कपाळमोक्ष
‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....
रोखठोक
गणेश सावंत
9422742810 -----------
आंधळी आणि बहिरी दिल्ली तर आहेच. आता अंधश्रद्धाळु आणि कपाळ मोक्षी दिल्ली पहायला भेटली. गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीतल्या बुराडी भागात देशात सनसनी निर्माण करून टाकणारी घटना घडली. वडाच्या पारंब्या लटकाव्यात तसे एका घरात एकाच कुटुंबातले एक नव्हे दोन नव्हे अकरा सदस्य लटकलेले दिसले. मोक्ष प्राप्तीसाठी भाटिया कुटुंबातल्या सदस्यांनी हे कपाळ मोक्षी धाडस केलं. या धाडस म्हणता येणार नाही तर हे कृत्य जागतिक महासत्ताक होणार्या हिंदुस्तानसाठी विचार करावयास लावणारं. आत्मा बाहेर जाईल आणि पुन्हा परत येईल यासाठी घराला अकरा पाईप लावण्यात आले. या सर्व घटनाक्रमावरून एकच लक्षात येतं या देशातला ग्रामिण भाग असो या शहरी भाग असो जिथं तिथं कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरविणार्यांनी आपली छाप कायम ठेवली. महाराष्ट्रसह देशातल्या प्रत्येक भागात साधु, संत सुफी आणि समाज सुधारकांनी देशवासियांचे मस्तक नांगरण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. परंतू वर्षामागून वर्ष गेले, दशका मागून दशके गेले, शतका मागून शतके चालली तरीही अंधश्रद्धेच्या जखड्यात अडकलेले देशवासी सुधरायला तयार नाहीत. या आत्महत्या कांडाचा सुत्रधार मोक्ष असेल तर अशा मोक्षास शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था की समाज व्यवस्था दोषी? हे आता उमजून घ्यावच लागेल. दिल्लीतल्या भाटीया या कुटुंबाविषयी उत्तर दिल्लीतल्या संतनगर बुराडी भागातल्या गल्ली क्रमांक ४ए मध्ये शिरताच उजव्या बाजूला दोन प्लॉट सोडून एक तीन मजली घर आहे. तिथे आता एक फक्त एक पाळीव कुत्रा जिवंत आहे.त्या घरातले सर्वच्या सर्व ११ जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते. भाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात १० लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या २० वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते. अंदाजे ७५ वर्षीय महिला नारायण, त्यांची दोन मुलं भुप्पी (४६) आणि ललित (४२) त्यांच्या पत्नी सविता (४२) आणि टीना (३८) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. भुप्पी यांच्या दोन तरुण मुली आणि एक अल्पवयीन मुलगा तसंच ललित यांचा १२ वर्षांचा मुलगाही मृतावस्थेत होते. या ११ लोकांमध्ये नारायण यांची एक विधवा मुलगी आणि तिची मुलगी (म्हणजे नारायण यांची नात) प्रियंका (३०) यांचाही समावेश आहे. प्रियंका यांचा १७ जूनला साखरपुडा झाला होता आणि ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न नियोजित होतं.हे कुटुंब सुशिक्षीत असतांना धार्मिकते बरोबर सर्वात मोठं अंधश्रद्धाळू कुटुंब असल्याचा धक्कादायक खुलासा या लोकांच्या आत्महत्येनंतर तपासकामी असलेल्या पोलिसांना ज्या डायर्या मिळून आल्या त्यातून झाला. राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या शहरात अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातले अकरा लोक गळफास घेवून लटकत असतील तर जय जवान जय किसान बरोबर दिलेल्या जय विज्ञानच्या नार्याला ही जबरदस्त चपराक म्हणावी लागेल. या देशात अनेक संत, महात्मे, सुफी, समाज सुधारक होवून गेले. उभं आयुष्य त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगावण्यासाठी आणि त्यांच्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चंदनासारखं झिजवलं. परंतू गल्ली ते दिल्ली बुवा, बबा आणि बयांनी अक्षरश: उच्छाद मांडला. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात भंप्पक महाराजया देशाने याची देही याची डोळा पाहिले. त्यांचे नागवे कुुकर्म उघड्या डोळ्याने अनुभवले. मोहमाया आणि वासनाही या महाराजांची देशवासियांनी अनुभवली. खेड्या पाड्यात जे छोटे-मोठे महाराज, बुवा पहायला मिळाले तेच मोठं-मोठे महाराज या देशांनी अनुभवले नव्हे तर त्यांचे कुकर्म उघडे पडल्यानंतर असारामसारखेही कित्येक कामांध महाराज जेलमध्ये गेले. महाराजांची भूमिकाही केवळ लोकांना लुबाडणारी, फसवणारी आणि स्वत:चा स्वार्थ साधणारी उभ्या देशाने पाहिली तरीही या देशातला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा माणूस सुधारला नाही हेच यातून स्पष्ट होते. गेल्या दिडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांची पैदास कशी होती?याचे मर्म ग्राही विवेचन शेतकर्यांचा आसूड या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, कित्येक अक्षरशत्रु भट ब्राह्मणास पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बेखुप ठोंब्यास ढवळ्या बुवा बनवून त्याच्या पायात खडवा व गळ्यात विना घालून अज्ञाती शेतकर्याकडे प्रतिष्ठीत भीक मागत फिरतात. एखाद्या देखण्या जवानास कवळे बुवा बनून टाळ मृंदागाच्या तालात मोठ्या प्रेमाने राधाकृष्ण राधा म्हणत नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणार्या सधन रांडमुंडीस आपल्या नादी लावतात. आपली पोटभरून मोठ्या मौजा करतात. एखाद्या अर्धवेड्या भांग्यास स्वामी बनवून लोकांना त्यांच्या नावाने नाना प्रकारच्या लोणकड्या थापा देवून स्वामीच्या दर्शनास त्यांना नेवून द्रव्य हरण करतात. फरक झालाच असेल तर एवढाच की सर्व जाती धर्मात आता असे उदंड पीक आले आहे. साठ वर्षापूर्वी किरलोस्कर म्हणतात,परमार्थ, मोक्ष, इश्वरप्राप्ती, साक्षात्कार इत्यादी वावड्या धर्म कल्पनांनी आपल्याला समाजाला इतके पछाडले आहे की असल्या सामाजिक शरिरावर बुवांची व महाराजांची गळवे उठली नाहीत तर आश्चर्य. भक्ती, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक हे तर बुवांची खास हत्यारे. कोणत्याही बुवाच्या अंगी आपली रवानगी नरकात करण्याची शक्ती असणे शक्य नाही. कारण स्वर्ग आणि नरक या जागाच काल्पनिक होत त्या प्रमाणे व्यक्तीच्या पापाचे क्षालन आणि पुण्याचे संवर्धन करण्याचे सामार्थ्य कोणत्या बुवा अगर महाराजांच्या अंगी असणे शक्य नाही. ज्याच्या त्याच्या पाप पुण्याची जबाबदारी त्याच्या-त्याच्यावर आहे. त्याबाबत कोणतीही दलाली उपयोगी पडणार नाही. जो अशी दलाली करतो तो अत्यंत मुर्ख वा अट्टल डांबीस असला पाहिजे. आम्ही असे आव्हान देण्यास तयार आहोत की कोणत्या बुवा ने अगर महाराजाने आपल्या अंगी अलौकीक सामार्थ्य असल्याचे सांगावे व आम्हास त्याची परिक्षा घेवून द्यावी असले प्रकार करून कोणी महाराज आपल्या पापाचे क्षणात भस्म करून आपल्याला इश्वराच्या पायाशी पोहोचवील ही कल्पना अत्यंत खुळ्यापणाची आहे. वाचकांच्या उदाहरणासाठी आम्ही या ठिकाणी केवळ फुले आणि किरलोस्कर यांचे विचार दिले. परंतू दिल्लीत झालेलं हे मोक्ष प्राप्तीचं कांड अखंड देशाला हादरून टाकणारं, आत्मचिंतीत करणारं आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात देशाचं मान खुजी करणारच म्हणावं लागेल. जोपर्यंत देशातला सर्वसामान्यातला सर्व सामान्य माणूस पाप, पुण्य, स्वर्ग, नरक यापासून दूर जात नाही तोपर्यंत अशा घटना घडणं बंद होणार नाही हे जेवढे त्रिवार सत्य आहे तेवढेच शतको ना शतकोपूर्वी या देशातल्या साधु, संतांनी असल्या अंधश्रद्धेवर आणि कर्मकांडावर प्रचंड आसूड ओढले आहे. महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकोबांनी सर अक्षरश: अशा भोंदू गिरीचे वाभाडे काढले आहे. तुकोबांना अभ्यासा ते म्हणतात, नवसे सायेशी होती पुत्र| का करणे लागी पती ॥ नवस सायेशी करून पोरं होत असतील तर नवरा करण्याची गरज काय? हा सवाल साडेतिनशे, चारशे वर्षापूर्वी तुकोबांनी विचारला आहे. भोंदू बाबा बद्दल बोलतांना ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करूनि म्हणति साधू ॥ अंगी लावूनिया राख डोळे झाकूनिया करती पाप ॥ असं म्हणत जावूनिया तिर्था काय तु केले | चर्म प्रक्षाळीले वरीवरी ॥ तिर्थ क्षेत्रावर जावून केवळ शरिर धुतले म्हणजे तिर्थ यात्रा सफल होत नाही. अंत:करण शुद्ध होणार नसेल तर त्या तिर्थ यात्रेला काय अर्थ? होवूनिया संन्यासी भगवी लुगडी | वासना ना सोडी विषयाची ॥ नुसते भगवे कपडे परिधान करून उपयोग नाही तर अंत:करणातून वासना सोडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले. असे जे बुवा, भट, महाराज अंधश्रद्धा पसरवत असतील, कर्मकांडांना प्रोत्साहन देत असतल तर तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती असे म्हणत तुकोबांनी त्याचे हाणून थोबाड फोडा असा आदेशही त्या काळी दिला. ऐसे संत झाले कै, तोंडी तंबाखूची नळी ॥ स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली ॥ या अभंगातून व्यसनीबाज, दगाबाज बुवा, बाबांना त्यांनी चपराक लावली. टिळा, टोपी घालूनी माळा | म्हणती आम्ही साधू ॥ दया धर्म चित्त नाही | ते जाणावे भोंदू ॥ असं म्हणत ज्याच्या मनात दया नाही तो संत असूच शकत नाही. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकांची कापितो मान या अभंगात तर तुकोबा आक्रमक होतात आणि कर्मकांड करणार्या अंधश्रद्धा पसरविणार्या तथाकथित महाराजांवर हल्ला चढवतात. अशा गुरूंवर तुकोबा म्हणतात, जळोजळो ते गुरूपण, जळो जळो ते चेलेपण तुकोबांच्या हजारो अभंगात जेवढी भक्ती आहे तेवढीच अंधश्रद्धेवर आसूड ओढलेले आपल्याला दिसून येतात. असे असतांना या देशात संस्कार आणि संस्कृतीची गंगा वाहत असतांना शेकडो वर्षानंतरही जर कोणी मोक्ष प्राप्तीसाठी कर्मकांड करतांना डायरी लिहित असतील आणि स्वत:सह स्वत:च्या कुटुंबियांना अकरा सदस्यांना यम सदनी धाडत असतील तर काय म्हणावे? दिल्लीतल्या भाटीया कुटुंबियांनी आत्महत्या करण्याच्या दिवशी डायरीत लिहिलेल्या पानात हा भितीदाय मजकूर लिहिला. ‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....तुमसे कहा था कि आज दो जोत जलाना, मगर तुमने ऐसा किया नहीं... नीतू और प्रभजोत अगले दो दिन तक कुलर में सोएंगे... इनकी यही सजा हैं| धु्रव की पढाई पर ध्यान दो, तुम्हें पता हैं कि भगवान कभी भी हमारे घरमें आ सकते हैं... इसलिए पूरी तैयारी रखो| मंगलवार को मैं सामग्री लाऊंगा, तुम जाप करने बैठना | रावतभाया, सोनीपत से अगले दिन आएंगे | भगवान आएंगे तो मेहमान चले जाएंगे|’ अशा प्रकारचं हादरून सोडणारं लिखान आम्हाला वाचायला भेटलं तेंव्हा कर्मकांड आणि अंधश्रद्धा देशवासियांच्या नसानसात कशी भिनलेली आहे हे उघड चित्र दिसून आले. शेकडो वर्षापासून लोकांची मस्तके नांगरली गेली. परंतू मस्तक नांगरणार्यांपेक्षा कर्मकांड आणि अंधश्रद्धेची दहशत पसरवणारे जेंव्हा यशस्वी होतात तेंव्हा खरच भारत देश हा हिंदुस्तान जागतिक महासत्ताक होईल हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आणि अशा घटना घडल्यानंतर या घटनांची जबाबदारी शासन प्रशासन व्यवस्थेची की समाज व्यवस्थेची? या प्रश्नात अडकल्याशिवाय आम्ही राहत नाही. परंतू सरशेवटी न देखावा डोळा ऐसा हा अकांत असे म्हणून शांत तर नक्कीच बसात येणार नाही. परंतू भाटीया कुटुंबियांची ही मोक्षप्राप्ती नाही तर कपाळ करंटेपणातला कपाळमोक्षच म्हणावा लागेल.
No comments:
Post a Comment