Sunday, 14 May 2017

आई गं...

आई गं...


-गणेश सावंत- 9422742810



पळताना ठेस लागो अथवा साधं नख काढताना जिभाळी लागो, तोंडात आई गं... आल्याशिवाय राहत नाही. दु:खाचा डोंगर जेंव्हा केव्हा कोसळतो तेव्हा माईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आई हे असे व्यक्तिमत्त्व आहे जे शब्दात सांगणं कठीण आहे. आईची व्याप्ती, आईचा महिमा, आईचे वात्सल्य, प्रेम, ममता हे कुठं ग्रंथात मांडणंही कठीण आहे. कारण तिच्या वात्सल्य, प्रेम, ममतेत अवघे विश्‍व सामावलेले आहे. जेवढं वात्सल्य, प्रेम तेवढाच रांगडेपणा, तेवढाच भविष्याचा वेध घेण्याची कला त्या मातेमध्ये सातत्याने पहावयास मिळते. आई जेंव्हा आई होते तेव्हा स्त्रीला तीन जन्म घ्यावे लागतात. जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या आईच्या पोटी जन्म घेते तेव्हा तिचा भूतलावरचा पहिला जन्म, जेंव्हा ही मुलगी मोठी होते विवाह योग्य होते, आपल्या आईला सोडून जाते, विवाह करते त्या वेळेस तिचा दुसरा जन्म असतो आणि जेंव्हा प्रत्यक्षात ति आई होते तेव्हा तिचा तिसरा जन्म होतो. एका २० वर्षाच्या कालखंडात एखाद्या स्त्रीला जेव्हा तिन जन्म घ्यावे लागतात तेव्हाच कुठे आई होण्याचं भाग्य तिच्या नशिबी येते.जेवढं तिचं भाग्य असतं तेवढच तिच्या पोटी जन्माला आलेले प्रत्येक स्त्री-पुरुषाचं परम भाग्य असतं की तिने स्वत:च्या तिन जन्मातून आपल्याला जन्माला घातलेलं आहे. परंतु आपण खरचं त्या आईचे आईपण किंवा तिचे तिन जन्म लक्षात ठेवतोत का?, उभ्या आयुष्यात आई मुलांना भरपूर देऊन जाते पण ती कधीच रिती होत नाही. तिच्याकडे प्रेम, वात्सल्य, ममता गच्च भरलेलं असतं. या तिन्हीही शब्दातील मायेची श्रीमंती तिच्याकडे ओसंडून वाहत असते. ति सातत्याने सागरासारखी समृद्ध असते. कसं जमत असेल हो जगभरातील मातांना, कुठली ऊर्जा मिळत असेल त्यांना, आई कुठल्याही राज्यात असो, प्रदेशात असो, देशात असो, गावात असो की शहरात असो, झोपडीत असो की महालात असो, कुठल्याही जाती-धर्मात असो तरी तिचं प्रेम हे सारखच कसं असतं हो. जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही, कोणत्याही सिमांना, बांधांना ती अडखडत नाही. जगभरातील आयांची भाषा सारखीच कशी असते हो, तिच्या स्पर्शाचं वात्सल्य सारखच कसं? हे सर्व बारकाईने पाहितलं तर त्याचं उत्तर मिळणं आयांच्या पोटी जन्म घेतलेल्यांना अद्यापतरी सोपं झालेलं नाही. ज्या प्रश्‍नाचं उत्तरच मिळत नाही, ज्या आईच्या प्रेम, वात्सल्य आणि ममतेचं धोरणच अकलनापेक्षा पुढचं असेल तर मग ती आई आणि तिचं हृदय किती प्रेमळ असेल. आई म्हणताच पाषाणालाही पाझर फुटतो, आईच्या कुशीमध्ये विसावल्यानंतर अवघ्या जगाचं दु:ख विरुळून जातं, आईच्या दुधानेच तुमच्या आणि माझ्या कर्तृत्व कर्माची पताका फडकत असते. आपल्याकडे आईला अनन्यसाधारण महत्व आहे. जगाच्या पाठीवर आईच्या व्याख्या अनेकांनी मांडल्या, कोणी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,’ असं म्हटलं तर साने गुरुजींची आई घराघरात जाऊन पोहचली. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या विज्ञानाच्या युगात जगाच्या पाठीवर सर्वकाही मिळेल परंतु आई मिळणार नाही हे त्रिवार सत्य असले तरी जगातली सर्वात श्रीमंत असणार्‍या आईला किंमत दिली जाते का हो, बिचारी आई घरामध्ये असते, घरातला वंशाचा दिवा टेंभा म्हणून मिरवत असतो. शाळेतून, कॉलेजातून येईल, दफ्तर तसच घरामध्ये फेकून देईल, कपडे कुठे तरी फेकून देईल, आई ओरडेन, ‘बाळा जेवण कर,’ हा ऐकून न ऐकल्यासारखं करेल. पुन्हा आई आवाज देईल, हा काहीतरी खटाटोप करत बसेल, आई जवळ येईल. त्या दिवट्याच्या डोक्यावरून हात फिरवील, बळजबरीने जेवायला बोलवील, हा वंशाचा दिवा दोन घास खाईल, पण त्यातही आईने बनवलेल्या स्वयंपाकातल्या त्रुटी काढीन, आईला त्याचा राग येणार नाही, परंतु लेकरु जेवलं याचा तिला परमानंद होईल. लाडाची लेक येते, ती आरशासमोर उभा राहते, टेप रेकॉर्डरवर गाणं चालू असतं, लाडाची लेक त्या गाण्यामध्ये धूंद असते, लेकीला दोन घास खाऊ घालावे यासाठी आई खटाटोप करत असते, लेक मात्र आईशी तुसड्यापणाने वागते, तरीही आई तिला जेऊ घालतेच. मग आई म्हणणार्‍या या बाईचा नवरा घरी येतो. मटनाच्या बोट्या शिजवायला सांगतो, थोडसं मिठ कमी पडलेलं असतं, दिवसभर राबराब राबून तिने संध्याकाळचा स्वयंपाक केलेला असतो, बाईचा नवरा असलेला हा तिच्या आईपणाकडे लक्ष देत नाही. सरळ तिला नाव ठेवून मोकळा होतो. ती बिचारी कसंबसं दोन लेकरांना आणि कुंकवाच्या धन्याला पोटभर मिळावं यासाठी प्रयत्न करत असते. मग घरामध्ये असो, अथवा नसो ती काटकसर करेल, स्वत:चं पोट मारेल परंतु आपल्या लेकरांना पोटभर घालेल, अशी ती माय. काय सांगावं, काय वर्णावं, काय बोलावं, आई आणि तिच्या ममता, वात्सल्य, प्रेमाबद्दल? जगाच्या पाठीवर असं कुठलच विद्यापीठ नसेल आणि असा कुठलाच कुलपती नसेल की त्या विद्यापीठामध्ये तो आपलं आयुष्य जगण्यात अपयशी झाला आहे. आई हे चालते-बोलते विद्यापीठ आहे. आई ही कुलपती आहे, आई ही जन्मदात्री आहे. आई माय हिचे तुमच्या-आमच्यावर अनंत उपकार आहेत. तरीही घराघरांमध्ये आईची अवहेलना सुरुच आहे. संताप येतो त्या दिवट्यांचा, संताप येतो त्या लेकींचा ज्या आईच्या पोटी जन्मल्या आणि म्हातारपणी त्याच आईला विसरले. आज २१ वे शतक आहे. जग मंगळावर, चंद्रावर चाललं. लोक चंद्र-तारे स्पर्श करू लागले. प्रत्येकाला प्रचंड भौतिक सुख मिळू लागलं, आनंद ही आनंद गडे जिकडे -तिकडे चोहीकडे, असे असताना जिकडे तिकडे आयांच्या आणि मायांच्या डोळ्यात अश्रूही आणू लागले. दुर्दैव याचं वाटतं, संस्कार आणि संस्कृतीचा अक्षरश: खजिना म्हणून ज्या भारत देशाकडे पाहितलं जातं त्याच भारत देशामध्ये वृद्धांचे आश्रमे वाढत आहेत. जिथं प्रेम आहे, वात्सल्य आहे, ममता आहे तिथच वृद्धाश्रमांसारखे मसनवाटेही मोठमोठे होत आहेत. ज्या आईने पदराखाली घेऊन दूध पाजलं, पाऊस लागेल म्हणून स्वत: पावसात भिजली परंतु लेकराला पाऊस लागू दिला नाही, स्वत: उन्हात उभी राहिली, डोक्यावर कडाक्याचं ऊन घेतलं पण लेकराला स्वत:च्या सावलीत विसावा दिला. स्वत: चार ठिगळ्याचं लुगडं घातलं परंतु काहीही करून शाळेचा गणवेश लेकराला दिला. चार दारची भांडीकोंडी केली, शेतापोता बराशी खांदल्या, घामाचं रक्त ओकलं, रातच्याला पाणी पिऊन झोपली, परंतु लेकरांच्या शाळेची, महाविद्यालयाची फि भरली. हेच पोरगं मोठं झालं, नोकरीला लागलं, त्याचं लग्न झालं, आता त्या आईचे, त्या माईचे कष्टाचे दिवस संपले. चार घास सुखाचे खाईल, राणीसारखी राहिल, असं तिलाही वाटलं परंतु नाही घरात आलेल्या सुनेने दिवट्या मुलाला सांगितले, उचला या खद्रावळीला आणि नेऊन टाका आश्रमात. हाही बहाद्दर उठला, बिचार्‍या म्हातार्‍या आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. काही वेळ आईला संताप आला, मात्र आई ती आई असते, वृद्धाश्रमात जात असताना आई त्या दिवट्याला म्हणाली, सांभाळून जा, घरी जाऊन सुनबाईला बोलू नकोस, सुखाने संसार कर, माझी काही काळजी करू नकोस. आता काय पिकलं पान आज ना उद्या गळणारच, तुला उभा आयुष्य पडलय. माझी काळजी सोडून दे. काय म्हणावं या मातेच्या हृदयाला आणि तिच्या हृदयात असलेल्या सागरापेक्षाही मोठ्या दयेला. आज मातृदिन आहे म्हणून आईचा महिमा वर्णवावा, असं वाटलं, परंतु दोन बोटाच्या जागेत आणि एका कांडीत चार कागदात आईचा महिमा वर्णवणं अशक्य आहे. आई ही आईच. तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिची ममता जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात, रुपयात, पैशात, सोन्यात, नाण्यात, हिरे जवाहारात तोलूनही मिळणार नाही. दुर्दैव याचं वाटतं, आम्ही ग्रामीण भागासह शहरी भागात पाहतो, जे सुशिक्षित म्हणून टेंभा मिरवतात, ज्यांच्याकडे खायला पोटभर असते अशा लोकांच्या घरी आई-बापांना चार-चार मुलं असतात, म्हातारे झालेले असतात परंतु म्हातारे आई-बाप कोणी सांभाळायचे? यावर त्या चौघात वाद होतात. बाप एकाने सांभाळायचा, माय दुसर्‍याने सांभाळायची त्यातही त्यांना महिने वाटून दिलेले. माय-बापाच्या वाट्याला जी थोडीफार संपत्ती आलेली असते ती ज्याच्याकडे असेल एक तर त्यानेच सर्व काही करायचं, तोही बोट मोडतोच, त्याची बाईलीही दातखिळी बसवतेच. काय ही अवहेलना! जेव्हा म्हातार्‍या आई-बापांना लेकरांची गरज असते, मानसिक आधाराची गरज असते, तेव्हाच म्हातार्‍या आई-बापांची ताटातूट केली जाते. चित्रपटांमध्ये आणि कथांमध्ये म्हातार्‍या आई-बापांच्या व्यथा पाहताना आणि वाचताना डोळ्यांचे काठ समाजासाठी ओलावणारे दिवटेही दिसून येतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील नायकांचा नायक अभिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आहे ‘बागबान’ हा चित्रपट पाहताना फ्लॅटसिस्टम संस्कृतीतलं जोडपं अक्षरश: मुसूमुसू रडतं. चित्रपट संपल्यावर पोटभरून खातं, त्या फ्लॅट संस्कृतीतल्या जोडप्यातल्या दिवट्याला आई-बापाची काही काळ आठवणही येत असेल परंतु सकाळ उजळली की पुन्हा जशाला तसं राहतं. श्रीमंतांच्या, पैशावाल्यांच्या, नोकरदारांच्या आणि ज्यांना चार-चार मुलं आहेत अशांच्या म्हातार्‍या आई-बापांना जेव्हा वृद्धाश्रमात जायची वेळ येत असेल तेव्हा त्यांना काय वाटत असेल? पण तरीही तरीही माय आपल्या लेकराचं भलच जाणते. अजून वेळ गेलेली नाही, या देशामध्ये आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये औषधालाही वृद्धाश्रम नकोय. वृद्धाश्रमाचा शब्दही कानी पडला तर त्याची चिड प्रत्येकाला यावी. ज्या आई-बापाने उभं आयुष्य चंदनासारखं झिजवून आपल्या लेकाला - लेकीला समाजात चालणं-बोलणं शिकवलं, त्याचं भविष्य घडवलं त्या लेकराने मरेपर्यंत आई- बापांची सेवा करणं हेच आपलं ध्येय समजायला हवं. जिवंतपणी आई-बापांची हालअपेष्टा करायची आणि मेल्यानंतर पिंडदानाच्या नावााखाली उधळपट्टी करायची, देव हा पहायचा असेल तर आईच्या डोळ्यात पहा, तिच्या हृदयात पहा, तिच्या कष्टात पहा, तिच्या ममतेत पहा, तिच्या वात्सल्यात पहा, तिच्या त्यागात पहा. प्रेमाची श्रीमंताची ओसंडून वाहताना दिसेल

साय दै बीड रिपोर्टर मधील आजचा रविवार १४ मे चा अग्रलेख

3 comments:

  1. सर आईचं प्रेम खुप सुंदर रेखाटले,आणि वास्तवाशि स्पर्श करत शब्दात चित्र उमटवले,ज्या देवा साठी पंढरपूर ला जातात तो देव आईवडिलाची सेवा करणार्या पुंडलिकासाठी आला हे लोक दर्शन घेतांना विसरतात!बाप आणि माय हेच खर दैवत आणि देवता आहेत हे का ?विसरता!

    ReplyDelete