लोकांपेक्षा, सत्तेपेक्षा, पक्षापेक्षा माणूस स्वत:ला मोठा
समजू लागला की त्याचा रावसाहेब दानवे होतो
रावसाहेब दानवेंचं डोकं फिरलंय
आधीच मर्कट! त्यात मद्य प्याला!!
विशेष संपादकीय
गणेश सावंत
का असे हे भेटती मज भेटणारे| षंढ निघती मर्द सारे भासणारे॥
काल ते ओकून ऐशी आग गेले| आज ते विझले निखारे पेयनारे॥
मी कसा विश्वास ठेवू या घडीचा| दुत शांतीचे सुरात खुपसणारे॥
ते कसे भुंकून गेले आज येथे| हेच ते होते करुना भाकणारे॥
दिवसही गेलेच सारे फुकट आता| निसटले होते गळाला लागणारे॥
काल ते घडलेच काही वेगळेसे| नेमके उघडेच पडले झाकणारे॥
सिंधुदूर्गचे कवी संतोष कसवनकर यांच्या कवीतेतले हे बोल तंतोतंत सत्तेची नशा आणि मस्ती अंगात भिनलेल्या राज्यकर्त्या भाजप नेत्यांच्या बेताल बडबडीवर बसतात. कालपर्यंत ज्यांच्याकडे मर्द म्हणून पाहितलं गेलं ते बेताल बडबडीचे षंढ निघाले. जे लोक चांगल्यासाठी झगडतात असे वाटत होते ते स्वत:साठी झगडतात हे दिसून आले. ज्यांच्याकडे चंदन म्हणून पाहितलं, ज्यांना या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने निवडणूकांमध्ये डोक्यावर घेतलं, तेच विस्तव निघाले. वाटलं होतं अच्छे दिन येतील. पदरा खाली घेवून हे लोक पाजतील. परंतू हे अस्तीनातले निखारेच नव्हे तर साप निघाले. महाराष्ट्रामध्ये आणि देशा
मध्ये भाजपाची सत्ता आहे. जेव्हापासून भाजपाकडे सत्ता आली आहे तेव्हापासून भाजपाचे पदाधिकारी आमदार, खासदार आणि मंत्री, सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी शेतमजूर यांना बटीक मानू पाहत आहेत. शेतकर्यांबरोबर सैनिकांचा घोर अपमान करत आहेत. सिमेवर लढणार्या सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे तर अक्षरश: दानव बनून शेतकर्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढत आहेत. कधी म्हणतायत शेतकरी आत्महत्या करणार नाही असे लेखी द्या, तेव्हा कर्जमाफी करू तर कधी म्हणतायत साल्यांचं रडगाणं सुरूच आहे. शेतकर्यांना, कष्टकर्यांना बटीक समजून शिव्या घालणार्या रावसाहेब दानवेंना बहूदा सत्तेचा माज चढला असावा. म्हणूनच असा बेताल बडबडीचा परिपाठ त्यांनी कायम ठेवलाय. जेव्हा स्वत:ला माणूस लोकांपेक्षा, सत्तेपेक्षा, पक्षापेक्षा मोठा समजतो तेव्हा त्याचा रावसाहेब दानवेच होतो. रावसाहेब दानवेंचं डोकं ठिकाणावर आहे काय? असा सवाल विचारण्यापेक्षा रावसाहेब दानवेंचं डोकं ठिकाणावर नाही. आधीच मरकट, त्यात मद्य प्याला असं एका वाक्यात रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घ्यावासा वाटतो. रावसाहेब दानवेंनी तुर खरेदीबाबत काल जे वक्तव्य केलं ते प्रचंड संतापजनक, बाजरी, कापूस, ऊस, तूर याचा आता विषय बंद करायचा. सर्वात जास्त तूर आम्ही खरेदी केली. आम्हीच सर्वात जास्त अनुदान दिलं असं म्हणत साले तरीही रडतातच असं वक्तव्य दानवेंचं होतं. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची म्हणण्यापेक्षा भाजपाच्या नेत्यांची जाहीर वक्तव्य एकापेक्षा एक धक्कादायक ठरत आहेत. त्यांची वक्तव्ये अशी होवू लागलीयत की इतकी वर्षे ज्या नेत्यांचे मार्गदर्शन म्हणून आपण चार गोष्टी ऐकायचोत, ते व्यासपिठावर जे बोलत होते ते त्यांचे खरे विचार होते की आज त्यांनी जे वक्तव्य केले हे त्यांचे खरे विचार आहेत हेच समजायला मार्ग नाही. हा संभ्रम जनतेच्या मनात उघडपणे दिसून येतो. परंतू ज्यांनी राजकारण्यांना जवळून बघितलं आहे, त्यांना उघडपणे हे लक्षात येतं. राजकारणी व्यासपिठावर एक बोलत असतात, बैठकीत एक बोलत असतात आणि खाजगीत तर अक्षरश: लोकांच्या अब्रूपर्यंत जात असतात. त्यांना वेडगाळात काढत असतात. तेच धोरण दानवेंचं यावेळेस पहायला मिळालं. रावसाहेब दानवे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तूर खरेदीबाबत साले रडतायत असं म्हणून शेतकर्यांची अवहेलना करतायत, परंतू सत्तेचा आणि पैशाचा माज असलेल्या अशा माणसांना हे माहित नाही, जय जवान| जय किसान बरोबर जय विज्ञान| चा नारा भाजपाचेच माजी पंतप्रधान तथा आजाद शत्रू अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला होता. त्यांच्या या नार्यातून शेतकरी सैनिक आणि नव्या युगाचा आदर होता. परंतू दोन दिवसात अन् कोल्हं उसात असल्यागत दानवे ज्या पद्धतीने भाष्य करतात ते भाष्य भाजपाचंच आहे का? की महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलाय. त्याच्या घरामध्ये अठराविश्व दारिद्य्राय, दुष्काळाच्या भयाव कालखंडातून जाणार्या या शेतकर्याच्या घरात उंदरं खेळतायत ते आपला प्रतिकार करू शकत नाहीत, आपण जे काही बोलू ते सहन करू शकतायत. म्हणून जर दानवे असं बोलत असतील तर तो त्यांचा शहाणपणा नव्हेच नव्हे, मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे आम्ही ती सातत्याने लिहित असतो.
वाहग पडला वाळी, केल्डा दाखवता नाळी
जंगलाचा राजा सिंह जेव्हा शिकार्याच्या पिंजर्यात अडकला जातो, तेव्हा जंगलातलं शूद्र माकडही त्या पिंजर्याजवळ जातं अन् स्वत:चं जनेंद्रीय हलवून त्या सिंहाची अवहेलना करतं असा या मालवनी ‘म्हणी’चा अर्थ आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकरी राजाकडे पाहितलं जातं तो दुष्काळाच्या आणि शासन, प्रशासन व्यवस्थारूपी शिकार्याच्या पिंजर्यात अडकलाय म्हणूनच सत्तेतील मस्तीतले लोक आज या पिंजर्यापुढे येवून अशी शिवीगाळ करतायत. त्यांना साले म्हणतायत, त्यांच्या आत्महत्येची अवहेलना करतायत, सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत. परंतू दानवे साहेब राजा तो राजा असतो याचा विसर बहूदा तुम्हाला पडला असावा. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने तुमच्या स्वप्नाळू भाषणाला आणि अच्छे दिनच्या गुहारला भुरळून गेले, तुम्हाला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तख्तावर बसवलं त्याची ही परतफेड असेल तर हेच शेतकरी कष्टकरी, कामगार, आणि शेतमजूर जेव्हा कमरेचं सोडून मस्तकी बांधतील तेव्हा सत्तेतल्या मस्तीवानाचा लंगोटही फिटल्याशिवाय राहणार नाही. काय चुक आहे शेतकर्यांची? त्यांनी तुरीचा पेरा जास्त केला, ही त्यांची चुक असेल तर तुम्हाला सत्ताधिश म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. अरे जेव्हा देश अडचणीत होता, या देशाला बाहेरून आयात केलेली तुरीची दाळ २०० रुपये किलोने घ्यावी लागत होती. त्याचवेळी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये बोलले देशातील शेतकर्यांना त्यांनी आवाहन केलं, शेतकर्यांनो तूर जास्तीत जास्त पेरा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्या, देश संकटातयं, देशातील लोकांना साधा वरण-भातही भाजप सरकारच्या काळात मिळणं मुश्किल झालंय, अशा वेळी मढे झाकून पेरणी करणारा माझा शेतकरी मायबाप देशाच्या मदतीला धावला. महाराष्ट्रासह देशभरात घामाचं रक्त ओकत शेतकर्यांनी धरणी माईच्या कुशीतून तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं. जेव्हा तूर ६०% पेक्षा जास्त उत्पादन होणार आहे याची माहिती कृषी विभागाने अनेक वेळा शासन प्रशासन व्यवस्थेला दिली, त्या परिस्थितीतही तुरीची आयात भाजप सरकारने केली आणि शेवटी शेतकर्यांच्या तुरीला हमीभावात खरेदी करण्यात सरकार जेव्हा कुचरायी करू लागलं तेव्हा शेतकर्यांनी सत्ताधिशांची आय माय काढली असती तर बरं झालं असतं असं आता वाटतंय. जेव्हा दानवे शेतकर्यांना साले म्हणतायत. शेतकर्यांना अंत पाहणे हे जर भाजप सरकारचं ब्रिद असेल तर जास्त दिवस लागणार नाहीत. शेतकर्यांच्या एका हातात रुमणं अन् दुसर्या हातात आसूड यायला. जेव्हा केव्हा शेतकर्यांनी एका हातात रुमणं अन् दुसर्या हातात आसूड घेतील तेव्हा कुठं कुठं ओरकांडे आणि वळ उमटतील हेही सांगणं कठीण होईल आणि तेव्हा
माज आणि सूज
नक्कीच उतरेल. शेतकरी पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ देतो, हा जर त्यांचा गुन्हा असेल आणि त्यांच्या या गुन्ह्याला शिक्षा म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे साले म्हणून शिवी देत असतील तर जगद्गुरू संत तुकारामांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर
देखोनी हरकली अंड| पुत्र झाला म्हणे रांड॥
तव तो झाला भांड| चाहाड चोर शिंधळ॥
असे म्हणण्याची वेळ, असे बेताल वक्तव्य करणार्या जननीवर आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही माती महाराष्ट्राची आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांची, डोंगर दर्यांची, माळ रानांची, मेहनतीची, निष्ठेची, त्यामुळे या ठिकाणी जननी या स्वाभिमानी आहेत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानाच्या श्रीमंतीत वावरतोय. दानवेंसारखे काही लोक पैशाच्या श्रीमंतीत वावरत असतील परंतू अखंड महाराष्ट्र हा आणि त्या अखंड महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर हा फक्त स्वाभिमानावर जीवंत आहे आणि त्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम सातत्याने होत असेल तर या महाराष्ट्रात अशा लोकांच्या जीभ हासाडण्यासाठी आग डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मरतायत, आत्महत्या करतायत, त्यांच्या भार्या पांढर्या कपाळाने चिल्यापिल्यांना जगवतायत. मरणार्यांच्या म्हतार्या मायबापांना कसं बसं पोसतायत. परंतू कोणाच्या घरात आणि दारात भिक मागायला जात नाहीत. याची जाणीव किंवा याची माहिती दानवेंना नसावी. म्हणूनच शेतकर्यांबाबत आणि त्यांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम रावसाहेब दानवेंसारखे प्रदेशाध्यक्ष करतायत. दुर्दैवं याचं वाटतं, दानवेंच्या या वक्तव्याचा समाचार अखंड महाराष्ट्र घेतोय परंतू काही दळभद्री आणि बुद्धीजवी मात्र दानवे खरे बोलले परंतू भाषा चुकली अशा पद्धतीने प्रतिक्रिया देवून त्यांचा पाठीराखापणा करत असतील तर अशा बुद्धीजीवींची किव नक्कीच करावीशी वाटते. अरे ज्या मागासपणाचा कलंक या मराठवाड्याला लागला आहे, त्या मराठवाड्याच्या वाडी वस्ती तांड्यावर जावून पाहा, तिथल्या शेतकर्यांचे कष्ट पाहा आणि मग बोला. दानवे बोलले ते खरे बोलले की खोटे बोलले, आजही शेतकर्यांच्या घरामध्ये तुर आहे. उद्या शेतकर्याला पेरा करण्यासाठी पैसा नाही, बि-भरणाला आणि खंतांना पैसे नाहीत. अशा स्थितीत शिवराळ शिव्यागाळीने शेतकर्यांची बोळवण होत असेल तर अशांना महाराष्ट्र माफ करणार नाही आणि शेतकर्यांचं देणं म्हणून आमच्या शब्दालाही शस्त्राची धार आल्याशिवाय राहणार नाही. सत्य ते सत्य, दानवेंनी स्वत:च्या पोराच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली त्यावेळी पैशाच्या जोरावर काम करणार्या लोकांना ज्या भाषेत बोलत होते त्याच भाषेत शेतकर्यांना बोलून पैशावाल्या बापजाद्यांची औलादी भाषा इथं महाराष्ट्र खपवून घेणार नाही. देशात आणि राज्यामध्ये विस्कटलेली घडी सुरळीत व्हावी या माफक अपेक्षेने जनतेने भाजपला भरघोष मताने निवडून दिले. तेव्हा निवडून देताना लोकांनी नक्कीच अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षाही योग्यच आहेत. लोकांच्या या अपेक्षा जर सत्ताधार्यांना आणि त्यांच्या पक्षाला वेडगळपणा आणि रडगाणे वाटत असेल तर आधी असं बोलणार्यांना भाजपाने बाजूला सारावं. शेतकर्यांना साले म्हणत दिवा लावणारे दानवे शेतीबद्दल काय बोलतील. या विशेष अग्रलेखामधला वरील फोटा पाहितला तर दानवेंची बुद्धी कुठपर्यंत आहे हे लक्षात येतं. अरे या महाराष्ट्रात आणि देशात जो व्यक्ती ज्याने काम करतो, ज्याच्यावर पोट असते त्याची पुजा करत असतो. परंतू एका भुमिपूजनाच्या कामात म्हणा किंवा एखाद्या खोलीकरणाच्या कामात म्हणा दानवेंना नारळ फोडायला बोलावलं, दानवे थेट त्या मशीनच्या बोकांडीवर बसून नारळ फोडून स्वत:मधली पात्रता दाखवून देतात, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करावी. परंतू बस्स सहनशिलतेचा अंत पाहू नका, शेतकर्यांची अवहेलना थांबवा, शेतकर्यांचे प्रश्न सोडवा, आणि असे बेताल बडबड करणार्यांना घराचा रस्ता दाखवा एवढंच सांगणं.
No comments:
Post a Comment