Thursday, 5 July 2018


कसलं प्रोफेशनअन् कसलं ‘सक्सेस’‘भो’ करतात ‘साले’

ही स्टेप का येवू देता?

रोखठोक गणेश सावंत -9422742810


स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येने महाराष्ट्राच्या पटलावर अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ज्ञानदानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय काय? ज्ञानदान हा धंदा बनलाय काय? गुरू, शिक्षक हे अर्थकारणासाठी कामांध होत आहेत काय? शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात लोभ, माया, मत्सर वाढत चाललाय काय? जिथं शिक्षणासाठी कैईकांनी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं तिथं स्वत:च आयुष्य भौतिक सुखात रमवण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे पाईक केवळ अर्थकारणालाच महत्त्व देत आहेत काय? खाजगी कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा हा सरकारी शिक्षण क्षेत्राला आव्हान देतोय काय? खाजगी कोचिंग क्लासेसद्वारा सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी यंत्रणा उभी राहतेय का? सरकार या खाजगी कोचिंग क्लासेसकडे दुुर्लक्ष का करतय? त्यांना नियम अटी का लावल्या जात नाहीत? ही शिक्षणाची खाजगी यंत्रणा खरच गुणवत्ता घडवतेय काय? ही यंत्रणा समाजा समाजातील विद्यार्थ्यांचे मस्तक खरच नांगरतेय काय? यासह खाजगी शिक्षण यंत्रणा ‘प्रोफेशनल’ झालीय काय? यामध्ये विद्यार्थी ‘सक्सेस‘ होतात की यंत्रणा चालवणारे? एवढे होवूनही ‘भो’ करतात ‘साले’ याचचं ज्वलंत उदाहरण अविनाश चव्हाणची हत्या. हे उघड सत्य नाकारता येत नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय ही ‘स्टेप’ का येवू देता? 
स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची तीन दिवसापूर्वी लातूरात भरवस्तीत गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. चव्हाण यांच्या हत्येने एक नरदेह नष्ट झाला असला तरी ही हत्या अविनाश चव्हाणांची नसून पवित्र शिक्षण क्षेत्राची म्हणावी लागेल. महाराष्ट्र हा साधु, संत, सुफी आणि समाज सुधारकांचा प्रदेश आहे. इथेच सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाला शिकता यावं, अन्य समाजाशी खांद्याला खांदा लावून चालता यावं म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला सर्वांगीण करण्याच्या उदाक्त हेतूने फुलेंपासून भाऊराव पाटलांपर्यंत अनेकांनी शिक्षणासाठी, ज्ञानदानासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं. लेखी बाळीपासून पोरा, सोरापर्यंत ज्ञानार्जन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. रात्रीचा दिवस केला आपले डोळे फोडले. परंतू इतरांच्या डोळ्यात प्रकाश दिला. त्याच महाराष्ट्रात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे बाजारीकरण झाले. सावित्रीबाई फुलेंपासून भाऊराव पाटलापर्यंतच्या समाज सुधारकांचा शिक्षणाकडे पाहिला जाणारा दृष्टीकोन आज मितीला डोळ्यासमोर आणला तर आजच्या शिक्षण व्यवस्थेेवर आसूड ओढावे वाटतील. मग ती शिक्षण व्यवस्था सरकारी असो वा खाजगी एखादा कामांध झालेला व्यक्ती जशी आपली काम वासना भागवण्यासाठी लाज, लज्जा सोडतो. श्वान जसं भाद्रपद महिना आल्यागद जिथं तिथं वर तंगडी करत राहतं त्यास्थितीत आजची शिक्षण प्रणाली असल्याचे उघडपणे म्हटले तरी त्याबाबत आम्हाला काहीच वाटणार नाही. सरकारी यंत्रणा असो, खाजगी संस्था असोत अथवा नव्याने उभी राहत चाललेली आणि सरकारलाच आव्हान देवू पाहणारी खाजगी कोचिंग क्लासेसची यंत्रणा असो ही यंत्रणा केवळ आणि केवळ अर्थकरणाच्या लोभापाई ज्ञानार्जनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. आणि हेच दुर्लक्ष सरकारी यंत्रणेकडूनही होत असल्याने 
शिक्षण क्षेत्राचीच हत्या 
जिथं तिथं या ना त्या मार्गाने पहावयास मिळते. लातूरमध्ये अविनाश चव्हाणची हत्या ही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला रक्तरंजित आणि रक्ताळलेली करून टाकणारी आहे. अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप ही खाजगी कोचिंग क्लास लातूरमध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये बहुचर्चित क्लास राहिली. अवघ्या काही वर्षात खाजगी कोचिंगमध्ये अविनाश चव्हाण यांनी नावलौकीक मिळून घेतलं. पैसा सर्वस्व नाही हे जेवढं सत्य तेवढच अविनाश चव्हाण यांनी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना आकर्षित केलं नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी चांगले प्राध्यापक, प्राचार्य त्यांनी आपल्या क्लासमध्ये शिकवणीसाठी ठेवले. यातून स्टेप बाय स्टेपचा निकाल चांगला लागत गेला, गुणवत्ता वाढत केली आणि त्या गुणवत्तेतून विद्यार्थी घडत गेला. स्टेप बाय स्टेपची शिक्षण प्रणाली तेवढीच पॉझीटीव्ह पहावयास मिळाली. परंतू अविनाश चव्हाण यांनीही या ठिकाणी या क्षेत्राला प्रोफेशनल (व्यवसाय) म्हणून पाहिलं. या क्षेत्रात यश येत गेल्याने अविनाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, तरूण वर्गाची मानसिकता पाहत लातूरात अद्यावत जीम स्थापन केली. त्याच्या उद्घाटनासाठी लातूरात सर्व प्रथम सनी लिओनी आणून अविनाश चव्हाण पुन्हा चर्चेत राहिले. एक मातब्बर प्रोफेशनल व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांना सक्सेस देणारा तरणा ताठा म्हणून अविनाशकडे लातूरमध्ये पाहण्यात येवू लागलं. यातून पक्ष संघटनाशी कधी दूरचा तर कधी जवळचा संबंध येत राहिला. अन् इथच अनेकांना अविनाशचं यश, अविनाशच अर्थकारण, त्याचं प्रोफेशनल, त्याच सक्सेस खटकत राहिलं आणि तिथच इतर क्लासेसवाले अविनाश ‘भो’ करत राहिले. अविनाशची हत्या जेंव्हा झाली त्यानंतर अवघ्या १२ ते १५ तासात लातूर पोलीसांनी या खूनाचा छडा लावला तेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर पडली. अविनाशची हत्या ही क्लासेसच्या प्रोफेशनलपणातून सक्सेसच्या चढाओढीतून आणि‘भो’ करणार्‍या साल्यांकडून झाल्याचे उघड झाले. तेंव्हा उभ्या महाराष्ट्रात शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र काळवडलं. अविनाशची हत्या ही एका नरदेहाची हत्या आहे की अखंड शिक्षण प्रणालीची? यावर नुसती चर्चा, आत्मचिंतने करून भागणार नाही तर या 
हत्यामागचं गुढ आणि सत्य 
बाहेर येणं अधिक महत्त्वाचं. या हत्येचा मास्टर माईंट अविनाश चव्हाणचा जुना भागिदार प्रा.चंदनकुमार शर्मा हा असल्याचे जेंव्हा उघड झाले आणि चंदनकुमार शर्मा हा बिहारी असल्याचे सत्य जेंव्हा समोर आले तेंव्हा खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये गुन्हेगारी शिरकाव गेल्या दशकभरापासून झाल्याचे स्पष्टपणे जाणवले. चंदनकुमार शर्मा याने अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी २० लाख रूपयाची सुपारी दिली. त्याचे नगदी साडे आठ लाख रूपये करण गहिवार नावाच्या वादग्रस्त व्यक्तीला देण्यात आले. गहिवारसह अन्य चौघांनी रेखी करून अत्यंत प्रोफेशन आणि सक्सेस पद्धतीने या हत्याकांडाला अंजाम दिला. गहिवार नावाचा व्यक्ती हा सुपारीबाज असला तरी तो भाजपाचे मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा कधी काळचा अंगरक्षक असल्याचा बोलबाला उघड होत गेला. परंतू यावर निलंगेकरांनी तो माझा अंगरक्षक कधीच नव्हता, कधी काळचा तो कार्यकर्ता होता. असे कार्यकर्ता येतात आणि जातात अशी प्रतिक्रिया देवून या गंभीर प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू सोशल नेटवर्कींग मिडियासह विरोधक संभाजी निलंगेकरांसोबत सफारी सूटमध्ये असलेला करण गहिवार याचे फोटो वेळोवेळी दाखवून निलंगेकरांचा तो अंगरक्षकच होता हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. खर पाहिलं तर निलंगेकरांनीही या प्रकरणात प्रामुख्याने लक्ष घालून या हत्येमागचं गुढ आणि सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना नुसती मदतच नव्हे तर पोलिसांकडून हे सत्य बाहेर काढावं कारण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात झालेली ही हत्या एकट्या अविनाश चव्हाणची नसून ती अखंड शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षण क्षेत्राला बाजारीकरण करू पाहणार्‍या हत्यारांना जगासमोर आणणारी आहे. खाजगी कोचिंग क्लासेस हा 
स्वार्थ साधून पोट भरण्याचा धंदा
काही काळापर्यंत मर्यादीत होता. परंतू आता नुसत पोटच भरण्याचा नसून आर्थिक बाबीसोबत थेट शय्यासोबत करण्याचा धंदा होवून बसला. लातूरमध्ये सर्वात जास्त क्लासेस आहेत. प्रत्येक वर्षी २५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी लातूरमध्ये केवळ शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आपल्या मुलीचे, मुलाचे भविष्य घडले जावे, भविष्यात ते यशोशिखरावर जावेत या प्रांजळ मताने प्रत्येक पालक पैशाची तमा न बाळगता स्वत:हून खाजगी क्लासेसपर्यंत जातात. आज लातूरात ज्या भागात क्लासेस आहेत तो भाग पाहिला तर जेवढे विद्यार्थी-विद्यार्थीनी त्या ठिकाणी वावरतांना दिसतात तेवढेच ‘बाऊंसर’ही पहायला मिळतात. बाऊंसर त्याठिकाणी हवेत कशाला? याचा अर्थ खाजगी कोचिंगने प्रोफेशनलपणा अंगीकारलाय. सक्सेसचा नारा देत पालकांच्या आयचा घो करत ‘भो’ करणारे साले जिथं तिथं वावरतांना दिसतात. आज एकट्या लातूरात अविनाश चव्हाणची हत्या होवूनही शिक्षण क्षेत्राला रक्तरंजित करणारा इतिहास २१ व्या शतकात पहायला मिळाला, तो गंभीरच. लातूरसह आता जिल्ह्या- जिल्ह्यात अर्थकारणाच्या ललनेवर फिदा होणारे प्रोफेशनल आणि सक्सेसशी कोचिंग क्लासेसवाले शिक्षणाला धंदा बनू पाहत आहेत. यावर ना सराकरचं नियंत्रण ना पालकांचं. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये 
सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी 
यंत्रणा उभी राहतेच कशी? 
हा जाहीर सवाल थेट सरकारला विचारावासा वाटतो. वेळीच खाजगी कोचिंग क्लासेसच्या या धंदेवाईक पणावर आळा घातला नाही. या लोकांना वेसन टोचल्या नाही तर हे खाजगी कोचिंग क्लासेसवाले वळुगत वर शेपूट करतील आणि उधळत राहतील. त्यासाठी अविनाश चव्हाणची हत्या हा रक्ताळलेला इतिहास न ठरवता. यापुढ शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात रक्तरंजित घटना घडणार नाहीत. त्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना विशिष्ट घटनेमध्ये बांधून ठेवायला हवे. या लोकांकडे एका वर्गात किती विद्यार्थी असायला हवेत? शिक्षक, प्राध्यापक हे दर्जेेदार आहेत का? त्यांचे शिक्षण योग्यतेच आहे का? विद्यार्थ्यांना शिकवू शकतात का? शिकवणी चालकांनी विद्यार्थ्यांकडून किती फिस घ्यावी, विद्यार्थ्यासाठी आसन व्यवस्था आहे का? शुद्ध पाणी पिण्यासाठी आहे का? बाथरूम, टॉयलेट याची व्यवस्था आहे का? पार्कींग आहे का? संबंधित क्लासचे संचालक महिन्या, तीन महिन्याला विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलतात का? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची हमी संबंधित क्लासेस देतय का? हमी देत नसेल आणि क्लासेस विद्यार्थ्यांना योग्य गुणवत्ता देत नसेल तर अशा क्लासेसवर दंड आकरता येईल का? कायदेशीर कारवाई करता येईल? मोबदला घेवून शिक्षण दिलं जातं याचा अर्थ पालक हे ग्राहक आहे आणि क्लासेस ही दुकान आहे त्यामुळे त्या दुकानातून दिला जाणार माल तेवढाच दर्जदार असायला हवा. याकडेही सरकार लक्ष देईल का? मुळात आजचे कोचिंग क्लासेस म्हणजे कसले प्रोफेशन आणि कसले सक्सेस यास्थितीत असल्याने सरकारी यंत्रणेसह पालकांनी सगज राहिलं, जाब विचारले तरच ही यंत्रणा अटोक्यात राहिल नसता नाक्या-नाक्यावर खाजगी कोचिंग क्लासेसचा रक्तरंजित इतिहास पुन्हा-पुन्हा लिहिला जाईल हे महाराष्ट्राच्या वैचारिकतेला ज्ञान दानाच्या व्यक्तीला मानहाणीकारक असेल.

No comments:

Post a Comment