Thursday, 5 July 2018

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. १ जुलै रविवार अग्रलेख

आणीबाणीचा शंख निनाद
इंदिराद्वेषाचं विष

-गणेश सावंत-9422742810


पंतप्रधान नरेंद मोदींनी आणीबाणीचा शंख निनाद केला. आणीबाणीचं साल आणि तारीख काळा दिवस म्हणून भाजपाने साजराही केला. यावर आम्ही भाष्य करावं की नाही याच्या विचारात होतो. कारण तेंव्हा आम्ही जन्मालाही आलो नव्हतो. २५ जून १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी अक्षरश: जीवघेणी होती. असं भाजपातल्या नेत्यांचं म्हणणं आहे, संघ परिवाराचं म्हणणं आहे. जो संघ कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नव्हता. परंतू आणीबाणीच्या लढ्यात त्या संघातले काही जण दृष्टीक्षेपात पडायचे. त्यांच्या मते २५ जून हा काळा दिवस! नक्कीच आम्हीही आणीबाणीचे पुरस्कर्ते नाहीत की आजच्या मोदी सरकारचे विरोधक काळा दिवस आला काय आणि गेला काय त्यात फरक पडण्यासारखं काहीच नाही. कारण गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारने जी मुस्कटदाबी केली, सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या उरावर नाचून सत्ता केंद्राला जे महत्त्व दिलं ते तरी आम्ही याची देही याची डोळा पाहतो. त्यामुळे आणीबाणी एवढी बिकट असेल तर आजचे दिवसही आणीबाणीपेक्षा कमी नाहीत. हे उघड आणि स्पष्टपणे सांगायला आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत. कारण भाजप सरकारला जेंव्हा केंव्हा आपली पडती कळा दिसून येते तेंव्हा-तेंव्हा सरकार जात, पात, धर्म, पंत अथवा इतिहासातल्या त्रुटी समोर आणून सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडूनच केला जातो. आम्ही तर उघडपणे लिहितांनाच म्हटलयं, आणीबाणीच्या काळात आमचा जन्मही झाला नव्हता परंतू, आणीबाणीचे आजपर्यंत सर्वसमावेशक वाचन केल्यानंतर आणीबाणीवर लिहितांना, चिंतन करतांना आणीबाणीचे सर्व पैलू डोळ्यासमोर येतात. परंतू भाजप केवळ सत्ता केंद्र आपलंस करण्यासाठी स्वार्थ हेतूने विषय हाताळतो. आणि या विषयांचे संदर्भ जेंव्हा १९७५ साली जन्मलेले आणि पाळण्यात असलेले बाळुत्यात सू-सू करणारे बोलायला लागतात. तेंव्हा मात्र अशांची किव करण्यापेक्षा त्यांना आणीबाणीतला आजच्या परिस्थितीतला हा सूर्य आणि हा जयद्रथ आम्हाला दाखवावासा वाटतो.
इंदिराजींची आणीबाणी
२५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. तो काळ तसा भयावह होता. नुकत्याच १९७१ चे बांगलादेशाबरोबरचे युद्ध संपलेले होते. देशात भयंकर दुष्काळ पडलेला होता. अन्न धान्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वत्र हाहा माजलेला होता. देशाची लोकसंख्या स्वातंत्र्य काळापासून २५ ते २७ वर्षाच्या कालखंडात दुप्पटीने या अडीच पटीने झाली होती. अशा वेळी विरोधकही आक्रमक झाले होते. जयप्रकाश नारायण सारखे नेते अक्षरश: सरकारला नुसतं कोंडीत पकडत नव्हते तर सरकारचे आदेश पाळू नका म्हणून लष्काराला आणि पोलीस दलाला आवाहन करत होते. अनेक आजचे सत्तेतले नेतेही गांधींविरोधात तुटून पडत होते. अशा स्थितीत इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. आपल्याकडे अमर्याद अधिकार घेतले, नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली. सरकारच्या निर्णयाविरूद्ध वागेल त्याला कारागृहात टाकण्याची मोहिम त्यांनी चालू ठेवली. जो सरकार विरोधात बोलेल तो जणू देशाचा दुश्मन या स्थितीमध्ये आणीबाणीचे एक वाक्यात विवेंचन करावे लागेल. आणीबाणीला जो प्रत्यक्ष विरोध करेल, जो अप्रत्यक्ष विरोध करेल, आणीबाणीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात जो बोलेल जो लिहिल त्याची धरपकड केली. हे सर्व इंदिरा गांधींनी सरकारवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अथवा स्वत:च सरकार वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा
घटनात्मक अधिकार
इंदिराजींनी देशावर लादलेली आणीबाणी हा घटनात्मक अधिकार म्हणावा लागेल. कारण भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी आणीबाणी लादली. या कार्यकाळामध्ये नक्कीच देशातील सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला प्रचंड यातना झल्या. देशवासियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात गदा आली. त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. परंतू हे सर्व इंदिरा गांधींनी अत्यंत घटनेच्या चौकटीत राहून केले हे ही विसरता येणार नाही. आणीबाणी म्हणजे हिटलरशाही नव्हे किंवा रोमचा राजा न्युरोसारखा लहरीपणा नव्हे. आणीबाणी ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यातल्या संविधानामधला एक अधिकार म्हणावा लागेल. परंतू हा अधिकार वापरायचा की नाही? आणि या अधिकारातून लोकहित जपायचं की स्वत:च सत्ता केंद्र जपायचं हा ज्याच्या त्याचा भाग. म्हणूनच आणीबाणी लादल्यानंतर इंदिराजींनी स्वत:च सत्ता केंद्र जपलं. लोकहित जपण्यापेक्षा सरकारवरचा धोका त्यांना महत्त्वाचा वाटला. घटनेच्या अधिकारातून आणीबाणी लादल्यानंतर लोकात जो संताप उसळला. त्या संतापाला इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले. पुढच्या निवडणूकीमध्ये इंदिरा गांधींचा दारून पराभव झाला. प्रथमच देशात कॉंग्रेस व्यतिरीक्त सरकार स्थापन झाले. इंदिरा गांधींना त्यांची चुक उमजून आली. त्यांनी चुक कबुल केली. देशवासियांची माफीही मागितली. त्यानंतर पुन्हा या देशावर इंदिरा गांधींचं सरकार आलं. देशवासियांनी इंदिरा गांधींना जवळ केलं. २५ जून जर काळा दिवस असेल तर त्यानंतर लोकांनी इंदिराजींना स्विकारलेल्या दिवसाला सोनेरी दिवस म्हणायचे की काळा दिवस? हा प्रश्‍न आणीबाणीत न जन्मलेल्या माझ्यासारख्याला पडणार म्हणजे पडणार. कारण भारताचं संविधान हे सर्व श्रेष्ठ आहे. सत्ता केंद्राने संविधानाचा अधिकार पॉझिटीव्ह वापरायचा की निगेटीव्ह हा त्याचा भाग आहे. लोकहिताचा वापरायचा की सत्ता केंद्रापूरता मर्यादीत हा त्याचा भाग आहे. इंदिराजींनी स्वहितासाठी तो वापरला म्हणावा तर जनतेेने इंदिराजींना नाकारलं हेही त्रिवार सत्य आहे. आता तब्बल ४३ वर्षानंतर भाजपाचे पंतप्रधान नरेंद मोदी आणि संघ परिवाराला २५ जून हा काळा दिवस वाटतो. अन्
आणीबाणीचा शंख निनाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होतो. हे आश्‍चर्य नव्हे काय? आणीबाणीला विरोध करणारे ४३ वर्षापासून विरोध करतायत. आमच्यासारखे नवखे ही आणीबाणीचा कार्यकाळ वाचून तो कालखंड शापीत होता, अधिकारशाहीचा होता, हुकूमशाहीचा होता असंही आम्ही उघडपणे म्हणत इंदिराजींच्या त्या निर्णयाचा धिक्कार करतोय. परंतू ४३ वर्षानंतर आणीबाणीचा विषय समोर करून संघ परिवाराला आणि भाजपाला आज केवळ आणि केवळ सत्ता केंद्र शाबूत ठेवण्याची मनिषा असेल आणि त्या इराद्यातून या काळ्या दिवसाचा जन्म झाला असेल तर सेम-सेम म्हणावंच लागेल. कारण भाजप सरकार सत्तेत येवून चार वर्ष झाली. गेल्या तीन वर्षाच्या कालखंडातही या देशाला आणि या देशातील भाजप सरकारला २५ जून १७, १६, १५ साल आठवल नाही. त्या सालामध्ये २५ जून आला नाही. या तीन वर्षामध्ये २५ जून हा काळा दिवस म्हणून साजरा करावा असही भाजपाला वाटलं नाही. केवळ २०१९ च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पुन्हा आपलं निष्क्रीय हत्यार बाहेर काढलं. जातीपातीचं शस्त्र समोर आणलं अन् पुन्हा शिळ्या कढीला उत देत २५ जूनचा काळा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला. आम्हाला आश्‍चर्य वाटतं. जर आणीबाणी लादून इंदिराजींनी देशाचं वाटोळ केलं तर मग याच देशाने इंदिराजींना पुन्हा डोक्यावर का घेतलं? हा प्रश्‍न आणीबाणीचा दिवस काळा म्हणून साजरा करणार्‍यांना नक्कीच पडायला हवा. आणीबाणीचा कलखंड जर जहरीला होता तर भाजपाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आज देशात जी अस्थिरता आहे
ती आणीबाणी नव्हे काय?
नोटबंदीच्या कार्यकाळामध्ये देशभरात जो हल्लाकल्लोळ उडाला. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला ज्या यातना झाल्या, जी पिढा झाली. बँकेच्या लाईनमध्ये उभा राहिलेल्या सर्वसामान्य माणसाचा जो मृत्यू झाला तो काय आणीबाणीपेक्षा कमी म्हणायचा काय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी जाहीरपणे सरकारचे वाभाडे काढले. ही आणीबाणी नव्हती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातल्या स्मृती इराणी यांनी वृत्तपत्राची मुस्कटदाबी करत फेक न्यूजचा आधार घेत वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल करणे आणि त्या पत्रकाराला, संपादकाला जेलमध्ये डांबण्याची तरतूद करणे ही मुस्कटदाबी नव्हती काय? सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी साडे तिनशेपेक्षा जास्त वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या. सातशेपेक्षा जास्त वृत्तपत्र ब वर्गातून कमी करण्याच्या हालचाली केल्या. हा आणीबाणीचा काळ नव्हे काय? ही वृत्तपत्राची मुस्कटदाबी म्हणजे सरकारची हुकूमशाही नव्हे काय? असे एक ना अनेक प्रश्‍न याठिकाणी उपस्थित करता येतील. एकीकडे नोटबंदी होते आणि अवघ्या तीन दिवसामध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ज्या बँकेचे संचालक आहेत त्या बँकेत ५७५ कोटी रूपये जुन्या नोटा जमा होतात. हे आणीबाणीचे लक्षण नव्हे काय? शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारांचे लोंढे आणि भाजपाचे मुर्ख बनवण्याचे धंदे ही आणीबाणी नाही काय? भारतीय जनता पार्टी आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देश फेकू म्हणून पाहतो असं आम्ही म्हणत नाही तर देशातली जनता सोशल नेटवर्कींग मिडियावर आक्रमकपणे भाष्य करते. मग २५ जून आत्ताच काळा दिवस साजरा करण्यामागं
इंदिराद्वेषाचं विष
म्हणायच का? निवडणुक लढवतांना दाखवलेले मुंगरीलाल के हसीन सपने भाजपाला प्रत्यक्षात उतरा आले नाहीत आणि ते येणारही नव्हते. गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भावनिक मुद्याला हात घालायचा, वर्षानु वर्षे चालत आलेल्या धार्मिक मुद्याला समोर करायचे. कधी म्हणायचे मंदिर वही बनायेंगे परंतू तारीख नही बतायेंगे, कधी म्हणायचे सर्वांच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख जमा होतील परंतू हक्काचे पैसे घेण्यासाठीच लोकांना रांगेत उभा करायचे. असे एक ना एक जुमले करत पुन्हा एखाद्या विषयी द्वेष मनात ठेवून राजकारण करायचं. आज भाजपाने इंदिराद्वेषाचं राजकारण समोर केलं. आणीबाणीचं विष समोर आणत कॉंग्रेसला मुर्छीत करण्याचा प्रयास केला गेला. इंंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशाला होरपाळलं हे जरी सत्य असलं तरी इंदिरा गांधींचं कर्तृत्व स्विकारावच लागेल. पारंपारिक, प्रतिस्पर्धी आणि कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानच्या उरात धडकी भरवणारी, बांगलादेशाला धुळ चारणारी मर्दानी इंदिरा गांधी आठवावी लागले. आणीबाणीचा कालखंड सोडला तर इंदिरा गांधींचं सरकार हे मोदी सरकारपेक्षा उच्चीत होतं असं म्हणण्याचं धाडस आम्ही नक्की करू. आजच्या पद्धतीने आणीबाणी देशासमोर मांडली जातेय तो अनुभव तर आज अखंड देश आणि देशातल्या सर्व क्षेत्रातले लोक घेतायत हेही तेवढच खरं. भाजपाने सत्ता केंद्र समोर ठेवून जो उद्योग सुरू केला आहे. तो उद्योग देशात माणसा माणसात विष कालवणारा आहे. कधी जात, पात, धर्म, पंताच्या नावावर कधी सावरकर-जीनाच्या तर कधी महात्मा गांधी-नथुराम गोडसेंच्या विषयावर. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मनुस्मृतीच्या तर कधी इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानांच्या विषयावर भाष्य करायचं, देशवासियांच्या भावना उचंबळून आणायच्या आणि आपली स्वार्थाची पोळी भाजायची. परंतू भाजपाचं हे धोरण माणसाला माणूस म्हणून ठेवणारं नाही हे आता गृहीत धरायला हवं. कारण आपल्या बाप दादांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्तरंजित लढाय्या कराव्या लागल्या. परंतू आता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी माणूस म्हणून रहावं लागेल आणि माणूस म्हणून राहतांना सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव प्रत्येकांना ठेवावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून चांगलेच उत्तर दिले आहे. आपल्या व्यंगचित्रामध्ये मोदी देशवासियांच्या उरावर उभे राहून मोदी वृत्तपत्र, टेलिव्हिजन चॅनल, उद्योगपती, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांना वेठीस धरून कसे काम करतात हे दाखवताना राज ठाकरेंनी ‘लोका सांगे...’ हे सचित्र दिलं. याचं आत्मचिंतन भाजपाला करावा लागेल.

No comments:

Post a Comment