Thursday, 12 July 2018

पिटू भक्तीचा डांगोरा|कळी काळाशी दरारा॥

तुका म्हणे
-----

गणेश सावंत | रोखठोक 

मो.९४२२७४२८१०
------
महाराष्ट्राच्या मातीला रक्त पचवण नवं नाही आणि महाराष्ट्राच्या माणसालाही देशासाठी रक्त सांडण नवं नाही. शतका नु शतकापूर्वी इथं केवळ स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. कित्येक देह खर्ची पडले परंतू तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेच. तुमच्या आमच्या बाबदाद्यांनी गडकोटासाठी खडे पहारे दिले. केवळ आणि केवळ तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगता यावं, तुमच्यावर पारतंत्र्याची तलवार कोसळू नये म्हणूनच या महाराष्ट्राच्या नरवीरांनी स्वत:च्या देहाची अक्षरश: ढाल केली. आज तुम्ही आम्ही जो स्वातंत्र्याचा श्‍वास घेतोय तो कित्येक स्वाभिमानी नरदेहांच्या बलीदानामुळेच अन् आज तुम्ही आम्ही जो मुक्त संचार करतोय तो गणतंत्र आणि प्रजासत्ताकतेमुळेच हे सांगण्याची वेळ एवढ्यासाठीच येतेय. आज स्वातंत्र्यासाठी रक्तपात करण्याची गरज नाही. तलवारी उपसण्याची गरज नाही. आज गरज आहे ती मिळवलेल्या स्वातंत्र्य टिकवण्याची, आज गरज आहे जात, पात, धर्म, पंत विरहीत गणतंत्र आणि प्रजासत्ताकतेचे ध्वज खांद्यावर घेण्याची, आज गरज आहे ती करमट पणा आणि अंधश्रद्धा गाढून टाकण्याची, आज गरज आहे माणसाला माणूस म्हणून शिवकण देण्याची, आज गरज आहे शक्ती भक्तीतलं खर मर्म समोर मांडत भक्तीचा डांगोरा पिटवण्याची आणि कळीकाळाशी दरारा निर्माण करण्याची. 
जगाच्या पाठीवर महाराष्ट्र धर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. इतिहास चाळून पाहिला आणि त्या इतिहासातले सोळाव्या शतकातले संदर्भ पाहिले तर महाराष्ट्राच्या मातीत निपजल्यांनीच स्वाभिमान जागवल्याचे दिसून येते. जणु काल पर्वाही देशावर संकट आलं तर महाराष्ट्रच धावून गेल्याचे पहावयास मिळते. म्हणून आणि म्हणूनच ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे मथळे तुम्हाला ज्ञात असतील. परंतु असे असतांना आता काही तथाकथित धर्म मार्तंड आपले तोंड वरी काढत आहेत. जिथं तिथं विषवल्ली पेरण्याचे काम करीत आहे. हे विषवल्ली महाराष्ट्राच्या मातीलाच नव्हे तर हिंदुस्तानच्या सर्वोभौमितेला काळवंडून टाकणारी असेल म्हणून शक्ती भक्तीला आणि वारकरी धारकर्‍यांच्या एकात्मतेला जे जळजळीत आणि कर्मट दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्या प्रयत्नांना सरकारही मुक संमती देते तेंव्हा आम्हाला तुकोबांचा सहारा घेत तुकोबांची भक्ती आणि त्या भक्तीतली शक्ती आत्मसात करण्याबरोबर ती आमच्या वाचकांनाही द्यावीसी वाटते. सध्या महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताच्या नावावर जो गोंधळ सुरू आहे. तो गोंधळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या एकाही संताला मान्य नसेल. ज्या मणुस्मृतीच्या आधारे हा गोंधळ घातला जातो ती मणुस्मृती जुने मढे उकरल्यागत आहे. असं म्हटलं तरी आम्हाला त्यात बर वाईट वाटणार नाही. कारण हा महाराष्ट्र जगद्गुरू संत तुकारामांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. भक्तीचा डांगोरा पिटवणार्‍या जगद्गुरू तुकोबांच्या तणामनात कुठलीच जात नव्हती. म्हणूनच तुकोबा आपल्या एका अभंगात जातीच्या उतरंडी पाडतांना महाराष्ट्राच्या मातीत अशी कुठलीही जात ही शुद्र नाही. आणि त्या जातीतला माणुस शुद्र नाही. माणुस म्हणून जो जगतो आणि दुसर्‍याकडे माणुस म्हणुन जो पाहतो तो सर्वश्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र असा प्रदेश आहे ज्या प्रदेशाला भुगोलाबरोबर इतिहास आहे. साधु, संत, सुफींची मांदीयाळी याच महाराष्ट्राच पहावयास मिळते.
पवित्र ते कुळ
पवित्र ते कुळ पावन तो देश | जेथे हरिचे दास घेती जन्म ॥ 
कर्म धर्म त्याचे जाला नारायण | त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ 
वर्ण़अभिमाने कोण जाले पावन | ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥ 
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने | तयाची पुराणे भाट जाली ॥ 
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार | धागा हा चांभार रोहिदास ॥ 
कबीर मोमीन लतिब मुसलमान | सेना न्हावी जाण विष्णुदास ॥ 
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु | भजनी अभेदू हरिचे पायी ॥ 
चोखामेळा बंका जातीचा माहार | त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥ 
नामयाची जनी कोण तिचा भाव | जेवी पंढरीराव तियेसवे ॥ 
मैराळा जनक कोण कुळ त्याचे | महिमान तयाचे काय सांगो ॥ 
यातायातीधर्म नाही विष्णुदासा | निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥ 
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ | तारिले पतित नेणो किती ॥
तुकोबांचा हा अभंग आणि या अभंगात सर्व जातं, पात, धर्म, पंतातले संत पाहिले तर महाराष्ट्र जात, पात, धर्म, पंताला कधीही थारा देणारा नाही हेच स्पष्ट होते. प्रत्येक जातीमध्ये एक ना एक संत जन्माला आले आणि त्या संतांनी केवळ एकच शिकवण दिली. ती म्हणजे ईश्‍वर हा एक आहे आणि त्या ईश्‍वराला शरण जातांना सर्व मोहमाया, मत्सर, लोभ दूर ठेवून नामस्मरण करा. परंतु आज त्याच महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताचे भुत मानगुटीवर बसवण्याचे काम तथाकथीत धर्म मार्तंडांकडून होतांना दिसून येत आहे. हे महाराष्ट्राचेच नव्हे तर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माणसा माणसाला त्यागाची, विश्‍वासाची, प्रेमाची शिकवण देणार्‍या संतांचे दुर्दैव नव्हे ते तुमचे आमचे दुर्दैव म्हणावं लागेल. पंढरपुरची वारी ही शेकडो शतकापासून सुरू आहे. मृदंगावर थाप, टाळांचा निनाद, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण, खांद्यावर भगवी पताका म्हणजेच वारकरी. परंतू आता या वारकर्‍यातही काही तथाकथीत वार करी घुसू पाहत आहेत. यातून अशा वार करणार्‍या आणि त्याचा पुरस्कार करणार्‍या लोकांना साध्य काय करायचे हा शोधाचा विषय नक्कीच नसला तरी हा विषय गंभीरतेने घेण्याचा आहे. अशा लोकांबाबत आणि त्यांच्या कृत्यांबाबत तुकोबा म्हणत असतील 
बुडते हे जन न देखावे डोळा|
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे महाराष्ट्राचे वेद आहे. त्यांचे अभंग म्हणजे तुकोपनिषदच आहे. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथही मराठीतच आहे व ज्ञानदेवांनी तो अबालसुबोध अशा ओवी छंदात आपण लिहिल्याचे सांगितले आहे. इतके असून सुद्धा ज्ञानेश्‍वर हा ग्रंथ पुुष्कळांना मिटलेल्या मुठीसारखा वाटतो. तर तुकोबांचे अभंग हे उघडलेल्या मुठी सारखे वाटतात. तुकोबांच्या अभंगात जो सिद्धांत जे सामर्थ्य पहावयास मिळते ते स्पष्टवक्तेपणाचाच. हे उघड सत्य सर्वश्रुत असतांना शक्ती भक्तीचा नारा वारकरी धारकर्‍यात बदलोतच कसा? याचं विवेचन नक्कीच व्हायला हवं. ज्या वेळेत रक्तपाताची, ढाल, तलवारीची गरज होती त्यावेळेस नक्कीच शस्त्र हाती घ्यायला हवे. परंतू आता शास्त्र आणि शस्त्र नव्हे तर संविधान महत्त्वाचे आहे. भारतीय सर्वोभौमत्ता महत्त्वाची आहे. त्यावेळी कोणी जर असा धार्मिक गलका करू पाहत असेल आणि या गलक्यात लोक सामील होत असतील तर तुकोबा अशा व्यवस्थेला आणि माणसिकतेला आपल्या अभंगातून म्हटले असते
बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणुनीया ॥
तुका म्हणे माझे देखती डोळे | भोग देते वेळ येईल कळो ॥
ज्यांना शिष्य शाखा वाढवून गुरूपणाचे अवडंबर माजवायचे आहे त्यांना त्या अवडंबरातून आजच्या परिस्थितीत जे प्रक्षोप होईल तो डोळ्याने पाहण्यासारखा नक्कीच नसेल. पुढे धर्माचे पाळण कसे करावे यावर भाष्य करतांना 
धर्माचे पाळण | करने पाषाण्डं खंडन
हेचि आम्हा करने काम | बीज वाढवावे नाम
तिष्ण उत्तरे | हाती घेवूनी बाण फिरे
नाही भिडभार | तुका म्हणे लहानथोर
वज्रास भेदण्या इतका कठीणपणा प्रसंगाने विष्णुदासांना तो स्विकारता येत असला तरी मेनाहुन मऊ आम्ही विष्णुदास हा त्यांचा खरा स्वभाव असायला हवा. तिष्ण उत्तरांचे बाण हाती घेवून फिरत असतांनाही तुकोबांनी लोकांना प्रेमाने समजावून सांगण्याचा त्या काळी तेवढाच प्रयत्न केला. मी निष्ठुर बोललो तरी ते तुमच्या हिताचे आहे. हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. परंतु आपल्या कर्तव्य कर्मातून जात, पात, धर्म, पंत याला कुठेही थारा देवू नका. हे वेळोवेळी साांगितले. तुकोबांच्या या भक्तीच्या डांगोर्‍यामुळेच आज महाराष्ट्र हा देशात शक्तीपीत आहे हे ही अभिमानाने सांगावेसे वाटते. पंढरीच्या वाटेने जातांना उच, निच, कोणी नाही. लाभ, लोभ, मत्सर, माया इथे कोठेही पहावयास मिळत नाही. उलट तुकोबांनी पंढरीच्या वाटेवर जाणार्‍याबाबत आणि साक्षात पांडुरंगाबाबत विठ्ठलाला भुत म्हणून संबोधलं आहे. आपल्या पुढील अभंगात ते म्हणतात,
पंढरीचे भुत मोठे | आल्या गेल्या झडपि वाटे ॥
बहु खेचरीचे रानं | जाता वेडे होये मन ॥
तेथे जावू नका कोणी | गेले नाही आले परतुनी ॥
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ॥
पंढरीचे भुत मोठे आहे. त्यावाटेने जो जातो त्याच्यावर हे भुत झडप घालतं. एक तर तिथं कोणी जावू नये आणि गेलच तर ते परतुन येणार नाही. कारण पंढरीचा हा मार्ग, वारीचा हा मार्ग, विठ्ठलाचं वेड लावणारं आहे. भक्ती रसात डुंबून टाकणारं आहे. विठ्ठल जसे पंढरीला गेले तसे पुन्हा ते जन्मले नाहीत. परंतु प्रत्येक वारकर्‍याच्या ह्रदयामध्ये विठ्ठलाचा निनाद, पांडुरंगाचा निनाद पहावयास आणि ऐकवयास मिळतो. तुकोबा जर जात, पात, धर्म, पंत विरहीत ईश्‍वर माणसात शोधत असतील, रस्त्यात शोधत असतील, काटेरी झुडपात शोधत असतील तर तुम्हा आम्हाला शशस्त्र धारकरी होण्याचे कारण ते काय? भक्तीचा डांगोरा पिटवण्यासाठी माणसाला माणुस म्हणून जगण्याची अभिलाषा निर्माण करण्यासाठी जो कोणी प्रयत्नाची परिकाष्टा करत असेल तो नक्कीच नथ मस्तक होण्या लायक असेल. परंतु स्वत:च्या धर्माचा गर्व करत इतरांच्या धर्माला तुछ तेने पाहत असेल तर तो धर्मही नाही आणि तो माणुसही नाही. हे उघड सत्य संत महात्म्यांनी सांगून ठेवले. तरीही महाराष्ट्राच्या मातीत 
बकरे वाचतात आणि माणसे मरतात 
ही हार नमेकी कोणाची? हा पराजय नेमका कोणाचा? आणि ही जीत कोणाची हा विजय कोणाचा? याचे आत्मचिंतन केल्यानंतर पुन्हा-पुन्हा सरकारच्या कार्य प्रणालीवर आक्षेप घ्यावासाच वाटतो. नागपुुरात जैन समाजाच्या काही लोकांनी बकरे वाचवण्यासाठी टाहो फोडला. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेत मजूर यांचे एटीएम असलेल्या शेळ्या, मेंढ्या आखाती देशामध्ये विक्रीसाठी जाणार होत्या. परंतु बकर्‍यांचे जीव वाचवा हो म्हणत जैन समाजाच्या काही लोकांनी विरोध करताच सरकारने विमानाद्वारे दीड हजार बकरे जे आखाती देशामध्ये जाणार होते ते रद्द करण्यात आले. बकर्‍यांचा जीव येथे वाचला परंतु या बकर्‍यांचा जीव महाराष्ट्रात वाचेलच हे सांगणे कठीण आहे. परंतु सरकारने मात्र हे विमान उडान रद्द करून महाराष्ट्रामध्ये आपल्या कुठल्या निर्णयाची दिशा दाखवून दिली हे सांगणे कठीण. दुसरीकडे आफवेवरून राईनपांडा येथे पाच निष्पाप लोकांची याच महाराष्ट्रात हत्या होते. महाराष्ट्र सरकार बकरे वाचवण्यात यशस्वी होतात माणसे वाचवण्यात यशस्वी होत नाहीत. हे उदाहरण एवढ्यासाठीच या भक्तीच्या डांगोर्‍यामध्ये आम्ही घेतोय ते म्हणजे कर्मटपणा, धर्म मार्तंडपणा आणि मणुच्या सांनिध्यात वाहत चाललेल्या सरकारचे धोरण दाखवण्यासाठी. पंढरीस निघालेली वारी ही भक्तीचा डांगोरा पिटवणारी आहे आणि पंढरीचं वाळवंट हे एक एका लागती पाईरे  याची शिकवण देणारं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार ज्या धर्म मार्तंडाचा पुरस्कार करू पाहतय. जात, पात, धर्म, पंताला महत्त्व देवू पाहतय ते पुरस्कार आणि ते महत्त्व 
महाराष्ट्राचं वाळवंट
केल्याशिवाय राहणार नाही. भक्ती रसात डुंगून जाणं ईश्‍वराचं नामस्मरण करणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतू स्वत:च्या धर्माचा आदर करणं आणि इतरांच्या धर्माचा अनादर करणं ही कुठल्याच धर्माची शिकवण नाही. वारकरी संप्रादाय आणि वारकरी धर्म हा तर अक्षरश: माणसातल्या माणुस पणाला जागृत करणारा आणि प्रत्येकाकडे माऊली म्हणून पाहणारा आहे. त्यामुळे वारकर्‍यांना कधी हाती तलवार घेण्याची गरज पडली नाही. त्यांना कधी भिती वाटली नाही. स्वरक्षणाची गरज पडली नाही. कारण ज्याच्या अंगी शिस्त असते त्याला कशाचीच भिती नसते. म्हणूनच विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी पंढरीच्या वाटेवर ऊन, पावसात निघतो तेंव्हा त्याच्या मनात कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो असते ती फक्त विठुरायाच्या भेयीची ओढ. आणि त्या भेटीसाठी जेंव्हा हा वारकरी पंढरीत जातो त्यावेळी त्या ठिकाणी खेळ मांडतो.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाईरे ॥
क्रोध अभिमान गेला पावटणी | एक एका लागती पाईरे ॥
असं म्हणत आनंदाने नाचत गात विठ्ठलाचे नामस्मरण करतो. कसलाही अभिमान नसतो, कसलाही क्रोध नसतो, कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो असतो तो फक्त माणुस धर्म, असते ती फक्त माऊली. परंतू आज या माऊलीला स्वरक्षण देण्याच्या नावाखाली जो सौराचार चालु आहे आणि महाराष्ट्रात सत्ताधार्‍यांकडून जो धर्माचा पुरस्कार करणे चालू आहे तो महाराष्ट्राला वाळवंटाच्या खाईत लोटणाराच. 


सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आजच्या रोखठोक मध्ये वाचा  12 /6/2018

Thursday, 5 July 2018

कपाळमोक्ष
‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....
रोखठोक 
गणेश सावंत 
9422742810 
-----------

आंधळी आणि बहिरी दिल्ली तर आहेच. आता अंधश्रद्धाळु आणि कपाळ मोक्षी दिल्ली पहायला भेटली. गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीतल्या बुराडी भागात देशात सनसनी निर्माण करून टाकणारी घटना घडली. वडाच्या पारंब्या लटकाव्यात तसे एका घरात एकाच कुटुंबातले एक नव्हे दोन नव्हे अकरा सदस्य लटकलेले दिसले. मोक्ष प्राप्तीसाठी भाटिया कुटुंबातल्या सदस्यांनी हे कपाळ मोक्षी धाडस केलं. या धाडस म्हणता येणार नाही तर हे कृत्य जागतिक महासत्ताक होणार्‍या हिंदुस्तानसाठी विचार करावयास लावणारं. आत्मा बाहेर जाईल आणि पुन्हा परत येईल यासाठी घराला अकरा पाईप लावण्यात आले. या सर्व घटनाक्रमावरून एकच लक्षात येतं या देशातला ग्रामिण भाग असो या शहरी भाग असो जिथं तिथं कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरविणार्‍यांनी आपली छाप कायम ठेवली. महाराष्ट्रसह देशातल्या प्रत्येक भागात साधु, संत सुफी आणि समाज सुधारकांनी देशवासियांचे मस्तक नांगरण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. परंतू वर्षामागून वर्ष गेले, दशका मागून दशके गेले, शतका मागून शतके चालली तरीही अंधश्रद्धेच्या जखड्यात अडकलेले देशवासी सुधरायला तयार नाहीत. या आत्महत्या कांडाचा सुत्रधार मोक्ष असेल तर अशा मोक्षास शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था की समाज व्यवस्था दोषी? हे आता उमजून घ्यावच लागेल. दिल्लीतल्या भाटीया या कुटुंबाविषयी उत्तर दिल्लीतल्या संतनगर बुराडी भागातल्या गल्ली क्रमांक ४ए मध्ये शिरताच उजव्या बाजूला दोन प्लॉट सोडून एक तीन मजली घर आहे. तिथे आता एक फक्त एक पाळीव कुत्रा जिवंत आहे.त्या घरातले सर्वच्या सर्व ११ जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते. भाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात १० लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या २० वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते. अंदाजे ७५ वर्षीय महिला नारायण, त्यांची दोन मुलं भुप्पी (४६) आणि ललित (४२) त्यांच्या पत्नी सविता (४२) आणि टीना (३८) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. भुप्पी यांच्या दोन तरुण मुली आणि एक अल्पवयीन मुलगा तसंच ललित यांचा १२ वर्षांचा मुलगाही मृतावस्थेत होते. या ११ लोकांमध्ये नारायण यांची एक विधवा मुलगी आणि तिची मुलगी (म्हणजे नारायण यांची नात) प्रियंका (३०) यांचाही समावेश आहे. प्रियंका यांचा १७ जूनला साखरपुडा झाला होता आणि ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न नियोजित होतं.हे कुटुंब सुशिक्षीत असतांना धार्मिकते बरोबर सर्वात मोठं अंधश्रद्धाळू कुटुंब असल्याचा धक्कादायक खुलासा या लोकांच्या आत्महत्येनंतर तपासकामी असलेल्या पोलिसांना ज्या डायर्‍या मिळून आल्या त्यातून झाला. राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या शहरात अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातले अकरा लोक गळफास घेवून लटकत असतील तर जय जवान जय किसान बरोबर दिलेल्या जय विज्ञानच्या नार्‍याला ही जबरदस्त चपराक म्हणावी लागेल. या देशात अनेक संत, महात्मे, सुफी, समाज सुधारक होवून गेले. उभं आयुष्य त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगावण्यासाठी आणि त्यांच्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चंदनासारखं झिजवलं. परंतू गल्ली ते दिल्ली बुवा, बबा आणि बयांनी अक्षरश: उच्छाद मांडला. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात भंप्पक महाराजया देशाने याची देही याची डोळा पाहिले. त्यांचे नागवे कुुकर्म उघड्या डोळ्याने अनुभवले. मोहमाया आणि वासनाही या महाराजांची देशवासियांनी अनुभवली. खेड्या पाड्यात जे छोटे-मोठे महाराज, बुवा पहायला मिळाले तेच मोठं-मोठे महाराज या देशांनी अनुभवले नव्हे तर त्यांचे कुकर्म उघडे पडल्यानंतर असारामसारखेही कित्येक कामांध महाराज जेलमध्ये गेले. महाराजांची भूमिकाही केवळ लोकांना लुबाडणारी, फसवणारी आणि स्वत:चा स्वार्थ साधणारी उभ्या देशाने पाहिली तरीही या देशातला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा माणूस सुधारला नाही हेच यातून स्पष्ट होते. गेल्या दिडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांची पैदास कशी होती?याचे मर्म ग्राही विवेचन शेतकर्‍यांचा आसूड या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, कित्येक अक्षरशत्रु भट ब्राह्मणास पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बेखुप ठोंब्यास ढवळ्या बुवा बनवून त्याच्या पायात खडवा व गळ्यात विना घालून अज्ञाती शेतकर्‍याकडे प्रतिष्ठीत भीक मागत फिरतात. एखाद्या देखण्या जवानास कवळे बुवा बनून टाळ मृंदागाच्या तालात मोठ्या प्रेमाने राधाकृष्ण राधा म्हणत नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणार्‍या सधन रांडमुंडीस आपल्या नादी लावतात. आपली पोटभरून मोठ्या मौजा करतात. एखाद्या अर्धवेड्या भांग्यास स्वामी बनवून लोकांना त्यांच्या नावाने नाना प्रकारच्या लोणकड्या थापा देवून स्वामीच्या दर्शनास त्यांना नेवून द्रव्य हरण करतात. फरक झालाच असेल तर एवढाच की सर्व जाती धर्मात आता असे उदंड पीक आले आहे. साठ वर्षापूर्वी किरलोस्कर म्हणतात,परमार्थ, मोक्ष, इश्‍वरप्राप्ती, साक्षात्कार इत्यादी वावड्या धर्म कल्पनांनी आपल्याला समाजाला इतके पछाडले आहे की असल्या सामाजिक शरिरावर बुवांची व महाराजांची गळवे उठली नाहीत तर आश्‍चर्य. भक्ती, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक हे तर बुवांची खास हत्यारे. कोणत्याही बुवाच्या अंगी आपली रवानगी नरकात करण्याची शक्ती असणे शक्य नाही. कारण स्वर्ग आणि नरक या जागाच काल्पनिक होत त्या प्रमाणे व्यक्तीच्या पापाचे क्षालन आणि पुण्याचे संवर्धन करण्याचे सामार्थ्य कोणत्या बुवा अगर महाराजांच्या अंगी असणे शक्य नाही. ज्याच्या त्याच्या पाप पुण्याची जबाबदारी त्याच्या-त्याच्यावर आहे. त्याबाबत कोणतीही दलाली उपयोगी पडणार नाही. जो अशी दलाली करतो तो अत्यंत मुर्ख वा अट्टल डांबीस असला पाहिजे. आम्ही असे आव्हान देण्यास तयार आहोत की कोणत्या बुवा ने अगर महाराजाने आपल्या अंगी अलौकीक सामार्थ्य असल्याचे सांगावे व आम्हास त्याची परिक्षा घेवून द्यावी असले प्रकार करून कोणी महाराज आपल्या पापाचे क्षणात भस्म करून आपल्याला इश्‍वराच्या पायाशी पोहोचवील ही कल्पना अत्यंत खुळ्यापणाची आहे. वाचकांच्या उदाहरणासाठी आम्ही या ठिकाणी केवळ फुले आणि किरलोस्कर यांचे विचार दिले. परंतू दिल्लीत झालेलं हे मोक्ष प्राप्तीचं कांड अखंड देशाला हादरून टाकणारं, आत्मचिंतीत करणारं आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात देशाचं मान खुजी करणारच म्हणावं लागेल. जोपर्यंत देशातला सर्वसामान्यातला सर्व सामान्य माणूस पाप, पुण्य, स्वर्ग, नरक यापासून दूर जात नाही तोपर्यंत अशा घटना घडणं बंद होणार नाही हे जेवढे त्रिवार सत्य आहे तेवढेच शतको ना शतकोपूर्वी या देशातल्या साधु, संतांनी असल्या अंधश्रद्धेवर आणि कर्मकांडावर प्रचंड आसूड ओढले आहे. महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकोबांनी सर अक्षरश: अशा भोंदू गिरीचे वाभाडे काढले आहे. तुकोबांना अभ्यासा ते म्हणतात, नवसे सायेशी होती पुत्र| का करणे लागी पती ॥ नवस सायेशी करून पोरं होत असतील तर नवरा करण्याची गरज काय? हा सवाल साडेतिनशे, चारशे वर्षापूर्वी तुकोबांनी विचारला आहे. भोंदू बाबा बद्दल बोलतांना ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करूनि म्हणति साधू ॥ अंगी लावूनिया राख डोळे झाकूनिया करती पाप ॥ असं म्हणत जावूनिया तिर्था काय तु केले | चर्म प्रक्षाळीले वरीवरी ॥ तिर्थ क्षेत्रावर जावून केवळ शरिर धुतले म्हणजे तिर्थ यात्रा सफल होत नाही. अंत:करण शुद्ध होणार नसेल तर त्या तिर्थ यात्रेला काय अर्थ? होवूनिया संन्यासी भगवी लुगडी | वासना ना सोडी विषयाची ॥ नुसते भगवे कपडे परिधान करून उपयोग नाही तर अंत:करणातून वासना सोडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले. असे जे बुवा, भट, महाराज अंधश्रद्धा पसरवत असतील, कर्मकांडांना प्रोत्साहन देत असतल तर तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती असे म्हणत तुकोबांनी त्याचे हाणून थोबाड फोडा असा आदेशही त्या काळी दिला. ऐसे संत झाले कै, तोंडी तंबाखूची नळी ॥ स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली ॥ या अभंगातून व्यसनीबाज, दगाबाज बुवा, बाबांना त्यांनी चपराक लावली. टिळा, टोपी घालूनी माळा | म्हणती आम्ही साधू ॥ दया धर्म चित्त नाही | ते जाणावे भोंदू ॥ असं म्हणत ज्याच्या मनात दया नाही तो संत असूच शकत नाही. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकांची कापितो मान या अभंगात तर तुकोबा आक्रमक होतात आणि कर्मकांड करणार्‍या अंधश्रद्धा पसरविणार्‍या तथाकथित महाराजांवर हल्ला चढवतात. अशा गुरूंवर तुकोबा म्हणतात, जळोजळो ते गुरूपण, जळो जळो ते चेलेपण तुकोबांच्या हजारो अभंगात जेवढी भक्ती आहे तेवढीच अंधश्रद्धेवर आसूड ओढलेले आपल्याला दिसून येतात. असे असतांना या देशात संस्कार आणि संस्कृतीची गंगा वाहत असतांना शेकडो वर्षानंतरही जर कोणी मोक्ष प्राप्तीसाठी कर्मकांड करतांना डायरी लिहित असतील आणि स्वत:सह स्वत:च्या कुटुंबियांना अकरा सदस्यांना यम सदनी धाडत असतील तर काय म्हणावे? दिल्लीतल्या भाटीया कुटुंबियांनी आत्महत्या करण्याच्या दिवशी डायरीत लिहिलेल्या पानात हा भितीदाय मजकूर लिहिला. ‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....तुमसे कहा था कि आज दो जोत जलाना, मगर तुमने ऐसा किया नहीं... नीतू और प्रभजोत अगले दो दिन तक कुलर में सोएंगे... इनकी यही सजा हैं| धु्रव की पढाई पर ध्यान दो, तुम्हें पता हैं कि भगवान कभी भी हमारे घरमें आ सकते हैं... इसलिए पूरी तैयारी रखो| मंगलवार को मैं सामग्री लाऊंगा, तुम जाप करने बैठना | रावतभाया, सोनीपत से अगले दिन आएंगे | भगवान आएंगे तो मेहमान चले जाएंगे|’ अशा प्रकारचं हादरून सोडणारं लिखान आम्हाला वाचायला भेटलं तेंव्हा कर्मकांड आणि अंधश्रद्धा देशवासियांच्या नसानसात कशी भिनलेली आहे हे उघड चित्र दिसून आले. शेकडो वर्षापासून लोकांची मस्तके नांगरली गेली. परंतू मस्तक नांगरणार्‍यांपेक्षा कर्मकांड आणि अंधश्रद्धेची दहशत पसरवणारे जेंव्हा यशस्वी होतात तेंव्हा खरच भारत देश हा हिंदुस्तान जागतिक महासत्ताक होईल हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही आणि अशा घटना घडल्यानंतर या घटनांची जबाबदारी शासन प्रशासन व्यवस्थेची की समाज व्यवस्थेची? या प्रश्‍नात अडकल्याशिवाय आम्ही राहत नाही. परंतू सरशेवटी न देखावा डोळा ऐसा हा अकांत असे म्हणून शांत तर नक्कीच बसात येणार नाही. परंतू भाटीया कुटुंबियांची ही मोक्षप्राप्ती नाही तर कपाळ करंटेपणातला कपाळमोक्षच म्हणावा लागेल.


कसलं प्रोफेशनअन् कसलं ‘सक्सेस’‘भो’ करतात ‘साले’

ही स्टेप का येवू देता?

रोखठोक गणेश सावंत -9422742810


स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येने महाराष्ट्राच्या पटलावर अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ज्ञानदानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय काय? ज्ञानदान हा धंदा बनलाय काय? गुरू, शिक्षक हे अर्थकारणासाठी कामांध होत आहेत काय? शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात लोभ, माया, मत्सर वाढत चाललाय काय? जिथं शिक्षणासाठी कैईकांनी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं तिथं स्वत:च आयुष्य भौतिक सुखात रमवण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे पाईक केवळ अर्थकारणालाच महत्त्व देत आहेत काय? खाजगी कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा हा सरकारी शिक्षण क्षेत्राला आव्हान देतोय काय? खाजगी कोचिंग क्लासेसद्वारा सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी यंत्रणा उभी राहतेय का? सरकार या खाजगी कोचिंग क्लासेसकडे दुुर्लक्ष का करतय? त्यांना नियम अटी का लावल्या जात नाहीत? ही शिक्षणाची खाजगी यंत्रणा खरच गुणवत्ता घडवतेय काय? ही यंत्रणा समाजा समाजातील विद्यार्थ्यांचे मस्तक खरच नांगरतेय काय? यासह खाजगी शिक्षण यंत्रणा ‘प्रोफेशनल’ झालीय काय? यामध्ये विद्यार्थी ‘सक्सेस‘ होतात की यंत्रणा चालवणारे? एवढे होवूनही ‘भो’ करतात ‘साले’ याचचं ज्वलंत उदाहरण अविनाश चव्हाणची हत्या. हे उघड सत्य नाकारता येत नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय ही ‘स्टेप’ का येवू देता? 
स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची तीन दिवसापूर्वी लातूरात भरवस्तीत गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. चव्हाण यांच्या हत्येने एक नरदेह नष्ट झाला असला तरी ही हत्या अविनाश चव्हाणांची नसून पवित्र शिक्षण क्षेत्राची म्हणावी लागेल. महाराष्ट्र हा साधु, संत, सुफी आणि समाज सुधारकांचा प्रदेश आहे. इथेच सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाला शिकता यावं, अन्य समाजाशी खांद्याला खांदा लावून चालता यावं म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला सर्वांगीण करण्याच्या उदाक्त हेतूने फुलेंपासून भाऊराव पाटलांपर्यंत अनेकांनी शिक्षणासाठी, ज्ञानदानासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं. लेखी बाळीपासून पोरा, सोरापर्यंत ज्ञानार्जन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. रात्रीचा दिवस केला आपले डोळे फोडले. परंतू इतरांच्या डोळ्यात प्रकाश दिला. त्याच महाराष्ट्रात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे बाजारीकरण झाले. सावित्रीबाई फुलेंपासून भाऊराव पाटलापर्यंतच्या समाज सुधारकांचा शिक्षणाकडे पाहिला जाणारा दृष्टीकोन आज मितीला डोळ्यासमोर आणला तर आजच्या शिक्षण व्यवस्थेेवर आसूड ओढावे वाटतील. मग ती शिक्षण व्यवस्था सरकारी असो वा खाजगी एखादा कामांध झालेला व्यक्ती जशी आपली काम वासना भागवण्यासाठी लाज, लज्जा सोडतो. श्वान जसं भाद्रपद महिना आल्यागद जिथं तिथं वर तंगडी करत राहतं त्यास्थितीत आजची शिक्षण प्रणाली असल्याचे उघडपणे म्हटले तरी त्याबाबत आम्हाला काहीच वाटणार नाही. सरकारी यंत्रणा असो, खाजगी संस्था असोत अथवा नव्याने उभी राहत चाललेली आणि सरकारलाच आव्हान देवू पाहणारी खाजगी कोचिंग क्लासेसची यंत्रणा असो ही यंत्रणा केवळ आणि केवळ अर्थकरणाच्या लोभापाई ज्ञानार्जनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. आणि हेच दुर्लक्ष सरकारी यंत्रणेकडूनही होत असल्याने 
शिक्षण क्षेत्राचीच हत्या 
जिथं तिथं या ना त्या मार्गाने पहावयास मिळते. लातूरमध्ये अविनाश चव्हाणची हत्या ही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला रक्तरंजित आणि रक्ताळलेली करून टाकणारी आहे. अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप ही खाजगी कोचिंग क्लास लातूरमध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये बहुचर्चित क्लास राहिली. अवघ्या काही वर्षात खाजगी कोचिंगमध्ये अविनाश चव्हाण यांनी नावलौकीक मिळून घेतलं. पैसा सर्वस्व नाही हे जेवढं सत्य तेवढच अविनाश चव्हाण यांनी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना आकर्षित केलं नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी चांगले प्राध्यापक, प्राचार्य त्यांनी आपल्या क्लासमध्ये शिकवणीसाठी ठेवले. यातून स्टेप बाय स्टेपचा निकाल चांगला लागत गेला, गुणवत्ता वाढत केली आणि त्या गुणवत्तेतून विद्यार्थी घडत गेला. स्टेप बाय स्टेपची शिक्षण प्रणाली तेवढीच पॉझीटीव्ह पहावयास मिळाली. परंतू अविनाश चव्हाण यांनीही या ठिकाणी या क्षेत्राला प्रोफेशनल (व्यवसाय) म्हणून पाहिलं. या क्षेत्रात यश येत गेल्याने अविनाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, तरूण वर्गाची मानसिकता पाहत लातूरात अद्यावत जीम स्थापन केली. त्याच्या उद्घाटनासाठी लातूरात सर्व प्रथम सनी लिओनी आणून अविनाश चव्हाण पुन्हा चर्चेत राहिले. एक मातब्बर प्रोफेशनल व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांना सक्सेस देणारा तरणा ताठा म्हणून अविनाशकडे लातूरमध्ये पाहण्यात येवू लागलं. यातून पक्ष संघटनाशी कधी दूरचा तर कधी जवळचा संबंध येत राहिला. अन् इथच अनेकांना अविनाशचं यश, अविनाशच अर्थकारण, त्याचं प्रोफेशनल, त्याच सक्सेस खटकत राहिलं आणि तिथच इतर क्लासेसवाले अविनाश ‘भो’ करत राहिले. अविनाशची हत्या जेंव्हा झाली त्यानंतर अवघ्या १२ ते १५ तासात लातूर पोलीसांनी या खूनाचा छडा लावला तेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर पडली. अविनाशची हत्या ही क्लासेसच्या प्रोफेशनलपणातून सक्सेसच्या चढाओढीतून आणि‘भो’ करणार्‍या साल्यांकडून झाल्याचे उघड झाले. तेंव्हा उभ्या महाराष्ट्रात शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र काळवडलं. अविनाशची हत्या ही एका नरदेहाची हत्या आहे की अखंड शिक्षण प्रणालीची? यावर नुसती चर्चा, आत्मचिंतने करून भागणार नाही तर या 
हत्यामागचं गुढ आणि सत्य 
बाहेर येणं अधिक महत्त्वाचं. या हत्येचा मास्टर माईंट अविनाश चव्हाणचा जुना भागिदार प्रा.चंदनकुमार शर्मा हा असल्याचे जेंव्हा उघड झाले आणि चंदनकुमार शर्मा हा बिहारी असल्याचे सत्य जेंव्हा समोर आले तेंव्हा खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये गुन्हेगारी शिरकाव गेल्या दशकभरापासून झाल्याचे स्पष्टपणे जाणवले. चंदनकुमार शर्मा याने अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी २० लाख रूपयाची सुपारी दिली. त्याचे नगदी साडे आठ लाख रूपये करण गहिवार नावाच्या वादग्रस्त व्यक्तीला देण्यात आले. गहिवारसह अन्य चौघांनी रेखी करून अत्यंत प्रोफेशन आणि सक्सेस पद्धतीने या हत्याकांडाला अंजाम दिला. गहिवार नावाचा व्यक्ती हा सुपारीबाज असला तरी तो भाजपाचे मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा कधी काळचा अंगरक्षक असल्याचा बोलबाला उघड होत गेला. परंतू यावर निलंगेकरांनी तो माझा अंगरक्षक कधीच नव्हता, कधी काळचा तो कार्यकर्ता होता. असे कार्यकर्ता येतात आणि जातात अशी प्रतिक्रिया देवून या गंभीर प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू सोशल नेटवर्कींग मिडियासह विरोधक संभाजी निलंगेकरांसोबत सफारी सूटमध्ये असलेला करण गहिवार याचे फोटो वेळोवेळी दाखवून निलंगेकरांचा तो अंगरक्षकच होता हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. खर पाहिलं तर निलंगेकरांनीही या प्रकरणात प्रामुख्याने लक्ष घालून या हत्येमागचं गुढ आणि सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना नुसती मदतच नव्हे तर पोलिसांकडून हे सत्य बाहेर काढावं कारण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात झालेली ही हत्या एकट्या अविनाश चव्हाणची नसून ती अखंड शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षण क्षेत्राला बाजारीकरण करू पाहणार्‍या हत्यारांना जगासमोर आणणारी आहे. खाजगी कोचिंग क्लासेस हा 
स्वार्थ साधून पोट भरण्याचा धंदा
काही काळापर्यंत मर्यादीत होता. परंतू आता नुसत पोटच भरण्याचा नसून आर्थिक बाबीसोबत थेट शय्यासोबत करण्याचा धंदा होवून बसला. लातूरमध्ये सर्वात जास्त क्लासेस आहेत. प्रत्येक वर्षी २५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी लातूरमध्ये केवळ शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आपल्या मुलीचे, मुलाचे भविष्य घडले जावे, भविष्यात ते यशोशिखरावर जावेत या प्रांजळ मताने प्रत्येक पालक पैशाची तमा न बाळगता स्वत:हून खाजगी क्लासेसपर्यंत जातात. आज लातूरात ज्या भागात क्लासेस आहेत तो भाग पाहिला तर जेवढे विद्यार्थी-विद्यार्थीनी त्या ठिकाणी वावरतांना दिसतात तेवढेच ‘बाऊंसर’ही पहायला मिळतात. बाऊंसर त्याठिकाणी हवेत कशाला? याचा अर्थ खाजगी कोचिंगने प्रोफेशनलपणा अंगीकारलाय. सक्सेसचा नारा देत पालकांच्या आयचा घो करत ‘भो’ करणारे साले जिथं तिथं वावरतांना दिसतात. आज एकट्या लातूरात अविनाश चव्हाणची हत्या होवूनही शिक्षण क्षेत्राला रक्तरंजित करणारा इतिहास २१ व्या शतकात पहायला मिळाला, तो गंभीरच. लातूरसह आता जिल्ह्या- जिल्ह्यात अर्थकारणाच्या ललनेवर फिदा होणारे प्रोफेशनल आणि सक्सेसशी कोचिंग क्लासेसवाले शिक्षणाला धंदा बनू पाहत आहेत. यावर ना सराकरचं नियंत्रण ना पालकांचं. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये 
सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी 
यंत्रणा उभी राहतेच कशी? 
हा जाहीर सवाल थेट सरकारला विचारावासा वाटतो. वेळीच खाजगी कोचिंग क्लासेसच्या या धंदेवाईक पणावर आळा घातला नाही. या लोकांना वेसन टोचल्या नाही तर हे खाजगी कोचिंग क्लासेसवाले वळुगत वर शेपूट करतील आणि उधळत राहतील. त्यासाठी अविनाश चव्हाणची हत्या हा रक्ताळलेला इतिहास न ठरवता. यापुढ शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात रक्तरंजित घटना घडणार नाहीत. त्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना विशिष्ट घटनेमध्ये बांधून ठेवायला हवे. या लोकांकडे एका वर्गात किती विद्यार्थी असायला हवेत? शिक्षक, प्राध्यापक हे दर्जेेदार आहेत का? त्यांचे शिक्षण योग्यतेच आहे का? विद्यार्थ्यांना शिकवू शकतात का? शिकवणी चालकांनी विद्यार्थ्यांकडून किती फिस घ्यावी, विद्यार्थ्यासाठी आसन व्यवस्था आहे का? शुद्ध पाणी पिण्यासाठी आहे का? बाथरूम, टॉयलेट याची व्यवस्था आहे का? पार्कींग आहे का? संबंधित क्लासचे संचालक महिन्या, तीन महिन्याला विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलतात का? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची हमी संबंधित क्लासेस देतय का? हमी देत नसेल आणि क्लासेस विद्यार्थ्यांना योग्य गुणवत्ता देत नसेल तर अशा क्लासेसवर दंड आकरता येईल का? कायदेशीर कारवाई करता येईल? मोबदला घेवून शिक्षण दिलं जातं याचा अर्थ पालक हे ग्राहक आहे आणि क्लासेस ही दुकान आहे त्यामुळे त्या दुकानातून दिला जाणार माल तेवढाच दर्जदार असायला हवा. याकडेही सरकार लक्ष देईल का? मुळात आजचे कोचिंग क्लासेस म्हणजे कसले प्रोफेशन आणि कसले सक्सेस यास्थितीत असल्याने सरकारी यंत्रणेसह पालकांनी सगज राहिलं, जाब विचारले तरच ही यंत्रणा अटोक्यात राहिल नसता नाक्या-नाक्यावर खाजगी कोचिंग क्लासेसचा रक्तरंजित इतिहास पुन्हा-पुन्हा लिहिला जाईल हे महाराष्ट्राच्या वैचारिकतेला ज्ञान दानाच्या व्यक्तीला मानहाणीकारक असेल.
सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. १ जुलै रविवार अग्रलेख

आणीबाणीचा शंख निनाद
इंदिराद्वेषाचं विष

-गणेश सावंत-9422742810


पंतप्रधान नरेंद मोदींनी आणीबाणीचा शंख निनाद केला. आणीबाणीचं साल आणि तारीख काळा दिवस म्हणून भाजपाने साजराही केला. यावर आम्ही भाष्य करावं की नाही याच्या विचारात होतो. कारण तेंव्हा आम्ही जन्मालाही आलो नव्हतो. २५ जून १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी अक्षरश: जीवघेणी होती. असं भाजपातल्या नेत्यांचं म्हणणं आहे, संघ परिवाराचं म्हणणं आहे. जो संघ कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नव्हता. परंतू आणीबाणीच्या लढ्यात त्या संघातले काही जण दृष्टीक्षेपात पडायचे. त्यांच्या मते २५ जून हा काळा दिवस! नक्कीच आम्हीही आणीबाणीचे पुरस्कर्ते नाहीत की आजच्या मोदी सरकारचे विरोधक काळा दिवस आला काय आणि गेला काय त्यात फरक पडण्यासारखं काहीच नाही. कारण गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारने जी मुस्कटदाबी केली, सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या उरावर नाचून सत्ता केंद्राला जे महत्त्व दिलं ते तरी आम्ही याची देही याची डोळा पाहतो. त्यामुळे आणीबाणी एवढी बिकट असेल तर आजचे दिवसही आणीबाणीपेक्षा कमी नाहीत. हे उघड आणि स्पष्टपणे सांगायला आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत. कारण भाजप सरकारला जेंव्हा केंव्हा आपली पडती कळा दिसून येते तेंव्हा-तेंव्हा सरकार जात, पात, धर्म, पंत अथवा इतिहासातल्या त्रुटी समोर आणून सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडूनच केला जातो. आम्ही तर उघडपणे लिहितांनाच म्हटलयं, आणीबाणीच्या काळात आमचा जन्मही झाला नव्हता परंतू, आणीबाणीचे आजपर्यंत सर्वसमावेशक वाचन केल्यानंतर आणीबाणीवर लिहितांना, चिंतन करतांना आणीबाणीचे सर्व पैलू डोळ्यासमोर येतात. परंतू भाजप केवळ सत्ता केंद्र आपलंस करण्यासाठी स्वार्थ हेतूने विषय हाताळतो. आणि या विषयांचे संदर्भ जेंव्हा १९७५ साली जन्मलेले आणि पाळण्यात असलेले बाळुत्यात सू-सू करणारे बोलायला लागतात. तेंव्हा मात्र अशांची किव करण्यापेक्षा त्यांना आणीबाणीतला आजच्या परिस्थितीतला हा सूर्य आणि हा जयद्रथ आम्हाला दाखवावासा वाटतो.
इंदिराजींची आणीबाणी
२५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. तो काळ तसा भयावह होता. नुकत्याच १९७१ चे बांगलादेशाबरोबरचे युद्ध संपलेले होते. देशात भयंकर दुष्काळ पडलेला होता. अन्न धान्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वत्र हाहा माजलेला होता. देशाची लोकसंख्या स्वातंत्र्य काळापासून २५ ते २७ वर्षाच्या कालखंडात दुप्पटीने या अडीच पटीने झाली होती. अशा वेळी विरोधकही आक्रमक झाले होते. जयप्रकाश नारायण सारखे नेते अक्षरश: सरकारला नुसतं कोंडीत पकडत नव्हते तर सरकारचे आदेश पाळू नका म्हणून लष्काराला आणि पोलीस दलाला आवाहन करत होते. अनेक आजचे सत्तेतले नेतेही गांधींविरोधात तुटून पडत होते. अशा स्थितीत इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. आपल्याकडे अमर्याद अधिकार घेतले, नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली. सरकारच्या निर्णयाविरूद्ध वागेल त्याला कारागृहात टाकण्याची मोहिम त्यांनी चालू ठेवली. जो सरकार विरोधात बोलेल तो जणू देशाचा दुश्मन या स्थितीमध्ये आणीबाणीचे एक वाक्यात विवेंचन करावे लागेल. आणीबाणीला जो प्रत्यक्ष विरोध करेल, जो अप्रत्यक्ष विरोध करेल, आणीबाणीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात जो बोलेल जो लिहिल त्याची धरपकड केली. हे सर्व इंदिरा गांधींनी सरकारवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अथवा स्वत:च सरकार वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा
घटनात्मक अधिकार
इंदिराजींनी देशावर लादलेली आणीबाणी हा घटनात्मक अधिकार म्हणावा लागेल. कारण भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी आणीबाणी लादली. या कार्यकाळामध्ये नक्कीच देशातील सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला प्रचंड यातना झल्या. देशवासियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात गदा आली. त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. परंतू हे सर्व इंदिरा गांधींनी अत्यंत घटनेच्या चौकटीत राहून केले हे ही विसरता येणार नाही. आणीबाणी म्हणजे हिटलरशाही नव्हे किंवा रोमचा राजा न्युरोसारखा लहरीपणा नव्हे. आणीबाणी ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यातल्या संविधानामधला एक अधिकार म्हणावा लागेल. परंतू हा अधिकार वापरायचा की नाही? आणि या अधिकारातून लोकहित जपायचं की स्वत:च सत्ता केंद्र जपायचं हा ज्याच्या त्याचा भाग. म्हणूनच आणीबाणी लादल्यानंतर इंदिराजींनी स्वत:च सत्ता केंद्र जपलं. लोकहित जपण्यापेक्षा सरकारवरचा धोका त्यांना महत्त्वाचा वाटला. घटनेच्या अधिकारातून आणीबाणी लादल्यानंतर लोकात जो संताप उसळला. त्या संतापाला इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले. पुढच्या निवडणूकीमध्ये इंदिरा गांधींचा दारून पराभव झाला. प्रथमच देशात कॉंग्रेस व्यतिरीक्त सरकार स्थापन झाले. इंदिरा गांधींना त्यांची चुक उमजून आली. त्यांनी चुक कबुल केली. देशवासियांची माफीही मागितली. त्यानंतर पुन्हा या देशावर इंदिरा गांधींचं सरकार आलं. देशवासियांनी इंदिरा गांधींना जवळ केलं. २५ जून जर काळा दिवस असेल तर त्यानंतर लोकांनी इंदिराजींना स्विकारलेल्या दिवसाला सोनेरी दिवस म्हणायचे की काळा दिवस? हा प्रश्‍न आणीबाणीत न जन्मलेल्या माझ्यासारख्याला पडणार म्हणजे पडणार. कारण भारताचं संविधान हे सर्व श्रेष्ठ आहे. सत्ता केंद्राने संविधानाचा अधिकार पॉझिटीव्ह वापरायचा की निगेटीव्ह हा त्याचा भाग आहे. लोकहिताचा वापरायचा की सत्ता केंद्रापूरता मर्यादीत हा त्याचा भाग आहे. इंदिराजींनी स्वहितासाठी तो वापरला म्हणावा तर जनतेेने इंदिराजींना नाकारलं हेही त्रिवार सत्य आहे. आता तब्बल ४३ वर्षानंतर भाजपाचे पंतप्रधान नरेंद मोदी आणि संघ परिवाराला २५ जून हा काळा दिवस वाटतो. अन्
आणीबाणीचा शंख निनाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होतो. हे आश्‍चर्य नव्हे काय? आणीबाणीला विरोध करणारे ४३ वर्षापासून विरोध करतायत. आमच्यासारखे नवखे ही आणीबाणीचा कार्यकाळ वाचून तो कालखंड शापीत होता, अधिकारशाहीचा होता, हुकूमशाहीचा होता असंही आम्ही उघडपणे म्हणत इंदिराजींच्या त्या निर्णयाचा धिक्कार करतोय. परंतू ४३ वर्षानंतर आणीबाणीचा विषय समोर करून संघ परिवाराला आणि भाजपाला आज केवळ आणि केवळ सत्ता केंद्र शाबूत ठेवण्याची मनिषा असेल आणि त्या इराद्यातून या काळ्या दिवसाचा जन्म झाला असेल तर सेम-सेम म्हणावंच लागेल. कारण भाजप सरकार सत्तेत येवून चार वर्ष झाली. गेल्या तीन वर्षाच्या कालखंडातही या देशाला आणि या देशातील भाजप सरकारला २५ जून १७, १६, १५ साल आठवल नाही. त्या सालामध्ये २५ जून आला नाही. या तीन वर्षामध्ये २५ जून हा काळा दिवस म्हणून साजरा करावा असही भाजपाला वाटलं नाही. केवळ २०१९ च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पुन्हा आपलं निष्क्रीय हत्यार बाहेर काढलं. जातीपातीचं शस्त्र समोर आणलं अन् पुन्हा शिळ्या कढीला उत देत २५ जूनचा काळा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला. आम्हाला आश्‍चर्य वाटतं. जर आणीबाणी लादून इंदिराजींनी देशाचं वाटोळ केलं तर मग याच देशाने इंदिराजींना पुन्हा डोक्यावर का घेतलं? हा प्रश्‍न आणीबाणीचा दिवस काळा म्हणून साजरा करणार्‍यांना नक्कीच पडायला हवा. आणीबाणीचा कलखंड जर जहरीला होता तर भाजपाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आज देशात जी अस्थिरता आहे
ती आणीबाणी नव्हे काय?
नोटबंदीच्या कार्यकाळामध्ये देशभरात जो हल्लाकल्लोळ उडाला. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला ज्या यातना झाल्या, जी पिढा झाली. बँकेच्या लाईनमध्ये उभा राहिलेल्या सर्वसामान्य माणसाचा जो मृत्यू झाला तो काय आणीबाणीपेक्षा कमी म्हणायचा काय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी जाहीरपणे सरकारचे वाभाडे काढले. ही आणीबाणी नव्हती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातल्या स्मृती इराणी यांनी वृत्तपत्राची मुस्कटदाबी करत फेक न्यूजचा आधार घेत वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल करणे आणि त्या पत्रकाराला, संपादकाला जेलमध्ये डांबण्याची तरतूद करणे ही मुस्कटदाबी नव्हती काय? सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी साडे तिनशेपेक्षा जास्त वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या. सातशेपेक्षा जास्त वृत्तपत्र ब वर्गातून कमी करण्याच्या हालचाली केल्या. हा आणीबाणीचा काळ नव्हे काय? ही वृत्तपत्राची मुस्कटदाबी म्हणजे सरकारची हुकूमशाही नव्हे काय? असे एक ना अनेक प्रश्‍न याठिकाणी उपस्थित करता येतील. एकीकडे नोटबंदी होते आणि अवघ्या तीन दिवसामध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ज्या बँकेचे संचालक आहेत त्या बँकेत ५७५ कोटी रूपये जुन्या नोटा जमा होतात. हे आणीबाणीचे लक्षण नव्हे काय? शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारांचे लोंढे आणि भाजपाचे मुर्ख बनवण्याचे धंदे ही आणीबाणी नाही काय? भारतीय जनता पार्टी आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देश फेकू म्हणून पाहतो असं आम्ही म्हणत नाही तर देशातली जनता सोशल नेटवर्कींग मिडियावर आक्रमकपणे भाष्य करते. मग २५ जून आत्ताच काळा दिवस साजरा करण्यामागं
इंदिराद्वेषाचं विष
म्हणायच का? निवडणुक लढवतांना दाखवलेले मुंगरीलाल के हसीन सपने भाजपाला प्रत्यक्षात उतरा आले नाहीत आणि ते येणारही नव्हते. गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भावनिक मुद्याला हात घालायचा, वर्षानु वर्षे चालत आलेल्या धार्मिक मुद्याला समोर करायचे. कधी म्हणायचे मंदिर वही बनायेंगे परंतू तारीख नही बतायेंगे, कधी म्हणायचे सर्वांच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख जमा होतील परंतू हक्काचे पैसे घेण्यासाठीच लोकांना रांगेत उभा करायचे. असे एक ना एक जुमले करत पुन्हा एखाद्या विषयी द्वेष मनात ठेवून राजकारण करायचं. आज भाजपाने इंदिराद्वेषाचं राजकारण समोर केलं. आणीबाणीचं विष समोर आणत कॉंग्रेसला मुर्छीत करण्याचा प्रयास केला गेला. इंंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशाला होरपाळलं हे जरी सत्य असलं तरी इंदिरा गांधींचं कर्तृत्व स्विकारावच लागेल. पारंपारिक, प्रतिस्पर्धी आणि कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानच्या उरात धडकी भरवणारी, बांगलादेशाला धुळ चारणारी मर्दानी इंदिरा गांधी आठवावी लागले. आणीबाणीचा कालखंड सोडला तर इंदिरा गांधींचं सरकार हे मोदी सरकारपेक्षा उच्चीत होतं असं म्हणण्याचं धाडस आम्ही नक्की करू. आजच्या पद्धतीने आणीबाणी देशासमोर मांडली जातेय तो अनुभव तर आज अखंड देश आणि देशातल्या सर्व क्षेत्रातले लोक घेतायत हेही तेवढच खरं. भाजपाने सत्ता केंद्र समोर ठेवून जो उद्योग सुरू केला आहे. तो उद्योग देशात माणसा माणसात विष कालवणारा आहे. कधी जात, पात, धर्म, पंताच्या नावावर कधी सावरकर-जीनाच्या तर कधी महात्मा गांधी-नथुराम गोडसेंच्या विषयावर. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मनुस्मृतीच्या तर कधी इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानांच्या विषयावर भाष्य करायचं, देशवासियांच्या भावना उचंबळून आणायच्या आणि आपली स्वार्थाची पोळी भाजायची. परंतू भाजपाचं हे धोरण माणसाला माणूस म्हणून ठेवणारं नाही हे आता गृहीत धरायला हवं. कारण आपल्या बाप दादांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्तरंजित लढाय्या कराव्या लागल्या. परंतू आता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी माणूस म्हणून रहावं लागेल आणि माणूस म्हणून राहतांना सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव प्रत्येकांना ठेवावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून चांगलेच उत्तर दिले आहे. आपल्या व्यंगचित्रामध्ये मोदी देशवासियांच्या उरावर उभे राहून मोदी वृत्तपत्र, टेलिव्हिजन चॅनल, उद्योगपती, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांना वेठीस धरून कसे काम करतात हे दाखवताना राज ठाकरेंनी ‘लोका सांगे...’ हे सचित्र दिलं. याचं आत्मचिंतन भाजपाला करावा लागेल.