनतेचे आशिर्वाद कामी आल्याचे सांगितले. या अपघाताची माहिती अवघ्या काही क्षणात महाराष्ट्रातल्या गावागावांत जाऊन पोहचली. देशभरात आणि जगभरात देवेंद्र फडणवीसांच्या अपघाताची इत्यंभूत माहिती जात गेली. परंतु त्याचवेळी या पुरोगामी महाराष्ट्रात असं एक वावटळ निर्माण झालं जसं की, वाळवंटात एखादं जनावर मृतावस्थेत पडावं आणि कित्येक दिवसांपासून भुकेलेल्या गिधाडांना आपलं सावज मिळावं आणि गिधाडांचं टोलधाड त्या मृत जनावरावर तुटून पडावं, असंच काहीसं मुख्यमंत्री अपघातातून बचावले म्हणून सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या असंस्कृत आणि नेभळटांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या जिवंत असण्यावर शोक व्यक्त केला. ज्या महाराष्ट्रामध्ये संस्कार आणि संस्कृती सोबत नांदते, साधू-संत-सुफींची विचारधारा निखळ पांढर्‍यासारखी वाहते समाजसुधारकांचं ध्येय कणाकणात भिनलेलं असतं, शाहू-फुले-आंबेडकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा, दाखवलेला मार्ग डोळ्यात अंजन घालावा तसा कायम असतो. तरीही एखाद्याच्या जिवंतपणावर जेंव्हा महाराष्ट्राच्या मातीत शोक व्यक्त केला जातो आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मरणावर आनंदोत्सव साजरा करण्याची दिशा दाखवली जाते तेव्हा खरच जिवंतपणावर शोक व्यक्त करणारे महाराष्ट्राच्या मातीतच निपजलेले आहेत का हा प्रश्‍न विचारावासा वाटतो. महाराष्ट्राची माती ही निधड्या छातींना जन्माला घालणारी आहे. दुश्मनालाही चितपट करताना पाठीत वार करणारी महाराष्ट्राची माती नाही. महाराष्ट्राच्या मातीत जो जन्मतो तो

पाठीवर नाही तर छातीवर

वार करण्यासाठी आणि झेलण्यासाठी सातत्याने तत्पर असतो, मग त्याच मातीतली ही गरमी मुख्यमंत्र्यांच्या जिवंतपणावर शोक कसं काय व्यक्त करते? आणि या निलाजर्‍या पणाचं समर्थन तरी कसं करावं? म्हणूनच हा आजचा आमचा खटाटोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत निपजणार्‍यांना सांगून ठेवलय, धैर्य ठेवा, संघर्ष करा आणि यशाची पताका पडकवा. छत्रपतींनी पाठीत वार करण्याची शिकवण महाराष्ट्राच्या मातीला दिलेली नाही. देवेंद्र फडणवीसांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त करणं म्हणजे एखाद्याच्या पाठीत वार करण्यासारखं आहे. नक्कीच वैचारिक मतभेद असायला हवेत, वैचारिक शत्रुत्वही असायला हवं, मात्र हे मतभेद आणि शत्रुत्व निभावताना आचारसंहिता प्रत्येकाने प्रत्येकाला लावून ठेवायला हवी. ती आचारसंहिता महाराष्ट्राच्या मातीत निपजल्याची शुद्ध बिजापोटी जन्म घेतलेल्या आई-बापांच्या पोटची असते, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त करणं म्हणजे आपल्या कर्तृत्वाला गंज लागणे आणि आपल्या मस्तकात जणू अळ्या वळवळ करण्यासारखं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत, महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटतील ते विचारधारा संपुष्टात आल्यानंतर धनदांडगे आणि सत्ताधीशांची गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांकडे पाहण्याची दृष्टी जेव्हा बदलेल, तिचा जेव्हा अपघात होईल आणि ती दृष्टी जेव्हा यमसदनी जाईल तेव्हा बदल होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यातील रयतेचे नेतृत्व करत असले तरी त्यांना आई-बाप आहेत, पत्नी आहे, मुल आहेत, भावंड आहेत याचा विचार जिवंतपणात शोक व्यक्त करणार्‍यांना का करता आला नाही? मुख्यमंत्री फडणवीसांच्या अपघातानंतर महाराष्ट्रभरातून ज्या प्रतिक्रिया पहावयास मिळाल्या. त्या महाराष्ट्राच्या विचारसरणीच्या नक्कीच नव्हत्या. होय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले, होय त्यांनी केवळ मुंगेरीलालचे स्वप्न दाखवले, होय कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे हाल जैसे थे आहेत. परंतु याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना मरणाच्या दारात पाहणे असे होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्य-कर्माला एक वेळेस मरणाच्या दारात पाहितलं तर तो महाराष्ट्राचा अभिमान असेल, राजकारणाचा एक भाग असेल. राजकीय विचाराचा एक ध्रूवीकिरण असेल. परंतु ज्या उद्देशाने आणि ज्या भावनेने सोशल नेटवर्किंग मीडियावर टोळधाड यावी आणि लचके तोडावेत, हा जो प्रकार निबर सह्याद्रीला मान झुकवणारा म्हणावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर, कर्तव्य कर्मावर भाष्य करणं एक वेळेस आम्ही समजू शकू, परंतु शाहू-फुले-आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दुसर्‍याचं मरण आजपर्यंत कोणीच चितलं नाही. ते या वेळेस पहायला मिळालं. आजपर्यंत कुठल्याही नेत्याबाबत अशा प्रतिक्रिया गेल्या २० वर्षांच्या कालखंडात आम्हास ऐकावयास मिळाल्या नाहीत. जेवढे प्रतिक्रिया देणारे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मरणावर टपणारे दोषी आहेत तेवढीच महाराष्ट्राची संस्कृती विटाळलीय का? हा जेंव्हा प्रश्‍न पडतो तेव्हा

फडणवीसांनीही विचार करावा

  असंही सांगावसं वाटतं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राजकारण्यांनी असं काही रयतेविरुद्ध केलं की ज्यामुळे देशात रणकंद माजलं, आणीबाणीची वेळ आली, अशा नेतृत्वाविरोधात, अशा नेत्यांविरोधात आणि सत्ताधीशांविरोधात देशभरात बंडाचं निशाण फडकवलं गेलं. मोर्चे काढण्यात आले, आंदोलन केले गेले. जेलभरो झाले, उपोषणं झालं, लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या आणि छात्यांवर गोळ्याही खाल्ल्या. कुठं-कुठं प्रशासनाने रयतेच्या पाठीतही गोळ्या घातल्या, तेव्हाही रयतेने आपलं नेतृत्व सत्ताधीश यांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त केला नाही किंवा त्यांच्या मरणाची वाट पहायली नाही. स्वातंत्र्याच्या सत्तरीत महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्याबाबत बोलताना फक्त देशातून असं लिहिलं, गांधींनी गडबड करायला नको होती, आणखी दोन-चार महिने गांधी शांत बसले असते तर जिना त्यांच्या मरणानी मेले असते, या व्यतिरिक्त राजकारणामध्ये आजपर्यंत तरी कुठल्या सत्ताधीशाविरोधात रयतेने मरणाची वाट पाहितल्याचं ज्ञात नाही. इंदिराजींची आणीबाणी आठवा आणि त्यांची हत्या झाल्यानंतर देशातली परिस्थिती आठवा, असे कित्येक उदाहरणे याठिकाणी देता येतील. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या बाबतच महाराष्ट्रामधून तुम्ही जिवंत असल्याचा शोक व्यक्त होतोय. तेव्हा फडणवीस तुमचं कुठंं चुकतय का? याचा विचार होणेही गरजेचं आहे. शासन-प्रशासन व्यवस्थेतील प्रशासन व्यवस्था ही रयतेची कोंडी करत असेल तर शासन व्यवस्थेतील नेतृत्वाने ती कोंडी तोडणं त्यांचं आद्यकर्तव्य असतं, असं यशवंतरावांनी स्पष्टपणे सांगितलय. राजकारण करताना छक्केपंजे, गनिमी कावे, आश्‍वासने आणि योग्य वेळेचे निर्णय याला जेवढं महत्त्व आहे तेवढच महत्त्व लोकांच्या प्रश्‍नालाही राजकारणात सत्ताधिशांनी द्यायला हवं. बहुदा फडणवीस लोकांच्या प्रश्‍नाला महत्त्व देण्यासाठी ज्या अभ्यासाची आणि वेळेची महती सांगत फिरतात त्याचीच ही प्रतिक्रिया आहे का याचा विचार होणेही गरजेचं आहे.


साय दै रिपोर्टर मधील आज २८ मे रविवार अग्रलेख

Sunday, 21 May 2017

त्या वड्यावगळीच्या पैदासीचा बाप कोण ?

तिडक्याचं किडकं  मस्तक आधी ठेचा 
गणेश सावंत-9422742810
        जिथं स्वाभिमान नावाची चिज नव्हती, पारतंत्र्यात राहा, केवळ आणि केवळ मुजरे घालण्यातच धन्यता मानली जात होती. अन्याय, अत्याचार सहन करणं हे अंगवळणी पडलं होतं. लाज-लज्जा, शरम नाकाला गुंडाळली गेली होती. माणसासारखे माणूस असून जनावरांसारखं जिनं जगावं लागत होतं. इज्जत काय असते, अब्रू कशाला म्हणतात हे स्मरणापलिकडे गेलं होतं. अशा वेळी माझ्या माणसांना इज्जत अब्रू मिळावी, त्याच्यातला स्वाभिमान जागृत व्हावा, त्याला लाज-लज्जा, शरम असावी आणि तो स्वातंत्र्याच्या जगामध्ये निर्भयपणे मिरावा याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलं. रात्रीचा दिवस करत महाराष्ट्राच्या गावागावात स्वातंत्र्य पोहचविलं, तेव्हा कुठं महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्यांना सह्याद्रीसारख्या निधड्या छात्या आल्या, स्वाभिमान आला, स्वकर्तृत्व आलं, नेतृत्व करण्याची उर्मी आली. छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं, स्वाभिमान जागृत करत केला, धैर्य ठेवून संघर्ष केल्यानंतर यशाची पताका फडकवता येते, हे जाज्वल्य उदाहरण स्वत:च्या उभारल्या गेलेल्या स्वराज्यातून उभ्या महाराष्ट्राला नव्हे जगाला दाखवून दिले. छत्रपतींचा इतिहास कुठल्या एका जातीचा, धर्माचा अथवा पंथाचा नाही. त्यामुळे छत्रपती हे फक्त मराठ्यांचेच आहेत हे म्हणणेही तेवढेच चुकीचे. अवघ्या जगाने छत्रपतींच्या स्वराज्याची, त्यांच्या कर्तव्य कर्माची, अर्थव्यवस्थेची, जलसंधारणाची, युद्धनितीची आणि स्वराज्यातल्या मावळ प्रांतात नेतृत्व करणार्‍यांपासून गोपनीवर पाखरं राखणार्‍यांच्या व्यवस्थेपर्यंतची दखल घेतली. छत्रपतींच्या इतिहासातूनच राज्य, देश आणि जगातले बहुतांशी देशही चालत आहेत. तेंव्हा राजेंना स्वत:च्या माणसांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी झगडावं लागलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा स्थितीत मोहिमेवर जावं लागलं. परंतु आज त्याच स्वातंत्र्याच्या स्वाभिमानात महाराष्ट्राच्याच मातीत जेंव्हा किड लागते तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकाला जाते. संतापून असल्या तिडक्या आणि किडक्या व्यक्तीच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही शिस्तीची, कायद्याची आणि परोपकारी असल्याने या संतापाला कायदेशीर मार्ग दाखवावा लागतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेली आजची लोकशाही आहे, इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून किडक्यांना संपवण्याची भाषा करता येत नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष दिला त्याच छत्रपतींच्या मातीत तिडक्यासारखी वड्यावगळीची पैदास जन्माला येते, हे महाराष्ट्राचं नव्हे तर त्याच्या माय-बापाचं दुर्दैव म्हणावं लागेल. शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी, परंतु या तिडक्याचं बिज नक्कीच किडकं म्हणूनच त्याच्या जिभेतून थेट छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याबाबत अपशब्द निघाले. अरे ज्या माणसाने स्वाभिमान जागृत केला, धैर्य काय असतं, संघर्ष काय असतो याची शिकवण दिली त्याच युगपुरुषाच्या बाबतीत बोलताना तुझी जिभ का झडली नाही? असं त्या विठ्ठल तिडकेला कानफटात देऊन विचारावंसं वाटतं. एक 

तिडके किडका निघाला 

म्हणून राज्यभरात एवढा संताप व्यक्त होताना दिसून येतो. तिडकेने जर आपली वड्यावगळीची पैदास आहे हे दाखवायचेच होते तर तो अन्य मार्गानेही दाखवू शकत होता, परंतु महाराष्ट्राच्या मातीत लोकशाहीच्या राज्यात ज्या प्रमाणे राजकीय पक्षांनी थोर-महात्म्यांना एखाद्या चौकटीत बसवून जात-पात-धर्म-पंथावर मताची भिक मागायला सुरुवात केली त्यातूनच तिडक्या सारख्या किडक्यांची पैदास एखाद्या नालीत अळ्यांनी वळवळ करावी, तशी वळवळ करताना दिसून येऊ लागले. आपण कोणाचे समर्थक आहोत याबाबत कोणाचचं दुमत असण्याचं कारण नाही. कोणी कोणाच्या विचारांवर प्रभावीत होऊन त्यांचं नेतृत्व स्वीकारावं याबाबतही कोणाला देणंघेणं नाही. लोकशाहीच्या राज्यात बोलण्याला आणि लिखाणाला स्वातंत्र्य असल्याने सोशल नेटवर्किंगमधून जो तो आपले मत व्यक्त करताना दिसून येतो. परंतु या वैयक्तिक मतांना काही ठिकाणी जातीची झालर लावली जाते. ती जातीची झालर मानव जातीला एखाद्या कॅन्सरप्रमाणे सडवित आहे हेच या किडक्या तिडकेच्या प्रकरणावरून उघडपणे स्पष्ट होताना दिसून येते. तिडके एखाद्या पक्षातील नेत्याच्या नेतृत्वाचं गुणगाण करताना, त्याचं समर्थन करताना, त्याच्या नेतृत्वाबद्दल कोणी वंगाळ बोललं म्हणून जर तिडके थेट महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोट उचलत असेल, त्याची जिभ चराचरा बोलत असेल तर तिडकेंसारख्या चराचरा बोलणार्‍या किडक्या जिभा आणि पोटात एक अन् ओठात एक ठेवणार्‍यांना आणि मस्तकात केवळ जात्यांध अळ्या वळवळ करणार्‍यांची मस्तके वेळीच ठेचली पाहिजेत. मग ती कायद्याच्या चौकटीत म्हणा अथवा भरचौकात म्हणा, तिडकेचा गुन्हा नव्हे तर तो महागुन्हा आहे. हे प्रकरण गेली दोन दिवस वार्‍यासारखं पसरत आहे. आज जणू जिल्ह्यात वणवा पेटला आहे, अशा स्थितीतही बीड जिल्ह्याचं म्हणा किंवा राज्याचं पोलिस प्रशासन त्या किडक्याला आणि सडक्याला अद्याप पकडू शकलं नाही. ज्या व्यक्तिच्या गरळीमुळे अवघ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, हे माहित असताना प्रशासन अद्याप याबाबत हरकतमध्ये येत नाही याचा अर्थ शासन आणि प्रशासन व्यवस्थेला बहुदा यावर प्रतिक्रिया काय उमटतात याची परीक्षा घ्यायची असेल तर तिडकेपेक्षा राज्यातलं भाजप सरकार तेवढच किडकं आणि सडकं आहे हे उघडबुद्धीने स्पष्टपणे आम्ही एवढ्यासाठीच मांडतोय. गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात तिडकेसारखा विठ्ठल नावाचा सडका गजाआड जायला हवा होता. परंतु असं झाल्याचं अद्यापपर्यंत पहावयास मिळालं नाही. तिडकेच्या संवादावरून सर्वत्र जो संताप आहे 

तो पराकोटीचा संताप 

जान-मालच्या नुकसानीतून व्यक्त झाला तरच तो संताप मोठा मानायचा, अशी जर राज्यकर्त्यांची भूमिका असेल तर ती महाराष्ट्राच्या संस्कार, संस्कृतीबरोबर सर्वसामान्य परवडणारी नाही आणि आज जो विषय सोशल नेटवर्किंग मीडियामुळे स्फोटक बनला आहे याला सोशल नेटवर्किंग मीडिया जेवढी जबाबदार आहे तेवढीच तिडके नावाच्या किडक्याच्या मेंदुतील सडकी मानसिकताही जबाबदार आहे आणि तिडकेसारख्या तरुणाच्या मस्तकात ही सडकी मानसिकता मग ती जातीची असो अथवा अन्य कुठली ती आलीच कुठून? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न. आम्ही कुठल्या एका जातीला अथवा एका पक्षाला समोर ठेवून बोलत नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जात-पात-धर्म-पंथाला घेऊन राजकारण केलं जातं, वेगवेगळ्या जातींना ग्रहीत धरून निवडणुकांमध्ये उतरविले जाते त्याचा परिणाम तिडक्यांसारख्या व्यक्तींच्या मस्तकामध्ये असले सडके विचार जन्म घेतात. राज्याच्या राजकारणावर बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा दबदबा आहे, हे स्वाभिमानाने सांगावसं वाटतं परंतु त्याच बीड जिल्ह्यात जातीच्या नावावर राजकारण होतं नव्हे नव्हे तर निवडणुका लढविल्या जातात, तेव्हा मात्र हा स्वाभिमान अपमानामध्ये बदलून जातं. राज्यकर्त्यांना निवडणूक लढवणार्‍यांना, पुढार्‍यांना, नेतृत्वांना पाच वर्षाच्या कालखंडासाठी, पाच वर्षांच्या सत्तेसाठी जातीची समिकरणे महत्त्वाची असतील, परंतु या जातीच्या समिकरणातून जर बापालाच कोणी शिव्या घालत असेल तर त्या पापाचे बाप हे राजकारणीच असतील हेही तेवढेच उघड सत्य आणि तिडकेच्या बाबतीतही हे त्रिवार सत्य. आजकाल महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना माझं ते खरं ह्या तोर्‍यामध्ये वावरण्याची जणू मस्तीच आली आहे. परंतु हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही खरं ते माझं अशी आहे, याचा विसर अशा लोकांना पडला म्हणूनच तिडकेसारख्याच्या तोंडातून असा सडका विषय निघाला. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसविण्यापेक्षा त्यांचे कर्तव्य-कर्म, त्यांचे धोरण लोकांपर्यंत न्यायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या त्या तिडकेचा कडेलोट तर व्हावाच परंतु तिडके ज्या पद्धतीने बोलतोय त्याला जे धारीष्ट आलय, ते कोणी दिलं नसलं तरी अशा पैदासींच्या धारीष्ट्याला कापण्याचं कामही राज्यकर्त्यांबरोबर जे नेतृत्व करतात त्यांनी आधी करावं. शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीत मराठेच नव्हे तर कुठल्याच जातीचा माणूस सहन करणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर नुकताच जन्मलेला नवजात बालकही जय म्हणतं, एवढी उर्मी त्या नावात आहे. ही केवळ त्यांच्या कर्तृत्व-कर्मामुळेच, याची जाण अवघ्या महाराष्ट्राला आहे. तिडकेच्या अटकेसाठी शिवप्रेमींनी बंद पुकारलाय. उद्या बीड जिल्हा बंद असणार आहे अन् नक्कीच तो कडकडीत बंद राहील, परंतु या बंदच्या काळात आपल्याकडून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं म्हणण्याचं धाडस आमचंच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेतृत्वाचं अथवा नेत्याचं किंवा राज्यकर्त्यांचं असेल, असंही आम्हाला वाटत नाही कारण विषय तेवढा गंभीर आहे. परंतु तरीही महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता कुठल्या एका जातीपूर्ती मर्यादीत नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या धर्माचा गर्व करावा, परंतु दुसर्‍याच्या धर्माचा अनादर, दुसर्‍याच्या जातीचा अनादर कोणीही करू नये एवढे यावेळी सांगावेसे वाटते आणि थेट बीड जिल्हा पोलिस प्रशासनासह महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आम्ही उघडपणे आणि ठणकावून सांगतो, काहीही करा, आकाश-पाताळ एक करा, जमीन खोदा वा आणखी काय करा परंतु विठ्ठल तिडके नावाचा किडका आणि त्याचा सडका मस्तक आधी ठेचा. उद्याची नुसती ठिणगी आहे आणि हा वणवा कधी पेटेल, भडकेल आणि उभ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल हे सांगता येणार नाही त्यामुळे हातावर हात ठेवून बसू नका, काय होतय ते बघू नका, तात्काळ हरकतमध्ये या आणि तिडकेच्या मुसक्या बांधा...... 

साय दै बीड रिपोर्टर मधील आजचा २१ मे रविवार अग्रलेख
http://beedreporter.net/

Sunday, 14 May 2017

आई गं...

आई गं...


-गणेश सावंत- 9422742810



पळताना ठेस लागो अथवा साधं नख काढताना जिभाळी लागो, तोंडात आई गं... आल्याशिवाय राहत नाही. दु:खाचा डोंगर जेंव्हा केव्हा कोसळतो तेव्हा माईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आई हे असे व्यक्तिमत्त्व आहे जे शब्दात सांगणं कठीण आहे. आईची व्याप्ती, आईचा महिमा, आईचे वात्सल्य, प्रेम, ममता हे कुठं ग्रंथात मांडणंही कठीण आहे. कारण तिच्या वात्सल्य, प्रेम, ममतेत अवघे विश्‍व सामावलेले आहे. जेवढं वात्सल्य, प्रेम तेवढाच रांगडेपणा, तेवढाच भविष्याचा वेध घेण्याची कला त्या मातेमध्ये सातत्याने पहावयास मिळते. आई जेंव्हा आई होते तेव्हा स्त्रीला तीन जन्म घ्यावे लागतात. जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या आईच्या पोटी जन्म घेते तेव्हा तिचा भूतलावरचा पहिला जन्म, जेंव्हा ही मुलगी मोठी होते विवाह योग्य होते, आपल्या आईला सोडून जाते, विवाह करते त्या वेळेस तिचा दुसरा जन्म असतो आणि जेंव्हा प्रत्यक्षात ति आई होते तेव्हा तिचा तिसरा जन्म होतो. एका २० वर्षाच्या कालखंडात एखाद्या स्त्रीला जेव्हा तिन जन्म घ्यावे लागतात तेव्हाच कुठे आई होण्याचं भाग्य तिच्या नशिबी येते.जेवढं तिचं भाग्य असतं तेवढच तिच्या पोटी जन्माला आलेले प्रत्येक स्त्री-पुरुषाचं परम भाग्य असतं की तिने स्वत:च्या तिन जन्मातून आपल्याला जन्माला घातलेलं आहे. परंतु आपण खरचं त्या आईचे आईपण किंवा तिचे तिन जन्म लक्षात ठेवतोत का?, उभ्या आयुष्यात आई मुलांना भरपूर देऊन जाते पण ती कधीच रिती होत नाही. तिच्याकडे प्रेम, वात्सल्य, ममता गच्च भरलेलं असतं. या तिन्हीही शब्दातील मायेची श्रीमंती तिच्याकडे ओसंडून वाहत असते. ति सातत्याने सागरासारखी समृद्ध असते. कसं जमत असेल हो जगभरातील मातांना, कुठली ऊर्जा मिळत असेल त्यांना, आई कुठल्याही राज्यात असो, प्रदेशात असो, देशात असो, गावात असो की शहरात असो, झोपडीत असो की महालात असो, कुठल्याही जाती-धर्मात असो तरी तिचं प्रेम हे सारखच कसं असतं हो. जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही, कोणत्याही सिमांना, बांधांना ती अडखडत नाही. जगभरातील आयांची भाषा सारखीच कशी असते हो, तिच्या स्पर्शाचं वात्सल्य सारखच कसं? हे सर्व बारकाईने पाहितलं तर त्याचं उत्तर मिळणं आयांच्या पोटी जन्म घेतलेल्यांना अद्यापतरी सोपं झालेलं नाही. ज्या प्रश्‍नाचं उत्तरच मिळत नाही, ज्या आईच्या प्रेम, वात्सल्य आणि ममतेचं धोरणच अकलनापेक्षा पुढचं असेल तर मग ती आई आणि तिचं हृदय किती प्रेमळ असेल. आई म्हणताच पाषाणालाही पाझर फुटतो, आईच्या कुशीमध्ये विसावल्यानंतर अवघ्या जगाचं दु:ख विरुळून जातं, आईच्या दुधानेच तुमच्या आणि माझ्या कर्तृत्व कर्माची पताका फडकत असते. आपल्याकडे आईला अनन्यसाधारण महत्व आहे. जगाच्या पाठीवर आईच्या व्याख्या अनेकांनी मांडल्या, कोणी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,’ असं म्हटलं तर साने गुरुजींची आई घराघरात जाऊन पोहचली. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या विज्ञानाच्या युगात जगाच्या पाठीवर सर्वकाही मिळेल परंतु आई मिळणार नाही हे त्रिवार सत्य असले तरी जगातली सर्वात श्रीमंत असणार्‍या आईला किंमत दिली जाते का हो, बिचारी आई घरामध्ये असते, घरातला वंशाचा दिवा टेंभा म्हणून मिरवत असतो. शाळेतून, कॉलेजातून येईल, दफ्तर तसच घरामध्ये फेकून देईल, कपडे कुठे तरी फेकून देईल, आई ओरडेन, ‘बाळा जेवण कर,’ हा ऐकून न ऐकल्यासारखं करेल. पुन्हा आई आवाज देईल, हा काहीतरी खटाटोप करत बसेल, आई जवळ येईल. त्या दिवट्याच्या डोक्यावरून हात फिरवील, बळजबरीने जेवायला बोलवील, हा वंशाचा दिवा दोन घास खाईल, पण त्यातही आईने बनवलेल्या स्वयंपाकातल्या त्रुटी काढीन, आईला त्याचा राग येणार नाही, परंतु लेकरु जेवलं याचा तिला परमानंद होईल. लाडाची लेक येते, ती आरशासमोर उभा राहते, टेप रेकॉर्डरवर गाणं चालू असतं, लाडाची लेक त्या गाण्यामध्ये धूंद असते, लेकीला दोन घास खाऊ घालावे यासाठी आई खटाटोप करत असते, लेक मात्र आईशी तुसड्यापणाने वागते, तरीही आई तिला जेऊ घालतेच. मग आई म्हणणार्‍या या बाईचा नवरा घरी येतो. मटनाच्या बोट्या शिजवायला सांगतो, थोडसं मिठ कमी पडलेलं असतं, दिवसभर राबराब राबून तिने संध्याकाळचा स्वयंपाक केलेला असतो, बाईचा नवरा असलेला हा तिच्या आईपणाकडे लक्ष देत नाही. सरळ तिला नाव ठेवून मोकळा होतो. ती बिचारी कसंबसं दोन लेकरांना आणि कुंकवाच्या धन्याला पोटभर मिळावं यासाठी प्रयत्न करत असते. मग घरामध्ये असो, अथवा नसो ती काटकसर करेल, स्वत:चं पोट मारेल परंतु आपल्या लेकरांना पोटभर घालेल, अशी ती माय. काय सांगावं, काय वर्णावं, काय बोलावं, आई आणि तिच्या ममता, वात्सल्य, प्रेमाबद्दल? जगाच्या पाठीवर असं कुठलच विद्यापीठ नसेल आणि असा कुठलाच कुलपती नसेल की त्या विद्यापीठामध्ये तो आपलं आयुष्य जगण्यात अपयशी झाला आहे. आई हे चालते-बोलते विद्यापीठ आहे. आई ही कुलपती आहे, आई ही जन्मदात्री आहे. आई माय हिचे तुमच्या-आमच्यावर अनंत उपकार आहेत. तरीही घराघरांमध्ये आईची अवहेलना सुरुच आहे. संताप येतो त्या दिवट्यांचा, संताप येतो त्या लेकींचा ज्या आईच्या पोटी जन्मल्या आणि म्हातारपणी त्याच आईला विसरले. आज २१ वे शतक आहे. जग मंगळावर, चंद्रावर चाललं. लोक चंद्र-तारे स्पर्श करू लागले. प्रत्येकाला प्रचंड भौतिक सुख मिळू लागलं, आनंद ही आनंद गडे जिकडे -तिकडे चोहीकडे, असे असताना जिकडे तिकडे आयांच्या आणि मायांच्या डोळ्यात अश्रूही आणू लागले. दुर्दैव याचं वाटतं, संस्कार आणि संस्कृतीचा अक्षरश: खजिना म्हणून ज्या भारत देशाकडे पाहितलं जातं त्याच भारत देशामध्ये वृद्धांचे आश्रमे वाढत आहेत. जिथं प्रेम आहे, वात्सल्य आहे, ममता आहे तिथच वृद्धाश्रमांसारखे मसनवाटेही मोठमोठे होत आहेत. ज्या आईने पदराखाली घेऊन दूध पाजलं, पाऊस लागेल म्हणून स्वत: पावसात भिजली परंतु लेकराला पाऊस लागू दिला नाही, स्वत: उन्हात उभी राहिली, डोक्यावर कडाक्याचं ऊन घेतलं पण लेकराला स्वत:च्या सावलीत विसावा दिला. स्वत: चार ठिगळ्याचं लुगडं घातलं परंतु काहीही करून शाळेचा गणवेश लेकराला दिला. चार दारची भांडीकोंडी केली, शेतापोता बराशी खांदल्या, घामाचं रक्त ओकलं, रातच्याला पाणी पिऊन झोपली, परंतु लेकरांच्या शाळेची, महाविद्यालयाची फि भरली. हेच पोरगं मोठं झालं, नोकरीला लागलं, त्याचं लग्न झालं, आता त्या आईचे, त्या माईचे कष्टाचे दिवस संपले. चार घास सुखाचे खाईल, राणीसारखी राहिल, असं तिलाही वाटलं परंतु नाही घरात आलेल्या सुनेने दिवट्या मुलाला सांगितले, उचला या खद्रावळीला आणि नेऊन टाका आश्रमात. हाही बहाद्दर उठला, बिचार्‍या म्हातार्‍या आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. काही वेळ आईला संताप आला, मात्र आई ती आई असते, वृद्धाश्रमात जात असताना आई त्या दिवट्याला म्हणाली, सांभाळून जा, घरी जाऊन सुनबाईला बोलू नकोस, सुखाने संसार कर, माझी काही काळजी करू नकोस. आता काय पिकलं पान आज ना उद्या गळणारच, तुला उभा आयुष्य पडलय. माझी काळजी सोडून दे. काय म्हणावं या मातेच्या हृदयाला आणि तिच्या हृदयात असलेल्या सागरापेक्षाही मोठ्या दयेला. आज मातृदिन आहे म्हणून आईचा महिमा वर्णवावा, असं वाटलं, परंतु दोन बोटाच्या जागेत आणि एका कांडीत चार कागदात आईचा महिमा वर्णवणं अशक्य आहे. आई ही आईच. तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिची ममता जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात, रुपयात, पैशात, सोन्यात, नाण्यात, हिरे जवाहारात तोलूनही मिळणार नाही. दुर्दैव याचं वाटतं, आम्ही ग्रामीण भागासह शहरी भागात पाहतो, जे सुशिक्षित म्हणून टेंभा मिरवतात, ज्यांच्याकडे खायला पोटभर असते अशा लोकांच्या घरी आई-बापांना चार-चार मुलं असतात, म्हातारे झालेले असतात परंतु म्हातारे आई-बाप कोणी सांभाळायचे? यावर त्या चौघात वाद होतात. बाप एकाने सांभाळायचा, माय दुसर्‍याने सांभाळायची त्यातही त्यांना महिने वाटून दिलेले. माय-बापाच्या वाट्याला जी थोडीफार संपत्ती आलेली असते ती ज्याच्याकडे असेल एक तर त्यानेच सर्व काही करायचं, तोही बोट मोडतोच, त्याची बाईलीही दातखिळी बसवतेच. काय ही अवहेलना! जेव्हा म्हातार्‍या आई-बापांना लेकरांची गरज असते, मानसिक आधाराची गरज असते, तेव्हाच म्हातार्‍या आई-बापांची ताटातूट केली जाते. चित्रपटांमध्ये आणि कथांमध्ये म्हातार्‍या आई-बापांच्या व्यथा पाहताना आणि वाचताना डोळ्यांचे काठ समाजासाठी ओलावणारे दिवटेही दिसून येतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील नायकांचा नायक अभिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आहे ‘बागबान’ हा चित्रपट पाहताना फ्लॅटसिस्टम संस्कृतीतलं जोडपं अक्षरश: मुसूमुसू रडतं. चित्रपट संपल्यावर पोटभरून खातं, त्या फ्लॅट संस्कृतीतल्या जोडप्यातल्या दिवट्याला आई-बापाची काही काळ आठवणही येत असेल परंतु सकाळ उजळली की पुन्हा जशाला तसं राहतं. श्रीमंतांच्या, पैशावाल्यांच्या, नोकरदारांच्या आणि ज्यांना चार-चार मुलं आहेत अशांच्या म्हातार्‍या आई-बापांना जेव्हा वृद्धाश्रमात जायची वेळ येत असेल तेव्हा त्यांना काय वाटत असेल? पण तरीही तरीही माय आपल्या लेकराचं भलच जाणते. अजून वेळ गेलेली नाही, या देशामध्ये आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये औषधालाही वृद्धाश्रम नकोय. वृद्धाश्रमाचा शब्दही कानी पडला तर त्याची चिड प्रत्येकाला यावी. ज्या आई-बापाने उभं आयुष्य चंदनासारखं झिजवून आपल्या लेकाला - लेकीला समाजात चालणं-बोलणं शिकवलं, त्याचं भविष्य घडवलं त्या लेकराने मरेपर्यंत आई- बापांची सेवा करणं हेच आपलं ध्येय समजायला हवं. जिवंतपणी आई-बापांची हालअपेष्टा करायची आणि मेल्यानंतर पिंडदानाच्या नावााखाली उधळपट्टी करायची, देव हा पहायचा असेल तर आईच्या डोळ्यात पहा, तिच्या हृदयात पहा, तिच्या कष्टात पहा, तिच्या ममतेत पहा, तिच्या वात्सल्यात पहा, तिच्या त्यागात पहा. प्रेमाची श्रीमंताची ओसंडून वाहताना दिसेल

साय दै बीड रिपोर्टर मधील आजचा रविवार १४ मे चा अग्रलेख

Thursday, 11 May 2017

रावसाहेब दानवेंचं डोकं फिरलंय.... आधीच मर्कट! त्यात मद्य प्याला!!

लोकांपेक्षा, सत्तेपेक्षा, पक्षापेक्षा माणूस स्वत:ला मोठा 
समजू लागला की त्याचा रावसाहेब दानवे होतो

रावसाहेब दानवेंचं डोकं फिरलंय
आधीच मर्कट! त्यात मद्य प्याला!!


विशेष संपादकीय
गणेश सावंत

का असे हे भेटती मज भेटणारे| षंढ निघती मर्द सारे भासणारे॥
काल ते ओकून ऐशी आग गेले| आज ते विझले निखारे पेयनारे॥
मी कसा विश्‍वास ठेवू या घडीचा| दुत शांतीचे सुरात खुपसणारे॥
ते कसे भुंकून गेले आज येथे| हेच ते होते करुना भाकणारे॥
दिवसही गेलेच सारे फुकट आता| निसटले होते गळाला लागणारे॥
काल ते घडलेच काही वेगळेसे| नेमके उघडेच पडले झाकणारे॥

सिंधुदूर्गचे कवी संतोष कसवनकर यांच्या कवीतेतले हे बोल तंतोतंत सत्तेची नशा आणि मस्ती अंगात भिनलेल्या राज्यकर्त्या भाजप नेत्यांच्या बेताल बडबडीवर बसतात. कालपर्यंत ज्यांच्याकडे मर्द म्हणून पाहितलं गेलं ते बेताल बडबडीचे षंढ निघाले. जे लोक चांगल्यासाठी झगडतात असे वाटत होते ते स्वत:साठी झगडतात हे दिसून आले. ज्यांच्याकडे चंदन म्हणून पाहितलं, ज्यांना या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने निवडणूकांमध्ये डोक्यावर घेतलं, तेच विस्तव निघाले.  वाटलं होतं अच्छे दिन येतील. पदरा खाली घेवून हे लोक पाजतील. परंतू हे अस्तीनातले निखारेच नव्हे तर साप निघाले. महाराष्ट्रामध्ये आणि देशा
मध्ये भाजपाची सत्ता आहे. जेव्हापासून भाजपाकडे सत्ता आली आहे तेव्हापासून भाजपाचे पदाधिकारी आमदार, खासदार आणि मंत्री, सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी शेतमजूर यांना बटीक मानू पाहत आहेत. शेतकर्‍यांबरोबर सैनिकांचा घोर अपमान करत आहेत. सिमेवर लढणार्‍या सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे तर अक्षरश: दानव बनून शेतकर्‍यांच्या अब्रूचे धिंडवडे काढत आहेत. कधी म्हणतायत शेतकरी आत्महत्या करणार नाही असे लेखी द्या, तेव्हा कर्जमाफी करू तर कधी म्हणतायत साल्यांचं रडगाणं सुरूच आहे. शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना बटीक समजून शिव्या घालणार्‍या रावसाहेब दानवेंना बहूदा सत्तेचा माज चढला असावा. म्हणूनच असा बेताल बडबडीचा परिपाठ त्यांनी कायम ठेवलाय. जेव्हा स्वत:ला माणूस लोकांपेक्षा, सत्तेपेक्षा, पक्षापेक्षा मोठा समजतो तेव्हा त्याचा रावसाहेब दानवेच होतो. रावसाहेब दानवेंचं डोकं ठिकाणावर आहे काय? असा सवाल विचारण्यापेक्षा रावसाहेब दानवेंचं डोकं ठिकाणावर नाही. आधीच मरकट, त्यात मद्य प्याला असं एका वाक्यात रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घ्यावासा वाटतो. रावसाहेब दानवेंनी तुर खरेदीबाबत काल जे वक्तव्य केलं ते प्रचंड संतापजनक, बाजरी, कापूस, ऊस, तूर याचा आता विषय बंद करायचा. सर्वात जास्त तूर आम्ही खरेदी केली. आम्हीच सर्वात जास्त अनुदान दिलं असं म्हणत साले तरीही रडतातच असं वक्तव्य दानवेंचं होतं. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची म्हणण्यापेक्षा भाजपाच्या नेत्यांची जाहीर वक्तव्य एकापेक्षा एक धक्कादायक ठरत आहेत. त्यांची वक्तव्ये अशी होवू लागलीयत की इतकी वर्षे ज्या नेत्यांचे मार्गदर्शन म्हणून आपण चार गोष्टी ऐकायचोत, ते व्यासपिठावर जे बोलत होते ते त्यांचे खरे विचार होते की आज त्यांनी जे वक्तव्य केले हे त्यांचे खरे विचार आहेत हेच समजायला मार्ग नाही. हा संभ्रम जनतेच्या मनात उघडपणे दिसून येतो. परंतू ज्यांनी राजकारण्यांना जवळून बघितलं आहे, त्यांना उघडपणे हे लक्षात येतं. राजकारणी व्यासपिठावर एक बोलत असतात, बैठकीत एक बोलत असतात आणि खाजगीत तर अक्षरश: लोकांच्या अब्रूपर्यंत जात असतात. त्यांना वेडगाळात काढत असतात. तेच धोरण दानवेंचं यावेळेस पहायला मिळालं. रावसाहेब दानवे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तूर खरेदीबाबत साले रडतायत असं म्हणून शेतकर्‍यांची अवहेलना करतायत, परंतू सत्तेचा आणि पैशाचा माज असलेल्या अशा माणसांना हे माहित नाही, जय जवान| जय किसान बरोबर जय विज्ञान| चा नारा भाजपाचेच माजी पंतप्रधान तथा आजाद शत्रू अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला होता. त्यांच्या या नार्‍यातून शेतकरी सैनिक आणि नव्या युगाचा आदर होता. परंतू दोन दिवसात अन् कोल्हं उसात असल्यागत दानवे ज्या पद्धतीने भाष्य करतात ते भाष्य भाजपाचंच आहे का? की महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलाय. त्याच्या घरामध्ये अठराविश्‍व दारिद्य्राय, दुष्काळाच्या भयाव कालखंडातून जाणार्‍या या शेतकर्‍याच्या घरात उंदरं खेळतायत ते आपला प्रतिकार करू शकत नाहीत, आपण जे काही बोलू ते सहन करू शकतायत. म्हणून जर दानवे असं बोलत असतील तर तो त्यांचा शहाणपणा नव्हेच नव्हे, मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे आम्ही ती सातत्याने लिहित असतो. 
वाहग पडला वाळी, केल्डा दाखवता नाळी
जंगलाचा राजा सिंह जेव्हा शिकार्‍याच्या पिंजर्‍यात अडकला जातो, तेव्हा जंगलातलं शूद्र माकडही त्या पिंजर्‍याजवळ जातं अन् स्वत:चं जनेंद्रीय हलवून त्या सिंहाची अवहेलना करतं असा या मालवनी ‘म्हणी’चा अर्थ आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकरी राजाकडे पाहितलं जातं तो दुष्काळाच्या आणि शासन, प्रशासन व्यवस्थारूपी शिकार्‍याच्या पिंजर्‍यात अडकलाय म्हणूनच सत्तेतील मस्तीतले लोक आज या पिंजर्‍यापुढे येवून अशी शिवीगाळ करतायत. त्यांना साले म्हणतायत, त्यांच्या आत्महत्येची अवहेलना करतायत, सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत. परंतू दानवे साहेब राजा तो राजा असतो याचा विसर बहूदा तुम्हाला पडला असावा. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने तुमच्या स्वप्नाळू भाषणाला आणि अच्छे दिनच्या गुहारला भुरळून गेले, तुम्हाला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तख्तावर बसवलं त्याची ही परतफेड असेल तर हेच शेतकरी कष्टकरी, कामगार, आणि शेतमजूर जेव्हा कमरेचं सोडून मस्तकी बांधतील तेव्हा सत्तेतल्या मस्तीवानाचा लंगोटही फिटल्याशिवाय राहणार नाही. काय चुक आहे शेतकर्‍यांची? त्यांनी तुरीचा पेरा जास्त केला, ही त्यांची चुक असेल तर तुम्हाला सत्ताधिश म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. अरे जेव्हा देश अडचणीत होता, या देशाला बाहेरून आयात केलेली तुरीची दाळ २०० रुपये किलोने घ्यावी लागत होती. त्याचवेळी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये बोलले देशातील शेतकर्‍यांना त्यांनी आवाहन केलं, शेतकर्‍यांनो तूर जास्तीत जास्त पेरा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्या, देश संकटातयं, देशातील लोकांना साधा वरण-भातही भाजप सरकारच्या काळात मिळणं मुश्किल झालंय, अशा वेळी मढे झाकून पेरणी करणारा माझा शेतकरी मायबाप देशाच्या मदतीला धावला. महाराष्ट्रासह देशभरात घामाचं रक्त ओकत शेतकर्‍यांनी धरणी माईच्या कुशीतून तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं. जेव्हा तूर ६०% पेक्षा जास्त उत्पादन होणार आहे याची माहिती कृषी विभागाने अनेक वेळा शासन प्रशासन व्यवस्थेला दिली, त्या परिस्थितीतही तुरीची आयात भाजप सरकारने केली आणि शेवटी शेतकर्‍यांच्या तुरीला हमीभावात खरेदी करण्यात सरकार जेव्हा कुचरायी करू लागलं तेव्हा शेतकर्‍यांनी सत्ताधिशांची आय माय काढली असती तर बरं झालं असतं असं आता वाटतंय. जेव्हा दानवे शेतकर्‍यांना साले म्हणतायत. शेतकर्‍यांना अंत पाहणे हे जर भाजप सरकारचं ब्रिद असेल तर जास्त दिवस लागणार नाहीत. शेतकर्‍यांच्या एका हातात रुमणं अन् दुसर्‍या हातात आसूड यायला. जेव्हा केव्हा शेतकर्‍यांनी एका हातात रुमणं अन् दुसर्‍या हातात आसूड घेतील तेव्हा कुठं कुठं ओरकांडे आणि वळ उमटतील हेही सांगणं कठीण होईल आणि तेव्हा 
माज आणि सूज
नक्कीच उतरेल. शेतकरी पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ देतो, हा जर त्यांचा गुन्हा असेल आणि त्यांच्या या गुन्ह्याला शिक्षा म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे साले म्हणून शिवी देत असतील तर जगद्गुरू संत तुकारामांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर 
देखोनी हरकली अंड| पुत्र झाला म्हणे रांड॥
तव तो झाला भांड| चाहाड चोर शिंधळ॥
असे म्हणण्याची वेळ, असे बेताल वक्तव्य करणार्‍या जननीवर आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही माती महाराष्ट्राची आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांची, डोंगर दर्‍यांची, माळ रानांची, मेहनतीची, निष्ठेची, त्यामुळे या ठिकाणी जननी या स्वाभिमानी आहेत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानाच्या श्रीमंतीत वावरतोय. दानवेंसारखे काही लोक पैशाच्या श्रीमंतीत वावरत असतील परंतू अखंड महाराष्ट्र हा आणि त्या अखंड महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर हा फक्त स्वाभिमानावर जीवंत आहे आणि त्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम सातत्याने होत असेल तर या महाराष्ट्रात अशा लोकांच्या जीभ हासाडण्यासाठी आग डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मरतायत, आत्महत्या करतायत, त्यांच्या भार्या पांढर्‍या कपाळाने चिल्यापिल्यांना जगवतायत. मरणार्‍यांच्या म्हतार्‍या मायबापांना कसं बसं पोसतायत. परंतू कोणाच्या घरात आणि दारात भिक मागायला जात नाहीत. याची जाणीव किंवा याची माहिती दानवेंना नसावी. म्हणूनच शेतकर्‍यांबाबत आणि त्यांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम रावसाहेब दानवेंसारखे प्रदेशाध्यक्ष करतायत. दुर्दैवं याचं वाटतं, दानवेंच्या या वक्तव्याचा समाचार अखंड महाराष्ट्र घेतोय परंतू काही दळभद्री आणि बुद्धीजवी मात्र दानवे खरे बोलले परंतू भाषा चुकली अशा पद्धतीने प्रतिक्रिया देवून त्यांचा पाठीराखापणा करत असतील तर अशा बुद्धीजीवींची किव नक्कीच करावीशी वाटते. अरे ज्या मागासपणाचा कलंक या मराठवाड्याला लागला आहे, त्या मराठवाड्याच्या वाडी वस्ती तांड्यावर जावून पाहा, तिथल्या शेतकर्‍यांचे कष्ट पाहा आणि मग बोला. दानवे बोलले ते खरे बोलले की खोटे बोलले, आजही शेतकर्‍यांच्या घरामध्ये तुर आहे. उद्या शेतकर्‍याला पेरा करण्यासाठी पैसा नाही, बि-भरणाला आणि खंतांना पैसे नाहीत. अशा स्थितीत शिवराळ शिव्यागाळीने शेतकर्‍यांची बोळवण होत असेल तर अशांना महाराष्ट्र माफ करणार नाही आणि शेतकर्‍यांचं देणं म्हणून आमच्या शब्दालाही शस्त्राची धार आल्याशिवाय राहणार नाही. सत्य ते सत्य, दानवेंनी स्वत:च्या पोराच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली त्यावेळी पैशाच्या जोरावर काम करणार्‍या लोकांना ज्या भाषेत बोलत होते त्याच भाषेत शेतकर्‍यांना बोलून पैशावाल्या बापजाद्यांची औलादी भाषा इथं महाराष्ट्र खपवून घेणार नाही. देशात आणि राज्यामध्ये विस्कटलेली घडी सुरळीत व्हावी या माफक अपेक्षेने जनतेने भाजपला भरघोष मताने निवडून दिले. तेव्हा निवडून देताना लोकांनी नक्कीच अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षाही योग्यच आहेत. लोकांच्या या अपेक्षा जर सत्ताधार्‍यांना आणि त्यांच्या पक्षाला वेडगळपणा आणि रडगाणे वाटत असेल तर आधी असं बोलणार्‍यांना भाजपाने बाजूला सारावं. शेतकर्‍यांना साले म्हणत दिवा लावणारे दानवे शेतीबद्दल काय बोलतील. या विशेष अग्रलेखामधला वरील फोटा पाहितला तर दानवेंची बुद्धी कुठपर्यंत आहे हे लक्षात येतं. अरे या महाराष्ट्रात आणि देशात जो व्यक्ती ज्याने काम करतो, ज्याच्यावर पोट असते त्याची पुजा करत असतो. परंतू एका भुमिपूजनाच्या कामात म्हणा किंवा एखाद्या खोलीकरणाच्या कामात म्हणा दानवेंना नारळ फोडायला बोलावलं, दानवे थेट त्या मशीनच्या बोकांडीवर बसून नारळ फोडून स्वत:मधली पात्रता दाखवून देतात, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करावी. परंतू बस्स सहनशिलतेचा अंत पाहू नका, शेतकर्‍यांची अवहेलना थांबवा, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवा, आणि असे बेताल बडबड करणार्‍यांना घराचा रस्ता दाखवा एवढंच सांगणं.