Sunday, 28 May 2017

छातीवर वार करणारे पाठ केंव्हापासून दाखवायलेत?




जिवंतपणावर शोक व्यक्त करणं 
महाराष्ट्राची संस्कृती नाही 



गणेश सावंत-९४२२७४२८१०

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला परवा - परवा लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यात गंभीर अपघात झाला. हेलिकॉप्टर उडालं आणि बाजुच्या खांबाला जाऊन धडकलं. खाली जमीनीवर येऊन पडलं, काही क्षण त्याठिकाणी धावपळ उडाली. स्फोट होण्याच्या भितीने जो तो जिव वाचवित पळत सुटला. शासन-प्रशासन व्यवस्थेतील अधिकारीही आपला जिव वाचविण्याच्या बेतात राहीले. असा तो यमाच्या दारातून परत येण्याचा प्रसंग देवेंद्र फडणविसांनी याची देही याची डोळा अनुभवला. दैव बलवत्तर म्हणून फडणवीस या अपघातातून बचावले. फडणवीसांनी भवानी मातेचे, विठ्ठलाचे आणि महाराष्ट्रातील अकरा कोटी पेक्षा जास्त जनतेचे आशिर्वाद कामी आल्याचे सांगितले. या अपघाताची माहिती अवघ्या काही क्षणात महाराष्ट्रातल्या गावागावांत जाऊन पोहचली. देशभरात आणि जगभरात देवेंद्र फडणवीसांच्या अपघाताची इत्यंभूत माहिती जात गेली. परंतु त्याचवेळी या पुरोगामी महाराष्ट्रात असं एक वावटळ निर्माण झालं जसं की, वाळवंटात एखादं जनावर मृतावस्थेत पडावं आणि कित्येक दिवसांपासून भुकेलेल्या गिधाडांना आपलं सावज मिळावं आणि गिधाडांचं टोलधाड त्या मृत जनावरावर तुटून पडावं, असंच काहीसं मुख्यमंत्री अपघातातून बचावले म्हणून सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या असंस्कृत आणि नेभळटांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या जिवंत असण्यावर शोक व्यक्त केला. ज्या महाराष्ट्रामध्ये संस्कार आणि संस्कृती सोबत नांदते, साधू-संत-सुफींची विचारधारा निखळ पांढर्‍यासारखी वाहते समाजसुधारकांचं ध्येय कणाकणात भिनलेलं असतं, शाहू-फुले-आंबेडकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा, दाखवलेला मार्ग डोळ्यात अंजन घालावा तसा कायम असतो. तरीही एखाद्याच्या जिवंतपणावर जेंव्हा महाराष्ट्राच्या मातीत शोक व्यक्त केला जातो आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मरणावर आनंदोत्सव साजरा करण्याची दिशा दाखवली जाते तेव्हा खरच जिवंतपणावर शोक व्यक्त करणारे महाराष्ट्राच्या मातीतच निपजलेले आहेत का हा प्रश्‍न विचारावासा वाटतो. महाराष्ट्राची माती ही निधड्या छातींना जन्माला घालणारी आहे. दुश्मनालाही चितपट करताना पाठीत वार करणारी महाराष्ट्राची माती नाही. महाराष्ट्राच्या मातीत जो जन्मतो तो

पाठीवर नाही तर छातीवर

वार करण्यासाठी आणि झेलण्यासाठी सातत्याने तत्पर असतो, मग त्याच मातीतली ही गरमी मुख्यमंत्र्यांच्या जिवंतपणावर शोक कसं काय व्यक्त करते? आणि या निलाजर्‍या पणाचं समर्थन तरी कसं करावं? म्हणूनच हा आजचा आमचा खटाटोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत निपजणार्‍यांना सांगून ठेवलय, धैर्य ठेवा, संघर्ष करा आणि यशाची पताका पडकवा. छत्रपतींनी पाठीत वार करण्याची शिकवण महाराष्ट्राच्या मातीला दिलेली नाही. देवेंद्र फडणवीसांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त करणं म्हणजे एखाद्याच्या पाठीत वार करण्यासारखं आहे. नक्कीच वैचारिक मतभेद असायला हवेत, वैचारिक शत्रुत्वही असायला हवं, मात्र हे मतभेद आणि शत्रुत्व निभावताना आचारसंहिता प्रत्येकाने प्रत्येकाला लावून ठेवायला हवी. ती आचारसंहिता महाराष्ट्राच्या मातीत निपजल्याची शुद्ध बिजापोटी जन्म घेतलेल्या आई-बापांच्या पोटची असते, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त करणं म्हणजे आपल्या कर्तृत्वाला गंज लागणे आणि आपल्या मस्तकात जणू अळ्या वळवळ करण्यासारखं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत, महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटतील ते विचारधारा संपुष्टात आल्यानंतर धनदांडगे आणि सत्ताधीशांची गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांकडे पाहण्याची दृष्टी जेव्हा बदलेल, तिचा जेव्हा अपघात होईल आणि ती दृष्टी जेव्हा यमसदनी जाईल तेव्हा बदल होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यातील रयतेचे नेतृत्व करत असले तरी त्यांना आई-बाप आहेत, पत्नी आहे, मुल आहेत, भावंड आहेत याचा विचार जिवंतपणात शोक व्यक्त करणार्‍यांना का करता आला नाही? मुख्यमंत्री फडणवीसांच्या अपघातानंतर महाराष्ट्रभरातून ज्या प्रतिक्रिया पहावयास मिळाल्या. त्या महाराष्ट्राच्या विचारसरणीच्या नक्कीच नव्हत्या. होय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले, होय त्यांनी केवळ मुंगेरीलालचे स्वप्न दाखवले, होय कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे हाल जैसे थे आहेत. परंतु याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना मरणाच्या दारात पाहणे असे होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्य-कर्माला एक वेळेस मरणाच्या दारात पाहितलं तर तो महाराष्ट्राचा अभिमान असेल, राजकारणाचा एक भाग असेल. राजकीय विचाराचा एक ध्रूवीकिरण असेल. परंतु ज्या उद्देशाने आणि ज्या भावनेने सोशल नेटवर्किंग मीडियावर टोळधाड यावी आणि लचके तोडावेत, हा जो प्रकार निबर सह्याद्रीला मान झुकवणारा म्हणावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर, कर्तव्य कर्मावर भाष्य करणं एक वेळेस आम्ही समजू शकू, परंतु शाहू-फुले-आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दुसर्‍याचं मरण आजपर्यंत कोणीच चितलं नाही. ते या वेळेस पहायला मिळालं. आजपर्यंत कुठल्याही नेत्याबाबत अशा प्रतिक्रिया गेल्या २० वर्षांच्या कालखंडात आम्हास ऐकावयास मिळाल्या नाहीत. जेवढे प्रतिक्रिया देणारे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मरणावर टपणारे दोषी आहेत तेवढीच महाराष्ट्राची संस्कृती विटाळलीय का? हा जेंव्हा प्रश्‍न पडतो तेव्हा

फडणवीसांनीही विचार करावा

  असंही सांगावसं वाटतं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राजकारण्यांनी असं काही रयतेविरुद्ध केलं की ज्यामुळे देशात रणकंद माजलं, आणीबाणीची वेळ आली, अशा नेतृत्वाविरोधात, अशा नेत्यांविरोधात आणि सत्ताधीशांविरोधात देशभरात बंडाचं निशाण फडकवलं गेलं. मोर्चे काढण्यात आले, आंदोलन केले गेले. जेलभरो झाले, उपोषणं झालं, लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या आणि छात्यांवर गोळ्याही खाल्ल्या. कुठं-कुठं प्रशासनाने रयतेच्या पाठीतही गोळ्या घातल्या, तेव्हाही रयतेने आपलं नेतृत्व सत्ताधीश यांच्या जिवंतपणावर शोक व्यक्त केला नाही किंवा त्यांच्या मरणाची वाट पहायली नाही. स्वातंत्र्याच्या सत्तरीत महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्याबाबत बोलताना फक्त देशातून असं लिहिलं, गांधींनी गडबड करायला नको होती, आणखी दोन-चार महिने गांधी शांत बसले असते तर जिना त्यांच्या मरणानी मेले असते, या व्यतिरिक्त राजकारणामध्ये आजपर्यंत तरी कुठल्या सत्ताधीशाविरोधात रयतेने मरणाची वाट पाहितल्याचं ज्ञात नाही. इंदिराजींची आणीबाणी आठवा आणि त्यांची हत्या झाल्यानंतर देशातली परिस्थिती आठवा, असे कित्येक उदाहरणे याठिकाणी देता येतील. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या बाबतच महाराष्ट्रामधून तुम्ही जिवंत असल्याचा शोक व्यक्त होतोय. तेव्हा फडणवीस तुमचं कुठंं चुकतय का? याचा विचार होणेही गरजेचं आहे. शासन-प्रशासन व्यवस्थेतील प्रशासन व्यवस्था ही रयतेची कोंडी करत असेल तर शासन व्यवस्थेतील नेतृत्वाने ती कोंडी तोडणं त्यांचं आद्यकर्तव्य असतं, असं यशवंतरावांनी स्पष्टपणे सांगितलय. राजकारण करताना छक्केपंजे, गनिमी कावे, आश्‍वासने आणि योग्य वेळेचे निर्णय याला जेवढं महत्त्व आहे तेवढच महत्त्व लोकांच्या प्रश्‍नालाही राजकारणात सत्ताधिशांनी द्यायला हवं. बहुदा फडणवीस लोकांच्या प्रश्‍नाला महत्त्व देण्यासाठी ज्या अभ्यासाची आणि वेळेची महती सांगत फिरतात त्याचीच ही प्रतिक्रिया आहे का याचा विचार होणेही गरजेचं आहे.


साय दै रिपोर्टर मधील आज २८ मे रविवार अग्रलेख

No comments:

Post a Comment